उन्हाळ्याच्या सुट्ट्या लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
उन्हाळ्याच्या सुट्ट्या लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २ मे, २०११

सुट्टीची भटकंती...(८)

घरी परत जायचं मामीला सांगितल्यानंतर मामीन आणखी दोन दिवस राहण्याचा आग्रह केला. खूपच आग्रह झाल्यामुळे मी सुद्धा होकार दिला. आज मामी पापडाचा..बिबडी..हा प्रकार तयार करणार होती. माझ्यासाठी हा प्रकार नवीन होता. पहाटे साडेतीनला काहीतरी खुडबुड ऐकून मला जाग आली. पाहतो, तर मामी स्वयंपाकघरात काहीतरी करत होती....(काही कारणास्तव उर्वरित भाग उद्या...)

शुक्रवार, २९ एप्रिल, २०११

सुट्टीची भटकंती...(७)

आज सकाळी माझी तब्येत जरा बिघडली होती. पोटही बिघडलं होतं थोडं...। असं वाटलं की काल हॉटेलचं खाल्लेलं पचलं नसावं. आज जेवण न करण्याचा विचार करून मी मामीला तसं सांगितलं. मामी म्हणाली, अरे काही नाही..दुपारपर्यंत सगळं ठीक होईल बघं. इकडे ये बरं जरा...। मी मामीने बोलावल्यानंतर मामीच्या मागोमाग माजघरात गेलो. तिथे कपाटावर एक पेटी ठेवली होती..हीच पेटी माझ्यासाठी जादूची पेटी ठरली आणि मी दुपारी आंब्याच्या रसावर ताव मारला...ही पेटी म्हणजेच आपण ऐकून असलेला "आजीबाईचा बटवा" होता.
नेहमी नाही पण केव्हातरी गरज भासत असल्यामुळे पेटीरुपी हा आजीबाईचा बटवा मामीने वर ठेवला होता. मी उंच असल्यामुळे आणि मामासुद्धा शेतावर गेलेला असल्यामुळे मलाच ही पेटी खाली काढायला मामीने सांगितलं. यातलं एक औषध मामीने मला दिलं त्यावर गरम पाणी प्यायलो आणि काय? अकराच्या सुमारास एकदा 'तिकडे' जाऊन फटाक्यांच्या आवाजासह सारं काही मस्त होऊन पोट मोकळं झालं, त्यानंतर थोड्या वेळातच पुन्हा एकदा छान वाटू लागलं. मामीने मला एक चूर्ण दिलं होतं हे चूर्ण गरम पाण्याबरोबर घेतलं. नेमकं कोणतं चूर्ण असेल याची उत्कंठा शिगेला पोहोचल्यामुळे मी न रहावून मामीला विचारलं..हे चूर्ण हिंग्वाष्टक चूर्ण होतं. अर्धा चमचा चूर्ण गरम पाण्याबरोबर घेतलं होतं. नंतर पोटही थोडं शेकलं. यामुळे जणू काही जादूची कांडीच फिरली होती. डॉक्टरांकडे जाण्याचीही गरज भासली नाही. आपण म्हणतो आयुर्वेदाच्या औषधांमुळे खूप उशीरा बरं वाटतं, पण हा अनुभव मी स्वतः घेतला होता. ऍलोपॅथीचं औषध सुद्धा दोनदा घ्यावच लागतं की...। मग आयुर्वेदाला नावं कशाला ठेवायची? या आजीबाईच्या बटव्यात यासह त्रिफळा चूर्ण, कस्तुरी गोळ्या, त्रिभुवन कीर्ती रस, चंद्रप्रभा वटी, शंखवटी, श्वासकासामृत सिरप, ज्येष्ठमधचूर्ण, सुठ, दालचिनी, थोडी हळद, मिरपूड, जिरपूड, कदली क्षार, जायफळ, वेखंड, पानपिंपळी, वेलदोडा, लवंग, कांदा, दुर्वा अशी कितीतरी सामुग्री होती. यापैकी बर्‍याच गोष्टी तर दररोज स्वयंपाकात वापरल्या जातात.
आज मामाच्या शेतातल्याच आंब्याच्या झाडाच्या कैर्‍यांचं पन्हं आणि गवतात पिकवलेल्या आंब्यांचा रस, पुरी असं पुन्हा एकदा हेवी जेवण होतं. मामीने जेवणात गरम पाणीच प्यायला सांगितलं होतं. मी सुद्धा तसच करून नंतर पुन्हा एकदा मामीने तयार केलेला दुसर्‍या औषधाचा डोस घेतला. गावात यात्रा सुद्धा आली होती. सहज यात्रेत फेरफटका मारायला गेलो. यात्रेत डफडी, भोंगा, बासरी, बॅट सगळ्याच वस्तू होत्या. विविध स्टॉल्स होते. काय काय होतं सांगू? एक विशेष म्हणजे गावात जास्त जाड असे कोणीही नव्हते. स्थूल व्यक्तिमत्व होतं पण आजारी असं कोणीही दिसलं नाही किंवा शहरातल्या माणसांसारखी पोटंही कोणाची हातावर नव्हती. याचं कारण म्हणजे दररोज फिरायला जाणं, शेतावर जाऊन काम करणं हे असावं. शहरात आपण एकाच जागेवर तासन् तास बसलेलो असतो, घरी असताना टीव्ही समोर, आणि ऑफिसमध्ये असताना पीसी समोर...परिणामी अनेक विकार आम्हांला जडले आहेत. ग्रामीण भागात भार नियमनामुळे टीव्ही तर कमीच पहायला मिळतो. शेतात न गेल्यास खाणार काय? असा प्रश्न पडतो...खरंच गावाकडचं वातावरण आणि जीवन किती छान आहे...हे मी अनुभवलं आणि दुसर्‍या दिवशी परत घरी जाण्याचं ठरवलं...

