रविवार, २८ ऑगस्ट, २०११

दत्ता पाटील यांच्या निधनामुळे सर्वसामान्यांचा आवाज हरपला- भुजबळ

मुंबई, दि. 27 : महाराष्ट्र विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते दत्तात्रय नारायण उर्फ दत्ता पाटील यांच्या निधनामुळे सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा आवाज हरपला, अशा शब्दात राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
श्री. भुजबळ यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, स्वातंत्र्यलढ्यासह संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत दत्ता पाटील यांनी अमूल्य योगदान दिले. 25 वर्षांहून अधिक काळ अलिबागचे नेतृत्व करीत असताना त्यांनी या विभागातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे हित कधीही नजरेआड होऊ दिले नाही. कोकण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रालाही त्यांनी मोलाचे योगदान दिले. या लोकांचा विधिमंडळातील एक कणखर आवाज म्हणून ते ओळखले जात. त्यांच्या निधनामुळे एक सच्चा, तळमळीचा लोकप्रतिनिधी काळाच्या पडद्याआड गेला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

गुरुवार, ४ ऑगस्ट, २०११

खाजगीकरणांतर्गत रस्ते चौपदरीकरणाच्या चार प्रकल्पांना पायाभूत सुविधा समितीची मान्यता

मुंबई, दि. 4 : महाराष्ट्र मंत्रीमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीच्या आज झालेल्या बैठकीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खाजगीकरणांतर्गत (बीओटी) चौपदरीकरणाच्या चार महत्त्वाच्या निविदा प्रस्तावांना आज मंजुरी देण्यात आली. याअंतर्गत एकूण 176.29 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे चौपदरीकरण करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे दिली.
मंत्रीमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीने मंजूर केलेल्या या प्रस्तावांमध्ये शिरोली (कोल्हापूर) ते सांगली, अहमदनगर-करमाळा-टेंभुर्णी, हडपसर-सासवड-बेलसरफाटा अधिक बेल्हा-पाबळ-उरुळीकांचन-जेजुरी-निरा आणि मोहोळ-कुरूल-कामती-मंद्रुप या रस्त्यांच्या चौपदरीकरण प्रकल्पांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
मंजूर झालेल्या प्रकल्पांची थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे :
1) शिरोली (कोल्हापूर) ते सांगली रस्ता (प्र. रा.मा. क्र.3 व रा.मा. 75) : या टप्प्यातील शिरोली ते अंकली आणि अंकली ते सांगली या 25.66 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे चौपदरीकरण आणि 26.95 किलोमीटर लांबीचे दुपदरीकरण करण्यात येणार आहे.
2) अहमदनगर-करमाळा-टेंभुर्णी (रा.मा. क्र. 141): या 61.71 किलोमीटर लांबीच्या रस्ता चौपदरीकरणास मान्यता देण्यात आली.
3) हडपसर-सासवड-बेलसरफाटा (रा.मा. क्र. 64) व बेल्हा-पाबळ-उरुळीकांचन-जेजुरी-निरा (रा.मा. क्र. 61) : या एकूण 41.06 किलोमीटरच्या रस्ते चौपदरीकरणास मान्यता देण्यात आली.
4) मोहोळ-कुरुल-कामती-मंद्रुप ते राज्यमार्ग क्र.13 ला जोडणारा रस्ता (रा.मा. क्र.149) : या एकूण 48.400 किलोमीटर लांबीच्या रस्ता चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.

बुधवार, ३ ऑगस्ट, २०११

मुंबई अनुभवणार 'हवाई फॉम्युला-1' चा थरार

मुंबई, दि. 3: अनेक अभिनव उपक्रमांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात तत्पर असणाऱ्या मुंबईकरांना 'हवाई फॉर्म्युला-1' म्हणून जगभरात लोकप्रिय होत असलेल्या 'एअरो-जीपी' या विमान स्पर्धेचा थरार या वर्षअखेरीस अनुभवावयास मिळणार आहे. या स्पर्धेचे भारतातील संयोजक असलेल्या मे. आय इंडिया इनोव्हेटिव्ह मिडिया या कंपनीला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) विनावित्तीय सहकार्यासाठीचे पत्र काल प्रदान केले.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांची आय-इंडिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हरभजन सिंग सहगल यांनी गेल्या सोमवारी या स्पर्धेच्या आयोजनासंदर्भात भेट घेऊन त्यांना पॉवरपॉइंट सादरीकरण दाखविले आणि मुंबईमध्ये या उपक्रमाच्या आयोजनासाठी एमटीडीसीकडून सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
'इएसपीएन-स्टार' वाहिनीच्या माध्यमातून जगभरातील 50हून अधिक देशांत या चित्तथरारक स्पर्धेचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राच्या पर्यटनाच्या प्रसिद्धीच्या दृष्टीने हा अभिनव उपक्रम उपयुक्त ठरेल, असे मत श्री. भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केले. त्यानुसार काल सायंकाळी एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश ढाकणे यांनी सदर कंपनीला सहकार्य करण्याबाबतचे पत्र दिले.
'एअरो ग्रॅंड प्रिक्स (जीपी)-2011' ही हवाई स्पर्धा अनेक बाजूंनी अभिनव आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी ठरणार आहे. साधारण 6 ते 8 एअरोबेटिक विमाने एका ठराविक कक्षेत जमिनीपासून अवघ्या 50 फूट इतक्या कमी अंतरावर 400 किलोमीटर प्रति तास इतक्या प्रचंड वेगाने एकमेकांशी स्पर्धा करतील. केवळ एअर रेसिंग असेच स्पर्धेचे स्वरुप नाही, तर एअर कॉम्बॅट, बार्नस्टॉर्मिंग अशा कसरतींनी ही स्पर्धा अधिकच चित्तथरारक आणि रंजक ठरेल. स्पर्धेसाठी मोकळी जागा आवश्यक असल्याने ती समुद्रावर किंवा वाळवंटातच घेता येते. मुंबईच्या समुद्रावर ती घेण्यात येईल. स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी देश-विदेशांतील नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभेल, असे आयोजकांचे म्हणणे आहे. एकूण पाच दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत तीन दिवस सराव फेऱ्या तर अखेरचे दोन दिवस अंतिम फेरीचे सामने होतील. स्पर्धेसाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक बाबींची पूर्तता तसेच परवानग्या मिळविल्यानंतर स्पर्धेसाठी नोव्हेंबर-डिसेंबरमधील तारखा निश्चित करण्यात येतील, अशी माहिती संयोजकांनी यावेळी दिली.
--
एअरो-जीपी क्रीडा प्रकाराविषयी...
युके स्थित फ्लाइंग एसेस (Flying Aces) या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक जेफ झॅल्टमन यांच्या संकल्पनेतून सन 2005 पासून 'एअरो-जीपी' स्पर्धा अधिकृतरित्या भरविण्यास प्रारंभ झाला. पहिली स्पर्धा स्लोव्हेनिया (2005) येथे झाली. त्यानंतर माल्टा (2006), रोमानिया (2007 व 2008),  युके (2008), अबु धाबी (2009 व 2010) याठिकाणी ही स्पर्धा भरविण्यात आली. यंदा आयइंडिया इनोव्हेटिव्ह मिडिया कंपनीच्या पुढाकाराने आणि एमटीडीसीच्या सहकार्याने ही स्पर्धा या वर्षअखेरीस मुंबईत भरविण्यात येणार आहे.

कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप

(पनवेल):  राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...