रविवार, ३१ मार्च, २०१३

दमा असूनही दम-दार गाणारे विष्णुबुवा...




जे गरिब पर हित करे, ते रहीम बड लोग।
कहाँ सुदामा बापुरो, कृष्ण मिताई जोग।।

अर्थात- जे लोक गरीबांचे भले करतात, ते सर्वात मोठे. मोठे ते नाहीत, जे एखाद्या मोठ्या पदावर असतील...। इथे रहीमदासजींनी कृष्ण आणि सुदामाचे उदाहरण देऊन सांगितलंय की सुदामा गरीब असूनही, कृष्णाने त्याच्याशी मैत्री केली होती..! सुदामा कृष्णाचा 'जिवलग मित्र' होता.

रहीम यांचा हा दोहा अचानक आठवला! निमित्त होतं, ते म्हणजे दारासमोर बसून मधुर आवाजात अभंग सादर करणार्‍या भिक्षेकर्‍याचं...! वयाची सत्तरी गाठलेला मात्र तरीही पोटाची खळगी भरण्यासाठी अजूनही दारोदार फिरून भिक्षा मागणारा हा भिक्षेकरी अनेक दिवसांपासून वेगवेगळे अभंग, भजनं सादर करून मिळेल त्या पैशावर हा गृहस्थ कुटुंबाचा उदरनिर्वाह अनेक वर्षांपासून चालवतोय.


विष्णुबुवा असं यांचं नाव असून काही दिवसांपासून ते इंदूरमधल्या विशेषतः महाराष्ट्रीयन कॉलन्यांमध्ये फिरून मराठी बांधवांकडून मिळतील ते पैसे, कपडे आदी वस्तूंद्वारे आपला उदरनिर्वाह चालवतात. महाराष्ट्रीयन कॉलन्यांमध्ये फिरल्यामुळे मराठीत बोलता येतं आणि दोन पैसे जास्त मिळतात अशी विष्णुबुवांची भावना आहे. ते मूळचे महाराष्ट्रातल्या मलकापूरचे असून विदर्भासह मध्य प्रदेशातल्या भोपाळ, जबलपूर, हरदा, इंदूर आदी ठिकाणी जाऊन त्यांच्या मधुर आवाजामुळे नागरीक अक्षरशः मंत्रमुग्ध होऊन त्यांची वाहवा करतात, मात्र पैसे फार कमी लोक देतात अशी खंत विष्णुबुवा व्यक्त करतात. आपला आधार असलेला एकमेव मुलगा आणि सून काही वर्षांपूर्वीच वारले, यामुळे नातू पांडरुंग याला सोबत घेऊन गावोगावी फिरतो आणि मिळेल त्यात पोट भरतो. मधुनमधुन मध्यप्रदेशातल्या एखाद्या छोट्या गावात शासनातर्फे दोहे, भजनं गाण्याची संधी मिळते तेव्हा मात्र काही-हजार रुपये मिळतात आणि तेवढ्यापुरतं का होईनां, विष्णुबुवांना आनंद होतो. स्व. पं. भीमसेन जोशी यांचे अभंग, भजनं, कबीर, रहीम यांचे दोहे सादर करतात. अक्षरशः काठीचा आधार असलेली एकतारी सुद्धा जुनी झाली असल्याचं तिच्याकडे पाहिल्यावर सहज लक्षात येतं. विष्णुबुवांना सध्या दम्याचा त्रास होत असून गाणं म्हणताना काहीवेळा दम लागतो. परंतु त्याकडे दुर्लक्ष करून मधुर आणि दमदार आवाजात ते भजनं सादर करतात. दम्याचा त्रास होऊ नये म्हणून जवळ बाळगलेला स्प्रे सुद्धा लवकरच संपणार असून, त्यासाठी पैसे कसे जमतील याची चिंता त्यांना सध्या सतावते आहे. तरुणाईला सुद्धा लाजवेल इतका खणखणीत त्यांचा आवाज आहे, हे मात्र खरंय...

शनिवार, १६ मार्च, २०१३

संवेदनशील मतदान केंद्रांबाबत सतर्कता बाळगावी- राज्य निवडणूक आयुक्त


पुणे, दि. 16 : ग्रामपंचायतीच्या निवडणुका मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने संवेदनशील मतदान केंद्रांबाबत पोलिस आणि संबंधित अधिकाऱ्यांनी विशेष सतर्कता बाळगावी, अशा सूचना राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी आज येथे दिल्या.
         