गुरुवार, २८ एप्रिल, २०११

सुट्टीची भटकंती...(६)

...सकाळी उठून गावात फेरफटका मारावा या उद्देशाने तयार झालो आणि गावात गेलो. अगदी गावाच्या सीमेपर्यंत पोहोचलो. गावाच्या सीमेवर अगदी टिप्पीकल वास येत होता...तसाच उलट पावली परत फिरलो. शासनाची शौचालयासंदर्भात असलेली योजना स्वीकारण्यास अजूनही ग्रामस्थ मंडळी तयार नाहीत असं दिसलं. ठराविक घरांमध्येच किंवा घराबाहेर सिट्स बसविल्याचं लक्षात आलं. खरंतर शासनाच्या अनेक चांगल्या योजना असतात, पण त्या व्यवस्थित राबविल्या जात नसाव्या किंवा पोहोचत नसाव्या. खर्च तर होऊन जातो, हे मी तुम्हांला मागेही सांगितलंच (कदाचित हा उल्लेख अनेकदा होईल). हो, एक मात्र आहे. शासनाने ग्राम स्वच्छता चांगल्या प्रकारे राबविणार्‍या ग्रामपंचायतीला, पालिकेला बक्षिस, पुरस्कार, काही सवलती जाहीर केला असल्यामुळे अनेक गावं ही योजना चांगल्या प्रकारे कशी राबवता येईल, यशस्वी कशी होईल याचा विचार करतात आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीही करतात. या गावात सुद्धा तसंच चित्र होतं. गावात ठिकठिकाणी गल्लीच्या कोपर्‍यावर कचरा-कुंडी ठेवली होती. तसंच कचरा गोळा करण्यासाठी दररोज सकाळी ठराविक वेळेत कचरा उचलणारी गाडी, कर्मचारी किंवा घंटागाडी येत होती. ही घंटागाडी थोडी मोठी असल्यामुळे अरूंद गल्ल्यांमध्ये जाऊ शकत नव्हती. तिथे गल्लीच्या तोंडावर गाडी थांबून कर्मचारी थेट आतमध्ये येऊन कचरा नेताना दिसत होते. सगळा कचरा गोळा करून गावापासून सरासरी पाच ते सहा किलोमीटर दूर नेऊन तिथे स्वतंत्र व्यवस्था केली होती. कचर्‍यातलं प्लॅस्टिक इथे वेगळं केलं जायचं. प्लॅस्टिकच्या कॅरी बॅग्ज वापरण्याची बंदी इथेही घातलेली होती. म्हणून शासनमान्य प्रमाणातील कॅरी बॅग्ज किंवा कागदी पिशव्या वापरण्याचा आग्रह केला जात होता (कॅरी बॅग ला..मी गंमतीने वाहक पिशवी असं म्हटलं आणि आमच्या मामाला हसू आलं).
गावातल्या काही धनाढ्यांकडे खूप गाई होत्या. त्यांनी गावाबाहेर छानसं फार्म हाऊस तयार केलं होतं. इथून दूध शहरांमध्ये पाठवलं जायचं. तसंच गावच्या सरपंचाने तर दुधापासून तयार होणार्‍या पदार्थांचा छोटासा कारखानाच सुरू केला होता. त्यालाही प्रतिसाद चांगला होता. हा कारखाना बघण्याची मनात इच्छा होती. सरपंच चक्क बी. एस्सी. पीएच. डी. असल्यामुळे संशोधनातही त्याला अभिरूची होती. त्या दृष्टीने तो सुद्धा याव्यतिरिक्त काहीतरी प्रयत्न करतोय असं वाटलं.
घरी परत येताना बस स्थानकाशेजारच्या हॉटेलमधून मस्तपैकी वड्यांचा आणि मिसळीच्या रस्श्याचा वास आला. आज वडा-पाव आणि मिसळ खायची असा विचार केला आणि हॉटेलमध्ये शिरलो. पाहिलं तर थोडंस अस्वच्छ असं हॉटेल होतं. इतक्या सकाळी सुद्धा गावातल्या नागरिकांप्रमाणे माशाही उठलेल्या जाणवलं. पण विचार केला, इथले लोक तर इथे खातातच आपण ही खाऊन पाहू...वडा-पाव खायला सुरवात केली, मात्र...पाव वडा खायला सुरवात केली आणि काय विचारता। तिखट पण खावा असाच वाटणारा तो वडा होता. नाकातून पाणी यायला आणि कान खाजवायला सुरवात झाली. ऑर्डर प्रमाणे त्यांनी संगळं दिलं होतं आता खाणं आवश्यकच...। कमी गर्दी असल्यामुळे हॉटेलच्या मालकाला ते लक्षात आलं. जवळ येऊन त्याने, नवीन दिसताय? कुठून आलात? जास्त तिखट लागलं का? अरेरे...अरे, थोडा कलाकंद आण पाहू...असं एका वेटरला(कळकट कपड्यातल्या पोर्‍याला) सांगितलं. कलाकंद खाल्ल्यानंतर जरा बरं वाटलं. माझ्या समोर बसलेला एक माणूस तर चक्क मिरची कचाकचा खात होता..ते पाहून तर मलाच चर्र झालं. मिसळही खाल्ली, वरून मुद्दामच हॉटेलचा चहा प्यायलो. बिल द्यायला गेलो, मात्र खिशात पैसे थोडे कमी होते. असं कुठे जाऊ याची शक्यता नसल्याने मोजके पैसेच खिशात ठेवले होते. आता काय करावं? या विचारात असताना हॉटेलच्या मालकाने ते ओळखलं आणि तुम्हा पाहूणे आहात, राहू द्या पैसे. असं सांगितलं आणि घेतलेले पैसेही परत केले. मी खूप आग्रह केला तरी घेतले नाहीत...गावच्या माणसांच्या मायेचा ओलावा आणि शहरातील शुष्कता रूक्षपणा यावरून माझ्या लक्षात आला..!

बुधवार, २७ एप्रिल, २०११

सुट्टीची भटकंती...(५)

