सोमवार, २९ नोव्हेंबर, २०१०

बाबांच्या रुपात लाभले आबा...

संपूर्ण महाराष्ट्रातच मागास जिल्हा म्हणून पाहिल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यास आर. आर. पाटील उर्फ आबा यांची पुन्हा एकदा पालकमंत्री या नात्याने नियुक्ती झाली आहे. जिल्ह्यास आबा हे बाबांच्या रुपात अर्थातच खरोखर पालकाच्या, वडिलांच्या रुपात लाभले आहेत.
खरंतर दुर्गम अशा भागात, ते सुद्धा मागास भागात जाण्यास, जिथे नक्सलवादी केव्हा, कधी, कुठून कसे येतील आणि हल्ला करतील हे सांगता येत नाही, अशी ख्याती आणि भीती तिथे असलेल्या अधिकाऱ्यांना वाटत आहे, अशा भागाची जबाबदारी तेही पालकमंत्री पदासारखी महत्वाची जबाबदारी स्वीकारणे म्हणजेच धाडस आणि धारिष्ट्याचे आहे.  कोणतीही सुरक्षा व्यवस्था न घेताच बाईकवरून फिरून ग्रामस्थांकडून वस्तूस्थिती जाणून घेणे ही छोटी गोष्ट नाही. शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे, पोलिस कर्मचारी-अधिकारी अडचणी सोडविणे आदी गोष्टींमुळे गडचिरोली जिल्ह्याचा कायापालट नक्की होईल, परीसरातील बेरोजगारी कमी होण्यास मदत होऊन वाईट मार्गाला लागलेले युवक पुन्हा एकदा समाजात येऊन ताठ मानेने जगायला शिकतील, हाच विश्वास, हीच अपेक्षा.

रविवार, २८ नोव्हेंबर, २०१०

वाघांचे मृत्यू- संगोपनाचा विचार व्हावा

चंद्रपूर येथे नुकताच एक वाघ मृत्यूमुखी पडला. देशात दिवसेंदिवस वाघांच्या संख्येत लक्षणीय घट होत आहे. यावर शासन चिंताग्रस्त आहे. परंतु यासंदर्भात प्रभावी उपाययोजनांची गरज आहे. पुन्हा एकदा सर्कशींना वाघांचे खेळ करण्यास परवानगी देण्याचा शासनाने विचार करावा. जेणे करून किमान वाघांचे संगोपन, देखभाल व्यवस्थित होऊन त्यांची संख्या देखील वाढेल, हे निश्चित...।

कांद्याने केल्या गुदगुल्या...

मध्यंतरी झालेल्या अकाली पावसामुळे राज्यासह देशाच्या अनेक भागात मुख्यत्वे कांदा हे हाती आलेले पीक खराब होऊन कांद्याने न चिरताच डोळ्यात पाणी आणले होते. सुमारे चाळीस रुपयांपर्यंत कांद्याचे भाव गेल्यानंतर शासनाने त्वरीत हालचाली केल्यामुळे काही राज्यात जाणवणारी कांद्याची कमतरता आणि परिस्थितीनुरुप वाढलेले भाव कमी होण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्र आणि राजस्थानमधून कांदा संबंधित राज्यात पुरवला जाणार असल्याचा निर्णय कृषि मंत्रालयाने घेतला आहे.
खाण्यासाठी आणि स्वयंपाकात चवीपुरता का होईना, कांदा मिळणार असल्याचा आनंद आणि गुदगुल्या ग्राहक आणि गृहिणींना होत आहे.

शनिवार, २७ नोव्हेंबर, २०१०

आदर्श गृहनिर्माण सोसायटीच्या कागदपत्रे गहाळ

आदर्श गृहनिर्माण सोसोयटीची कागदपत्रे गहाळ झाल्याबद्दल विभागाचे नगरविकास विभागाचे सचिव गुरुदास बाजपे यांनी पोलिसांकडे लेखी तक्रार दिल्यानंतर मरिन ड्राईव्ह पोलिसांनी शुक्रवारी रात्री अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तत्कालिन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना आदर्श गृहनिर्माण सोसोयटीतील सदनिका प्रकरणी राजीनामा देण्याच्या हाय कमांडने केलेल्या सूचनेमुळे त्यांनी राजीनामा दिला होता. यानंतर मुख्यमंत्री पदावर काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांची वर्णी लागली. स्वच्छ प्रतिमा असलेले पृथ्वीराज चव्हाण अशी त्यांची ख्याती आहे. आगामी निवडणुका ध्यानात घेऊन काँग्रेसने चांगली खेळी खेळल्याचे आता विरोधकांचा आरोप खरा असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. इतक्या मोठ्या प्रकरणाची कागदपत्र गहाळ होतातच कशी? आता आदर्श गृहनिर्माण सोसायटीच गहाळ न होवो म्हणजे मिळवले..। तसे येत्या डिसेंबरमध्ये आदर्श सोसायटीची जागाच जमीनदोस्त करण्यात येण्याच्या वृत्ताला सूत्रांनी अप्रत्यक्ष दुजोरा दिला आहे. यातच सर्व काही आले असल्याचा सूर आहे.

विठ्ठल उमप यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची आदरांजली

मुंबई. ता. 26-  जांभूळ-आख्यान या विस्मरणीय लोकनाट्यामुळे जनमानसांवर अधिराज्य गाजविलेले लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या निधनामुळे महाराष्ट्राचा लोकरंगनायक काळाच्या पडद्याआड गेला. मनोरंजन आणि प्रबोधन यांची सुरेख सांगड घालणारे स्व. उमप यांनी अखेरच्या श्वासापर्यंत रंगभूमीची सेवा केली, या शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शोक व्यक्त केला.

लोककलेचा जाणता रंगकर्मी हरपला-उपमुख्यमंत्री पवार

लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या निधनामुळे लोककलेचा जाणता रंगकर्मी हरपला आहे, या शब्दात उपमुख्यमंत्री विठ्ठल उमप यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदरांजली अर्पण केली.
श्री. पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे, की उमप यांनी लोककलेचा प्रत्येक कलाप्रकार आत्मीयतेने हाताळला. जांभुळ-आख्यान सारखा कार्यक्रम सादर करून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती. वयाच्या 80 वर्षानंतर देखील ते तळमळीने लोककला सादर करीत होते. श्वासाच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते
कार्यरत होते आणि लोककलेची साधना करीत होते.

उपेक्षितांच्या दुःखांना वाचा फोडणारा कलावंत हरपला - छगन भुजबळ

लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या निधनाने फुले-शाहू-आंबेडकरांचा महान वारसा जोपासणारा आणि आपल्या कलेच्या माध्यमातून उपेक्षितांची दुःखे अभिजनांपर्यंत पोचविणारा अस्सल लोककलावंत काळाच्या पडद्याआड गेला आहे. महात्मा जोतीराव फुले याच्या अखंडावर आधारित "गीतफुले' या मी निर्माण केलेल्या ध्वनिफितीमध्ये उमप यांनी "सर्वांचा निर्मिक आहे एक' ही कविता म्हटली होती. उमप यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त नुकताच माझ्या हस्ते त्यांचा सत्कार झाला होता. शाहीर उमप यांच्या निधनाने आंबेडकरी लोकचळवळीचे आणि राज्याच्या लोककला क्षेत्राचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. शाहीर आत्माराम पाटील यांच्यापाठोपाठ महाराष्ट्राने आपला आणखी एक महान लोककलाकार गमावला आहे.

झी मराठी वाहिनीवर अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या सारेगमप या संगीत मालिकेचे ते मार्गदर्शक होते.

शुक्रवार, २६ नोव्हेंबर, २०१०

How to enable touchpad of notebook/laptop having Windows 7 operating system?

Firstly restart you system. Then open Control Panel, after that click on System restore. Wait few seconds..follow instructions (if appear).

 Go to-   Control Panel > System restore

Only, do this, thats all..! Bss!..आपका काम हो गया, आपले काम झालेच..। एकदम सोप्पी गोष्ट करा.

Sushrut Jalukar.

बुधवार, २४ नोव्हेंबर, २०१०

तेंडुलकरने "टुरिझम ब्रँड ऍम्बॅसेडर" होण्यासाठी भुजबळ यांची विनंती

मुंबई, ता. २४- सन २०११ हे वर्ष महाराष्ट्र शासन पर्यटन वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी महाराष्ट्राचा "टुरिझम ब्रँड ऍम्बॅसेडर" होण्याची विनंती पत्राद्वारे केली आहे. तेंडुलकर यांच्या सहमतीसाठी कृषिमंत्री व आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांनाही केली आहे.
भारतीय पर्यटन विकास महामंडळाने अभिनेता आमीर खान, झारखंडने महेंद्रसिंग धोनी, गुजरातने अभिनेता अमिताभ बच्चन यांची "टुरिझम ब्रँड ऍम्बॅसेडर" म्हणून नियुक्ती केली आहे. याच धर्तीवर तेंडुलकर यांची नियुक्ती करावी अशी भुजबळ यांची इच्छा असून त्यांनी तसे पत्र तेंडुलकर यांना पाठविले आहे. भुजबळ यांच्याकडे याव्यतिरिक्त सार्वजनिक बांधकाम विभागाचा कार्यभार असल्यामुळे, ज्या पर्यटनस्थळांकडे जाण्यासाठी दळणवळणाच्या योग्य सुविधा नाहीत त्या उपलब्ध करता येऊ शकतील. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून पर्यटकांना पंचतारांकित सोयी-सुविधा देखील उपलब्ध करून देण्यावर आपला भर राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सन २०११ हे पर्यटन वर्ष म्हणून साजरे करीत असताना संपूर्ण महाराष्ट्रातील पर्यटनाच्या संधी पर्यटकांना समजाव्यात, देशातील तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी राज्याकडे आकृष्ट व्हावे आणि राज्याच्या महसूलात पर्यटनाद्वारे अधिकाधिक वृद्धी व्हावी, यादृष्टीने योग्य प्रचार-प्रसिद्धीची गरज त्यांनी प्रतिपादित केली.

