मराठी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मराठी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १४ डिसेंबर, २०११

...अखेर "हिंग्लिश" च्या पगड्याची पगडी बसली डोक्यावर!

आजकालच्या मुलांना भेसळीचे खाण्याची सवय झाली आहे, शुद्ध तुपातले अन्न खाल्ले तर, त्यांचे पोट बिघडते, अपचन होते...अशी वाक्य अनेकदा ऐकू येतात. देशातल्या अनेक भाषांच्या बाबतीतही जवळपास असेच झाले आहे. प्रामुख्याने देशात व्यवहारासाठी वापरल्या जाणार्‍या दोन प्रमुख भाषा मानण्यात येणार्‍या हिंदी आणि इंग्रजी यांचे मिश्रण म्हणजेच हिंग्लिश वापरण्याची मुभा शासनानेच आता अप्रत्यक्षपणे दिली आहे...

अवघ्या दशकापूर्वी अतिशय शुद्ध स्वरूपात बोलल्या जाणार्‍या जवळपास अनेक प्रादेशिक भाषांमध्ये आता इंग्रजीने शिरकाव केला आहे. देशावर दीडशे वर्षे राज्य केलेल्या ब्रिटिशांनी देश सोडून जाता-जाता चहा आणि सॉरी हे दोन शब्द इथेच सोडले, अन् बस्स...चहा नसला तर अनेकांना चुकल्यासारखे वाटणे, कामे न होणे यासारखेच अगदी भाषांचेही झाले आहे. दररोजच्या बोलण्यात, शब्दप्रयोगात इंग्रजी शब्द नसला तर चुकल्यासारखे वाटते. काही वर्षांपूर्वी मोठ्या शहरांपासून याला अप्रत्यक्षरित्या सुरूवात झाल्याचे जाणवते, नव्हे, इंग्रजी चा मोठ्या प्रमाणावर भाषांमध्ये शिरकाव होणार असल्याचे जणू ते सूतोवाच ठरले..

अनेक सुशिक्षित अथवा मोठ्या शहरांमध्ये शिकणारी मुलं आपसात बोलताना एखादा शब्दप्रयोग मुद्दामच इंग्रजीमध्ये करून आपल्याला इंग्रजीचे ज्ञान असल्याचे दर्शवित असल्याचा आरोप जनसामान्यांकडून तेव्हा केला जात होता. मात्र आज राजरोसपणे इंग्रजीच्या अनेक शब्दांनी बोलीभाषेत दखल देऊन (किंवा आपल्यासारख्यांनीच आणून) प्रादेशिक भाषांवर आक्रमण केले आहे.

सध्या मिंग्लिश आणि हिंग्लिश अशा दोन उपभाषाच जणू उदयास आल्या आहेत. मराठमोळ्या संस्कृतीत केक येऊन तर थोडाफार इंग्लिश कल्चर ने प्रवेश केला होताच...त्यात भरीस भर म्हणून दररोजच्या संवादात सुद्धा इंग्रजीचा वापर करणे सुरू झाले. मराठी + इंग्लिश आणि हिंदी + इंग्लिश अर्थातच सर-मिसळ होऊन खरोखर मिसळच झाली आहे...दररोज दिवसाची 'सुप्रभातम्' ने होणारी सुरवात आता 'हाय' ने आणि शेवट 'बाय' ने होतोय, सरासरी दहा घरांपैकी आठ घरांमध्ये हेच चित्र आहे. कॉन्व्हेंट चा ट्रेंड आता झाल्यामुळे शुद्ध हिंदी, मराठीत बोलणारी मुलंसुद्धा अनेकदा इंग्रजीतले अनेक शब्दप्रयोग बोलण्यात करतात. हिंदी अथवा मराठी भाषांमध्ये इंग्रजाळलेल्या हिंग्लिश आणि मिंग्लिश यांचा पगडा नक्कीच बसला आहे. ग्लोबलायझेशनच्या काळात इंग्रजी भाषा येणं जरी काळाची गरज ठरली असली, तरीही मराठी असो किंवा हिंदी...कोणतीही मातृभाषा काळाच्या ओघात मागे पडणार नाही, मोडी प्रमाणे मोडणार नाही, ही प्रत्येकाची जबाबदारीच नव्हे, कर्तव्य ठरले आहे!

रविवार, २७ फेब्रुवारी, २०११

किती उरली आहे अस्खलित मराठी...?

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
दिवसेंदिवस जग जवळ येतंय, तसा माणूस माणसापासून दूर जातोय. टीव्ही, इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमे, इंटरनेट, कॉम्प्यूटर अशा विविध माध्यमांमुळे होणारी प्रगती आणि विकास नाकारता येणार नाही. परंतू माणूस माणसापासून दूर जातोय हे कटूसत्य आहे. काही वर्षांपूर्वी मातृभाषेसह एखादी भाषा बोलता येणारी व्यक्ती आता किमान चार भाषा बोलू लागली आहे. मात्र भोवतालच्या वातावरणामुळे बऱ्याच अंशी कित्येकांच्या, विशेषतः मराठी बांधवांच्या भाषेवर विपरित परिणाम झाला आहे. अन्य मातृभाषा असलेले परंतू महाराष्ट्रात राहणारे बांधव एकमेकांशी संवाद साधताना मातृभाषेतच साधतात. आमचा मराठी बांधव मात्र एकमेकांशी संवाद साधताना मातृभाषेत बोलण्याऐवजी अन्य भाषेत बोलतो. मध्य प्रदेशाकाही राज्यांमध्ये तर सर्रासपणे हे पहावयास मिळते. आजी-आजोबा मराठी बोलतात, आई-वडिल मराठी-हिंदी भाषेत बोलतात आणि तिसरी पिढी म्हणजेच मुलं..या मुलांना तर मराठी अगदी कमी बोलता येतं..! त्यांचे पालक देखील त्यांच्याशी जास्तीत जास्त हिंदीमध्येच बोलतात. हिंदी भाषेचा येथे विरोध नाही, मात्र आपली मातृभाषा विसरता कामा नये, मातृभाषा यायलाच पाहिजे हे संस्कार आपल्या मुलांवर करणे ही पालकांची जबाबदारी आहे. याचा विसर पालकांना पडलेला दिसतो. एकीकडे मराठी भाषा टिकवून ठेवण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करायचे आणि यासाठी घेतल्या जाणाऱ्या बैठकांना, तयारी करताना मात्र आम्हाला मराठीचा विसर पडतो, याचा विचार गांभीर्याने होणे गरजेचे आहे.
महाराष्ट्रात सुद्धा सध्याची पिढी अस्खलित मराठी विसरत चालली आहे हे सहज जाणवते. मराठी बोलताना, संवाद साधताना इंग्रजाळलेली मराठी वापरायची (खानदेशी शब्द म्हणजे घुसडायची) सवय झालेली आहे. अलिकडे तसे इंग्रजी सुद्धा वाढले आहे, लोकांना इंग्रजी माध्यम वापरता येऊ लागले आहे, ही बाब चांगली कौतुकास्पद आहे. पण याबरोबर आपली मातृभाषा मराठी मागे पडत चालली आहे.
मराठी बांधव कोणत्याही प्रांतात जावो, स्थायिक झालेला असो, परंतू मराठी विसरू नये, हीच आजच्या मराठी भाषा दिनानिमित्त विनंती!

कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप

(पनवेल):  राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...