कोरोना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कोरोना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ६ जुलै, २०२०

कोरोना...! आणखी खबरदारी

सुमारे चार महिन्यांपासून कोरोना विषाणूमुळे सगळे त्रस्त झाले आहेत. भारतासह अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर ताण पडला. देशात सतत लॉकडाउन करूनही अनेक नागरिकांना अजून याचे फारसे गांभीर्य नसल्याचे चित्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या आलेखावरून स्पष्ट होते. शासन, पोलिस, प्रशासन, प्रिंट-इलेक्ट्रॉनिक्स मीडिया यांनीही कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, फैलाव होवू नये यासाठी आपपल्या परीने शक्य तेवढी काळजी घेतली प्रयत्न केले. परंतु अद्याप देशातील एकही राज्य कोरोनामुक्त झालेले नसून शासनाने अनलॉक करून शिथीलता देऊन अर्थव्यवस्थेस गती देण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र अजून सुद्धा काळजी करण्यासारखीच परिस्थिती आहे.
सर्वत्र व्यवहार पूर्ववत होण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे तर सूज्ञ नागरीक कोरोनापासून बचाव कसा व्हावा, आपल्याला कोरोनाची लागण होवू नये यासाठी शक्य तेवढी काळजी घेत आहेत. परंतु कोरोनाकडे दुर्लक्ष करणारे लोकही कमी नाहीत, तर दुसरीकडे अनेक ठिकाणी पोलिस कर्मचारी, शासकिय कर्मचारी, डॉक्टर, मीडियाकर्मी आदी महत्त्वाच्या घटकांना देखील त्यांनी शक्य तितकी काळजी घेऊनही कोरोनाची बाधा झाली आहे.
कोरोना प्रतिबंधक लस अद्याप तयार झालेली नाही, आणि लस तयार झाली तरीही नेहेमी औषधे, लस घेऊन चालणार नाही. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढवणे हा सर्वोत्तम उपाय असल्याचे मत तज्ज्ञ मंडळींनी व्यक्त केले आहे. यासाठी दररोज सकाळी किमान अर्धा तास तरी स्वतःच्या आरोग्यासाठी देणे आवश्यक आहे. योगासने, प्राणायाम यासारखे दुसरे माध्यम सध्यातरी नसावे. योगासने करू न शकणाऱ्या लोकांनी अगदी आवश्यक असल्यासच घराबाहेर पडावे, तोंडाला मास्क व्यवस्थित लावावा, नाकाखाली मास्क जाणार नाही याची काळजी घ्यावी.

लिफ्ट वापर...
शक्य असल्यास लिफ्टचा वापर न करता जिन्याने ये-जा करावी. जिन्याच्या रेलिंगला स्पर्श करू नये. लिफ्ट वापरणे अगदी आवश्यक असेल तर हातात ग्लोज घाला किंवा कागदाने लिफ्टच्या बटणास, दरवाज्यास, हँडलला स्पर्श करावा, लिफ्टमधून बाहेर पडल्यानंतर लिफ्टसाठी वापरलेले ग्लोज, कागद कचऱ्याच्या डब्यात टाकावे किंवा डिस्पोज ऑफ करावे म्हणजे जास्त चांगले.

घर...
घरात प्रवेशद्वाराजवळच सॅनिटायझर ठेवून बाहेरुन आल्यानंतर याचा वापर करावा किंवा सोबत सॅनिटायझरची छोटी बाटली (स्टँडर्ड सॅनिटायझर तज्ञांच्या सल्ल्याने घ्यावे) खिशात ठेवावी, गरज असेल तेव्हा सॅनिटायझरने हात स्वच्छ करावा. बराच वेळ बाहेर असल्यास, भरपूर गर्दी असलेल्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी गेल्यास साबणाने घरी परतल्यानंतर स्वच्छ आंघोळ करावी. शक्य झाल्यास आपले स्वतःचे कपडे आपणच धुवून काढावे.

बाहेरील व्यक्ती...
अत्यावश्यक कामासाठी घरी प्लंबर, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक, वॉशिंग मशीन, फॅन आदी दुरुस्ती करणारी व्यक्ती आल्यास सर्वप्रथम त्यास आपल्यासमोर हातास सॅनिटायझर लावण्यास सांगावे, त्याच्या कामाशिवाय शक्यतो अन्य वस्तूंना हात लावू देऊ नये, आपण देखील त्याच्यापासून शक्य तेवढे दूर थांबावे.