शासनातर्फे विविध क्रीडास्पर्धांना ५० लाखांचे अनुदान

मुंबई, ता. २४- राज्यातील प्रत्येक जिल्हा कबड्डी असोसिएशनला सिंथेटिक मॅट उपलब्ध करून दिली जाईल. याचबरोबर राज्यात दरवर्षी होणार्‍या "छत्रपती शिवाजी चषक कबड्डी स्पर्धे" सह इतर विविध क्रीडा स्पर्धांसाठी शासनातर्फे प्रत्येकी ५० लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री व राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी दिली.
राज्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री ऍड. पद्माकर वळवी, क्रीडा विभाग सचिव संजय कुमार, क्रीडा विभागाचे सचिव संजयकुमार यावेळी उपस्थित होते.
यावेळी अजित पवार म्हणाले, की कबड्डी हा खेळ मातीवर खेळला जातो परंतु याचा प्रसार आता आंतरराष्ट्रीय स्तरावर झपाट्याने होत आहे. परिणामी, नजीकच्या काळात कबड्डी मॅटवर खेळणे अनिवार्य होईल. यादृष्टीने राज्यातील खेळाडूंना सिंथेटिक मॅटवर कबड्डीचा सराव करणे आवश्यक असल्याने प्रत्येक जिल्ह्यास एक सिंथेटिक मॅट शासनाच्या निधीतून उपलब्ध करून दिली जाईल.
राज्यात दरवर्षी राष्ट्रीय स्तरावर पुरुष/महिलांची "छत्रपती शिवाजी चषक कबड्डी स्पर्धा" आयोजित केली जाते. यासाठी शासनातर्फे २१ लाखांचे अनुदान दिले जात असे. मात्र गत कालावधीतील विविध बाबींच्या किंमतीत झालेली वाढ लक्षात घेऊन आता ५० लाखांचे अनुदान उपलब्ध करून दिले जाईल.
कबड्डी स्पर्धेप्रमाणेच शासनाच्या वतीने आयोजित करण्यात येणार्‍या "कै. खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा, कै. भाई नेरूरकर चषक खो-खो स्पर्धा" आणि व्हॉलिबॉल स्पर्धेसाठी सुद्धा प्रत्येकी ५० लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.

भारत पुन्हा आठव्या स्थानावर

चीनमधील ग्वांगझू येथे सुरू असलेल्या आशियाई क्रिडा स्पर्धांमध्ये १४ व्या स्थानावर घसरलेल्या भारतीय स्पर्धकांनी पुन्हा एकदा दैदिप्यमान कामगिरी करून क्रमवारीमध्ये भारताला आठव्या स्थानावर आणले आहे. आतापर्यंत (हे वृत्त लिहिपर्यंत) भारताला सुवर्ण- 7, रजत-१२ आणि कांस्य 20 पदके मिळाली आहेत.
यजमान चीन प्रथम, दक्षिण कोरिया द्वितीय आणि जपान तृतीय स्थानावर आहे.

मुख्यमंत्रीपद टिकवून ठेवण्यात येडियुरप्पा यशस्वी

कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा आपले मुख्यमंत्रीपद टिकवून ठेवण्यात यशस्वी झाले आहेत. आपल्याला पदउतार करण्याच्या पक्षाच्या निर्णयाला त्यांनी आव्हान देऊन बुद्धीकौशल्याने यातून सोडवणूक करून घेतली.
भूखंड गैरव्यवहार प्रकरणी राजीनामा देण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यावर दबाव वाढत होता. दरम्यान भूखंड गैरव्यवहारात नाव गोवले जाताच, येडियुरप्पा यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या ताब्यातील भूखंड शासनास परत केले होते. यामुळे येडियुरप्पा यांची बाजू आणखी मजबूत झाली. या प्रकरणी त्यांना चर्चेसाठी भाजप पक्षश्रेष्ठींनी दिल्ली येथे बोलावले असता, प्रारंभी स्वतः न जाता त्यांचे दोन विश्वासू मंत्री दिल्ली येथे पाठवून चर्चा करण्यात आली. तत्पूर्वी श्री. येडियुरप्पा पुट्टूपूर्ती येथे जाऊन सत्यसाईबाबा यांच्या वाढदिवस सोहळ्यात सहभागी झाले होते. त्यांनी यानंतर दिल्ली गाठून माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा आणि रेड्डी यांच्या घोटाळ्याच्या फाइलीच सोबत ठेवल्या होत्या.
पक्षनेत्यांनी दिलेला आदेश पाळू अशी भूमिका कायम ठेवून अन्यथा पाठिंबा काढून घेण्याबाबत खडसावायला सुद्धा ते विसरले नाहीत. येडियुरप्पा यांना कर्नाटकच्या खासदारांनीही पाठिंबा जाहीर केला असून आपले नाणे खणखणीत असल्याचे येडियुरप्पा यांनी सिद्ध केले आहे.

बिहारमध्ये नितीशच्या नीतिची सरशी- १८४ जागांवर यश

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत २४३ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली जनता दल (संयुक्त) आणि भाजपा युतीने लढविलेल्या निवडणुकीत युतीला १८४ जागांवर यश मिळाले. विविध राजकीय पक्षांनी देखील नितीशकुमार यांना यशाचे धनी म्हणून श्रेय दिले आहे.
नितीशकुमार यांच्या काळात कायदा सुव्यवस्था सुधारल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. नितीशकुमार यांनी खरोखरच विकास केला असून येत्या काही वर्षात बिहार राज्याविषयी असलेली मलिन प्रतिमा पुसली जाईल अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली. विकासाच्या राजकारणालाच नागरिकांनी कौल दिल्याचे मत भाजप चे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. नितीशकुमार मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची हॅट-ट्रिक गाठणार आहेत. यापूर्वी २००५ मध्ये देखील ते बिहारचे मुख्यमंत्री होते. परंतु २००० मध्ये मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर बहुमत सिद्ध न करू शकल्यामुळे अवघ्या सात दिवसातच त्यांना राजीनामा देणे भाग पडले होते. अभियंता असलेले नितीश उच्च विद्या विभूषित असल्यामुळे बिहारचे दिवस नक्की बदलतील असा ज्येष्ठ नागरिकांना देखील विश्वास आहे.

सोमवार, २२ नोव्हेंबर, २०१०

हिवाळी अधिवेशन निवासव्यवस्थेबाबत भुजबळ यांनी घेतला आढावा

नागपूर, ता. २१- येत्या १ डिसेंबरपासून नागपूर येते सुरू होत असलेल्या विधीमंडळ-हिवाळी अधिवेशनाचा राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी बैठकीत आढावा घेतला. यानुसार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच पीठासन अधिकार्‍यांच्या निवासस्थानांखेरीज यंदाही, रवीभवन येथे २४ कॅबिनेट मंत्री व १० राज्यमंत्र्यांसाठी निवास व्यवस्था करण्यात आली आहे. अन्य अधिकारी, कमर्चारी यांच्यासाठी निवासव्यवस्था पूर्ववत राहील. कर्मचार्‍यांसाठी १६० सह ६४ अतिरिक्त निवासी गाळ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. वृत्तपत्र प्रतिनिधींची निवास व्यवस्था देखील 'सुयोग' येथे करण्यात आल्याचे सचिव नंदकुमार जंत्रे यांनी सांगितले. बैठकीस सामान्य प्रशासन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग सचिव, विविध विभाग वरिष्ठ अधिकारी, नागपूर येथील स्थानिक अधिकारी उपस्थित होते.

