गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२५

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सज्जता- विमानतळ परिचालनाचा महत्त्वाचा टप्पा

 नवी मुंबई, प्रतिनिधी- नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (DGCA) संचालक श्री. फैज अहमद किडवई यांनी मंगळवार, दि.
२५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प स्थळाला भेट देऊन विमानतळाच्या
सज्जतेचा (Readiness) आढावा घेतला. 



यापूर्वी नवी मुंबई विमानतळ येथे ११ ऑक्टोबर २०२४ रोजी
भारतीय हवाई दलातर्फे घेण्यात आलेली इन्स्ट्रूमेन्ट लँडिंग चाचणी आणि २९ डिसेंबर २०२४ रोजी इंडिगोतर्फे
घेण्यात आलेली प्रवासी विमान लॅंडिंग चाचणी यशस्वीरीत्या पार पडली होती.
या प्रसंगी विपिन कुमार, (भा. प्र. से.) अध्यक्ष, भारतीय विमानतळ प्राधिकरण, श्री. प्रकाश निकम, प्रादेशिक
संचालक, नागरी विमान वाहतूक सुरक्षा मंडळ (BCAS), श्री. विजय सिंघल, (भा. प्र. से.), उपाध्यक्ष तथा
व्यवस्थापकीय संचालक, सिडको, श्री. शान्तनु गोयल, (भा. प्र. से.), सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको,
श्रीमती गीता पिल्लई, मुख्य महाव्यवस्थापक (परिवहन व विमानतळ), सिडको आणि नवी मुंबई इंटरनॅशनल
(एनएमआयएएल) यांचे अधिकारी यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीपूर्वी २४ फेब्रुवारी
२०२५ रोजी नागरी विमान वाहतूक महासंचलनालय आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या
अधिकाऱ्यांनी संपूर्ण दिवस विमानतळाची पाहणी केली.



नागरी विमान वाहतूक महासंचालनालय ही देशातील प्रमुख विमानतळ सुरक्षा नियामक संस्था असून नवी
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलेल्या भेटी दरम्यान महासंचालनालयातर्फे विमानतळाचे व्यापक
मूल्यमापन करण्यात येऊन विमानतळाच्या सज्जतेचा आढावा घेण्यात आला. नागरी विमान वाहतूक
महासंचालनालयातर्फे विमानतळाच्या धावपट्टी, एप्रन, टॅक्सीवे, एटीसी टॉवर टर्मिनल बिल्डिंग, बॅगेज हॅंडलिंग
सिस्टीम इ. महत्त्वाच्या क्षेत्रांची पाहणी करण्यात आली.


या पाहणी दरम्यान मान्यवरांसाठी मॉक चेक-इन प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. यामध्ये डमी बोर्डिंग
पास आणि बॅगेज टॅग जारी केले, ज्यावर रीव्ह्यू टीमने समाधान व्यक्त केले.
सिडकोतर्फे ११६० हेक्टरवर विकसित करण्यात आलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रती वर्ष २०
दशलक्ष प्रवासी आणि ०.८ दशलक्ष टन माल वाहतुकीकरिता नियोजित आहे. अंतिम टप्प्यात विमानतळाची
प्रती वर्ष प्रवासी वाहतूक क्षमता ९० दशलक्ष आणि माल वाहतूक क्षमता २.६ दशलक्ष टन असणार आहे. मुंबई
येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवासी भार हलका करण्याच्या उद्देशाने नवी
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित करण्यात आले आहे. सदर विमानतळ मुंबई महानगर प्रदेशातील
मध्यवर्ती ठिकाणी असून या विमानतळाद्वारे एमएमआर प्रदेशाच्या विकासाला चालना मिळणार आहे.

सिडकोतर्फे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला उपनगरीय रेल्वे, मेट्रो, जलवाहतूक यांसह प्रस्तावित
हैदराबाद हायस्पीड रेल्वेद्वारे कनेक्टिव्हिटी नियोजित आहे.

