सोमवार, ३१ जानेवारी, २०११

भुजबळ ठरले "सिनिअरमोस्ट पार्टिसिपन्ट" विशेष पुरस्काराचे मानकरी

व्हिन्टेज ड्राइव्ह...आनंद लाँग ड्राइव्हचा...
मुंबई, ता. ३० - मंत्री जरी असलो तरीही आपण हरहुन्नरी असल्याचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी आज सिद्ध करून दाखविले. येथे आयोजित 'व्हिन्टेज कार रॅली' चे उद्घाटन करून त्यांनी अचानक चक्क रॅलीमध्ये सहभाग देखील घेतला. चालवायला अत्यंत अवघड असलेल्या १९४७ ब्युईक कन्व्हर्टिबल चे स्टेअरिंग अत्यंत सफाईदारपणे हाताळले तसेच रॅलीचे संपूर्ण अंतर व्यवस्थित पूर्ण केले. अशी रॅली पूर्ण करणारे ते पहिलेच मंत्री ठरल्याने त्याचबरोबर सर्वात ज्येष्ठ ड्रायव्हर ठरल्याने त्यांना "द सिनिअरमोस्ट पार्टिसिपन्ट टू ड्राईव्ह इन द व्हिन्टेज कार रॅली" या विशेष पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले. हॉर्निमन सर्कल ते बांद्रा आणि तेथून पुन्हा परत असा मार्ग या रॅलीसाठी निश्चित करण्यात आला होता. श्री. भुजबळ यांनी हे अंतर पूर्ण केले.
या गाडीचे मालक नितिन दोसा यांनी ही कार चालविण्यास अत्यंत अवघड असून लेफ्ट हँड ड्राइव्ह असल्याचे सांगितले. दरम्यान, वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाइल असोसिएशनतर्फे आयोजित रॅलीमध्ये राज्याचे पोलिस महासंचालक डी. शिवानंदन, एमटीएनएलचे व्यवस्थापक एस. पी. सिंग देखील सहभागी झाले होते. सुमारे १४७ प्रकारच्या दुर्मिळ व्हिन्टेज कार या रॅलीच्या निमित्ताने मुंबईत धावल्या.

मध्य प्रदेशात अजूनही थंडी

महाराष्ट्रात थंडीचा जोर कमी झाला असला, तरीही मध्यप्रदेशात मात्र अद्याप थंडीचा जोर कायम आहे. दिवसा तापमान २४ ते २५ अंशांपर्यंत जात असून रात्रीचे किमान तापमान मात्र ८ ते ९ अंश असते. गेल्या आठवड्यात थंडी कमी होत आहे अशी चिन्हं असतानाच थंडी मात्र स्थिरावल्याचे चित्र आहे. थंडीमुळे लोकांनी पुन्हा जॅकेट्स, स्वेटर, कानटोपी, मफलर, मुलांना हँडग्लोज् घालणे सुरू केले आहे. शहरातील नागरी वस्त्यांमध्ये रात्री आठनंतर शुकशुकाट दिसतो.

रविवार, ३० जानेवारी, २०११

अति सर्वत्र वर्ज्यते...।

जागतिकीकरणामुळे संपूर्ण जग जवळ आले आहे. एका देशातून दुसऱ्या देशात क्षणात ज्या-त्या देशातल्या घडामोडी, घटना यांची प्रत्यक्ष माहिती समजू शकते. वैज्ञानिक विविध विषयांचा अभ्यास करून मानवाच्या हितासाठी, असाध्य रोगांवर तोडगा निघावा म्हणून विविध औषधे,लसींचा शोध लावत आहेत. भारत देखील यात तसूभर देखील मागे नाही. परंतू कोणत्याही बाबतीत मर्यादा ओलांडल्यास पुन्हा शून्यावर वेळ येऊन ठेपते. बंगलोर येथील एका संशोधन केंद्राने टायफॉईड संदर्भात अँटीबायोटिक म्हणून समजल्या जाणाऱ्या हळदीवर अर्थातच हळद या घटकावर संशोधन केले. हळदीचा वापर "अति" केल्यास हळदीच्या अती वापरामुळे माणसावर जीव गमावण्याची वेळ येते असे अनुमान काढल्याचे आजच (30 जानेवारी 11) एका इलेक्ट्रॉनिक वृत्त वाहिनीने वृत्त प्रसिद्ध केले आहे. खरंतर, अति सर्वत्र वर्ज्यते...। हा निसर्ग नियमच आहे, हे या संशोधकांना ठाऊक नसावे. अमृत जरी अति सेवन केले तरीसुद्धा त्याचेही विष तयार होते. हळदीवर संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांनी कोणत्याही निष्कर्शावर पोहोचण्यापूर्वी, अनुमान काढण्यापुर्वी ज्येष्ठ, तज्ज्ञ, विशेषतः आयुर्वेदाच्या ज्येष्ठांचा सल्ला, मार्गदर्शन घेणे, त्यांच्याशी चर्चा करणे आवश्यक होते. निसर्गाने मानव कल्याणासाठीच हळदीसारख्या विविध वनौषधींची निर्मिती केली आहे. स्थिर बुद्धीने, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केल्यास आणि ठरलेल्या मात्रेतच हळदीसारख्या वनौषधींचा वापर केल्यास अखिल मानवाचे कल्याणच होईल, किंबहुना "हल्दी" मुळे मानव "हेल्दी" आणि "वेल्दी" देखील राहील यात शंका नाही.

हेलमेट सक्ती किती 'सुरक्षित'...!

काही वर्षांपासून दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांना वाहन चालविताना हेलमेट लावणे आणि चारचाकी वाहनचालकांनी सीटबेल्ट लावण्याची सक्ती करण्यात आली. प्रारंभी देशाची राजधानी नवी दिल्ली येथे आणि पाठोपाठ काही प्रमुख शहरांमध्ये आणि नुकतेच मध्यप्रदेशातील इंदूर येथे हेलमेट सक्ती करण्यात आली आहे. हेलमेट सक्ती करणे किती परिणामकारक ठरेल याचा विचार होणे आवश्यक आहे.


दुचाकी वाहनचालक, कारचालक अर्थात चारचाकी वाहनचालक वाहन भरधाव चालवितात. विशेषतः शहराबाहेर, शहरातील प्रमुख मार्गांवर, राष्ट्रीय महामार्गावर अनेकदा गंभीर स्वरूपाचे अपघात होऊन अनेकदा यात वाहनचालकांचे जीव गमावल्याच्या घटना घडतात. दिवसेंदिवस या प्रकारे अपघात होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. अपघात झाल्यास किमान जीव गमावण्याची वेळ येऊ नये, "सर सलामत तो..." असे म्हणतात नां! याप्रमाणे न्यायालयाने दुचाकी वाहनचालकांसाठी वाहन चालविताना हेलमेट बेल्टसह लावणे अनिवार्य केले आहे. ठिकठिकाणी यासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या विशेष सभा, चर्चासत्रांमध्ये प्रतिष्ठितांसह ज्येष्ठ नागरिकांनी देखील या सक्तीस दुजोरा दिला. हेलमेट न लावणाऱ्या वाहनचालकास दंड आकारण्याची तरतूद देखील करण्यात आली. वाहनचालकाच्या मागे बसणाऱ्या व्यक्तीस देखील हेलमेट लावण्याची सक्ती करण्यात आली आहे. काही ठिकाणी हेलमेट लावण्यापासून महिला वाहनचालकांना सूट देण्यात आली आहे. परंतु अनेक शहरांमध्ये हेलमेट सक्तीस फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे शासकीय अधिकाऱ्यांच्या अहवालावरून दिसून येते.