विक्रोळी रेल्वे अपघात प्रकरणी शासनाकडून दखल पंधरा दिवसात संयुक्त बैठक: भुजबळ

मुंबई, ता. २२- विक्रोळी येथे रविवारी झालेल्या रेल्वे अपघातात तीन व्यक्ती ठार झाल्याची शासनाने गंभीर दखल घेतली असून पंधरा दिवसात यासंदर्भात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांच्यासह महानगरपालिका तसेच रेल्वे प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आज दिली.
विक्रोळी येथील रेल्वे अपघात प्रकरणी मंत्रालयातील दालनात श्री. भुजबळ यांनी आज बैठक घेतली. दुर्लक्ष करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याचे अधिकार राज्य शासनास असल्याचे भुजबळ यांनी रेल्वेला बजावले. यावेळी भुजबळ म्हणाले की, मुंबई महानगरमध्ये दरवर्षी सरासरी चार हजारपेक्षा अधिक व्यक्ती रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडतात. सुमारे २५०० व्यक्ती अपंग होतात. म्हणजेच दररोज सरासरी ११ ते १२ व्यक्ती मृत्युमुखी पडतात, पाच ते सहा व्यक्ती अपंग होतात. रेल्वे प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घ्यावी. विक्रोळीसारखी अशी जी ठिकाणे आहेत त्या सर्व ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे. विक्रोळी येथील या ठिकाणी ओव्हरब्रिज उभारण्याची प्रक्रिया येत्या पंधरा जानेवारीपर्यंत पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरवात करावी. यासाठी आवश्यक ते सर्वेक्षणही पूर्ण व्हावे. बैठकीस गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यासह रेल्वेचे प्रशासन अधिकारी, वरिष्ठ पोलिस अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान काल (ता. २१) विक्रोळी स्थानकात संतप्त नागरिकांनी रेल रोको आंदोलन केल्यामुळे रेल्वेची उपनगरी व मेल एक्सप्रेस सेवा सुमारे चार तास ठप्प झाली होती. गृहमंत्री आर. आर. पाटील, रेल्वे पोलिसांनी याप्रश्नी दिलेल्या आश्वासनानंतर रेल रोको आंदोलन मागे घेण्यात आले होते.

भारताची ३७३ धावांची आघाडी: डाव घोषित

नागपूर, ता. २१- राहुल द्रविडने केलेल्या १९१ धावा आणि महेंद्र धोनी याने त्याला दिलेली उत्कृष्ट साथ यामुळे आज भारताने ५६६ धावा करून आपला डाव घोषित केला. नागपूर येथे सुरू असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम कसोटी सामन्यात आज सकाळीच सचिन तेंडुलकरने अवघ्या चार धावा काढून काही मिनिटातच मैदानातून परतला. सचिन आज आपले पन्नासवे शतक झळकावणार असे सगळ्यांनाच वाटत असताना चार धावा काढून ६१ धावांवर बाद झाल्यामुळे त्याला तंबूत परतावे लागले होते. यानंतर राहुल द्रविड आणि महेंद्रसिंह धोनी यांनी सुरेख खेळून द्रविड १९१ तर धोनीने ९८ धावा काढल्या. यात द्रविड याने एकूण २१ चौकार मारून आपले एकतिसावे शतक पूर्ण केले.

येडियुरप्पा अखेर दिल्लीकडे..

भूखंड गैरव्यवहार प्रकरणी अनेक दिवसांपासून वादाच्या भोवर्‍यात सापडलेले कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा आज (ता. २२) दुपारी हे वृत्त लिहिपर्यंत दिल्लीकडे रवाना झाले. भाजपा पक्षश्रेष्ठींनी त्यांना रविवारीच दिल्ली येथे बोलावले होते, परंतु ते दिल्ली येथे न जाता पुट्टूपूर्ती येथे सत्य साईबाबांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी व सत्य साई यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते. सोमवारी सकाळी येडियुरप्पा यांनी आपले दोन विश्वासू मंत्री दिल्ली येथे चर्चेसाठी पाठविल्याचे खात्रीलायक वृत्त होते. भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांना पक्षाने याप्रकरणी निर्णय घेण्याचे सर्वाधिकार दिले आहेत. दरम्यान भूखंड प्रकरण चव्हाट्यावर येताच येडियुरप्पा यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या ताब्यातील भूखंड शासनास परत केले होते.
काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना देखील मुंबईच्या आदर्श गृहनिर्माण संस्था प्रकरणी राजीनामा देऊन पदच्युत व्हावे लागले. हे प्रकरण शमत नाही तोच येडियुरप्पा यांचे प्रकरण समोर आले.

सचिनच्या चाहत्यांची निराशा- शतक हुकले

नागपूर, ता. २१- फटकेबाज सचिन तेंडुलकरचे आज शकत हुकल्यामुळे त्याच्या चाहत्यांची निराशा झाली. नागपूर येथे सध्या न्यूझीलंड विरुद्ध सुरू असलेल्या तिसर्‍या कसोटी सामन्यात काल खेळ थांबला तेव्हा सचिनच्या ५७ धावा झाल्या होत्या. आज सचिन शतक पूर्ण करेल अशी अपेक्षा अनेकांना होती. परंतु आज सचिन केवळ आणखी चार धावांची भर घालून अवघ्या ६१ धावांवर बाद झाला. त्याला न्यूझीलंडच्या अँडी मॅके याने बाद केले. सचिनचे होणारे शतक हे पन्नासवे शतक असल्यामुळे आज तो आपले ५० वे शतक नागपूर येथे पूर्ण करेल असे दिग्गजांसह त्याच्या चाहत्यांना देखील वाटत होते.

अकाली पावसाच्या नुकसानीचा लवकरच पंचनामा

राज्यात ठिकठिकाणी झालेल्या अकाली पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन, लवकरच पंचनामा देखील करण्यात येईल. यानंतर आर्थिक मदत देण्याबद्दल निर्णय घेण्यात येईल. अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. 

फुले दाम्पत्याचे विचार आजही मार्गदर्शक- के. शंकरनारायणन्

मुंबई, ता. २१- देशातील सामाजिक तसेच आर्थितक विषमता दूर करण्यासाठी सकारात्मक परिवर्तनाची गरज आहे. यासाठी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार आजही मार्गदर्शक आहेत. असे प्रतिपादन राज्यापाल के. शंकरनारायणन् यांनी केले.
वांद्रे (पश्चिम) येथील मुंबई एज्युकेशनल ट्रस्टच्या संकुलात उभारण्यात आलेल्या महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण केल्यानंतर झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. ते म्हणाले, की देशाला महासत्ता बनविण्यासाठी, परिवर्तनाची मोठी आवश्यकता आहे. दैनंदिन जीनवात आपण सातत्याने छोटेमोठे बदल स्वीकारतो. मात्र, तेव्हाच देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेले बदल देखील वेळोवेळी स्वीकारले पाहिजे. यासाठी आर्थिक, सामाजिक परिवर्तनाची गरज असून हे केवळ फुले दाम्पत्याच्या विचारांमधूनच शक्य आहे. आजच्या महिला आणि विद्यार्थीनी यांनी फुले दाम्पत्याचे आभार मानले पाहिजे, कारण त्यांच्यामुळेच आज आपण सर्वच क्षेत्रात पुरूषांच्या बरोबरीने वावरत आहात. महात्मा फुले पायाभूत सुविधांचे एक कृतीशील विकासक होते.
गुलामगिरी, शेतकर्‍याचा असूड आदी पुस्तकांबरोबरच मंडळी आणि सत्यशोधक समाज संस्था आदी माध्यमातूनही त्यांनी आपल्या सामाजिक कार्याचा, विचारांचा प्रसार केला. त्यांनी मांडलेले त्री-भाषा सूत्र आज संपूर्ण भारतात वापरले जात आहे, असे मत राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. देशात  विकास घडवून आणण्यासाठी युवा पिढीने फुले दाम्पत्याचा आदर्श आपल्यासमोर ठेवून सामाजिक  परिवर्तनाचे दूर बनले पाहिजे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळूकर यांनी केले. आमदार पंकज भुजबळ यांनी आभार मानले.

कांद्यामुळे रडणे काय, आता कांदाच विसरा...

अकाली पावसामुळे यंदा राज्यात ठिकठिकाणी कांदा अक्षरशः फेकून द्यावा लागला. परिणामी ऐन हातातोंडाशी आलेला शेतकर्‍यांचा घास निसर्गाने हिरावून घेतला. याचबरोबर जेवणाची चवही बदलली. मध्यंतरी, कांदा ५० रुपयांपर्यंत महाग होणार, या शक्यतेने रडू कोसळले. परंतु आता मात्र शिल्लक चांगल्या प्रतीचा कांदा रुपयांची शंभरी गाठणार असल्याचे वृत्त आहे. परिणामी कांद्यामुळे रडणे सोडाच, रडून-रडून डोळेही कोरडे झाले असून कांदा विसरण्याचीच वेळ आली आहे.

शुक्रवार, १९ नोव्हेंबर, २०१०

'कसाब' चा पुळका कशाला "साब"...