पुणे जिल्ह्यातील 70 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका आणि 63 रिक्त जागांच्या होणाऱ्या पोटनिवडणुकांसाठी 29 मार्च 2013 रोजी मतदान होणार आहे. त्यासंदर्भात श्रीमती सत्यनारायण यांनी आज येथे आढावा बैठक घेतली. जिल्हाधिकारी विकास देशमुख व अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर आदींसह अन्य संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.
        
 मतदान यंत्रे, मार्कर पेन व इतर मतदानाच्या साहित्याबाबत आढावा घेऊन श्रीमती सत्यनारायण यांनी सांगितले की, आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्यासाठी सर्वांनी दक्ष राहावे. आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून निवडणूक असलेल्या ठिकाणी राजकीय पक्ष आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन संबंधितांना निवडणुकांची माहिती द्यावी. तसेच पेडन्यूजबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समित्या नियुक्त केल्या असून त्यासंदर्भातील तक्रारी या समित्यांकडे दाखल कराव्यात.

शुक्रवार, ८ मार्च, २०१३

जागतिक महिला दिन संदेश, शुभेच्छा

English madhe LADY, Marathit MAHILA, Hindi madhe NARI...
Yanchi saath nasel tar, aahe baatch Adhuri...
Theva lakshat ek goshta, ek na ek divas padel hi
Sampurna Duniyela BHARI...!!!

Jagtik Mahila Dinachya Hardik Shubhechha.


इंग्रजी मध्ये लेडी, मराठीत महिला, हिंदी मध्ये नारी...
यांची साथ नसेल तर, आहे बातच अधुरी...
ठेवा लक्षात एक गोष्ट, एक ना एक दिवस पडेल ही
संपूर्ण दुनियेला भारी...!!!

जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा.

रविवार, ३ मार्च, २०१३

अकोला येथे काँग्रेस मेळावा उत्साहात



अकोला, दि. 2 मार्च: आजवर केवळ काँग्रेसनेच जे बोलले ते करून दाखवले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी इंदू मीलची जागा देण्याचा निर्णय असो वा देशातील प्रत्येक मुलाला चांगले शिक्षण देण्यासाठी शिक्षणाचा अधिकार कायदा लागू करण्याचे आश्वासन असो, त्याची पूर्तता फक्त काँग्रेस पक्षानेच करून दाखवली आहे. सर्वसामान्यांसाठी काम करण्याचे हे कर्तव्य काँग्रेस भविष्यातही अशाच प्रकारे पूर्ण करीत राहील, असे मोहन प्रकाशजी यांनी म्हटले आहे.

अकोला येथील स्वराज भवनाच्या प्रांगणात आयोजित अमरावती विभागीय काँग्रेस मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून संबोधित करताना ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे होते तर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे चिटणीस अनिस अहमद, अकोल्याचे पालकमंत्री व शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा, समाज कल्याण मंत्री शिवाजीराव मोघे, रोहयो मंत्री डॉ. नितीन राऊत आदी नेते याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.

या मेळाव्याला संबोधित करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.श्री. माणिकराव ठाकरे यांनी विरोधी पक्षांवर कडाडून टीका केली. विरोधी पक्ष केवळ सत्ताप्राप्तीसाठी फोडाफाडीचे राजकारण करीत आहे. देशातील विविध समाज आणि घटकांमध्ये व्देष निर्माण करण्याचे राजकारण त्यांनी चालवले आहे. केवळ काँग्रेस पक्षानेच नेहमी देशाचा आणि सर्वसामान्यांचा विचार केला असून, जनताही सातत्याने काँग्रेसच्या पाठीशी उभी राहिली आहे. कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीसाठी सज्ज व्हावे, असे आ. माणिकराव ठाकरे यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य शासनाने अकोला परिसर व अमरावती विभागात केलेल्या विविध कामांची उदाहरणे देत सरकार नेहमी या विभागाच्या विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. अकोला विमानतळाचा प्रश्न आता मार्गी लागला असून, इतर प्रलंबित समस्यांवर विचार सुरू आहे. अमरावती विभाग व अकोला परिसरात गारपीटीने नुकसान झालेल्या शेतक-यांना शासनाकडून मदत देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात सांगितले.