आज सकाळी मला जाग आली, ती कोणाच्या तरी भांडणामुळे...। ओसरीवर जाऊन पाहिलं तर, सार्वजनिक नळावर पाणी भरण्यावरून दोन महिलांमध्ये भांडण सुरू होतं. पाण्यासाठी नंबर लावण्यावरून हे भांडण असल्याचं लक्षात आलं...इथे विषय भांडणाचा असला, तरी ग्रामीण भागात अजूनही विशिष्ट वेळेत ग्रामपंचायत पाणी पुरवठा करते. आजकाल शहरांमध्येही असंच चित्र पहायला मिळतं. ग्रामीण भागात मात्र अन्य वेळात पाण्याच्या टाकीखाली असलेल्या नळावरून किंवा पाणवठ्याच्या जागेवरून पाणी आणावं लागतं. आजकाल तसं सगळ्याच ठिकाणी 'ससे' अर्थात समाजसेवक झाले आहेत, ते टँकरद्वारे पिण्याचे पाणी अथवा वापरण्यासाठी पाणी उपलब्ध करून देतात, हे वेगळं. तसंच जमीनीत बोअरिंग करून सुद्धा गेल्या दशकापासून खासगी रितीने स्वतःसाठी पाणी उपलब्ध करून घेतलं जातं.
मामाच्या गावात फिरताना काही ठिकाणी गोबर गॅस ही संकल्पना दिसली. गावामध्ये जवळपास प्रत्येकाकडे गाई, म्हशी असतातच. यांच्या शेणापासून गवर्‍या थापून झाल्यानंतर उर्वरित शेण या गॅससाठी वापरलं जातं, तसंच बर्‍याचदा प्लॅस्टिक विरहित कचरा सुद्धा लोक यात टाकताना दिसतात. पण यामुळे पैशाची बचत होते असं म्हणतात. याला जागा मात्र जास्त लागते. नाहीतरी, शहरात जवळपास बाराही महिने घरगुती गॅसची टंचाई भासते (भासवली जाते). घरगुती गॅसच्या किंमतीही दिवसेंदिवस आकाशाला गवसणी घालताहेत.
आज शेजारीच लग्नं होतं त्यामुळे मामाकडे घरी स्वयंपाक होणार नव्हता. लग्न लागल्यानंतर अगदी टाळी वाजल्यानंतर म्हटलं तरी चालेल, लगेच पानं वाढण्याची तयारी सुरू झाली. वाढण्यासाठी म्हणून चक्क केळीच्या पानांचा उपयोग केला जातो. छान, वरण, पोळी आणि वांग्याची भाजी..। पोळी कुस्करून झाल्यानंतर आळं करून त्यात गरम-गरम वरण वाढतात आणि तूप ओतून मनसोक्त खातात, सोबत वांग्याची घोटलेली भाजी..असं हे जेवण म्हणजे पक्वान्नच असतं. जेवून घरी आल्यानंतर केव्हा झोप लागली कळलंही नाही...

सोमवार, २५ एप्रिल, २०११

सुट्टीची भटकंती...(३)

पहाटे पाच वाजताच मामाने उठवलं. मी फ्रेश होईपर्यंत मामीने चहा टाकला होता. त्या चहाला काय चव होती सांगू? व्वा. कधी नव्हे ते शुद्ध आणि धारोष्ण दूध होते त्या चहात. त्यामुळे तो चहा इतका छान लागत होता, की अगदी ३-४ कप प्यावासा वाटत होता...। शेत गावापासून थोडं दूर असल्यामुळे बाईकने जाऊ या, असं मामाने सांगितल्यानंतर मी बाईकऐवजी