(संग्रहित छायाचित्र)
देशाची आर्थिक राजधानी मानली जाणार्‍या मुंबईवरील हल्ल्याला येत्या २६ नोव्हेंबरला दोन वर्ष पूर्ण होतील. जवळपास ६० तास सुरक्षा यंत्रणांनी अथक परिश्रम करून अतिरेक्यांच्या ताब्यात असलेली हॉटेल ताजसह इतर ठिकाणे मुक्त केली होती. या हल्ल्यात सुरक्षा यंत्रणांच्या हाती लागलेला एकमेव अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब याला फाशीची शिक्षा होऊन अनेक महिने उलटून गेले. कसाही वागणार्‍या उर्मट कसाबसाठी शासनाला इतका पुळका कशाला हवा?
संपूर्ण देशाच्या सुरक्षा व्यवस्थेलाच आव्हान देत मुंबईतील महत्वाची ठिकाणे ताब्यात घेऊन बेछुट गोळीबार करून देशाच्या अनेक नागरिकांना आणि कर्तव्यासाठी प्राणांची आहुती देणार्‍या अधिकार्‍यांना देखील मारणार्‍या नराधम अतिरेक्यांपैकी कसाब हा एक अतिरेकी सुरक्षा पथकांच्या हाती जखमी अवस्थेत जीवंत सापडला. रुग्णालयातून उपचार घेऊन बरा झाल्यानंतर कसाबची रवानगी तुरुंगात करण्यात येऊन त्याच्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली. स्वतंत्र सेल, स्क्वॉड, यंत्रणा..सर्वच अगदी स्वतंत्र..। खरंतर प्रत्यक्ष सीसीटीव्ही कॅमेर्‍यांनी कसाब याने गोळी झाडताना दाखविल्याची चित्रफीत उपलब्ध असताना आणखी पुरावे मागण्याची मुळात गरजच काय?
कसाब याचे जेवण, राहणी, सुरक्षा व्यवस्थेसाठी विशेष तैनाती, वाहतूक, वहन, तपासण्या, विशेष वकील इ.वर दररोज लाखो रुपये खर्च झाला असून हा खर्च काही कोटी रुपयांच्या घरात तर कधीच पोहोचला आहे. मध्यंतर तो तुरुंगाधिकार्‍यांशी वाईट वागला, कुटे थुंकला, तरीही सर्व काही निमुटपणे सहन करायचे..। इतकी सन्मानाची वागणूक त्याला कशाला हवी? पाकिस्तानमधील भारतीय वंशाच्या लोकांना अथवा भारतीय कैद्यांना मिळणारी वागणूक शासनाने ध्यानात घेणे नितांत गरजेचे आहे. फाशीची शिक्षा झालेल्या आरोपींची शिक्षा कमी करून जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आल्याची देखील अनेक उदाहरणे आजकाल समोर येत आहेत. परंतु इतक्या मोठ्या देशद्रोह्याला, अतिरेक्याला पोलिस संरक्षणाची गरजच का? कसाबकडून मिळवायची तेवढी माहिती घेणे पूर्ण झाल्याचे सुरक्षा यंत्रणेचे सांगितले असल्याचे वृत्त आहे. परिणामी त्याला जनतेच्या सुपूर्द करणे अथवा लवकरात लवकर फाशीची शिक्षा देणे आवश्यक ठरले आहे. दोन वर्ष उलटून देखील अद्याप त्यावर निर्णय न होऊ शकणे ही अतिशय लाजीरवाणी बाब आहे.
अतिरेकी, देशद्रोही यांच्यासाठी विशेष कायद्याची तरतूद घटनेत करण्यात यावी. अशीच परिस्थिती राहिल्यास पाकिस्तानच्या भारत-विरोधी कारवायांना अजिबात पायबंद न बसता उलटपक्षी पोषक वातावरण, परिस्थिती निर्माण होईल. शासनाच्या ताब्यात असलेल्या सर्वच अतिरेक्यांना लवकरात लवकर फाशी देऊन संभाव्य खर्च टाळण्यात यावा. खर्च होणारी रक्कम शहीदांच्या कुटूंबांना दिल्यास मोठा आधार होऊन, त्यांच्या मुलांना उच्च शिक्षण, हवे तसे शिक्षण घेता येईल, देशाच्या शिलकेत एकप्रकारे भरच पडेल, हाच विश्वास!

केंद्रीय माहितीचा अधिकार : जनतेला सिडको प्रशासनातर्फे आवाहन

सिडको महामंडळातील विविध विभागांकडे माहितीच्या अधिकारांतर्गत अर्जदारांकडून अर्ज प्राप्त होत असतात. परंतु काही अर्जदार आपल्या अर्जावर वा अपिलांवर फक्त माहिती अधिकारी एवढेच नमूद करून, संबंधित अधिकार्‍याचा हुद्दा अथवा विभागाचे नाव नमूद न करता अर्ज सादर करीत असतात. यामुळे संबंधित विभागाकडून विहीत कालावधीत अपेक्षित असलेली माहिती ही एकापेक्षा अधिक विभागांशी संबंधित असल्याने संकलन करण्यास अधिक कालावधी लागतो. यामुळे संबंधित विभागाकडून विहित कालावधीलत माहिती उपलब्ध करून देण्यास विलंब होण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाच्या निर्दर्शनास आले आहे.
उपरोक्त बाब लक्षात घेऊन, सिडको प्रशासनाच्या वतीने माहितीचा अधिकार अधिनियमांतर्गत सादर करायचे अर्ज/अपील- महाव्यवस्थापक (प्रशासन) सिडको भवन, तळमजला, यांच्या कार्यालयात स्वीकारले जातील. जनतेच्या सुविधेकरता ही तरतूद येत असून जनतेने कृपया याची नोंद घ्यावी, असे आवाहन सिडको प्रशासनाने केले आहे.
सहाय्यक जनमाहिती अधिकारी जनमाहिती अधिकारी, आणि अपीलिय माहिती अधिकार्‍यांची सुधारित यादी सिडकोच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. याबाबतचा विस्तृत फलक सिडको भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ तळ मजला येथे लवकरच प्रदर्शित करण्यात येईल, असे कळविण्यात आले आहे.

बने चाहे दुश्मन जमाना हमारा..

राजीनामा देण्याचे हे देखील (जवळीक?) एक कारण तर नसेल नां...? (इंटरनेटवर सर्फिंग करता-करता उपरोक्त छायाचित्र सापडले आणि नकळत(बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा...ही  हिंदी गाण्याची ओळ मनाला चाटून गेली...)

लहुजींनी ज्ञानप्रसार केला: प्रा. हरी नरके

मुंबई, ता. १८- महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या शैक्षणिक चळवळीमध्ये क्रांतीवीर लहुजी साळवे यांनी वस्त्यावस्त्यात जाऊन शिक्षणाचे महत्व पटवून देण्याचे काम केले. असे प्रतिपादन प्रसिद्ध संशोधक प्रा. हरी नरके यांनी केले. मुंबई येथे क्रांतीकारक लहुजी साळवे यांच्या २१६ व्या जयंतीनिमित्त भारतीय बहुजन परिषदेच्या वतीने आयोजित पहिल्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
यावेळी प्रा. नरके म्हणाले, की जोतीराव-सावित्रीबाईंना घर सोडावे लागले, तेव्हा लहुजी त्यांच्या मदतीला धावले नसते तर फुले यांचा कार्य बंद पडले असते. आपल्या शैक्षणिक चळवळीचे प्रेरणास्थान म्हणून जोतीराव लहुजींना गुरूस्थानी मानत होते.  साहित्यिकांना सध्या देण्यात येणारे वाड्‍.मय पुरस्कार इंग्रज सरकारला सुरू करायला लावण्यात लहुजींचा मोठा हातभार होता.
मुक्ता साळवे या दलित साहित्यातील आद्य लेखिका असून त्यांचा निबंध दीडशे वर्षांपूर्वी राज्यात गाजला होता. परिक्षेतील पुरस्कार स्वीकारताना आपल्याला खाऊच्या खेळण्याचे बक्षिस नको, तर शाळेला ग्रंथालय द्या अशी मागणी मुक्ताने केली होती. ब्रिडीश राजवटीत दक्षिणा प्राईज कमेटीतर्फे पुरोहितांना दिल्या जाणार्‍या दक्षिणेतील काही रक्कम ग्रंथ पुरस्कारासाठी केली जावी अशी मागणी लोकहितवादी व त्यांच्या सहकार्यांनी सरकारकडे केली होती.
साहित्य हे संस्कृतीच्या जनुकांचे वाहक असते. सहिष्णुता आणि भलेपणाची वृत्ती जागती ठेवण्याचं काम लेखक करतो. साहित्य संमेलन म्हणजे एक प्रकारे सामुहिक उमदेपणाचा उत्सव असतो. वाचन ही एक कला असून वाचनात मागे असलेले लोक समाज उपद्रवात पुढे जातात. अणूबाँबच्या स्फोटापेक्षाही जगाला निरक्षरतेचा धोका मोठा आहे. निरक्षरता मानवी संस्कृतीला धोक्यात टाकते असे प्रतिपादन प्रा. नरके यांनी यावेळी केले.
कुसुम कपोले यांनी संमेलनाचे उद्घाटन केले. बाबासाहेब गोपले यांनी १५ ठराव मांडले. स्वागताध्यक्ष अप्पासाहेब अवचारे, विकास तांबे, साहित्यिक दया हिवराळे, संपत जाधव, शरद जाधव यांनी मनोगत मांडले. प्रास्ताविक व आभार व्यंकट शिंदे यांनी मानले.

गुरुवार, १८ नोव्हेंबर, २०१०

कांद्याने न चिरताच रडविले...

गेल्या महिन्यात परतीच्या मान्सून नंतर पावसाळा संपला असल्याचे हवामान खात्याने सांगितले होते. पावसाळा संपून आता हिवाळा सुरू होणार असे वाटत असतानाच पुन्हा एकदा तटवर्ती क्षेत्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे देशात अनेक ठिकाणी अकाली पाऊस झाला. परिणामी सर्वाधिक नुकसान कांदा, मिर्ची चे झाले. बाजारपेठेत जाणार असलेला आणि बाजारपेठेत जाऊन विक्रीच्या बेतात असलेला कांदा पावसात भिजला. मुसळधार पाऊस पडेल अशी सुतराम शक्यता, शंका शेतकरी व व्यापार्‍यांना नसल्यामुळे कांदा ओला होऊन मोठ्या प्रमाणावर कांदा फेकून द्यावा लागला आहे. यातही चांगला कांदा गवसतो का? या आशेने गरीब नागरीक चांगल्या कांद्याच्या शोधात आहेत. तोंडचा घास गेल्यामुळे कांद्याने न चिरताही डोळ्यात पाणी आणल्याची अर्थातच रडविल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे.