गुरुवार, २० फेब्रुवारी, २०२५

‘सिडको’ हक्काचे घर मिळालेल्यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अभिनंदन

 मुंबई, ता. १९ : सर्वसामान्यांना परवडणारी, हक्काची आणि दर्जेदार घरे मिळाली पाहिजेत, त्याचे जीवनमान
उंचावले पाहिजे, सर्वांचे घरांचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे. यासाठी सिडको, म्हाडा यासारख्या संस्था पारदर्शकपणे
काम करत आहेत. आजच्या या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पवित्र दिनी २१,३९९
सदनिकांच्या महासोडतीच्या माध्यमातून एकूण १९,५१८ नागरिकांचे सिडकोचे ‘माझ्या पसंतीचे सिडको घर’
या योजनेद्वारे हे स्वप्न पूर्ण होत असल्याने हक्काची घरे मिळालेले सर्वजण भाग्यशाली असून त्यांच्या
अभिनंदनाची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज व्यक्त केली. एका क्लिकवर मा. उपमुख्यमंत्री
यांच्या शुभहस्ते १९,५१८ अर्जदारांचे हक्काच्या घराचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सिडकोच्या ‘माझ्या
पसंतीचे सिडको घर’ या लॉटरीची ऑनलाईन सोडत काढण्यात आली. या कार्यक्रम प्रसंगी श्री. विजय सिंघल,
उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको, श्री. शान्तनु गोयल, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, डॉ.
राजा दयानिधी, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, श्री. गणेश देशमुख, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको,
श्री. मंगेश चितळे, आयुक्त, पनवेल महानगरपालिका यांसह सिडकोतील विभाग प्रमुख, अधिकारी आणि
कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी श्री. देवेंद्र फडणवीस, मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र यांनी व्हिडिओद्वारे दिलेला संदेश प्रसारित करण्यात
आला. आपल्या संदेशामध्ये मा. मुख्यमंत्री यांनी सिडकोची गृहनिर्माण योजना हे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत
सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न साकारणारे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगितले व यशस्वी अर्जदारांना
शुभेच्छा दिल्या. तसेच नवी मुंबई हे भविष्यातील विकासाचे केंद्र असून सिडकोच्या योजनेमुळे सर्वसामान्य
कुटुंबांना नवी मुंबईमध्ये हक्काचे घर मिळाले असल्याचे मा. मुख्यमंत्री यांनी या संदेशाद्वारे सांगितले.
श्री. अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र यांनी महासोडत कार्यक्रमासाठी दिलेल्या संदेशाचे या वेळी
वाचन करण्यात आले. तसेच त्यांनी आपल्या संदेशामध्ये, महासोडत प्रक्रिया हे “सर्वांसाठी घरे”
या संकल्पपूर्तीच्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे, असे प्रतिपादन केले व यशस्वी अर्जदारांना शुभेच्छा
दिल्या. अनेक सर्वसामान्य कुटुंबांचे घराचे स्वप्न साकार होणे, हा आनंदाचा क्षण असल्याचे मत देखील व्यक्त केले.

श्री. शिंदे म्हणाले की, सिडकोच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वांत मोठी लॉटरी असून
यात नागरिकांना आपली पसंत नोंदविण्याची मुभा फक्त सिडकोने दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
सर्वांसाठी घरे देण्याची घोषणा केली असून एवढ्या मोठ्या प्रमाणात घरे देण्याचा विक्रम होत असल्याचे त्यांनी
नमूद केले. सिडकोची ही घरे टाटा, एल.एण्ड टी., शापूरजी यांच्या सहभागाने बांधली असल्याने ती अतिशय
दर्जेदार असून घरे रेल्वे स्टेशन्स, विमानतळाच्या जवळ असल्याने सामान्यांना त्याचा फायदा होणार आहे.
नवी मुंबईचे अतिशय वेगाने शहरीकरण होत असल्याने घरांची मागणी वाढली असल्याचे त्यांनी सांगितले.
पूर्वी नवी मुंबईतून मुंबईत येण्यासाठी एक ते दीड तास लागत असल्याचे सांगून ते म्हणाले की,
आता अटलसेतूमुळे 20 मिनिटात प्रवास होतो. ठाणे ते विमानतळ एक डेडीकेटेड कॉरिडोर करण्यात
येणार असून त्याचबरोबर मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रो मार्गाने जोडली जाणार आहे. यामुळे
सर्वसामान्य मुंबईकरांच्या वेळेत मोठी बचत होणार आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी या अर्थसंकल्पात देशात तीन
कोटी घरे देण्याचे जाहिर केले असल्याने महाराष्ट्रात 20 ते 25 लाख घरे नक्की बांधली जाणार असल्याचा
विश्वास मा. उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, मुंबईतून बाहेर
गेलेल्या मुंबईकरांना मुंबईत परत आणण्यासाठी गृहनिर्माणाच्या नवनवीन योजना आणल्या जात आहे.
त्याचबरोबर सिडको, एमएमआरडीएम, एमएसआरडीसी, महाप्रित, बीएमसी, म्हाडा, एसआरए या सर्व
संस्थांना एकत्र करून रखडलेले प्रकल्प लवकर सुरू करण्यात येत असल्याचेही त्यांनी जाहिर केले. समुह विकास
माध्यमातून सर्वांना खुली जागा, खेळाची मैदाने, शाळा, वैद्यकीय सुविधा मिळणार असल्याचे श्री.शिंदे यांनी
सांगितले.