हेलमेट लावून वाहन चालविले तरीसुद्धा व्हायचे ते अपघात होणारच...ही वस्तूस्थिती नाकारता येणार नाही! इंदूरनजीक गौतमपुरा-चंबळ मार्गावर नुकत्याच झालेल्या एका अपघातात हेलमेट लावून दुचाकी चालविणाऱ्या वाहनचालकास झालेल्या अपघातात या वाहनचालकाच्या डोक्याचे हेलमेटसह तुकडेतुकडे झाले. आयएसआय मार्क असलेले हेलमेट घातले असले तरीही तुकडे झालेच. कोणत्यातरी डंपरसारख्या अवजड भरधाव वाहनाने त्याला ठोस मारल्यामुळे बऱ्याच दूरपर्यंत हा वाहनचालक फरपटत जाऊन त्याचा मृत्यू झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. यावरून हेलमेट लावून वाहन चालविणे देखील किती सुरक्षित आहे, हेलमेट लावून वाहन चालविणे किती सुरक्षित, जीव वाचविण्यासाठी लाभप्रद ठरते हे विचार करण्यासारखे आहे.

केवळ हेलमेट लावून आणि सीटबेल्ट लावून वाहन चालविण्यापेक्षा दुचाकी, चारचाकी, अवजड वाहनचालकांनी (शासकीय वाहनचलकांसह) वाहन भरधाव न चालविता विशिष्ट मर्यादित वेगात वाहन चालविल्यास अपघातांचे प्रमाण नक्की कमी होईल. शासनाने देखील यावर गांभीर्याने विचार करून प्रत्यक्ष अंमलबजावणी केल्यास अपघातांचे प्रमाण निश्चितच कमी होईल यात शंका नाही.

शुक्रवार, २८ जानेवारी, २०११

औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्राची स्पर्धा अन्य देशांशी-भुजबळ

मुंबई, ता. २७ - राज्याने सुरवातीपासूनच औद्योगिक क्षेत्रात आघाडी मिळवली असून याबाबतीत राज्याची स्पर्धा देशातील अन्य राज्यांशी नव्हे, तर अन्य देशांशी असल्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी नमूद केले आहे.
श्री. भुजबळ म्हणाले, की राज्यात १९८० मध्ये केवळ ४८६० लघुउद्योग होते. आज अशा सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगांची संख्या ३ लाख ५ हजार ६१ इतकी आहे. या क्षेत्रात सुमारे ४३ लाख ६९ हजार २९९ लाख रुपये इतकी प्रचंड गुंतवणूक झाली असून २३ लाख ८ हजार ९४४ जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. राज्यात लघु-मध्यम उद्योग अजूनही मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर या परिसरातच एकवटलेले दिसतात. अशा उद्योगांच्या विकासासाठी क्लस्टर डेव्हलपमेंट वर भर देण्याची नितांत आवश्यकता असून या दृष्टीने ग्लोबल परिषदेत चर्चा होईल असा विश्वास श्री. भुजबळ यांनी व्यक्त केला.

केंद्राच्या पर्यटन विकास निधीचा महाराष्ट्राने पुरेपूर लाभ घ्यावा- सुबोधकांत सहाय

मुंबई, ता. २७ - आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकृष्ट करण्याची भारताला मोठी संधी आहे. त्यादृष्टीने केंद्राकडून राज्यांना पर्यटन विकासासाठी निधी दिला जातो. पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र असलेल्या महाराष्ट्राने या निधीचा पुरेपूर लाभ घेण्याची गरज आहे. असे मत केंद्रीय पर्यटनमंत्री सुबोधकांत सहाय यांनी आज येथे व्यक्त केले. कफ परेड येथील  वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये द्वितीय ग्लोबल इकॉनॉमिक समेट-२०११ च्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.
श्री. सहाय म्हणाले की, भारतात कृषि व कृषि आधारित प्रक्रिया उद्योगांना देखील मोठे भविष्य आहे. देशात सुमारे पाच दशलक्ष डॉलर्स किंमतीची फळफळावळ, शेतमाल प्रक्रियेअभावी वाया जातात. आजमितीस आपण त्यापैकी केवळ सहा ते सात टक्के मालावरच प्रक्रिया करू शकतो. या पार्श्वभूमीवर लघु-मध्यम उद्योजकांना प्रक्रिया उद्योगातही गुंतवणुकीची मोठी संधी आहे.
गेल्या दोन दशकात भारतीय उद्योगाने मोठी झेप घेतली असून यात लघु-मध्यम उद्योगांचे अमूल्य योगदान आहे. संपूर्ण भारतीय उद्योगाचे प्रतिबिंब या उद्योगांमध्ये दिसते. या क्षेत्रात गुंतवणूक तसेच रोजगार निर्मितीच्याही सर्वाधिक संधी आहेत. असे केंद्रीय उद्योगमंत्री सलमान खुर्शीद म्हणाले.
यावेळी राज्याचे पर्यटन व सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ, पद्मश्री भवरलाल जैन, राष्ट्रीय लघुउद्योग विकास महामंडळ व्यवस्थापकीय संचालक डॉ. एच. पी. कुमार, न्यूयॉर्कचे वर्ल्ड ट्रेड सेंटर असोसिएशनचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर कोफी बोतेंग, मुंबई वर्ल्ड ट्रेड सेंटरचे चेअरमन कमल मोरारका आदी मान्यवर उपस्थित होते.

भवरलाल जैन यांना "जीवनगौरव"

मुंबई, ता. २७ - जैन इरिगेशन समूहाचे अध्यक्ष व खानदेशचे भूमिपुत्र भवरलाल जैन यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. येथील कफ परेड मधील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये द्वितीय ग्लोबल इकॉनॉमिक समेट-२०११ मध्ये हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी केंद्रीय पर्यटनमंत्री सुबोधकांत सहाय, राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ, राष्ट्रीय लघुउद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. एच. पी. कुमार, न्ययॉर्क येथील वर्ल्ड ट्रेड सेंटर्स असोसिएशनचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर कोफी बोतेंग, बँक ऑफ इंडियाच्या एक्सपोर्ट विभागाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रंगनाथन आदी मान्यवर उपस्थित होते.
मुंबई वर्ल्ड ट्रेड सेंटरचे चेअरमन कमल मोरारका यांनी स्वागत व ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज चे अध्यक्ष विजय कलंत्री यांनी प्रास्ताविक केले.