बुधवार, १७ नोव्हेंबर, २०१०

बकरी ईद, एकादशीनिमित्त शासनाच्या शुभेच्छा

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बकरी ईद व कार्तिकी एकादशीनिमित्त राज्यातील जनतेस शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान ईदनिमित्त ठिकठिकाणी मुस्लीम बांधवांनी सकाळी नमाज अदा करून देशाच्या विकास आणि एकजुटीसाठी प्रार्थना केली. पंढरपूर येथे दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची रीघ लागली होती. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रशासनातर्फे ध्वनीक्षेपकावरून सूचना देण्यात येत होत्या.
मध्यंतरी अकाली पाऊस पडल्याने पीकाचे नुकसान होऊन अनेक शेतकर्‍यांच्या तोंडचा घासच जणू ओढला गेला. यामुळे आता तरी पाऊस पडू नये अशी आळवणी काही भाविकांनी यावेळी केली. मंदीर परिसरात गुलाबाच्या फुलांना प्रचंड मागणी होती.

कबड्डी विजेत्या-उपविजेत्या संघाचे उपमुख्यमंत्र्यांकडून कौतुक

मुंबई, ता. १६- जम्मू येथे झालेल्या किशोर-किशोरी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या विजेत्या उपविजेत्या संघाचे उपमुख्यमंत्री पवार यांनी कौतुक केले.
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनची धुरा सांभाळत असतानाच उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर दोन्ही संघाने आपल्याला ही विजयाची बहुमोल भेट दिली असल्याचे प्रतिपादन यावेळी पवार यांनी केले. मुलांच्या संघाचे प्रशिक्षक प्रशांत मोकल, कर्णधार अक्षय उघाडे, मुलींच्या संघाचे प्रशिक्षक संतोष शिर्के, कर्णधार प्राजक्ता तापकिर आदी उपस्थित होते. असोसिएशनचे सरकार्यवाह मोहन भावसार यांची चीनमधील आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी कबड्डीचे तांत्रिक अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले.

मंगळवार, १६ नोव्हेंबर, २०१०

मंत्र्यांचा कँपस इंटरव्ह्यू एक चांगला पायंडा...

राज्याच्या मंत्रीमंडळात समाविष्ट करून घेण्यासाठी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनमध्ये इच्छुक (उमेदवार) मंत्र्यांचे कँपस इंटरव्ह्यू घेण्यात आले. अनेक मंत्र्यांनी आपल्या कार्याची तर काही मंत्र्यांनी आपल्या कामाची, कामगिरीची फाईलच यावेळी दाखविली, काही मंत्र्यांनी बाहेर व्यवस्थित अभ्यास करून प्रवेश केल्यानंतर आपल्या कामांचा पाढा म्हणून दाखवला. काहीही असो...शिक्षणाचा कुठे ना कुठे फायदा तर झाला?
शंभर टक्के शिक्षीत आणि गुन्हे दाखल नसलेल्या उमेदवारासच भविष्यकाळात निवडणुकीत (मग ती गावपातळीपासून थेट दिल्लीपर्यंत, कोणतीही असो) तिकिट देण्याची पद्धत सुरू करणे काळानुसार आवश्यक आहे. परिणामी घाणेरड्या राजकारणापासून दूर राहून देशाचा विकास खर्‍या अर्थाने करणे सहज शक्य होईल, हीच अपेक्षा.

सोमवार, १५ नोव्हेंबर, २०१०

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्र्यांचाही "आदर्श"

आपल्या अभिनंदनाचे होर्डिंग, बॅनर काढण्याच्या सूचना नवनिर्वाचित मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.
या सूचनेची त्वरीत अंमलबजावणी कार्यकर्ते आणि महापालिकेने केली असून आतापर्यंत सुमारे पाच हजार होर्डिंग, बॅनर, काढण्यात आले आहेत. ही बाब खरोखर स्तुत्य असून आदर्श ठरली आहे. राज्यातील अन्य नेत्यांनी देखील हे ध्यानात घेऊन तशी कृती करावी.

अशोक चव्हाण यांना मंत्रीमंडळात न घेण्याचा "आदर्श"...?

आदर्श गृहनिर्माण संस्था प्रकरणी राजीनाम द्यावा लागलेले राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा नवीन मंत्रीमंडळात समावेश न करण्याचे काँग्रेसने जवळपास निश्चित केले आहे.
नवनिर्वाचित मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्ली येथे काल काँग्रेस मुख्यालयात पक्षश्रेष्ठींशी नूतन मंत्रीमंडळातील समाविष्ट करण्यासंदर्भात मंत्र्यांविषयी चर्चा केली. यामुळे अनेक मंत्री दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात तळ ठोकून होते. परंतु माजी मुख्यमंत्री यांचा नूतन मंत्रीमंडळात समावेश न करण्याचे संकेत मुख्यालयाने दिले आहेत. भ्रष्टाचार करणार्‍यांची गय नाही, असा आदर्श काँग्रेस घालून आपली प्रतिमा बदलवू इच्छित असल्याचे हे द्योतक असल्याचे मत ज्येष्ठ काँग्रेसजन व्यक्त करीत आहेत.

शुक्रवार, १२ नोव्हेंबर, २०१०

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी ग्वांगझू सज्ज- ४७६ सुवर्ण पदकांचा निर्णय

ग्वांगझू, ता. १२- आजपासून (ता. १२) सुरू होणार्‍या आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी चीन सज्ज झाले आहे. ग्वांगझू सह चीन मध्ये स्पर्धा होणार्‍या सर्व ठिकाणांची सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे पावसाचे ढग विखुरणारी पाच विमाने देखील यात सामील करण्यात आली आहेत. यासह पाऊसरोधक रॉकेट्स देखील सज्ज ठेवण्यात आली आहेत. नुकत्याच भारतात झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या त्रुटींचा देखील अभ्यास करून उणीवा दूर करण्यात आल्या आहेत. १२ ते २७ नोव्हेंबरपर्यंत १५ दिवस स्पर्धा चालणार आहेत. यावेळी एकूण ४७६ सुवर्णपदकांचा निर्णय होईल.

वक्तव्य करताय..? जरा जपून...!

गेल्या काही दिवसात काँग्रेस आणि संघ दोघांनी एकमेकांविरुद्ध केलेल्या वक्तव्यांचे पडसाद देशभरात उमटले आहेत. कोणतेही वक्तव्य जपून करणे गरजेचे आहे.
राजकारण म्हटले म्हणजे त्यात पक्ष, व्यक्ती अथवा संबंधित विषय, घटनेच्या थोडक्यात उल्लेख करायचा झाल्यास एकमेकांच्या विरोधात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडणे, वक्तव्ये करणे, पदच्युत होणे, पक्षातून हकालपट्टी, निलंबन हे ओघाने आलेच. अनेकदा केवळ कारणासाठी, पैशासाठी, विरोधक म्हणून किंवा विरोधकाने विरोध केलाच पाहिजे या भूमिकेतून विरोध केला जातो. बर्‍याचदा संबंधित पदाधिकारी, कार्यकर्त्याची पक्षातून हकालपट्टी, निलंबन होणे असे प्रकार सर्रासपणे होतात. यात क्वचित विरोधक बघ्याची भूमिका सुद्धा पार पाडतात. पक्षातून हकालपट्टी झालेला कार्यकर्ता, पदाधिकारी अथवा संबंधित व्यक्ती नंतर जाहीर सभा, पत्रकार परिषद, वर्तमानपत्रातून लेखी निवेदनाद्वारे, स्वतःच निषेधाच्या माध्यमातून विविध आरोप करताना दिसतात. अनेकदा त्याच पक्षात, ठिकाणी चाललेल्या गैरव्यवहार, दुरुपयोग, भ्रष्टाचार, दंडूकेशाही, दडपशाही, धाक-दपटशा इत्यादीविषयी नंतर अगदी घसा फुटेपर्यंत माहिती सांगितली जाते.
पक्षात किंवा त्या क्षेत्रात कार्यरत असताना देखील सुरू असलेला भ्रष्टाचार अशा लोकांना दिसत नसेलच. मात्र तिथून निघाल्यावरच हे सर्वकाही दिसत असावे. कदाचित सावली अथवा छत्रछाया दूर झाल्यामुळे, अवकृपा झाल्यामुळे हे होत असावे. मध्यंतरी राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या आरोपानंतर प्रचंड गदारोळ झाला. यानंतर संघाचे के. सुदर्शन यांनी सोनिया गांधी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद देशभर उमटले असून आंदोलन, निषेध करण्यात आला. कोणीही वैयक्तीक किंवा संघटनात्मक, पक्षाविरुद्ध, संस्थेविरुद्ध निषेध नोंदविण्यासाठी वक्तव्य करताना विषय संवेदनशील होणार नाही, प्रसंगी अघटित घटना देखील घडून देशाचे नुकसान, हानी होणार नाही याचे भान ठेवणे ही काळाची गरज ठरली आहे. ।।..वादे वादे जायते लठ्ठ-लठ्ठी...।। हे ब्रीद समाजातल्या प्रत्येक घटकाने, त्यातल्या त्यात बुद्धीजीवी मंडळींनी तरी लक्षात ठेवल्यास लाभच आहे, हे ही नसे थोडके.!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदभार स्वीकारला

मुंबई, ता. ११- महाराष्ट्राचे नूतन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (ता. ११) रात्री नऊच्या सुमारास मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील दालनात उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. सर्व लोकांना सोबत घेऊन जाण्याचे आपले धोरण असून केवळ बोलण्याऐवजी कृतीवर भर राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
राजभवनावरील शपथविधीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर पवार यांनी नूतन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत मणिभवन आणि चैत्यभूमी येथे जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना वंदन केले. यानंतर मंत्रालयात राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण केली. मंत्रालयातील मिनी थिएटरमध्ये पत्रकारांशी वार्तालाप केल्यानंतर मुख्यसचिव, अप्पर मुख्यसचिव, सचिव तसेच अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांसमवेत बैठक घेतली. सुमारे दीड तास ही बैठक चालली. यावेळी राज्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. नागपूर येथे होणार्‍या आगामी हिवाळी अधिवेशनाचीही चर्चा करण्यात आली.

