काँग्रेस लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
काँग्रेस लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ९ मार्च, २०१४

काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये हिंगोली-रायगड मतदारसंघांची अदलाबदल- हातकणंगलेमध्येही काँग्रेसचा उमेदवार लढणार

मुंबई, दि. 8 मार्च 2014: काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने हिंगोली व रायगड लोकसभा मतदारसंघांची अदलाबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. 2009 मध्ये काँग्रेसने लढवलेली रायगडची जागा आता राष्ट्रवादी काँग्रेस लढणार असून, राष्ट्रवादीच्या कोट्यात असलेली हिंगोलीची जागा काँग्रेस लढवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यात असलेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार उभा करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. दि. 8 मार्च 2014 रोजी नवी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री शरद पवार आणि मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण यांची चर्चा झाली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री प्रफुल्ल पटेल आणि मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या बैठकीत दोनही पक्षांच्या संमतीने वरील निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयानंतर महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी काँग्रेस 27 मतदारसंघ तर राष्ट्रवादी काँग्रेस 21 मतदारसंघ लढवेल.

मंगळवार, २१ जानेवारी, २०१४

राज्यातील बहुतांश काँग्रेस उमेदवारांची घोषणा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात

मुंबई, दि. 20 जानेवारी 2014: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार घोषित करण्याच्या काँग्रेस पक्षाच्या नियोजित कार्यक्रमानुसार राष्ट्रीय पातळीवरील पहिली यादी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होणे अपेक्षित असून, त्यामध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांची मोठी संख्या असेल, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.श्री माणिकराव ठाकरे यांनी दिली आहे. दि. 20 जानेवारी 2014 रोजी टिळक भवन मुंबई येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.श्री माणिकराव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य निवड मंडळाची बैठक झाली. या बैठकीला मंडळाचे सदस्य मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस खा.श्री गुरूदास कामत, मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रा.श्री जनार्दन चांदूरकर, विधान परिषदेचे सभापती श्री शिवाजीराव देशमुख, माजी मुख्यमंत्री श्री अशोक चव्हाण, वनमंत्री श्री पतंगराव कदम, श्री सुरूपसिंग नाईक, राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष आ.श्री राजीव सातव, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती कमलताई व्यवहारे, सेवादलचे अध्यक्ष श्री चंद्रकांत दायमा, इंटकचे अध्यक्ष आ.श्री जयप्रकाश छाजेड, एनएसयुआयचे अध्यक्ष श्री शिवराज मोरे उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना आ.श्री माणिकराव ठाकरे म्हणाले की, या बैठकीत राज्यातील सर्वच्या 48 लोकसभा मतदारसंघातील राजकीय समिकरणे व परिस्थितीवर विचारविनिमय करण्यात आला. परंतु, काँग्रेसने नेहमीच धर्मनिरपेक्ष पक्षांना सोबत घेऊन समोर जाण्याची काँग्रेसची भूमिका घेतली आहे व ती आजही कायम आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, भारिप-बहुजन महासंघ, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, बहुजन विकास आघाडीसोबत मिळून निवडणूक लढण्यास प्रदेश काँग्रेसचे निवड मंडळ अनुकूल आहे. विविध पक्षांसोबत आघाडीचा निर्णय घेणा-या संरक्षण मंत्री श्री ए. के. अॅन्थनी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या राष्ट्रीय पातळीवरील समितीकडे तसा अहवाल देखील रवाना करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्तरावरून बोलणी करण्याची परवानगी मिळाल्यानंतर लगेच उपरोक्त समविचारी पक्षांशी जागावाटपाची बोलणी केली जाईल, असेही आ.श्री ठाकरे म्हणाले.

रविवार, ३ मार्च, २०१३

अकोला येथे काँग्रेस मेळावा उत्साहात



अकोला, दि. 2 मार्च: आजवर केवळ काँग्रेसनेच जे बोलले ते करून दाखवले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी इंदू मीलची जागा देण्याचा निर्णय असो वा देशातील प्रत्येक मुलाला चांगले शिक्षण देण्यासाठी शिक्षणाचा अधिकार कायदा लागू करण्याचे आश्वासन असो, त्याची पूर्तता फक्त काँग्रेस पक्षानेच करून दाखवली आहे. सर्वसामान्यांसाठी काम करण्याचे हे कर्तव्य काँग्रेस भविष्यातही अशाच प्रकारे पूर्ण करीत राहील, असे मोहन प्रकाशजी यांनी म्हटले आहे.

अकोला येथील स्वराज भवनाच्या प्रांगणात आयोजित अमरावती विभागीय काँग्रेस मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून संबोधित करताना ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे होते तर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे चिटणीस अनिस अहमद, अकोल्याचे पालकमंत्री व शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा, समाज कल्याण मंत्री शिवाजीराव मोघे, रोहयो मंत्री डॉ. नितीन राऊत आदी नेते याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.

या मेळाव्याला संबोधित करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.श्री. माणिकराव ठाकरे यांनी विरोधी पक्षांवर कडाडून टीका केली. विरोधी पक्ष केवळ सत्ताप्राप्तीसाठी फोडाफाडीचे राजकारण करीत आहे. देशातील विविध समाज आणि घटकांमध्ये व्देष निर्माण करण्याचे राजकारण त्यांनी चालवले आहे. केवळ काँग्रेस पक्षानेच नेहमी देशाचा आणि सर्वसामान्यांचा विचार केला असून, जनताही सातत्याने काँग्रेसच्या पाठीशी उभी राहिली आहे. कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीसाठी सज्ज व्हावे, असे आ. माणिकराव ठाकरे यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य शासनाने अकोला परिसर व अमरावती विभागात केलेल्या विविध कामांची उदाहरणे देत सरकार नेहमी या विभागाच्या विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. अकोला विमानतळाचा प्रश्न आता मार्गी लागला असून, इतर प्रलंबित समस्यांवर विचार सुरू आहे. अमरावती विभाग व अकोला परिसरात गारपीटीने नुकसान झालेल्या शेतक-यांना शासनाकडून मदत देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात सांगितले.

या मेळाव्याला अमरावती विभागातील काँग्रेसचे आमदार, जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप

(पनवेल):  राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...