गुरुवार, २७ जानेवारी, २०११

भेसळ करणार्‍या माफिया टोळ्यांवर 'मोक्का' अंतर्गतच कारवाईची गरज

मुंबई, ता. २७ - भेसळ करणार्‍या माफिया टोळ्यांवर 'मोक्का' अंतर्गतच कारवाई करण्याची गरज आहे. या शब्दात राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री तसेच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मागणी केली आहे.
मालेगावचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना माफियांनी जाळून मारण्याच्या घटनेबद्दल श्री. भुजबळ यांनी संताप व्यक्त केला. पेट्रोल-डीझेल भेसळ करणार्‍या माफियांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या सोनवणे यांना माफियांनी जाळून मारल्याचे समजताच श्री. भुजबळ यांनी आमदार पंकज भुजबळ यांच्यासह नाशिककडे तातडीने प्रयाण केले.
भेसळ करणार्‍या माफियांचा प्रश्न खूप जुना असून गेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभांमधून देखील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह आपण अशा टोळ्यांची दहशत रोखण्याची गरज व्यक्त केली होती. या टोळ्या संपविण्यासाठी त्यांच्यावर भेसळ प्रतिबंधक पथकांकडून नव्हे, तर थेट पोलिसांकडूनच कारवाई होण्याची गरज आहे. कायद्याला आव्हान देणार्‍या व कायदा हातात घेणार्‍या या प्रवृत्तींवर 'मोक्का' सारखी कडक कारवाई केलीच पाहिजे अशी आग्रही मागणी यावेळी त्यांनी केली.

प्रजासत्ताक दिनानिमित्त नागरिकांना शासनातर्फे शुभेच्छा

मुंबई, ता. २६ - देशाच्या ६२ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री तसेच संपूर्ण मंत्रीमंडळ, शासकीय प्रतिनिधी यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय घटनाकारांना अभिप्रेत असलेल्या समता, बंधुता आणि सहिष्णुता या तत्वांचा अंगिकार करण्यासाठी सारे प्रतिबद्ध होऊ या, अशा आशयाच्या आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सोमवार, २४ जानेवारी, २०११

तळपणार्‍या स्वरभास्कराचा अंत - अजित पवार

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या निधनाने हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या क्षितिजावर दीर्घ काळ अभूतपूर्व तेजाने तळपणार्‍या स्वरभास्कराचा अस्त झाला आहे. या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. संगीताच्या ध्यासापोटी वयाच्या अकराव्या वर्षापासून भीमसेन जोशी यांनी केलेले कष्ट, प्रयत्न यातून एका अद्भूत गायकीचा जन्म झाला. पंडितजींनी गायलेल्या अभंगरचना, शास्त्रीय संगीतातील त्यांनी आळवलेले विविध राग, चीज, पुण्यात त्यांच्या गुरुंच्या स्मरणार्थ सन १९५३ पासून सातत्याने साजरा होणारा सवाई गंधर्व महोत्सव अजरामर राहतील. पंडित भीमसेन जोशी यांच्या रुपाने एक मौलिक रत्न आज आपण गमावले आहे, असेही श्री. पवार म्हणाले.

हळहळलं अवघ्या रसिक जनांचं मन...

माझे माहेर पंढरी, विठ्ठल नामाचा रे टाहो...अशा अनेक भजनांपासून प्रभू अजि गमला..अशी विविध नाट्यगीते, मिले सुर मेरा तुम्हारा...आदी प्रकार सादर करून केवळ रसिकांना थक्क करून सोडणार्‍या आणि जागेवरच खिळवून ठेवणार्‍या पंडित भीमसेन जोशी यांच्या निधनामुळे अवघं रसिक जनांचं मन हळहळलं आहे.
आपल्या मुलाने अभियंता व्हावे असे वडिलांना वाटत असताना, लहानपणापासूनच संगीत क्षेत्राकडे कल असणार्‍या पंडित भीमसेन जोशी यांच्या व वडिलांच्या मतभेदामुळे अत्यंत लहान वयातच भीमसेन जोशी यांनी घर सोडले होते. ग्वाल्हेर येथे किराणा घराण्याचे रामभाऊ कुंदगोळकर उर्फ सवाई गंधर्व यांच्याकडे त्यांनी दीक्षा घेतली. पंडितजींनी त्यांचे गुरू सवाई गंधर्व यांच्या स्मरणार्थ दरवर्षी सवाई गंधर्व संगीत महोत्सव पुणे येथे १९५२ साली सुरू केला. आजही दरवर्षी पुणे येथे सवाई गंधर्व पुण्यतिथी महोत्सव उत्साहात साजरा केला जातो. नामवंत गायक येथे येऊन हजेरी लावणे हे भाग्य समजतात.
कोणत्याही कलाकाराला साजेशा अशा पंडित भीमसेन जोशी यांनी केवळ मराठी रसिकच नाही, तर गैरमराठी रसिकांची मने देखील आपल्या खड्या आवाजामुळे जिंकली होती. मराठी व्यतिरिक्त कानडी आणि हिंदी भाषेतही त्यांनी उपशास्त्रीय संगीतास सुरवात केली. पु.ल.देशपांडे यांनी गंमतीने 'हवाईगंधर्व' ही पदवी बहाल केली. कारण त्यांना वारंवार करावा लागणारा विमान प्रवास मानला जायचे. पंडितजींच्या गायनाला सुरवात झाल्यानंतर मैफलित झोपेमुळे पेंगणारे रसिक त्वरीत खडबडून जागे व्हायचे.
पंडितजींना मिळालेले विविध पुरस्कार-
* भारतरत्न पुरस्कार
    * पद्मश्री पुरस्कार
    * संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार
    * पद्मभूषण पुरस्कार
    * पद्मविभूषण पुरस्कार
    * संगीताचार्य
    * पुण्यभूषण पुरस्कार
    * स्वरभास्कर पुरस्कार
    * तानसेन पुरस्कार
    * डॉक्टरेट डि. लिट्.

भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षितीजावर तळपणारा 'स्वरभास्कर' मावळला

मुंबई, ता. २४ - पंडित भीमसेन जोशी यांच्या निधनामुळे भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्राच्या क्षितिजावर तेजाने तळपणारा 'स्वरभास्कर' मावळला, या शब्दात सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.
किराणा घराण्याचे शिष्य असलेल्या पंडित भीमसेन जोशी यांचे ख्याल गायकीवर प्रचंड प्रभुत्व होते. कन्नड, हिंदी आणि मराठीमध्ये त्यांनी भक्तीगीते आणि अभंगांचे सादरीकरण केले. शास्त्रीय संगीतातील तज्ज्ञ आणि दर्दी रसिकांबरोबरच सामान्य नागरिकांच्या मनावरही त्यांनी गारूड केले. त्यांचा विशिष्ट खर्जातील आवाज आणि ताना घेण्याची पद्धत रसिकांवर मोहिनी घालत असे. अलिकडे, मिले सुर मेरा तुम्हारा..., आणि भारतबाला च्या राष्ट्रगीताच्या व्हिडिओमध्येही त्यांचे गायन आणि व्यक्तीमत्व यांची छाप अखिल भारतीयांच्या मनावर उमटली. पुण्यात सवाई गंधर्व पुण्यतिथीच्या माध्यमातून आपल्या गुरुंना आदरांजली वाहण्याचा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला. त्यांचे सुपुत्र श्रीनिवास जोशी यांच्यासह अनेक शिष्यांची देणगी या गायकाने देशाला दिली असून त्यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे, असेही श्री. भुजबळ यांनी म्हटले आहे.