बैलगाडीने जाऊ असं म्हटल्यानंतर मामालाही आनंद झाला. जोडी गाडीला जुंपून पांथस्थ झालो. सकाळच्या त्या आणि त्यातल्या त्यात ग्रामीण भागातल्या त्या रस्त्यावर बैलांच्या गळ्यातली घंटा मंजूळ स्वरांनी भारल्याप्रमाणे वाजत होती, ते छान वाटत होतं. वाटेत भेटणारा जवळपास प्रत्येकजणच मामाला रामराम...। करत होता. शेत जवळ येऊ लागलं तशी कच्ची वाट लागली...आणि पाहता-पाहता आमच्यापुढे नकळत सात-आठ बैलगाड्या दिसल्या आणि मी आवाक झालो. गावाकडचे लोक किती लवकर उठतात आणि शेतावर जातात हे लक्षात येऊन काही अंशी माझी स्वतःची आणि शहराची तुलना करू लागलो...असो। ठरल्याप्रमाणे दुसर्‍या दिवशी सकाळी सातला शेतात पोहोचलो.
शेतात पोहोचल्यानंतर बैलांची जोडी मामाने एका मोठ्या झाडाखाली बांधली. आम्ही पुढे गेलो, परंतू शेतात तर कोणतच पीक दिसत नव्हतं. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे नसेल असा अंदाज मी मनात बांधला. मामाला शेतात काहीच नाही, मग कशाला आलोय आपण? असा प्रश्न केला. त्यावर तो मिश्किलपणे हसला आणि, काहीही नसलं तरी तण-काडी असतेच नां...। असं सांगून समोर शेतात पडलेला कचरा वेचणी सुरू केली. मी सुद्धा जमेल तशी मदत करू लागलो आणि काही तासांमध्ये भरपूर तण-काडी गोळा झाली. तोपर्यंत सूर्य डोक्यावर आला होता. झाडावरच्या कावळ्यांना पोटातले कावळे सुद्धा ओरडून दाद आणि साद देत होते. त्यामुळे आम्ही विहीरीवर जाऊन आधी हातपाय स्वच्छ धुतले. नंतर जेवणासाठी झाडाखाली गेलो. एव्हाना बैलांनी सुद्धा कडबा आणि घासगंजी खाऊन फस्त केली होती. अजून नांगरटीची कामं नसल्यामुळे त्यांना तसा आरामच होता. बैल सुद्धा बसून संथपणे रवंथ करत होते. आम्ही मामीने दिलेला टिफिन उघडला..टिफिन उघडल्यानंतर टिफिनमधून मस्त ठेच्याचा वास आला..मस्तपैकी मिरचीचा ठेचा आणि कळण्याच्या भाकरी, पुरी, काकडी, टोमॅटो यांचं सलाद, सोबत लिंबू दिलं होतं. जेवणावर ताव मारून आम्ही पुन्हा कामाला सुरवात केली. पण कधी नव्हे ते इतके सुग्रास अन्न मिळाल्यासारखेच मी जेवल्यामुळे झोप आली होती. काही वेळ झोपू असा विचार करून मी मामाला सांगितलं आणि पुन्हा झाडाखाली येऊन तिथल्या ताडपत्रीवर जाऊन पहूडलो आणि क्षणात झोप लागली.
संध्याकाळी पाचला जाग आल्यानंतर पुन्हा थोडं काम केलं. सूर्य मावळतीला आल्यानंतर आम्ही परत घराकडे कूच केलं. घरी गेल्यानंतर पुन्हा एकदा चहा प्यायलो...