एमटीएचएल प्रकल्पाबाबत बोलतांना उपमुख्यमंत्री म्हणाले की, काही एनजीओ, पर्यावरणवाद्यांनी या
प्रकल्पास विरोध दर्शवून या प्रकल्पामुळे फ्लेमिंगो पक्षी नवी मुंबईतून कमी होतील, असे सांगितले होते. मात्र
त्यावेळी रिमुव्हर्स सर्क्यूलेशन ड्रेन, नॉईज बॅरिअर या तंत्रज्ञानांचा वापर केल्यामुळे एमटीएचएल प्रकल्पामुळे
फ्लेमिंगोची संख्या कमी न होता आणखी वाढली. यावरून हे शासन प्रो इन्व्हायरमेंट प्रकल्प करते आहे, हे
दिसून आले. आता नवीन गृहनिर्माण धोरण आणली जात असून यात सर्वांसाठी परवडणारी घरे, परवडणारी
भाड्याची घरे, विद्यार्थी वसतीगृहे, काम करणाऱ्या महिलांसाठी घरे, ज्येष्ठ नागरिकांना घरे, गिरणी कामगार,

डबेवाले आदींचा यात अंतर्भाव असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.





बुधवार, १९ फेब्रुवारी, २०२५

जामनेर- नमो कुस्ती महाकुंभ: अमृता पुजारी, विजय चौधरी यांचे वर्चस्व

 जळगाव, (क्रीडा प्रतिनिधी)- कुस्तीप्रेमींच्या जनसागरासमोर लाल मातीत झालेल्या संघर्षात भारतीय पहिलवानच भारी ठरले. नमो कुस्ती महाकुंभ २ अंतर्गत देवाभाऊ केसरी  आंतरराष्ट्रीय कुस्ती दंगलमध्ये महिला महाराष्ट्र केसरी अमृता पुजारी आणि ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीसह सर्वच भारतीय पहिलवानांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील परदेशी पहिलवानांना धूळ चारत आपले वर्चस्व दाखवून दिले.



देवाभाऊ केसरीच्या निमित्ताने आयोजित आंतरराष्ट्रीय दंगलमध्ये महाराष्ट्र केसरी विजेत्यांनी जगभरातील 9 देशांमधून आलेल्या नामवंत पहिलवानांना पराभूत करून कुस्तीच्या मैदानी परंपरेचा अभिमान वाढवला. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेप्रमाणे कुस्तीत महिलाना समान सन्मान देताना या मैदानातील पहिली आणि अंतिम कुस्ती महिलांची लावण्यात आली. कुस्तीच्या इतिहासात प्रथमच महिला कुस्तीला हा सन्मान मिळाल्यामुळे महिला कुस्तीपटूंमध्ये आणि कुस्तीप्रेमी मध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले.

आपल्या तालुक्यात कुस्तीच्या मैदानात लढण्यासाठी आंतरराष्ट्रीय पहिलवान येणार असल्यामुळे सुमारे पन्नास हजारांपेक्षा अधिक कुस्तीप्रेमींचा अथांग जनसागर पसरला होता. महाराष्ट्र केसरी विजेत्या अमृता पुजारीने रोमानियाच्या ऑलिम्पियन कॅटलिना क्सेन्टने हिच्यावर वर्चस्व गाजवत विजय मिळविला. शेवटच्या कुस्तीमध्ये अमृताने उत्कृष्ट डावपेच आणि चपळाईने गुण मिळवत आपला पराक्रम सिद्ध केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते विश्वविजेता व ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांची कुस्तीला सलामी देण्यात आली.  सर्व विजेत्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते मानाची गदा देऊन गौरविण्यात आले.