पंडित भीमसेन जोशी यांचे निधन

सुमारे पन्नास वर्षांपासून संगीत क्षेत्रात आपल्या खड्या आवाजाने वर्चस्व प्रस्थापित केलेल्या पंडित भीमसेन जोशी यांची प्राणज्योत आज मालवली.
आपल्या स्वरांची नदी जगाच्या दहा दिशांना अथांग वाहणार्‍या संगीतसम्राट तसेच ख्याल गायकीसाठी सर्वश्रृत असलेल्या पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेली भजने देखील प्रसिद्ध होती. शास्त्रीय संगीत व भजन यासह त्यांनी अनेक चित्रपटगीते, ठुमरी देखील वेगळ्या शैलीत गायल्यामुळे प्रसिद्ध आहे. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.केवळ मराठीच नाही, तर संपूर्ण देशासह विदेशातील रसिक भीमसेन जोशी यांच्या आवाजाने संगीत मैफल सुरू असताना जागेवरच खिळवून ठेवत होते.
आपल्या गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध करून त्यांच्यावर भुरळ घातली होती.

शुक्रवार, २१ जानेवारी, २०११

१५ जानेवारी 'राष्ट्रीय मतदार दिन' साजरा होणार

दरवर्षी १५ जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करण्यास केंद्राने हिरवा कंदील दिला आहे. मतदान करण्यात असलेली मतदारांची उदासीनता लक्षात घेऊन ही संकल्पना अस्तित्वात येत आहे.
वयाची अठरा वर्षे पूर्ण केलेल्या मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येतो. दिवसेंदिवस मतदारांची मतदान करण्याविषयी उदासीनता वाढत आहे. वारंवार होणारी सत्ता परिवर्तने आणि जनतेस मिळणार्‍या सुखसोयी हे याचे प्रमुख कारण असल्याने युवकांपासून ज्येष्ठ नागरिक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यास मतदान केंद्रात जात नाहीत. कोणीही सत्तेवर आला तरी देखील काहीच करत नाही. यापेक्षा मतदान न केलेलेच बरे...! अशी मतदारांची भूमिका असते. यात बर्‍याच अंशी तथ्य देखील आहे,
वयाची अठरा वर्षे पूर्ण केलेल्या मतदारांची यादी निवडणूक आयोगातर्फे दरवर्षी बनविण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक मतदारसंघातील नवीन मतदारांचा मेळावा भरविण्यात येईल. त्यांना ओळखपत्र व बॅज देण्यात येणार असून मतदान करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. दरवर्षी सुमारे पंचवीस टक्के युवक मतदारयाद्यांसाठी नावनोंदणी करतात अथवा मतदान करतात असे सर्वेक्षणात आढळले असून यामुळेच राष्ट्रीय मतदार दिनाची संकल्पना मूर्त रूपात आणत असल्याचे माहिती व प्रसारणमंत्री अंबिका सोनी यांनी स्पष्ट केले आहे.
शासनाची ही संकल्पना कौतुकास्पद आहे. या संकल्पनेस प्रतिसाद मिळेल तो मिळेल. परंतू शासनापेक्षा तज्ज्ञांच्या मताप्रमाणे मतदारांच्या, मतदार नोंदणी करणार्‍यांच्या प्रमाणात, टक्केवारील अपेक्षेनुरुप वाढ झाल्यानंतर दरवर्षी साजरा करण्यात येणारा हा दिन थांबविण्यात यावा. दरवर्षी साजरा करण्यात येणारे विविध दिन यावर खर्च करण्यापेक्षा नागरिकांच्या समस्या खर्‍या अर्थान सोडविण्यासाठी राबविल्या जाणार्‍या योजनांमध्ये अथवा युवकांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांना आवश्यक तो अर्थपुरवठा करण्यात शासनाने हा पैसा वापरल्यास सार्थक होईल, हीच अपेक्षा.

पिंपरी-चिंचवड महापालिका व एमआयडीसीने एकत्रित प्रयत्नांतून अतिक्रमणे रोखावी

मुंबई, ता. २० - पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील एमआयडीसीच्या जागेवरील अतिक्रमणे रोखण्यासाठी महापालिका व एमआयडीसीने संयुक्त प्रयत्न करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. यासह विविध सूचना श्री. पवार यांनी केल्या.
एमआयडीसीने मागणी केल्यानुसार रिकामे भूखंड परत करण्याची कार्यवाही महापालिकेने सुरू केली असून महापालिकेने देखील एमआयडीसीकडे विकास योजनेतील रस्ते आणि पाणी पुरवठा प्रकल्पासाठी जागेची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.

नायगाव येथे पॉलिटेक्निक सुरू करणार - उपमुख्यमंत्री पवार

मुंबई, ता. २० - नायगाव (जि. सातारा) येथे मुलींसाठी पॉलिटेक्निक सुरू करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
नायगाव येथील विकास कामांबाबत मंत्रालयात झालेल्या बैठकीत श्री. पवार बोलत होते. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ, आमदार मकरंद पाटील, पर्यटन विभागाचे मुख्य सचिव आनंद कुळकर्णी उपस्थित होते.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जन्मभूमी नायगाव असल्यामुळे विशेष बाब म्हणून तेथे पॉलिटेक्निक सुरू केले जाईल. मुलींसाठी वसतीगृह उभारण्याची कार्यवाही देखील त्वरीत सुरू करावी. पर्यटक निवास आणि विविध बाबींसाठी दोन ठिकाणांची जागा निश्चित करून संबंधित विभागांना त्वरीत उपलब्ध करून द्यावी.
सावित्रीबाई फुले यांच्या जयंती सोहळ्याच्या कार्यक्रम स्थळाचे सपाटीकरण यांत्रिकी विभागकडून करून घ्यावे. आदी सूचना श्री. पवार यांनी दिल्या.

जिल्हा नियोजनाच्या आराखड्यात कुस्ती, कबड्डीच्या मॅटसाठी तरतूद करावी

मुंबई, ता. २० - देशी खेळांना चालना देण्याच्या उद्देशाने जिल्हा नियोजन आराखड्यात कुस्ती आणि कबड्डीच्या मॅटसाठी तरतूद करावी, तसेच महाराष्ट्र केसरी किताब विजेत्या कुस्तीगिरांच्या मानधनासंदर्भातील वय आणि उत्पन्न अट शिथील करण्यात यावी असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
हिंदकेसरी आणि महाराष्ट्र केसरी किताब विजेत्या कुस्तीगिरांच्या विविध मागण्या आणि कुस्ती स्पर्धांचे धोरण ठरविण्यासंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. युवक कल्याण आणि क्रीडामंत्री पद्माकर वळवी, वित्त विभाग मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, सार्वजनिक बांधकाम विभाग सचिव धनंजय धवड, क्रीडा व युवक संचालनालयाचे संचालक नरेंद्र सोपल, कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे आदी उपस्थित होते.
मानधनासाठी खेळाडूंचे वय ५० वर्षाहून अधिक असणे आवश्यक आहे, परंतू हिंदकेसरी, महान भारतकेसरी आणि रुस्तम-ए-हिंद किताब विजेत्यांना वय व उत्पन्नाची अट नाही. याच धर्तीवर महाराष्ट्र केसरी किताब विजेत्यांना असणारी उत्पन्नची अट शिथील करावी अशी कुस्तीगिरांची मागणी होती. याविषयी प्रस्ताव वित्तविभागाकडे सादर करावा तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील अशा किताब विजेत्यांना एसटी बस प्रवास सवलत लागू करावी. शिवाय शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंसाठीची एसटी प्रवास सवलत कूपनची मर्यादा ५०० रुपयांवरून एक हजार रुपयांपर्यंत वाढवावी असे निर्देश पवार यांनी दिले.
स्वर्गीय खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेस आंतरराष्ट्रीय दर्जा देण्याचा विचार केला जाईल. यासाठी क्रीडामंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि कुस्तीगिरांनी चर्चा करून आराखडा सादर करावा असेही पवार यांनी सांगितले.