शुक्रवार, २२ एप्रिल, २०११

सुट्टीची भटकंती...(२)

सुट्टीच्या पहिल्या दिवशी ठरल्याप्रमाणे सिनेमा पाहून झाला...आठवडाभर पोटभर झोप झाली...पुढे काय? गावी मामाकडे जायचं की पुण्याला काकांकडे? असा प्रश्न पडला (तसं तर सगळ्याच नातेवाईकांनी सुट्टीत बोलावलं होतं) पण ठरवलं, की गावी जायचं...
ठरल्याप्रमाणे गावी मामाकडे गेलो. शहर आणि गावाच्या वातावरणात फरक पडतोच नां..। गावात बस पोहोचल्यानंतर बस-स्टँड पर्यंत जाणार्‍या रस्त्यावर इतक्या सकाळी सुद्धा वर्दळ होती. स्टँडवर मामा घ्यायला आला होता. मामाच्या घरी जाताना वाटेत अनेकजण रामराम, नमस्कार करत होते. मनात विचार आले, खरंच किती छान..त्यानिमित्ताने संवाद तरी साधला जातो एकमेकांशी. नाहीतर, आमच्या मोठ्या शहरात अगदी घराच्या ओट्यावर बाहेर बसलेले शेजारी  तोंडातून चकार शब्द काढायला सुद्धा तयार होत नाहीत. पाहूणे म्हणून आलेल्या एखाद्या व्यक्तीने कोणाचा पत्ता विचारला तर केवळ हातानेच इशारा केला जातो किंवा खुणावले जाते. इथे तर पहा, अगदी सगळं वातावरणच जीवंत असल्यासारखं आणि चैतन्य असल्यासारखं वाटत होतं. त्यामुळे मला नकळत हुरुप आला. कदाचित गावाच्या मातीचा आणि वातावरणाचा हा परिणाम असावा. मामाचा मोठ्ठा वाडा होता त्यामुळे आपल्या अपार्टमेंटमध्ये असलेल्या केवळ तीन खोल्यांची (वन् बीएचके) आठवण चटकन आली. वाड्यात दाराजवळच शेणाने सारवलेली जमीन, काढलेली छान मोठ्ठी रांगोळी, आजुबाजूला असलेली मोगरा, गुलाब, रातराणी, निशिगंध अशी कितीतरी फुलांची झाडं आणि अनेक झाडांना आलेला बहर यामुळे तर अगदी प्रसन्न वाटत होतं. अनेक दिवसांनी भाचा आला म्हणून मामीने सुद्धा औक्षण केलं, दूध-भाकरीचा तुकडा टाकला..घरात बॅग ठेवल्यानंतर सगळ्या मोठ्यांना नमस्कार केला, आमच्या आजोबांना तर आश्चर्य वाटलं, की अजूनही हा नमस्कार करतो (अर्थात हे सगळे आई-वडिलांचे संस्कारच होते)...।
दोन दिवस छान गप्पा करण्यातच वेळ गेला. तिसर्‍या दिवशी मात्र थोडं बोअर झालं. मग, मामाने माझ्या समवयस्क मुलांशी ओळख करून दिली. कारण मामाचा मुलगा जॉबच्या शोधार्थ नशीब अजमवायला बाहेरगावी गेला होता. शिक्षण संपल्यानंतर पालकांसकट आजकाल मुलांना सुद्धा काहीतरी करण्याची जिद्द असते, इच्छा असते. आणि मध्यमवर्गीयांना तर याशिवाय गत्यंतरच नसते नां। मामाची शेती होती, परंतु मामाच्या मुलाला शेती करायची नव्हती, अर्थात मुलाने काहीतरी मोठ्या पदावर काम करावे अशी मामाचीही इच्छा होती. आमचे आजोबा सुद्धा नवीन आणि चांगल्या विचारांचा स्वीकार करणारे असल्यामुळे नोकरी हा विषय फारसा महत्वाचा आणि जड नव्हता.
पण, मी खेळायला, हुंदडायला जाण्याऐवजी मामाबरोबर शेतात जायचा विचार पक्का केला. त्यानिमित्ताने शेतीची थोडी माहिती होईल, इतकेच..। दुसर्‍या दिवशी आम्ही सकाळीच सातच्या आत शेतात पोहोचणार होतो...
(पुढील भाग उद्या...)