या मेळाव्याला अमरावती विभागातील काँग्रेसचे आमदार, जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

शुक्रवार, १ मार्च, २०१३

राहुल गांधी यांची मुंबई भेट...


अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सन्माननीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवार दिनांक 1 मार्च 2013 रोजी मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, मुंबई शहरातील लोकप्रतिनिधी आणि काही निमंत्रितांशी चर्चा केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या टिळक भवन कार्यालयात ही बैठक घेण्यात आली.

जयपूर येथे जानेवारी महिन्यात झालेल्या चिंतन शिबिरात राहुल गांधी यांनी प्रत्येक राज्यात जाऊन पदाधिका-यांशी चर्चा करण्याची घोषणा केली होती. पक्षातील शेवटच्या घटकापर्यंत जाऊन त्यांच्याशी संवाद साधण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी आज मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीशी चर्चा केली. या बैठकीमध्ये प्रामुख्याने संघटनात्मक विषयांवर चर्चा करण्यात आली.

सकाळी 9 च्या सुमारास राहुल गांधी यांचे मुंबईत आगमन झाले. महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच महाराष्ट्र मंत्रिमंडळातील सन्माननीय सदस्यांनी राहुलजी गांधी यांचे मुंबई विमानतळावर स्वागत केले. त्यानंतर राहुल गांधी थेट टिळक भवनला दाखल झाले.

त्यांनी सर्वप्रथम दिवंगत नेते स्व. वसंतदादा पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांनी प्रतिमेवर पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीच्या विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत राहुलजी गांधी यांनी स्व. वसंतदादा पाटील यांनी राजकारण, सहकार, शिक्षण व सामाजिक क्षेत्रात दिलेल्या बहुमूल्य योगदानाचा आवर्जून उल्लेख केला, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रवक्ते सचिन सावंत यांनी कळविले आहे.

नवी मुंबई मेट्रो – आता वाटचाल 21 व्या शतकाच्याही पुढे

स्वयंपूर्ण नवी मुंबईतील भविष्याची गती सांभाळणारा तर्कसंगत आणि सुयोग्य प्रकल्प म्हणजे नवी मुंबई मेट्रो. परिवहनाच्या बृहद आराखड्यावर आधारीत बहुपर्यायी दळणवळण व्यवस्थांना पूर्णत्व देणे हाच मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा उद्देश.

दिल्ली मेट्रो रेल्वे कॅार्पोरेशन आणि ली असोसिएट्‌स साऊथ एशिया यांच्या सूचनाबरहूकुम नवी मुंबईत पाच मार्गांचे जाळे विणले जाणार आहे. पूर्णत: उन्नत मार्गिकेवरून धावणारी ही मेट्रो पहिल्या टप्प्यात 11 कि.मी. अंतराच्या बेलापूर ते पेंधर क्षेत्रातील परिवहनाला नवे परिमाण देईल यात शंका नाही.
रेल्वेने निर्धारित केलेल्या बांधकाम दर्जाच्या परिमाणांची काटेकोर पूर्णता जागे अभावी, जागेच्या पूर्व-नियोजित वापरामुळे अथवा आरक्षणामुळे होऊ न शकल्याने नवी मुंबईतील काही नोडस्‌ रेल्वे मार्गापासून वंचित राहिले. जनतेला सर्व सुविधा पुरविण्याचा वसा घेतलेल्या, नागरिकांच्या समस्यांची, मागण्यांची प्राथम्याने दखल घेणाऱ्या सिडको प्रशासनानं त्यावर काढलेला तोडगा म्हणजे नवी मुंबई मेट्रो.

मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या शक्यतेबाबतचा सकारात्मक अहवाल दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळाकडून प्राप्त होताच सिडकोने व्यवस्थापकीय संचालक श्री. तानाजी सत्रे यांच्या नेतृत्वाखाली या प्रकल्पास गती देण्यास प्रारंभ केला. सिडकोच्या बांधकाम दर्जास साजेसा आणि प्रकल्प परंपरेत बसेल असा हा प्रकल्प व्हावा, नागरिकांच्या गरजांची पूर्तता योग्यरित्या व्हावी म्हणून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मेट्रो रेल्वे प्रकल्पांचा सिडको अधिकाऱ्यांनी अभ्यास केला.