स्वारगेट बसस्थानकासह परिसराच्या पुनर्विकासास तत्वतः मान्यता

मुंबई, ता. २० - पुण्यातील स्वारगेट एसटी आणि शहर वाहतूक बस स्थानक परिसरातील सद्यस्थिती आणि नियोजित मोनो व मेट्रो रेल्वे स्थानकामुळे वाढणारी वर्दळ लक्षात घेऊन या परिसराच्या पुनर्विकासास तत्वतः मान्यता देण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे सांगितले.
पुणे आणि बारामती शहरातील एसटी महामंडळाच्या विविध प्रश्नांबाबत मंत्रालयात झालेल्या बैठकीत श्री. पवार यांनी ही माहिती दिली. जलसंपदामंत्री सुनील तटकरे, राज्य एसटी महामंडळाचे अध्यक्ष सुधाकर परिचारक, उपाध्यक्ष दीपक कपूर, पुणे विभागीय आयुक्त दिलीप बंड, पुणे महापालिका आयुक्त महेश झगडे आदी उपस्थित होते.
बैठकीत स्वारगेट परिसराच्या पुनर्विकासाबाबत सादरीकरण करण्यात आले. यावेळी श्री. पवार म्हणाले की, स्वारगेट परिसरात सर्व बाजूंनी वाहतूक एकवटली असून सध्याच्या आणि भविष्यातील वाहतुकीचा विचार करून एसटी आणि शहर वाहतूक बसस्थानकांचा विचार करणे आवश्यक आहे. पुनर्विकास करताना सध्याची बसस्थानके आणि नियोजित मेट्रो व रेल्वे स्थानकांसह खासगी वाहनांच्या संख्येचाही विचार करावा लागेल.
बारामती येथे एसटीचा डेपो क्रमांक दोन उभारण्यासाठीच्या जागेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की बारामती एमआयडीसीतील जागा केंद्र शासनाच्या एका संस्थेकडे हस्तांतरित करण्यात आली असून संबंधित जागा उपलब्ध होत नसल्यास सेंट्रल बिल्डिंगजवळील जागा देण्याबाबत चौकशी केली जाईल.
बसस्थानकांचा पुनर्विकास करताना तेथेच गाळे देऊन परवानाधारक कॅन्टीन आणि स्टॉलधारकांचे पुनर्वसन करावे अशी मागणी परवानाधारक असोसिएशनतर्फे करण्यात आली.

गुरुवार, २० जानेवारी, २०११

लाजरी... (एक चारोळी)

"लाजरी" च्या या लाजण्याने लाजाळू ही लाजले..लाजरीशी खेळताना समजलंच नाही, बारा केव्हा वाजले...!
फूल तिच्या लाजण्याने खुदकन हसले..इतक्यात येऊन छोटेसे फुलपाखरू बसले..
लाजता लाजता लाजरी होऊ लागली मोठी...सुचले हो शब्द बघा आणि आले इथे ओठी...
फिरताना बागेत तिला बघून बहरला चाफा..नकळत चिउताईने घेतला तिचा पापा...!!!

माझा मित्र  संदीप पारोळेकर (दै. लोकमत वेबसाइट पुणे- उपसंपादक) त्याच्याकडे एक छानशी चिमुकली पाहूणी आली आहे..तिचे नाव "लाजरी" ठेवले आहे..त्याने ही आनंदवार्ता सांगताना सुचलेल्या-उपरोक्त चार ओळी..!!

आनंदाचा बहर...

राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड आणि खासदार समीर भुजबळ नवी दिल्ली येथे प्रफुल्ल पटेल यांना कॅबिनेटमंत्री पद मिळाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देताना.

बुधवार, १९ जानेवारी, २०११

घनकचरा प्रकल्पाबाबत नव्याने प्रस्ताव सादर करावा

मुंबई, ता. १८ - मीरा-भाईंदर येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठीच्या जागेबाबत नव्याने प्रस्ताव सादर करण्यात यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. मीरा-भाईंदर महानगरपालिका विविध समस्यांबाबत आयोजित बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रांतर्गत उत्तन पाली येथील सध्या कार्यरत असलेल्या प्रकल्पाऐवजी वरसावे येथे स्थलांतर करण्याचा प्रस्ताव होता. परंतु वरसावे येथे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी आरक्षित केलेली जमीन केंद्र शासनाच्या निकषानुरुप नसल्यामुळे प्रस्ताव रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. येथील शाळांच्या थकित भाड्याबाबत शासनाच्या धोरणानुसारच निर्णय घेण्यात यावा असेही पवार यांनी सांगितले.
बैठकीस पाणीपुरवठा स्वच्छतामंत्री लक्ष्मणराव ढोबळे, खासदार संजीव नाईक, राज्यमंत्री सचिन अहिर, राजेंद्र गावित, आमदार गिल्बर्ट मेंडोसा, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या मुख्य सचिव मालिनी शंकर, नगरविकास विभाग सचिव मनुकुमार श्रीवास्तव, जलसंपदा विभाग सचिव एकनाथ पाटील आदी उपस्थित होते.

अल्पसंख्यांक समस्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार - अजित पवार

मुंबई, ता. १८ - अल्पसंख्यांक समाजाच्या विविध समस्यांवर तत्काळ तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी सविस्तर चर्चा करू, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
पंतप्रधानांच्या १५ कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी, अल्पसंख्यांक समाजातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या मागण्या, अल्पसंख्यांक समाजाच्या विविध प्रश्नांबाबत आज श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. राज्यमंत्री खान यांनी राज्यात या १५ कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी समित्यांची नियुक्ती करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. तसेच जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत अल्पसंख्यांकांच्या विकासाबाबतच्या योजनांची चर्चा व्हायला हवी अशी मागणी केली. यानुसार श्री. पवार यांनी चर्चेबाबत दुजोरा देऊन आणि त्यासंदर्भात परिपत्रक निर्गमित करावे अशा सूचना दिल्या.
बैठकीस शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, शालेय शिक्षण व अल्पसंख्यांक विकास विभागाच्या राज्यमंत्री फौजिया खान, अल्पसंख्यांक आयोग अध्यक्ष नसीम सिद्दिकी, आमदार नवाब मलिक, शालेय शिक्षण विभाग प्रधान सचिव संजयकुमार, वित्तविभाग प्रधान सचिव सुधीर श्रीवास्तव, महिला व बालकल्याण विभाग प्रधान सचिव वंदना कृष्णा उपस्थित होते.