रोग-प्रतिकारक शक्ती वाढवणे हितावह...
कोणताही रोग, विकार, आजार असो... तुमच्या प्रतिकारशक्तीवर बरेच काही अवलंबून असते. प्रतिकारशक्ती उत्तम असल्यास कोरोनासारखा महाभयंकर असा विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी असते. प्रयत्न करणे आपल्या हातात असल्यामुळे, दररोज किमान अर्धा तास तरी योगासनांच्या मार्गदर्शकांच्या सल्ल्याने योगासने करावी.
काढा- पाण्यात (व्यक्तीपरत्वे प्रमाण ठरवून) तुळस, 4-5 काळी मिरी/मिरपूड, सुंठ, मनुका, गवतीचहा, हळद, गूळ, चिमुटभर दालचिनी इ. रकमा टाकून सर्व जवळपास निम्मे उकळवून (तज्ज्ञांचा सल्ला घेऊन) काढा घ्यावा...काढा तयार झाल्यानंतर थोडे दूध घातले तरीही चालेल. चहाऐवजी काढाच घेतला तरीही अपाय नाही. (हा काढा कोरोनासाठी नाही, मात्र याचे सेवन नियमित केल्यास प्रतिकारशक्ती वाढू शकते)

कोरोनाच्या प्रादुर्भावाने काहीगोष्टी मात्र विचारनीय ठरल्या आहेत, त्यांचा अभ्यास केला जाऊन त्यादृष्टीने दृष्टीकोन बदलण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. पावसाळा म्हटला की सर्दी, पडसे, डोकेदुखी, ताप, अंगदुखी, डोळ्यांना खाज सुटणे, खोकला या गोष्टी आल्याच...! हे विकार झाल्यास शासनाची, वैद्यकीय तज्ज्ञांची काय भूमिका असेल, अशा रुग्णांना कसे ट्रीट केले जाईल याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे...

मंगळवार, १२ मे, २०२०

कोरोना: घ्यावयाची खबरदारी

सध्या संपूर्ण जगातच कोरोना विषाणूने अक्षरशः थैमान घातले आहे. भारतात तर दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची आणि संशयितांची संख्या वाढतच आहे. सध्याचा काळ हा महत्त्वाचा मानला जात आहे. सुमारे तीन महिन्यांपासून यावर उपाययोजना सुरू असून अद्याप कोरोनाबाबत कोणतीही लस सापडली असल्याचे अधिकृत वृत्त नाही. काही देशांनी लस सापडल्याचा दावा मात्र केला आहे.

येत्या 17 मे स लॉकडाऊन संपण्याबद्दल काय घोषणा होते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. शासनाने शेतकरी, मजूरवर्ग, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या घटक, संस्थांसाठी लॉकडाऊन अटी शिथील केल्या असल्या, तरीही पूर्णपणे मोकळीक मात्र दिलेली नाही, यावरून अद्यापही परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेणे आवश्यक आहे. काही ठिकाणी पोलिस आणि प्रशासन यांच्यात समन्वय नसल्याच्या बातम्या देखील कानावर येत आहेत. तथापि अत्यंत महत्वाच्या कामासाठी बाहेर जाणाऱ्या अनेकांना पोलिसांचा प्रसाद खाऊन परत यावे लागत असल्याचा आरोपही केला जात आहे.

कोरोनामुळे वर्क फ्रॉम होम...काम करणारी मंडळीही कंटाळली आहे. लॉकडाऊन केव्हा ना केव्हा काढून घेतले जाईल हे तर निश्चित आहेच. परंतु लॉकडाऊननंतर काय घडामोडी घडतील, काय बदल होतील, आयुषतर्फे आरोग्य-रक्षणासाठी, रक्षकांसाठी काही आचारसंहिता तयार केली जाईल का? यासह अनेक बाबींवर अद्याप प्रश्नचिन्ह कायम आहे.

लॉकडाऊनमुळे कधी नव्हे असा एक चांगला परिणाम मात्र झाला तो म्हणजे संपूर्ण कुटुंब अनेक वर्षांनंतर एकत्र आली, मुलांच्या, आईबाबांच्या, आजोबाआजीच्या डोळ्यासमोर सगळे कुटुंबीय 24 तास दिसत असल्यामुळे सर्वांनाच आनंद झाला. वातावरणात ध्वनी-प्रदूषण, पर्यावरणातील प्रदूषण इ. चे वाढलेले प्रमाण प्रचंड कमी होऊन आता रात्री आकाशात तारे, चांदण्या, सप्तर्शी, शनी, शुक्र, मंगळ, नेपच्यून आदी ग्रह, नक्षत्रे सहज पहाता येत आहेत. याचबरोबर स्कायलॅब, सॅटेलाइट देखील आकाशात फिरताना डोळ्यांनी सहज दिसत असल्याचे काही नागरीकांचे म्हणणे आहे.

परंतु, वर्क फ्रॉम होम..मुळे ऑफिसचा फिल येत नसल्याचे आयटी क्षेत्रातल्या अनेकांचे म्हणणे आहे. 'वर्क फ्रॉम होम' मुळे कंपन्यांची देखील प्रचंड बचत देखील होत असल्याचे वृत्त आहे. तर दुसरीकडे, अनेकदा प्रोजेक्ट, टास्क सहजासहजी हाताळता येत नसल्याची देखील तक्रार आहे. इंटरनेट सेवेवर अचानक ट्राफिक वाढल्याने नेट कनेक्टिव्हिटी अनेकदा डिस्टर्ब होत आहे, यामुळे मीटिंग्ज, मोठे प्रोजेक्ट्स, फाईल अपलोड आणि डाउनलोड करण्यात देखील अडचणी येत आहेत.

