निवडणूक आयोग लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
निवडणूक आयोग लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १२ ऑगस्ट, २०१२

मीरा-भाईंदर महानगरपालिकेसाठी सरासरी ५२ टक्के मतदान-सोमवारी मतमोजणी

मुंबई, ता. १२- मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सरासरी ५२ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत पार पडली व कुठेही अनुचित प्रकार घडल्याची नोंद झाली नाही, अशी माहिती राज्य निवडणुक आयुक्त श्रीमती नीला सत्यनारायण यांनी दिली आहे.

मीरा-भाईंदर महानगरपालिकेत ४७ प्रभागात एकूण ९५ जागा असून त्यासाठी एकूण ५१६ उमेदवार रिंगणात होते. मतदानासाठी सर्वत्र आवश्यक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सोमवारी (ता. १३ ऑगस्ट) सकाळी नऊ वाजता मतमोजणी होईल, असेही श्रीमती सत्यनारायण यांनी सांगितले.

बुधवार, १ ऑगस्ट, २०१२

राज्यातील ७,७५६ ग्रामपंचायतींच्या ९ सप्टेंबरला सार्वत्रिक निवडणुका

मुंबई, ता. १- राज्यातील ७ हजार ७५६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ९ सप्टेंबर २०१२ रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी केली आहे. संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आज मध्यरात्रीपासून मतमोजणी होईपर्यंत आचारसंहिता लागू राहील, असेही त्यांनी म्हटले आहे.

नामनिर्देशनपत्रे २१ ऑगस्ट २०१२ ते २५ ऑगस्ट २०१२ या कालावधीत स्वीकारण्यात येतील. यांची छाननी २७ ऑगस्टला होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत २९ ऑगस्ट असेल. त्याच दिवशी चिन्ह नेमून देऊन अंतिमरित्या निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. ९ सप्टेंबरला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत मतदान होईल. दुसर्‍या दिवशी १० सप्टेंबरला मतमोजणी होईल. सर्व ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांद्वारे मतदान घेण्यात येईल. उमेदवारांना दैनंदिन खर्च सादर करणे आवश्यक राहील. तसेच निवडणुकीनंतर ३० दिवसांच्या आत एकूण खर्चाची माहिती सादर करावी लागेल.

जिल्हानिहाय मतदान होणार्‍या ग्रामपंचायतींची संख्या अशी- 
ठाणे ९८, रायगड २४७, रत्नागिरी २२६, सिंधुदुर्ग ३२९, नाशिक १८९, अहमदनगर २१०, धुळे १०८, जळगाव १३१, नंदुरबार ५३, पुणे २२०, कोल्हापूर ४७७, सांगली ४५९, सातारा ३२५, सोलापूर १९४, औरंगाबाद २१८, बीड ७०३, हिंगोली ६२, जालना २८५, लातूर ३५३, नांदेड १७७, उस्मानाबाद १६५, परभणी १२५, अमरावती २६२, अकोला २७७, बुलडाणा २७८, वाशिम २८७, यवतमाळ १००, नागपूर २४६, भंडारा ३८०, चंद्रपूर ६१, गडचिरोली ३९, गोंदिया ३५७ आणि वर्धा ११५. एकूण ७, ७५६.

शनिवार, २४ डिसेंबर, २०११

सहा नगरपरिषदांसाठी ६८ टक्के मतदान

मुंबई, ता. २३- नांदेड जिल्ह्यातील पाच आणि लातूर जिल्ह्यातील एक अशा सहा नगरपरिषदांसाठी शुक्रवारी (ता. २३) झालेल्या मतदानात सरासरी ६८ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज निवडणूक आयोगाने व्यक्त केला आहे. सर्वत्र मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्याचे राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी कळविले आहे.

नांदेड जिल्ह्यातील बिलोली, कंधार, कुंडलवाडी, मुदखेड, देगलूर आणि लातूर जिल्ह्यातील अहमदपूर या सहा नगरपरिषदांसाठी शुक्रवारी (ता. २३) मतदान झाले. दुपारी साडेतीनपर्यंत कुंडलवाडी येथे सर्वाधिक ५९.२७ टक्के तर कंधार येथे ५८.४६ टक्के मतदान झाले होते. या दोन्ही ठिकाणी मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत होता. दुपारनंतर सर्वच ठिकाणी मतदानास वेग आला. सर्व सहा नगरपरिषदांसाठी सरासरी ६८ टक्के मतदान झाले असून कुठेही अनुचित घटना घडली नसल्याचे निवडणूक आयोगाने कळविले आहे.

बुधवार, ३० नोव्हेंबर, २०११

अपीलाव्यतिरिक्त इतर जागांचा निवडणूक कार्यक्रम पूर्वनियोजनाप्रमाणेच [नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-२०११]



 मुंबई, ता. ३०- नगरपरिषदांच्या निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी दिलेल्या उमेदवारी अर्जासंदर्भातल्या निर्णयाविरुद्ध न्यायालयात अपील दाखल झालेल्या जागेकरिता अपीलाचा निकाल लागल्यानंतर तिसर्‍या दिवसापर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असेल. परंतु अपील दाखल न झालेल्या जागांचे चिन्हवाटप आणि इतर कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमानुसारच होईल.
 

राज्यातील १८८ नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी ८ डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्जाबाबत अपील दाखल झालेल्या जागांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा टप्पा पूर्ण झाला असल्याने या जागांचा निवडणूक कार्यक्रम पू्र्वीच निश्चित केल्यानुसार पार पडेल.
 

महाराष्ट्र नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक नियम १९६६ मधील नियम ४ च्या पोटकलम ३ अनुसार अपीलाचा निकाल लागण्यानंतर तिसर्‍या दिवसापर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असेल. तसेच यानंतर मतदान दिनांक राज्य निवडणूक आयोगाकडून स्वतंत्रपणे कळविण्यात येईल, असे राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे.

कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप

(पनवेल):  राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...