पावनखिंड पर्यटन विकासासाठी पहिल्या टप्प्यात सव्वादोन कोटी

मुंबई, ता. १८ - कोल्हापूर जिल्ह्यातील पावनखिंड (ता. शाहूवाडी) या ऐतिहासिक स्थळाचा विकास करण्यासाठी पावनखिंड परीसरात पहिल्या टप्प्यात सुमारे सव्वादोन कोटी रुपयांची विकास कामे करण्यात येतील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
शाहूवाडी-पन्हाळा परीसरातील विविध विकास कामांच्या संदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत बांधकाम विभाग सचिव धनंजय धवड यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी श्री. भुजबळ म्हणाले की, ऐतिहासिक पावनखिंड परीसराचा विकास करण्याच्या अनुषंगाने पहिल्या टप्प्या, सुशोभीकरणासह स्मृतीस्तंभ उभारणी, प्रवेशद्वार ते वाहनतळ रस्ता, वाहनतळ उभारणी, निरीक्षण मनोरा, स्वच्छतागृह व विश्रांतीस्थळ, ओढ्यावर लहान पूल आदी कामे करण्यात येतील. यासाठी २ कोटी २० लाख रुपयांची तरतूद करण्यात येईल. शिराळा व पन्हाळा तालुक्यांना जोडणारा महत्वाचा रस्ता असलेल्या सावर्डे (जि. कोल्हापूर) ते कांदे (जि. सांगली) या मार्गावर वारणा नदीवर उंच पातळीचा मोठा पूल बांधण्याचे सुमारे साडेसात कोटी रुपयांचे काम नाबार्ड अंतर्गत करावयाच्या कामात प्रस्तावित करण्यात येईल. तसेच पिशवी ते खोतवाडी, करूंगळे ते उदगिरी तसेच शित्तूर ते उदगिरी या रस्त्यांच्या कामासाठीही निधी उपलब्धतेनुसार प्राधान्याने तरतूद केली जाईल.

मंगळवार, १८ जानेवारी, २०११

नांदगाव व छपन्नखेडी प्रादेशिक योजनेतून नांदगाव पालिकेने स्वतंत्र होण्याची गरज - भुजबळ

 मुंबई, ता. १८ - नांदगाव शहर व छपन्नखेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून नांदगाव नगरपरिषदेने स्वतंत्र व्हावे आणि शहरासाठी असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे व्यवस्थापन व वितरण यंत्रणा ताब्यात घेऊन सुनियोजित पद्धतीने चालवावी. अशी सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी केली.
श्री. भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज या योजनेच्या समस्यांसंदर्भात सर्व संबंधितांची बैठक झाली. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री लक्ष्मण ढोबळे, आमदार पंकज भुजबळ, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग सचिव मालिनी शंकर, स्थानिक अभियंते, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
श्री. भुजबळ म्हणाले की, नांदगाव व ५६ खेडी पाणीपुरवठा योजनेची सद्यस्थिती लक्षात घेता ही योजना सुरळीतपणे सुरू राहण्याच्या दृष्टीने तिचे विभाजन करण्याची आवश्यकता आहे. तसेच पाणीपट्टीची मोठी थकबाकी आणि वाढीव पाणीपट्टीचा भार पेलण्याबाबत नांदगाव नगरपरिषदेने व्यक्त केलेली असमर्थता इ. लक्षात घेता नांदगाव परिषदेने शहराची पाणीपुरवठा योजना ताब्यात घ्यावी. चांगल्या कंत्राटदारास देखभाल-दुरुस्ती व पाणीपुरवठ्याची जबाबदारी सोपवावी, आदी सूचना दिल्या.
यो योजनेतील ज्या १६ गावांना गुरुत्वाकर्षणाच्या आधारे पाणी पुरविले जाते, त्यांनाही योजनेतून स्वतंत्र केल्यास त्यांच्या पाणीपट्टीचा प्रश्नही संपुष्टात येईल. याचबरोबर भारत निर्माण योजनेतून जिथे योजना राबविण्यात येत आहेत त्यांच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर त्या गावांनाही या योजनेतून स्वतंत्र करता येईल.
आमदार पंकज भुजबळ यांनी योजनेकरिता शासनाकडून २ कोटी १५ लाख ८२ हजार रुपयांचे अनुदान मिळण्याची मागणी केली.

लासलगाव, विंचूर प्रादेशिक योजनेची अपूर्ण कामे पूर्ण करावी

लासलगाव व विंचूर १६ गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करून यानंतरच ही योजना संयुक्त जलव्यवस्थापन समितीकडे हस्तांतरित करण्यात यावी, अशी सूचना देखील छगन भुजबळ यांनी केली.
प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या समित्या प्रांताधिकार्‍यांच्या नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयोग राबविण्यात येईल, असेही भुजबळ यांनी सांगितले.

येवला ३८ गाव पाणीपुरवठा योजनेच्या समस्यांवर अधिकार्‍यांनी तोडगा काढावा

येवला तालुक्यातील ३८ गावांची प्रादेशिक पाणीपुरवठा योजना निधिअभावी जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करणे शक्य नसल्याने सर्व सरपंचांची संयुक्त जलव्यवस्थापन समिती नियुक्त करावी आणि या सदस्यांनी सर्वानुमते खाजगी कंत्राटदाराची नेमणूक करून पाणीपुरवठा योजनेचे नियंत्रण व व्यवस्थापन करावे यासह विविध सूचना केल्या.

Back pain due to use of computer

Back pain due to computer use is a most common problem seen in 4 out of 5 persons at any point of life, caused due to long hours of working in front of computer or bad posture while using the computer and lack of practicing relaxing exercises before using the computers!
Back pain:

* The back is the workhorse of human body carrying the burden of the entire body, and is responsible for almost every move you make. This makes it susceptible to injury, and the resultant back pain can be quite immobilizing

* Back pain relief exercises help most patients. In fact, those who suffer from chronic back pain usually benefit from regular stretches and bends and easy to apply treatments

* When a person suffers from back pain, he or she may take a few days off to rest the back. Most physiotherapist, however recommend back pain relief exercises, that both stretching and relaxation of the area

* Bad posture or sudden jerks or Lack of relaxing exercises, overweight are some of the root causes
Treatment and Preventive measures:
Yoga:
*Doing yoga cultivates a balance between the flexibility and strength of the muscles of the body
    *People with back pain have to be extra careful when trying out exercises
    *Essentially yoga increases the skeletal and muscle strength of the back while correcting the problems. It also builds up the abdominal muscles.
    *The yoga poses need to be held for a few seconds, stretching and relaxing the back.
Stretching and Exercising while at work:

    *Sit properly in a good chair designed for desk work
    *Your back should be straight, your shoulders back, and the top of your monitor should be level with your eyes
    *If you have to look down or up, you need to adjust the height of your screen
    *Keep your legs bent at the knees so that the knees are only slightly higher than your hips
    *Feet should be flat on the floor or on a step stool of some sort
    *Stand up every half hour to stretch or walk around a bit.
    *Stretch your calves, and give your eyes a break from focusing on your computer screen. This will also help prevent blood clots from developing in your legs. Blood clots are very common among middle-aged computer users
    *To stretch your neck, flex your head forward/backward, side to side and look right and left. Never roll your head around your neck. This could cause damage to the joints of the neck

    * When a spinal disk presses on a nerve, it causes a herniated disk
    * Sometimes the herniated disk presses on hard on the sciatic nerve, resulting in sharp shooting pain right across the lower part of the body, this is known as sciatica
    * When the vertebras of the spinal column slip forward, over lapping each other the painful condition of Spondylolisthesis occurs
    * These problems could result in a herniated disk, or Sciatica, Spinal stenosis, Spondylosis and Spondylolisthesis
-----------------(COURTESY with Specialist Doctors)------------------------------------

फायलींच्या स्थितीबाबत माहिती देणारे सॉफ्टवेअर...तरी भ्रष्टाचार थांबणार का?

जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या विविध प्रकरणांच्या फायलींची माहिती देणारे सॉफ्टवेअर डीजेएसएस कार्यान्वित करण्यात आले आहे. फाईलची सद्यस्थिती यामुळे समजू शकणार आहे, परंतु यामुळे भ्रष्टाचार कमी होईल अथवा नाही याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.
आधुनिक काळात सतत बदलत्या तंत्रज्ञानामुळे नवीन तंत्रज्ञानाची भर पडत आहे. ही बाब कार्यप्रणालीत सुधारणा करण्यासाठी कार्यभार हलका होणे, विशेषतः शासकीय कार्यालयांमध्ये पेंडिंग असलेली प्रकरणे लवकर निघणे यासाठी फायदेशीर निश्चित ठरणार आहे. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने नुकतीच अशा प्रकारची कार्यप्रणाली सॉफ्टवेअर कार्यान्वित केले आहे हे कौतुकास्पद आहे. जिल्हाधिकारी कार्यालय म्हणजे संपूर्ण जिल्ह्याच्या विविध प्रकरणे, कामे यांचा निवाडा, निपटारा येथे होतो. खासगी क्षेत्रापासून थेट शासकीय कार्यालयांवर जिल्हाधिकारी कार्यालयाचे बर्‍यापैकी नियंत्रण असते. विविध उतारे, मान्यता, परवानग्या, वादातीत प्रकरणे, भूमिआलेख, कोषागार, आर्थिक बाबी, पुरवठा प्रकरणे, विविध संस्था, ग्रामपंचायती, स्थानिक स्वराज्य संस्था व त्यांचे व्यवहार, धोरणे, निवडणुका अशा कित्येक विषयांचे निर्णय येथे निश्चित केले जातात.
भ्रष्टाचारासाठी भारताचे नाव जगाच्या पाठीवर काळ्या यादीत आहेच. शासकीय कार्यालयांमध्ये तर मोठ्या प्रमाणावर याचे आगार असल्याचे दिसून येते. खासगी, वैयक्तीक फायलींपासून शासनाच्या कामांसाठी देखील जिल्हाधिकारी कार्यालयात चिरिमिरी घेतली जातेच. भाऊसाहेब, साहेब, दादा, अण्णा, नाना अशा विविध नावांचा वापर यासाठी केला जातो. अथवा नजीकचे एखादे चहाचे दुकान, पानटपरी, हॉटेल अशा ठराविक ठिकाणी ठराविक संकेतांकासह संबंधित व्यक्ती चिरिमिरीसाठी किंवा व्यवहार होण्यासाठी, फाईल पुढे सरकण्यासाठी ठरलेली रक्कम सुपूर्द करते. रक्कम मिळाल्याचे आणि कोणताही धोका नसल्याचे निश्चित झाल्यानंतर ही रक्कम संबंधित अधिकारी किंवा त्यांचे संबंधित आपल्या ताब्यात घेतात आणि फाईल, फायली पुढे सरकतात.
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने कार्यान्वित केलेले सॉफ्टवेअर, राज्यातील अन्य जिल्हाधिकारी किंवा शासकीय कार्यालये देखील कार्यान्वित करतीलच. या सॉफ्टवेअरमुळे एखाद्या व्यक्तीस आपली फाईल नेमकी कोणाच्या टेबलवर आहे? फाईलवर किती प्रक्रिया व्हायची बाकी आहे, हे समजण्यास मदत होईल. मात्र एका टेबलवरून दुसर्‍या टेबलवर (अगदी शेजारीच) फाईल जाण्यासाठी लागणारा कालावधी, वेळ याची कोणतीही शाश्वती नसते. या प्रणालीमुळे भ्रष्टाचार कमी होईल काय? याचा विचार होणे गरजेचे आहे. किंबहुना फाईल लवकरात लवकर साहेबांपुढे जाऊन त्यावर स्वाक्षरी होण्यासाठी चिरिमिरीचे दर बहुदा आणखी वाढतील अशी शक्यता नाकारता येत नाही. ठिकठिकाणच्या जिल्हाधिकारी, शासकीय मुख्य अधिकारी यांनी याचबरोबर भ्रष्टाचाराकडे खर्‍या अर्थाने लक्ष देऊन भ्रष्टाचार देखील कमी होणे ही वाढत्या महागाईमुळे ठरलेली सर्वसामान्यांची गरज आहे.

सिडकोच्या प्रकल्पांना नगरविकास राज्यमंत्र्यांची भेट

 
मुंबई, ता. १८ - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाकरिता संपादित करण्यात येणार्‍या जमिनीसंदर्भात येथील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करताना त्यांचे समाधान होईल, असे पुनर्वसन आणि पुनःस्थापना धोरण अवलंबिण्यात येईल तसेच या प्रकल्पग्रस्तांचे १२.५ टक्के भूखंड वाटपाबाबतचे अधिकारही अबाधित राहतील. अशी ग्वाही नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी दिली आहे. सिडकोच्या विविध प्रकल्पांना भेटी दरम्यान  पत्रकारांशी वार्तालाप करताना दिली.
सिडको अध्यक्ष नकुल पाटील, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे उपस्थित होते. सिडकोच्या विविध प्रकल्पांना भेट देऊन त्यांची सद्यस्थिती जाणून घ्यावी तसेच सिडकोच्या कार्यप्रणालीची माहिती जाणून घेण्याच्या दृष्टीने आपण नवी मुंबईस भेट देत आहोत. नवी मुंबई विमानतळ लवकरात लवकर आकारास यावे तसेच येथून स्थलांतरीत होणार्‍या प्रकल्पग्रस्तांची योग्य काळजी घेतली जावी या अनुषंगाने सिडको आणि शासन स्तरावर योग्य निर्णय घेतले जातील असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. सिडकोच्या कार्यपद्धतीविषयी समाधान व्यक्त करताना ते म्हणाले की, १९७० साली केवळ १.१७ लक्ष लोकसंख्या असणारा हा परीसर आज १८ लक्ष लोकांचे निवासस्थान असून हीच सिडकोच्या चांगल्या कार्याची पोचपावती आहे.
श्री. जाधव यांनी यासह विमानतळ प्रकल्प, उन्नती गृहनिर्माण योजना, गोल्फ कोर्स, सेंट्रल पार्क, आगरी कोळी संस्कृती भवन आणि एक्झिबिशन सेंटर या प्रकल्पांना भेट दिली. प्रकल्पाच्या विकासासंदर्भात सूचना देखील केल्या. सिडकोच्या विभाग प्रमुखांशी विविध प्रकल्पांबाबत चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. अध्यक्ष नकुल पाटील, संचालक सुभाष भोईर, नामदेव भगत यांनी प्रकल्पग्रस्तांना १२.५ टक्के भूखंडाचे वाटप, गरजेपोटी बांधलेल्या घरांचे प्रश्न इ. विषयी चर्चा करण्यात आली. सिडकोचे मागील ४० वर्षातील विविध प्रकल्प आणि विकसनशील प्रकल्पांविषयी माहिती देणारे सादरीकरण मुख्य नियोजक एम. व्ही. लेले यांनी केले. श्री. सत्रे यांनी प्रकल्पांविषयी विस्तृत माहिती दिली.