गुरुवार, ११ नोव्हेंबर, २०१०

महाराष्ट्रात ४० वर्षात २० मुख्यमंत्री

महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस १ मे १९६० पासून ११ नोव्हेंबर २०१० पर्यंत राज्याने एकूण २० (वीस) मुख्यमंत्री पाहिले..कारकीर्द पुढीलप्रमाणे:

१) यशवंतराव चव्हाण - १ मे १९६० ते १९ नोव्हेंबर १९६२
२) मारोतराव कन्नमवार - २० नोव्हेंबर १९६२ ते २४ नोव्हेंबर १९६३
३) वसंतराव नाईक - ५ डिसेंबर १९६३ ते २० फेब्रुवारी १९७५
४) शंकरराव चव्हाण - २१ फेब्रुवारी १९७५ ते १७ मे १९७७
५) वसंतदादा पाटील - १७ मे १९७७ ते १८ जुलै १९७८
६) शरद पवार - १८ जुलै १९७८ ते १७ फेब्रुवारी १९८०
७) अ. र. अंतुले - ९ जून १९८० ते १२ जानेवारी १९८२
८) बाबासाहेब भोसले - २१ जानेवारी १९८२ ते १ फेब्रुवारी १९८३
९) वसंतदादा पाटील - २ फेब्रुवारी १९८३ ते १ जून १९८५
१०) शिवाजीराव निलंगेकर - ३ जून १९८५ ते ६ मार्च १९८६
११) शंकरराव चव्हाण - १२ मार्च १९८६ ते २६ जून १९८८
१२) शरद पवार - २६ जून १९८८ ते २५ जून १९९१
१३) सुधाकरराव नाईक - २५ जून १९९१ ते २२ फेब्रुवारी १९९३
१४) शरद पवार - ६ मार्च १९९३ ते १४ मार्च १९९५
१५) मनोहर जोशी - १४ मार्च १९९५ ते ३१ जानेवारी १९९९
१६) नारायण राणे - १ फेब्रुवारी १९९९ ते १७ ऑक्टोबर १९९९
१७) विलासराव देशमुख - १८ ऑक्टोबर १९९९ ते १६ जानेवारी २००३
१८) सुशील कुमार शिंदे - १८ जानेवारी २००३ ते ३० ऑक्टोबर २००४
१९) विलासराव देशमुख - १ नोव्हेंबर २००४ ते ५ नोव्हेंबर २००८
२०) अशोक चव्हाण - ४ डिसेंबर २००८ ते आज (ता. ११ नोव्हेंबर) पर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री

२१) पृथ्वीराज चव्हाण - शपथविधी होणे बाकी (११ नोव्हेंबर २०१०) ते

बुधवार, १० नोव्हेंबर, २०१०

चव्हाण, पवार - मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री

राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे अखिल भारतीय काँग्रेस सरचिटणीस  पृथ्वीराज चव्हाण यांची तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांची वर्णी लागली आहे. चव्हाण यांची प्रतिमा अद्याप स्वच्छ असल्यामुळे आणि पक्षात त्यांचे वजन असल्यामुळे त्यांना राज्याचे मुख्यमंत्रीपद सोपविण्यात आले आहे. अशोक चव्हाण हे आदर्श गृहनिर्माण संस्था घोटाळ्यात अडकल्यामुळे त्यांना मुख्यमंत्री पद गमवावे लागले. आज सकाळी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. उपमुख्यमंत्री पदावर राज्याचे जलसंपदा व ऊर्जामंत्री व राष्ट्रवादी पक्षाचे अजितदादा पवार यांची निवड करण्यात आली.
काहीही असले तरीसुद्धा पुन्हा एकदा आणखी एका "चव्हाण" यांचीच वर्णी लागली आहेच..।

मंगळवार, ९ नोव्हेंबर, २०१०

आदर्श गृहनिर्माण संस्था- चौकशीने काय साध्य होणार?

आदर्श गृहनिर्माण संस्थेत आपल्या नातेवाईकांना घरे मिळवून दिल्याचा आरोप चव्हाण यांच्यावर असल्यामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री अशोक (सध्याच्या प्रथेनुसार अशोकराव) चव्हाण यांना राजीनामा द्यावा लागला. या प्रकरणाची चौकशी करून कठोर कारवाईची मागणी विरोधकांनी केली आहे, परंतु चौकशी झाली तरी नेमके काय साधणार आहे, ही बाब अनुत्तरित आहे.
मुंबई येथे आदर्श सोसायटी ज्या भूखंडावर उभी आहे, तो भूखंड संरक्षण दलाचा असल्याचा दावा करण्यात आला आहे. कारगिलमधील शहिदांच्या कुटुंबीयांसाठी असलेल्या या सोसायटीतील सदनिकांवर राजकीय नेते, तसेच लष्करी आणि प्रशासकीय अधिकारी यांनी डल्ला मारल्याच्या या प्रकरणाची गंभीर दखल संरक्षणमंत्र्यांनी घेतली. त्यांच्या आग्रहामुळेच या प्रकरणाची सीबीआय चौकशी सुरू करण्यात आली आहे.
या प्रकरणात मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचाही हात असल्याचा आरोप झाल्यानंतर श्री. चव्हाण यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधींकडे यापूर्वीच राजीनामा पाठविला होता. राज्यपाल के. शंकर नारायणन यांच्याकडे पाठविण्यात आला असून चव्हाण यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्यास सांगण्यात आले आहे. अनेकदा विविध प्रकरणांमध्ये मोठमोठे मंत्री, अधिकारी, पदाधिकारी, त्यांचे आप्त-स्वकीय गुंतले असल्याचे निष्पन्न होते. हे प्रकरण कारगिल शहिदांच्या कुटुंबीयांच्या सदनिकांचे असल्यामुळे चव्हाण यांना राजीनामा देणे भाग पडले, हा भाग निराळा. आपण निर्दोष असल्याचे चव्हाणांनी जरी सांगितले असले, तरीही इतक्या मोठ्या प्रकरणाची त्यांना अजिबात कुणकुण लागली नसेल काय? परवानगीपेक्षा जास्त मजले चढविण्यात आलेल्या या सदनिकेसाठी मोठ्या प्रमाणावर वाटे-हिस्से सुद्धा पडले असणारच. चव्हाण यांना बाजूस सारून काँग्रेस Mr. Clean असल्याचे दर्शवून आगामी निवडणुकांमध्ये, भ्रष्टाचार करणार्‍यांना काँग्रेसमध्ये थारा नसल्याचे काँग्रेसला सिद्ध करायचे असेल. चव्हाणांचा राजीनामा स्वीकारल्या गेल्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. मात्र अनेकदा गैरव्यवहार, घोटाळे, भ्रष्टाचाराची चौकशी होते, नंतर हातात काय येते? याचा विचार होणे देखील गरजेचे आहे. वारंवार अशा प्रकारची चौकशी व्हावी, दोषी व्यक्तींवर कारवाई व्हावी, पक्षातून हकालपट्टी, अन्यथा काही दिवस तुरुंगाची हवा खावी लागणे अथवा अन्य दंड आकारणे या गोष्टी आता नेहमीच्या आणि संबंधितांना सवयीच्या झाल्या आहेत.
काहीही करा...काहीही होत नाही! अशी भावना आजकाल अपराध करणार्‍यांच्या मनात निर्माण झाली आहे. यामुळे दिवसेंदिवस अशा प्रकरणांचा आलेख उंचावत आहे. जनता ओरडते, काही दिवसांनी सगळे विसरुन जाते..असा अनुभव नेहमीच येतो. सापडला तो चोर..असेच असल्यामुळे जो-तो अगदी भ्रष्टाचार का असेनां..जपून पाऊल टाकतो. परंतु मांजराला दूध पिताना कोणी ना कोणी पाहतेच, पाहिले नसले तरीही समजतेच..। प्रकरणात सापडणार्‍यांना कठोर शासन व्हावे, म्हणजे नेमके कसे शासन होण्याची अपेक्षा असते, कोणास ठाऊक।
न्यायव्यवस्थेनेच अशा प्रकारांसाठी नवीन उपाययोजना करणे ही काळाची गरज ठरणार आहे. भ्रष्टाचारात नाव उघड होणार्‍या राजकीय मंडळींना किंवा राजकारण्यास, अधिकारी, पदाधिकारी यांना त्वरीत राजीनामा द्यावा लागणे आवश्यक केले जावे.
याचबरोबर संबंधितांची संपत्ती न्यायालयाच्या अखत्यारित जमा करण्यात यावी, संबंधित प्रकरणांची शहनिशा, चौकशी लवकरात-लवकर पूर्ण व्हावी, दोषी आढळल्यास खरोखर (किमान पाच वर्षे) तुरुंगात रवानगी करण्यात यावी, अशा राजकारण्यास संबंधित पक्षाने पुन्हा कधीही निवडणुकीस उभे होऊ न देणे सर्वच राजकीय पक्षांना न्यायालयाने बंधनकारक करावे, निर्दोष असल्यास, तसे सिद्ध झाल्यास जप्त केलेली रक्कम पुन्हा देऊन एखादे चांगले पद देण्यात यावे आदी उपाययोजना केल्या जाव्यात हीच अपेक्षा