सोमवार, १७ फेब्रुवारी, २०२५

माझे पसंतीचे सिडकोचे घर; गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत बुधवारी

 मुंबई- माझे पसंतीचे सिडकोचे घर; गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत 19 फेब्रुवारी 2025 पार पडणार
२६,००० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार होण्याच्या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी
छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनाचे औचित्य साधून सिडको महामंडळाच्या “माझे पसंतीचे सिडकोचे
घर” गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत बुधवार, दि. 19 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी २.०० ते ४.००
च्या दरम्यान पार पडणार आहे. प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळासोबतच सोडतीचे थेट प्रक्षेपण वेबकास्टींगच्या
माध्यमातून करण्यात येणार आहे. यामुळे अर्जदार आपल्या सोयीच्या ठिकाणाहून या सोडतीचे साक्षीदार होऊ
शकतात.
सोडत प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण https://cidcohomes.com या संकेतस्थळावर करण्यात येणार आहे. अर्जदार
सदर संकेतस्थळावर, त्यांच्या सिडको होम खात्यात लॉग इन करून सोडतीचा निकाल घरबसल्या देखील पाहू
शकतात.
याशिवाय सोडतीचे थेट प्रक्षेपण खारघर पूर्व (तळोजा): भूखंड क्र.१४, सेक्टर-३७, तळोजा पंचानंद, पनवेल,
रायगड, ४१०२०८, खांदेश्वर: भूखंड क्र. १, सेक्टर-२८, खांदेश्वर रेल्वे स्टेशन, कामोठे, पनवेल, रायगड,
४१०२०९, खारघर: भूखंड क्र. ६३ अ, सेक्टर-१५, खारघर, पनवेल, रायगड, ४१०२१० येथील अनुभव
केंद्रांवर देखील करण्यात येणार आहे. यामुळे २६,००० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार होण्याच्या
क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी नागरिकांना सुलभरीत्या उपलब्ध होणार आहे, असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

गुरुवार, ६ फेब्रुवारी, २०२५

जामनेरमध्ये होणार ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय कुस्ती दंगल: फ्रान्स, मोल्दोवा, उझबेकिस्तान, जॉर्जिया, इराण, रोमानिया आणि एस्टोनियाचे पैलवान उतरणार

 मुंबई, दि. ४ - जळगाव जिल्ह्यातील जामनेर हे गाव इतिहास रचण्यासाठी सज्ज झाले आहे. येथील भूमीवर १६ फेब्रुवारी २०२५ रोजी 'नमो कुस्ती महाकुंभ-२' सोबत 'देवाभाऊ केसरी' ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्ती दंगल आयोजित करण्यात आली आहे. ‘शरीर तंदुरुस्त, खेळच सर्वोत्तम’ हा संदेश देत भारतीय महिला कुस्तीला प्रोत्साहन देणे हे या दंगलीचे मुख्य उद्दिष्ट आहे. या दंगलीमध्ये हिंदुस्थान , फ्रान्स, मोल्दोवा, उझबेकिस्तान, रोमानिया, जॉर्जिया, इराण आणि एस्टोनिया या देशांचे जागतिक विजेते, ऑलिंपियन, हिंद केसरी, रुस्तुम ए हिंद, भारत केसरी, महाराष्ट्र केसरी आणि उप-महाराष्ट्र केसरी सारखे महिला आणि पुरुष दिग्गज कुस्तीपटू सहभागी होणार आहेत. हे मोठे आयोजन मातीतील कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

याबद्दल बोलताना या ऐतिहासिक कुस्ती दंगलीचे प्रमुख आयोजक महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले कि, संपूर्ण महाराष्ट्रात या आयोजनाबद्दल प्रचंड उत्साह आहे. या कुस्ती दंगलमुळे जामनेर हे गाव जागतिक कुस्ती नकाशावर ठळकपणे झळकणार आहे. या निमित्ताने उत्तर महाराष्ट्रात एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्याची घोषणा करण्यात येणार आहे. हे क्रीडा संकुल सामान्य घरातील खेळाडूंना जागतिक दर्जाची सुविधा पुरवण्यासाठी मोठी भूमिका बजावेल.

कुस्ती रसिकांसाठी हा एक पर्वणीचा क्षण ठरणार आहे. जागतिक दर्जाच्या कुस्तीपटूंना एकाच मंचावर पाहण्याची ही अनोखी संधी आहे. ही स्पर्धा रविवार, १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता सुरू होऊन संध्याकाळी ८ वाजेपर्यंत चालणार आहे. कुस्तीला समर्पित असलेले हे आयोजन जामनेर येथे मोठ्या दिमाखात पार पडणार आहे. या ऐतिहासिक कुस्ती दंगलीचा साक्षीदार होण्यासाठी क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंत्री गिरीष महाजन यांनी  केले आहे.