प्रकल्पाच्या जडणघडणीचे टप्पे निश्चित करणे, कालावधी ठरविणे, दर्जाची सुनिश्चिती करणे आणि संभाव्य खर्चाचा अंदाज घेणे, ह्यासाठी सिडकोने या क्षेत्रातील अग्रगण्य अशा लुईस बर्गर या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कंपनीची विशेष सल्लागार म्हणून पारदर्शक आणि स्पर्धात्मक लिलाव पद्धतीने नेमणूक केली. दरम्यान प्रकल्पाच्या देखरेखीसाठी सिडकोच्या तांत्रिक गटाची नेमणूक करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनानं 10 सप्टेंबर 2010 रोजी, भारतीय ट्रॅम कायदा, 1886 अन्वये नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या प्रशासन आणि अंमलबजावणीसाठी सिडकोला अधिकार दिले. मेट्रो रेल्वेच्या पहिल्या टप्प्याच्या कामाचा पायाभरणी समारंभ 1 मे 2011 रोजी मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पार पडला. मुख्यमंत्र्यांनी हा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करण्याचे आवाहन सिडकोला केले. प्रकल्पाचा नियोजित कालावधी पाच वर्षांचा असला तरी मुख्यमंत्र्यांच्या विश्वासास पात्र ठरण्याचा श्री. सत्रे यांनी निर्धार व्यक्त केला असून त्यादृष्टीने कामाला सुरुवात झाली आहे.

ज्या दोन स्तंभांवर मेट्रो मार्गाचा व्हायडक्ट आधारलेला असतो ते पायर्स उभारणे हा या प्रकल्पाचा सर्वाधिक महत्वाचा टप्पा आहे. मेट्रोचा संपूर्ण डोलाराच यावर आधारलेला असल्याने त्याचा पाया भक्कम असणं क्रमप्राप्त आहे. म्हणून यास अधिक काळ लागतो. शिवाय या कामाचे सर्व सामान रस्त्यावर पसरलेले असल्याने त्यास जागाही खुप लागते आणि रहदारीची गैरसोयही होते. म्हणून या कामी दोन कंपन्यांची नेमणूक करण्यात आली आहे. आजवर या दोन्ही कंपन्यांनी 86 पायर्स उभारले आहेत. व्हायाडक्ट सोबतच स्थानकांची बांधणी, मेट्रो रेल्वेच्या कामांची यंत्र-सामुग्री ठेवण्यासाठी आगारांचा विकास तसेच विद्युत व्यवस्था, सिग्नल यंत्रणा यांची कामेही विविध टप्प्यांवर सुरु आहेत.

दरम्यान नवी मुंबईच्या भविष्यातील गरजा लक्षात घेता सिडकोने काही महत्वाचे बदल या प्रकल्पात केले आहेत. डब्यांची रुंदी 2.9 मिटरवरून 3.2 मिटरपर्यंत वाढविण्यात आली आहे. दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळाने याला मान्यता दिली आहे. सविस्तर प्रकल्प अहवालात सुचविलेल्या 75 व्होल्ट एकदिश विद्युत प्रवाहाऐवजी (DC) कमी संख्येच्या ट्रॅक्शन सबस्टेशनचा, कमी जागा लागणारा 25,000 व्होल्ट एकांतरीत विद्युत प्रवाहाचा (AC) वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रकल्पाच्या दूरसंपर्क प्रणालिसाठी ऑडिओ फ्रिक्वेन्सी ट्रॅक सर्किट (ए.एफ.टी.वी.) आणि सिग्नल यंत्रणेसाठी रंगीत प्रकाश प्रणाली निश्चित करण्यात आली होती, यात सुधारणा करून दूरसंपर्कावर आधारित सर्वोत्कृष्ट रेल्वे नियंत्रण प्रणाली (सीबीटीसी) हा पर्याय निवडण्यात आला आहे. एएफटीसी प्रणालित तांब्याचा वापर असल्याने हवामानातील काही घटकांचा त्यावर विपरित परिणाम संभवतो ज्यामुळे यंत्रणेत बिघाड होण्याची शक्यता अधिक असते. त्याचप्रमाणे तांब्याच्या चोरींची शक्यताही असते. म्हणून हा बदल अत्यंत मूलगामी स्वरुपाचा आहे.