गुरुवार, २१ एप्रिल, २०११

सुट्टीची भटकंती...

उन्हाळ्याच्या सुट्ट्या अनेक ठिकाणी लागल्या आहेत. काही ठिकाणी लवकरच लागतील. आता काय? किमान पंचेचाळीस दिवस म्हणजेच दीड महिना मज्जाच मज्जा...। मध्यंतरी वार्षिक परीक्षा असल्यामुळे आम्हाला आई-बाबांनी अभ्यासाव्यतिरिक्त काहीच करू दिलं नव्हतं. तुझी परीक्षा झाल्यानंतर करायचं, ते कर..असं सांगून ते मोकळे झाले होते.
परीक्षा संपली आणि काय? दरवर्षाप्रमाणे आम्ही मित्र-मैत्रिणी सिनेमाला गेलो. आजकाल तर मल्टीप्लेक्स असल्यामुळे सगळीच धमाल येते. तिकिटाचे पैसे जास्त द्यावे लागतात हे खरं असलं तरीही तिथे छान एअर-कंडीशन, पॉपकॉर्न, सूप, आईस्क्रीम, शेंगदाणे, चिप्स, कोल्ड्रिंक्स अशा सगळ्या सोयी आतल्या आतच केलेल्या असल्यामुळे मध्यांतरात रस्त्यावर जायची गरज नाही. असंही रस्त्यावर वाहनांची इतकी वर्दळ असते की रस्ता ओलांडताना अपघात झाला नाही म्हणजे सुटलो एकदाचा...असं म्हणून परत येऊन आपल्या चेअरवर बसून सिनेमा पहायचा. हो, एक मात्र आहे..पूर्वी चित्रपटगृहात असलेले उंदीर आजही मल्टीप्लेक्समध्ये आहेत. ए.सी. ची हवा खाऊन ते अजूनच गलेलठ्ठ झाले आहेत. त्यांचीही नवीन पीढी आली असेल...
अनेक दिवसांपासून साचलेली झोप मी आता आठवडाभर घेणार आहे. नंतर गावाला जाण्याचा विचार करेन. पण गावाला नेमकं कुठे जाऊ? मित्रांबरोबर कुठेतरी ७-८ दिवसांसाठी जाऊ की नेहमीप्रमाणे गावाकडे, गावाला मामाकडे जाऊ? अशा द्विधा स्थितीत मी आहे. बघू या, काय प्लॅनिंग होतंय ते...। पुन्हा उद्या तुम्हांला मी भेटायला येईन..
नमस्कार!

कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप

(पनवेल):  राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...