उपमुख्यमंत्र्यांकडून दीपावलीनिमित्त शुभेच्छा

मुंबई, ता. ४- दीपावलीच्या लक्षलक्ष दिव्यांच्या प्रकाशाने आपणा सर्वांचे आयुष्य तेजोमय होवो आणि समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत दिवाळीचा आनंद पोहोचो. पणतीच्या पवित्र प्रकाशाने अज्ञानाचा अंधःकार दूर होऊन संपन्नतेची दीपमाळ आपल्या आयुष्यात प्रकाशमान होवो..।
पर्यावरणाचे भान राखून ध्वनी आणि वायू प्रदूषणमुक्त दिवाळी साजरा करण्यावर नागरिकांनी भर द्यावा या शब्दात उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

ओबामा भारत भेट- त्रास आम्हाला कशाला..?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची तीन दिवसांची भारत भेटीची सांगता झाली. ओबामा यांच्या भारत भेटीत प्रामुख्याने त्यांच्या वाहनांचा ताफा सामान्य नागरिकांची डोकेदुखी ठरला.
मुंबई येथे विमानतळावर आगमन झाल्यानंतर नियोजित कार्यक्रमानुसार हॉटेल ताजसह सर्व संबंधित ठिकाणी त्यांचा ताफा पोहोचून ओबामांचे सभास्थळी आगमन होईपर्यंत अतिशय कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली. पन्नास गाड्यांच्या ताफ्यात एक गाडी ओबामा यांची...। त्यांच्या भोवती, मागे, पुढे सुरक्षा रक्षकांचे वलय..ते ज्या गाडीत बसणार ती गाडी सुद्धा अमेरिकेतून आणलेली..। हा ताफा एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाताना वाहतुक थांबविलेली..संबंधित ठिकाणचे नेटवर्क थांबवून..स्वतःचे वर्क सुरू ठेवलेले..ठिकठिकाणी जॅमर्स लावलेले..यामुळे सामान्य नागरिकांना प्रचंड त्रास आणि डोकेदुखी सहन करावी लागली. इतकी सुरक्षा व्यवस्था ठेवून वाहतुक थांबविणे म्हणजे देशाचा विकास थांबविण्यासारखे असल्याचे चंदन याने सांगितले. तर, दुसर्‍या व्यक्तीसाठी आपल्याच लोकांचे नेटवर्क, मोबाईल जॅम करणे योग्य नव्हे अशी प्रतिक्रिया सतीश यांनी व्यक्त केली. अशा प्रकारच्या लोकांच्या सुरक्षेवर लाखो रुपये खर्च होतो, याऐवजी थेट हेलिकॉप्टरनेच संबंधित ठिकाणी त्यांना नेल्यास खर्च कमी होऊन दैनिक व्यवहार देखील थांबणार नाहीत अशी प्रतिक्रिया अंजल यांनी व्यक्त केली.

सोमवार, ८ नोव्हेंबर, २०१०

भुजबळ यांच्याकडून ओबामा यांना "स्लेव्हरी" पुस्तक भेट

मुंबई, ता. ६ नोव्हेंबवर - उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना महात्मा ज्योतिबा फुले यांनी १८७३ मध्ये लिहिलेले स्लेव्हरी अर्थात गुलामगिरी हे पुस्तक भेट दिले. आपल्यासाठी ही अमूल्य भेट असल्याचे ओबामा यांनी सांगितले.
भारतातील सामाजिक चळवळीचे पहिले क्रांतिकारक महात्मा फुले यांनी १३७ वर्षांपूर्वी हे पुस्तक अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या गुलामगिरीविरुद्ध लढ्यासाठी योगदान देणार्‍यांना अर्पण केले आहे, हे वाचल्यानंतर ओबामा यांनी , हे पुस्तक आपल्यासाठी अमूल्य भेट असल्याचे सांगितले

मराठ्यांना आरक्षण देण्याच्या भूमिकेवर भुजबळ ठाम

मुंबई, ता. २ नोव्हेंबर- ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देण्यात यावे ही माझी भूमिका कायम आहे. मात्र, मराठा आरक्षणासाठी कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेतल्यास पुढाकार घेईन, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी येवला येथे केले. भुजबळ यांच्या उपस्थितीत नाशिक जिल्हा बँकेचे संचालक ऍड. माणिकराव शिंदे, नगरसेविका उषा शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
पक्षात नव्याने आलेल्या कोणत्याही कार्यकर्त्याला दुय्यम वागणूक दिली जाणार नाही असे सांगून भुजबळ यांनी प्रत्येक घरात पैशाची आवक होईल तेव्हाच खराखुरा विकास होईल असे प्रतिपादन केले.

मंगळवार, २ नोव्हेंबर, २०१०

दीपावली शुभेच्छा..

चला उधळू रंग छटांचे, चला उजळू दीप दिव्यांचे,
उर्जेच्या या नव पर्वाचे स्वागत-गीत हे गाऊ या..
दीपावली ही तेजोमयी करण्या लक्ष दीप हो लाऊ या...