सीबीटीसी यंत्रणेत माहिती प्रक्षेपण अधिक खात्रीलायक होते. तसेच यात केंद्रीय नियंत्रण कक्षाकडून होणारे संदेशवहन दोन्ही बाजुंनी शक्य होते. रेल्वे गाडीचे अचूक स्थलनिर्देशन शक्य होते. तसेच उर्जा संवर्धनही होते. परिणामी धावपट्टीवरील दोन गाड्यांमधील अंतर 90 सेकंदापर्यंत कमी करून प्रणालीची क्षमता 65,000 पीएचपीडीटी इतकी वाढते. मेट्रोच्या सर्व स्थानकांवर स्वयंचलित प्रवासशुल्क यंत्रणा स्थापन्यात येणार आहे. या संगणकीकृत यंत्रणेत स्वयंचलित प्रवेशद्वार असतील. तिकिटांएवजी स्मार्ट टोकन्स आणि स्मार्ट कार्डसचा वापर करण्यात येणार आहे.

या संपूर्ण प्रकल्पात दर्जा तसेच सुरक्षेवर विशेष भर देण्यात आला असून मेट्रो प्रणालीच्या अंतिम निविदा प्रक्रियेत यासाठी स्वतंत्र गुणवत्ता लेखापरीक्षक आणि स्वतंत्र सुरक्षा निर्धारक यांची नेमणूक करण्याची तरतूद करण्यात आली आहे व दोघेही महामंडळाच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यास कटीबद्ध असतील.
प्रकल्पाविषयीच्या अपेक्षा वाढल्यामुळे भागधारकांना प्रकल्पाच्या विविध गतिविधीविषयी आवश्यक आणि योग्य माहिती देणे अत्यावश्यक झाले होते व ते परिणामकारकरित्या साधता यावे म्हणून मेट्रो प्रकल्पास वाहिलेले एक स्वतंत्र संकेतस्थळ निर्मिण्यात आले. www.navimumbaimetrorail.com या संकेतस्थळावर सामान्य जनतेला या प्रकल्पाविषयी अधिक माहिती जाणून घेता येईल. निविदा प्रक्रियेत वास्तुरचना क्षेत्रातील तज्ज्ञांकडून देण्यात आलेला सहभाग व परिपूर्ण तयारी यामुळेच हे साध्य करण्यात यश आले आहे.

मेट्रो प्रणालीच्या कार्यान्वयनासाठी एकूण 6 वेगवेगळे पर्याय असलेल्या सर्वकष प्रस्तावाचा तपशीलवार अभ्यास करण्यात आला व प्रत्येक पर्यायाचे फायदे–तोटे लक्षात घेऊन सिडको महामंडळाचा भागभांडवळात 26% सहभाग असलेला पर्याय अंतिम करण्यात आला. याचा प्रारंभीचा कार्यकाल 10 वर्षाचा असून त्याचा खर्च रू. 550 करोड इतका आहे. चालक संस्थेची निवड करण्यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया हाती घेण्यात येणार आहे.

महामंडळाच्या धोरणानुसार प्रकल्पाच्या आरंभापासून दर पंधरवड्यानी या प्रकल्पाचा आढावा अतिशय बारकाईने घेतला जातो त्यावर महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक स्वत: जातीने लक्ष ठेवून असतात तसेच महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी प्रकल्पाच्या संकल्पनेपासून ते आजपर्यंत प्रकल्पपुर्तीच्या एकूण कारभाराचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या कमीत कमी 60 बैठका तसेच प्रकल्प स्थळाला विविध राज्यस्तरीय मान्यवरांकडून दिल्या जाणाऱ्या नियमित भेटीच्या आधारे प्रकल्पाचा मध्यावधी आढावा घेण्याची आवश्यकता नाही, असे जर म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
(शब्दांकन- डॉ. मोहन निनावे, जनसंपर्क अधिकारी, सिडको)

कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप

(पनवेल):  राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...