खारघर येथे पार पडले वैदर्भियांचे तिसरे स्नेहसंमेलन

 मुंबई :  मुंबई आणि परिसरात राहणा-या वैदर्भियांनी कोकणी माणसाचा आदर्श ठेवत आपली मायभूमी विदर्भाच्या संपर्कात (कनेक्ट)राहून विदर्भाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन ज्येष्ठ बांधकाम व्यावयासिक व माजी अणुशास्त्रज्ञ डॉ. सुरेश हावरे यांनी केले. आपला विदर्भ सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थेच्या तिस-या वैदर्भीय स्नेहसंमेलनात अध्यक्षीय भाषणात बोलताना त्यांनी हे आवाहन केले.

 नवी मुंबई व मुंबई परिसरातील वैदर्भियांचे हक्काचे व्यासपीठ

म्हणून “आपला विदर्भ सामाजिक आणि सांस्कृतिक संस्था’’ गेल्या काही वर्षांपासून कार्यरत आहे. या संस्थेने रविवारी वैदर्भियांचे तिसरे स्नेहसंमेलन खारघर येथील एमटीडीसी रेसिडेन्सीत आयोजित केले होते. या संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. सुरेश हावरे, प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ सनदी अधिकारी चंद्रकांत डांगे उपस्थित होते. यावेळी आपला विदर्भचे अध्यक्ष एड. विजयकुमार कोहाड, सरचिटणीस प्रमोद चुंचूवार, कोषाध्यक्ष अनंत शिंदे, सचिव राजेंद्र नंदनकर, उपाध्यक्ष अश्विनी हडपे यांच्यासह सभागृहात मोठ्या संख्येने वैदर्भीय उपस्थित होते. यावेळी महिलांचा हळदी-कुंकू आणि बाळगोपाळांची लूट पार पडली.

याप्रसंगी, “चंद्रपूरच्या महाकालीची लोकपरंपराः माय धुरपता” हा अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहून विदर्भ-मराठवाड्यातील शेकडो वर्षांच्या संबंधांमागील लोकपरंपरा उलगडणारे ज्येष्ठ पत्रकार संजीव भागवत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना भागवत यांनी गोंड राजांनी मराठी भाषेच्या प्रचारात आणि लोककल्याण क्षेत्रात बजावलेल्या भूमिकेबाबत सविस्तर माहिती दिली.

 कोकणातील लोकांचा आदर्श घ्या- हावरे

 “कोकणातील प्रत्येक गावाची एक संघटना वा मंडळे असून मुंबईत राहूनही ते गावच्या विकासात योगदान देतात. या गावाच्या मंडळांनी चाळीत वा सोसायट्यांमध्ये गावाच्या मालकीची एक खोली घेतलेली असते. या खोलीत गावाकडून नोकरीसाठी येणा-या तरूणाची काही महिने राहण्याची सोय होते. कोकणी माणूस आधीमनिऑर्डरने आणि आता ‘जी-पे’ने पैसे पाठवतो. मात्र या उलट विदर्भाचा माणूम मुंबईत आला की विदर्भाशी कनेक्ट राहत नाही. तो आधीही मनिऑर्डरने पैसे पाठवत नव्हता आणि आताही जी-पे ने पैसे पाठवत नाही. हे चित्र बदलायला हवे. आपण विदर्भाच्या विकासासाठी मुंबईत राहून योगदान द्यायला हवे,” अशी भूमिका त्यांनी मांडली. आपला विदर्भ संस्थेने एखादा एप विकसित करून सदस्य नोंदणी, नोकरी शोधणे, विवाहासाठी स्थळ शोधणे या सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात, अशी सूचना त्यांनी केली.

  विदर्भापासून दूर हक्काचे कुटुंब- डांगे

 “आयआयटी खरगपूर येथे मी एमटेक करायला गेलो तेव्हा तेथील वसतीगृहासमोर एक फलक लागले होते. त्यावर लिहिले होते – टू द होम अवे फ्रॉम होम. आपला विदर्भ ही संस्था विदर्भापासून दूर राहणा-यांना कुटुंबापासून दूर राहूनही हक्काचे कुटुंब म्हणून कार्य करीत आहे. ही चांगली संकल्पना असून अधिकाधिक वैदर्भियांपर्यंत पोहोचायला हवी. विदर्भातील झाडीपट्टी रंगभूमीला मुंबईत मानाचे स्थान मिळवून देण्यासाठीही संस्थेने काम करावे,” असे डांगे म्हणाले.

कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप

(पनवेल):  राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...