लॉकडाऊन पूर्णपणे काढून घेण्यात आल्यानंतर मात्र अनेक दिवस काळजी घ्यावी लागणार आहे हे निश्चित आहे. चेहऱ्यावर मास्क लावणे, शक्यतो लांब बाह्यांचा शर्ट वापरणे, बाहेर निघताना हँडग्लोज, दुचाकी अथवा कार, आपल्या वाहनाची हँडल, संबंधित एरिया निर्जंतुंक केल्याशिवाय शक्यतो निघू नये याप्रकारची खबरदारी  तसेच आणखी उपाययोजना तज्ञांच्या सल्ल्याने करणे अत्यंत आवश्यक आहे.

बाहेरगावहून घरी जाण्यासाठी रस्त्यांवर वाहनांची गर्दी नक्की होईल, यासाठी शासन, पोलिस यंत्रणा सावधगिरी बाळगेलच, मात्र नागरीकांनी स्वतः सतर्क रहाणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यांच्या सीमांवरच थेट, शरीराचे तापमान मोजणारी यंत्रणा कार्यान्वित करुन, तपासणी अहवाल संबंधित जिल्ह्यांच्या हॉस्पिटलनां (बहुदा ज्या जिल्ह्यातून प्रवासी आले आहेत आणि ज्या जिल्ह्यात प्रवेश करत आहेत अशा दोन्ही जिल्ह्यांना) शासकीय रुग्णालये, हॉस्पिटलचा ताण बऱ्याच प्रमाणात कमी होईल यात शंका नाही.

मंगळवार, २८ एप्रिल, २०२०

नवी मुंबई गृहनिर्माण संस्थांनी कोविड १९ साठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत योगदान द्यावे- सिडको

जगभर सर्वत्र थैमान घालणाऱ्या कोविड-१९ अर्थात कोरोना विषाणूचा सामना करायला महाराष्ट्र
शासनास मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आपले योगदान देण्याचे आवाहन सहनिबंधक,
सहकारी संस्था, सिडको यांच्यातर्फे त्यांच्या नवी मुंबईतील अधिकारक्षेत्रातील सर्व सहकारी गृहनिर्माण
संस्थांना करण्यात आले आहे.

कोविड-१९ विषाणूमुळे उद्भवलेल्या पॅनडेमिकचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे औषधे व
जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे, रोजगार गमावलेल्या मजूर, कामगार आदी आर्थिकदृष्ट्या दुर्बल
घटकातील लोकांना अन्न, निवारा व अन्य सुविधा पुरविणे इ. कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. या कामांकरिता
मोठ्या प्रमाणावर निधीची गरज आहे. याकरिता समाजातील व्यक्ती, संस्था, उद्योग समूह अशा विविध
स्तरांतून येणारा आर्थिक मदतीचा ओघ हा मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड १९ मध्ये संकलित करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर अशाप्रकारच्या नैसर्गिक आपत्तींच्या काळात मदतीसाठी नेहमीच पुढाकार घेणाऱ्या
गृहनिर्माण संस्थांनी आपल्या सामाजिक उत्तरदायित्वाचा भाग म्हणून मुख्यमंत्री सहाय्यत निधीसही आपले
आर्थिक योगदान देणे अपेक्षित आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या सहकार खात्यातर्फे अशाप्रकारच्या सार्वजनिकहिताच्या उपक्रमाकरिता देण्यात येणारे आर्थिक योगदान हे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० च्याकलम ६९ अंतर्गत कर सवलतीस पात्र करण्यात आले आहे. कोविड-१९ किंवा कोरोनाशी लढण्याकरिता नवीमुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्थांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड १९ मध्ये मोठ्या प्रमाणावर आपले आर्थिक योगदान देण्याचे आवाहन सहनिबंधक, सहकारी संस्था, सिडको यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड १९ चा तपशील खालीलप्रमाणे :
Name of Account : Chief Minister’s Relief Fund-COVID 19
Bank Saving Account : 39239591720
Bank : State Bank of India
Mumbai Head Branch Fort : 400023
Branch Code : 00300
IFSC CODE : SBIN0000300


मुख्यमंत्री सहाय्यता निधीस आरटीजीएस/एनईएफटी द्वारे आर्थिक सहाय्य करू इच्छिणाऱ्यांनी
गृहनिर्माण संस्थेच्या नावासह देण्यात आलेली रक्कम हा तपशील jointregcidco@gmail.com या ई-मेल
आयडीवर पाठवावा
. तसेच धनादेशाद्वारे (चेक) रक्कम देऊ इच्छिणाऱ्यांनी यतिश पाटील यांच्याशी

९७६८०१४४१३ या मोबाइल क्रमांकावर किंवा नवी मुंबई को-ऑपरेटिव्ह हाउजिंग सोसायटी फेडरेशनच्या
श्री. भास्कर म्हात्रे यांच्याशी ९८१९३०६९६७ या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप

(पनवेल):  राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...