दिवाळीच्या दिव्यांची उर्जा सांभाळा-भारनियमन पुन्हा वाढण्याची शक्यता

दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दीपावलीच्या दिव्यांच्या झगमगाटात लखलखटाने सुरुवात होणार्‍या प्रकाशपर्वात नव्या आशांच्या किरणांनी उर्जा मिळणार्‍या नागरीकांना ही मिळणारी उर्जा, भार-नियमन सहन करण्यासाठी सांभाळून ठेवावी लागणार आहे. पुन्हा एकदा भारनियमन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अनेक वर्षांपासून राज्य भीषण वीज टंचाईचा सामना करीत असून, याची झळ खरंतर वीज ग्राहकांपेक्षा वीज मंडळालाच बसली आहे. इतकी प्रचंड वीज टंचाई एका दिवसात होत नाहीच, सुरवातीलाच हे जाणवल्यानंतर त्वरीत हालचाली, उपाययोजना झाल्या असत्या, तर आज हे चित्र नसते. दिवसेंदिवस लोकसंख्येबरोबरच गरजाही वाढणार हे शाश्वत सत्य आहे. वीज मंडळाने राज्यात ठिकठिकाणी असलेल्या वीज निर्मिती केंद्रांची क्षमता वाढविण्याची योजना हाती घेऊन सुद्धा आता अनेक दिवस उलटून गेले आहेत. नियोजित कालावधीत सगळ्याच प्रकल्पाचे काम पूर्ण होईल अशी सध्या तरी सुतराम शक्यता नाही. मध्यंतरी एप्रिल २०१० मध्ये राज्यात १९ हजार मेगावॅट विजेची आवश्यकता होती, परंतु प्रत्यक्ष वीजनिर्मिती सुमारे १४ हजार पाचशे मेगावॅट झाली. उर्वरित तब्बल पाच हजार मेगावॅटची गरज अगदी अल्प प्रमाणात भागू शकली. यानंतर पावसाळ्यात हीच मागणी कमी होऊन सुमारे ३ हजार आठशे मेगावॅट पर्यंत हे प्रमाण खाली आले. एका अर्थाने, पावसाळा असल्यामुळे वरुणराजाची कृपादृष्टीच झाली, पावसाळा पथ्यावर पडला! परंतु हिवाळ्यापासून शेतांमध्ये पाणी देण्यासाठी पंप वापरले जाणे, सणासुदीनिमित्त वीजेची मागणी वाढणार असल्यामुळे भार नियमनात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राज्यातील भुसावळ, खापरखेडा, परळी, उरण, चंद्रपूर, कोराडी येथील वीज निर्मिती केंद्रांमधून मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती होणार असल्याचे राज्याचे ऊर्जा मंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले होते. याचबरोबर, यासाठी केंद्राकडून नियमित व नियंत्रित कोळसा पुरविण्यात यावा, महाराष्ट्राला २०१२ पर्यंत भारनियमन मुक्त करण्यासाठी राज्याची युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. 'प्रत्येकाला वीज' या केंद्राच्या घोषणेला राज्य निश्चितच पूर्णत्वास नेईल, मात्र राज्यातील औष्णिक प्रकल्पांना मोठ्या प्रमाणावर लागणारा कोळसा नियमित मिळावा, त्याचा दर्जा चांगला असावा, दरावर केंद्राचे नियंत्रण असावे अशी मागणी देखील त्यांनी केली होती. अकराव्या व बाराव्या पंचवार्षिक योजनेतून महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनीतर्फे अनेक प्रकल्पांची क्षमता वाढवून व काही नवीन कार्यान्वित करून २०१७ पर्यंत २०,७३१ मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आले असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
शहरात आठ तास तर ग्रामीण भागात बारा तासांचे भारनियमन करण्यात आल्यामुळे सहाजिकच उद्योग, व्यवसायासह शेती आदी घटकांवर विपरित परिणाम होऊन उत्पादन, उत्पन्न घटले...। यासह, खासगी वीजग्राहकांसह शासकीय कार्यालये, नगरपालिका, विविध संस्थांकडे देखील असलेली थकबाकी मंडळ वसुल करण्यात अपयशी झाल्यामुळे नुकसान आणि परिणती तोटा वाढला. सध्या महावितरणला दरमहा तब्बल २०० कोटिंचा फटका बसत आहे.
त्रासदायक ठरलेल्या भारनियमनामुळे नियमित वीजेची बिलं भरणारे अनेक ग्राहक देखील बिलं भरेनासे झाले आहेत. भारनियमन जास्त झाल्यास वीज कार्यालयावर मोर्चे, मोडतोड, हाणामारी असे प्रकार वाढीस लागले आहेत. यामुळे राजकीय पुढारी असो वा बडी व्यक्ती, कुणालाही वीजबिलात माफी मिळणार नाही, असे अजित पवार यांनी सांगितले आहे.
वीज कार्यालयावर हल्ला झाल्यास त्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सरळ घरी निघून जावे. १५ दिवस कार्यालयात येऊ नये. त्यांचा पगार त्यांना घरपोच देण्यात येईल, अशा सूचना महावितरणच्या वरिष्ठ पातळीवरून राज्यभरातील वीजकार्यालयांना देण्यात आल्याचे वृत्त आहे. यामुळे संबंधितांना याची जाणीव होऊन वीज कार्यालयावर होणार्‍या हल्ल्यांना जरब बसेल असे वीज मंडळाला वाटत असावे.
अशा प्रकारे हल्ले, घटना घडू नयेत यासाठी मंडळ व ग्राहक यांच्यात सामंजस्य होणे गरजेचे आहे, भले, बुरे ते घडून गेले...यानुसार उपाययोजना होणे आवश्यक आहे. विशेषतः युवाशक्तीला विश्वासात घेऊन संयुक्तपणे मोहिम राबवण्यात यावी. वीजनिर्मिती मोठ्या प्रमाणात होईल तेव्हा होईल, परंतु तोपर्यंत कोणतीही वीज दरवाढ न करणे आणि ..ताणले की फाटते..याप्रमाणे वीज ग्राहकांना वेठीस न धरणे या गोष्टींची त्वरीत अंमलबजावणी केल्यास काही अंशी तोटा भरुन निघू शकेल, हाच विश्वास!

what is "Blog"? (in short)

A blog is a personal diary. A daily pulpit. A collaborative space. A breaking-news outlet. A collection of links. Your own private thoughts. Memos to the world.
Your blog is whatever you want it to be. There are millions of them, in all shapes and sizes, and there are no real rules.
In simple terms, a blog is a web site, where you write stuff on an ongoing basis. New stuff shows up at the top, so your visitors can read what's new. Then they comment on it or link to it or email you.

सोमवार, १ नोव्हेंबर, २०१०

गेले कुठे ते दिवस...?

खबरदार जर टाच मारूनी जाशील पुढे चिंधड्या..उडवीन राई राई एवढ्या...!!! कवितेतल्या या ओळींची आज आठवण झाली...निमित्त आहे भारत-पाकिस्तान यांच्यात नुकत्याच झालेल्या चर्चेचे..! या कवितेची रचना करण्यात आली, तेव्हाचा काळ म्हणजे खरंच बहुदा सुवर्णयुगच म्हणावा लागेल...!!
सीमेवर सैनिक शत्रुशी लढताना, शत्रूने आपल्या हद्दीतून पुढे कूच करण्याचा प्रयत्न करण्याच्या प्रयत्नात असताना देशभक्त स्वाभिमानी भारतीय शिपायाने शत्रूला तो एकही पाऊल आणखी पुढे गेल्यास अगदी मोहरी एवढे त्याचे तुकडे करून टाकेन..असा सज्जड दम भरणारा शिपाई...। असा या रचनेचा आशय आहे. आजकाल याप्रकारच्या नवीन कविता सुद्धा ऐकिवात नाहीत. आजकाल तर आपणच एकमेकांचे पाय मागे ओढत आहोत, धीर देण्याऐवजी घाबरलेल्या व्यक्तीला आणखी घाबरवत आहोत असे चित्र निर्माण झाले आहे. भारत आणि पाकिस्तान या देशांच्या सीमेवर नेहमीच काही ना काही सुरूच असते. भारत स्वतः कधीच काही करत नाही, हे सुद्धा खरंय. परंतु खोड काढण्यात पाकिस्तान वरचढ आहेच. नुकतीच भारतीय सीमा सुरक्षा दल आणि पाकिस्तानमधील चर्चा झाली. यावेळी दोन्ही देशांमध्ये असलेला तणाव कमी करण्यासाठी काही उपाययोजनांची अंमलबजावणी निश्चित करण्यात आली आहेत. यानुसार वाघा सीमेवर अनेक वर्षांपासून दररोज होणारी परेड आणि संध्याकाळी ध्वज उतरवताना होणार्‍या अत्यंत कडक हालचाली (कवायत) आता मंदावणार आहेत. यात साधेपणा आणि सहजता येणार आहे. त्यामुळे सामान्य माणसाच्या मनात या कवायतीबद्दल असलेलं चित्र बहुदा पुसलं जाईल.
सीमेवर होणारा अनावश्यक गोळीबार थांबविणे, सीमा चुकून ओलांडणार्‍यांना गोळ्या न घालणे, सीमेलगत बांधकामे ते सुद्धा बेकायदेशीर बांधकामे न करणे, तस्करीला आळा घालणे या प्रमुख उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे...! खरंतर, अशा प्रकारच्या घटना सीमेवर घडत आहेतच हे निर्विवाद सत्य असल्याला यामुळे पुष्टी मिळाली आहे. याच कारणावरून सुद्धा भारताने पाकिस्तानला जाब विचारून कारवाई करणे आणि आपल्या सैनिकांना शाबासकी देऊन त्यांच्या कृतीमागे खंबीरपणे सरकारने उभे राहणे देशातल्या नागरिकांना अपेक्षित आहे. सीमावर्ती भागात घुसखोरी होत असल्यास सैन्याला एकही गोळी सरकारच्या परवानगीशिवाय मारता येत नाही. एखाद्या सैनिकाने असे केल्यास त्याला चौकशीला सामोरे जावे लागते. परिणामी सैनिकाला सहजासहजी कोणताही निर्णय घेता येत नाही. वरहुकुम, आता तर चर्चेतच ठरले आहे, की "चुकून" सीमा ओलांडणार्‍यांना गोळ्या घालू नये. यामुळे पाकिस्तानकडून बहुदा अशा चुका वारंवार घडतील, एखाद्या घुसखोरास पकडल्यास चुकून असे झाल्याचे सांगितले की त्याची सुटका...। बिचार्‍या सैनिकांना देखील बघ्याची भूमिका घ्यावी लागेल. कारण तसा आदेशच असल्यामुळे ते सुद्धा करणार काय, काय करू शकणार? आणि ते हे दुःख सांगणार कोणाला..? शासनाच्या या निर्णयाचा शासनाने पुन्हा विचार करावा, हीच अपेक्षा.
त्रस्त समंधा शांत हो..त्रस्त समंधा शांत हो..शत्रुचा संहार करूनी, शत्रुचा संहार करूनी नंतर निवांत हो..निवांत हो...या ओळी लिहिल्या नाही तर औरच..

ब्लॉग म्हणजे काय?

ब्लॉग ही एक वैयक्तिक रोजनिशी आहे. दररोजचे व्यासपीठ..असेही आपण म्हणू शकतो. इथे आपण आपले स्वतःचे विचार मांडू शकतो. मत व्यक्त करू शकतो. जे अपेक्षित आहे ते लिहू शकतो. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास ब्लॉग म्हणजे एक वेबसाइटच असते. आपण दररोज येथे वेगवेगळ्या नोंदी लिहू शकता. नवीन नोंद, लिखाण पानाच्या वरच्या बाजूस दिसते. जेणेकरून अभ्यागत किंवा वाचक, नवीन काय आहे? ते वाचू शकेल. यानंतर त्यांना संबंधित विषयावर आपले मत मांडण्याची संधी सुद्धा येथे टिप्पणी (comment) द्वारे त्यांना मिळू शकते. विषय पूर्ण झाल्यानंतर खालच्या बाजूस comments/टिप्पणी लिहिण्यासाठी एक चौकोन दिसेल, येथे टिप्पणी लिहिली जाते.

कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप

(पनवेल):  राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...