सोमवार, १७ जानेवारी, २०११

'केसरी हाऊसिंग' च्या कार्यालयाचे उद्घाटन

मुंबई, ता. १७ - पर्यटन उद्योगात ज्याप्रमाणे "केसरी" ने मराठी माणसाचा विश्वास संपादन केला आहे, त्याचप्रमाणे गृहनिर्माण क्षेत्रातही 'केसरी हाऊसिंग' ला निश्चित यश मिळेल, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.
हिमांशू केसरी पाटील आणि शशी जाधव यांनी 'केसरी हाऊसिंग' या गृहबांधणी उद्योगास प्रारंभ केला आहे. एल. जे. रोडवर (माहिम पश्चिम) केसरी हाऊसिंगच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी त्र्यंबकेश्वरच्या सत्यानंद योगपीठाचे स्वामी शिवराजानंद सरस्वती यांच्यासह केसरी पाटील, सुनिता पाटील, वीणा पाटील, आदी उपस्थित होते. कार्यालयास सौ. रश्मी ठाकरे, किरण शांताराम, अतुल परचुरे आदींनी भेट दिली.

आदर्श जमीनदोस्त करणे म्हणजे सर्वच नष्ट...

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आदर्श गृहनिर्माण संस्था प्रकरणी वादाच्या भोवर्‍यात सापडून त्यांना आपल्या पदाचा राजीनामा देणे भाग पडले होते. यानंतर आदर्श प्रकरण संसद व विधानसभेच्या सत्रात चांगलेच गाजले होते. फाईल गहाळ होणे, विविध प्रकरणांची चौकशी लागणे आदी घडामोडींनंतर आता आदर्शची इमारतच जमीनदोस्त करण्याचा निर्णय पर्यावरण मंत्रालयाने दिला आहे. तीन महिन्यात ही इमारत जमीनदोस्त करण्यात येणार आहे. प्रकरण काँग्रेसवर चांगलेच शेकले जात असल्याचे तज्ज्ञांचे मत असून इमारत जमीनदोस्त करणे म्हणजे संपूर्ण प्रकरणावरच पडदा टाकून जनतेला शांत करण्यासारखे असल्याची नागरिकांची प्रतिक्रिया आहे.

स्टँडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉन- २०११ चे बक्षीस वितरण

मुंबई, ता. १६ - सुमारे ३८ हजारांहून अधिक देशी-विदेशी नागरिकांचा सहभाग लाभलेल्या स्टँडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉन-२०११ मधील विजेत्यांना राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. मुंबई मॅरेथॉनमधील ४२ किलोमीटर लाँग-रन मध्ये आज इथिओपियाच्या गिरीमा असेफा याने विजेतेपद मिळविले. इथिओपियाच्याच बोटो सिगाए वोल्ड याने द्वितीय तर केनियाच्या पॅट्रिक मुरिकी याने तृतीय क्रमांक पटकाविला. महिलांच्या गटात देखील इथिओपियाचेच वर्चस्व कायम राहिले.
भारतीय धावपटूंच्या गटात पुण्याच्या आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटचे राहिले. प्रारंभी छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून के. शंकरनारायणन् यांच्या हस्ते मॅरेथॉनचे उद्घाटन करण्यात आले. मॅरेथॉनमध्ये अभिनेता विवेक ओबेरॉय, जॉन अब्राहम, मंत्री जयदत्त क्षीरसागर, अभिनेत्री दीपिका पदुकोण, गोरी खान, परमेश्वर गोदरेज आदींनी सहभाग घेतला होता.

राज्य संगीत नाट्य स्पर्धेत वसई कृत संगीत संशयकल्लोळ द्वितीय

मुंबई, ता. १६ - राज्य शासनाने आयोजित केलेल्या ५० व्या महाराष्ट्र राज्य व गोवा संगीत नाट्य स्पर्धेत वसई येथील मन्वंतर कला मंडळाने सादर केलेल्या संगीत संशयकल्लोळ या नाटकास द्वितीय पारितोषिक मिळाले.
सांगली येथे नुकत्याच झालेल्या स्पर्धेत गोव्याच्या पाईकदेव  भोलनाथ संस्थेच्या संगीत मीरा मधीरा या नाटकास ३५ हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक मिळाले. कै. गोविंद बल्लाळ देवल लिखित संगीत संशयकल्लोळ चे दिग्दर्शन हृदयनाथ कडू यांनी केले होते. अश्विनीशेठ ची भूमिका करणारे दशरथ राऊत यांना साभिनय गायनाचे प्रथम पारितोषिक मिळाले. कृत्तिकेची भूमिका करणारी श्रीयंका देसाई व भादव्याच्या भूमिकेसाठी महेश पाटील यांना उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळाले. ऑर्गन व तबल्यासाठी श्रीरंग परब व श्रीनिवास शेंबेकर यांना प्रथम पारितोषिक मिळाले.

पंडित भीमसेन जोशी यांची प्रकृती स्थिर

पुणे, ता. १७ - भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी सांगितले. पंडित भीमसेन जोशी यांना श्वासोच्छ्वासाचा त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती अद्याप चिंताजनक मात्र स्थिर आहे. त्यांच्यावर हिमोडायलिसिस करण्यात येत आहे. दरम्यान राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यावरणमंत्री छगन भुजबळ यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

शुक्रवार, १४ जानेवारी, २०११

प्रेमासाठी..वाट्टेल ते...!!!

प्रेमात सर्व काही माफ असतं..प्रेम हे आंधळं असतं! असं म्हणतात नां..? होय अगदी खरं आहे ते..आता हेच बघा नां...
प्रेमात अक्षरशः चिंब झालेल्या एका युवकाने त्याच्या प्रेयसीच्या अटी लग्नापूर्वीच तिला लिखित स्वरूपात म्हणजेच स्टँप पेपरवर लिहून दिल्या. अटींप्रमाणे लग्नानंतर हा पती ठरलेल्या वेळेत घरी आला नाही, तेव्हा त्याला बिचार्‍याला लिहून दिल्याप्रमाणे चक्क रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर झोपावे लागले.
सन २००७ मध्ये या जोडप्याने लग्न केले होते. हे नवरोबा कॉर्पोरेट कंपनीत नोकरीला असल्यामुळे बहुदा नेहमीच घरी परत यायला उशीर होतो. नवरोबा मदिरालयात जाऊन मदिरा प्राशन तर करुन आले नाही नां? याची शंका त्यांच्या सौभाग्यवतीला येत होती.
नवरोबाने हबीबगंज (भोपाळ नजीक) पोलिस ठाण्यात जाऊन बायकोविरुद्ध तक्रार केली, दोघांनाही ठाण्यात बोलावून समजाविण्यात आले आणि स्टँप पेपरवर असलेल्या अटींमध्ये बदल करण्यात आला. पाहूया या अटी तरी कोणत्या होत्या..?
अटी अशा-
१). एका वेळचा स्वयंपाक बायको आणि एका वेळचा नवरोबांनी करावा.
२). संध्याकाळी सातच्या आत घरात..अन्यथा नवरोबांनी बाहेर झोपावे.
३). रात्री नऊनंतर टीव्ही बंद.
४). पे अकाउंट दोघांचे संयुक्त खाते असेल.
५). घर खर्चात सुरवातीला नवरोबाचे पैसे वापरले जातील.
६). घर खरेदीची रजिस्ट्री (व्यवहार) सौभाग्यवतींच्या नावावर होतील.
७). सौं. नी मोबाईलवर कॉल केल्यानंतर लगेच पिक केला जाईल, टाळंटाळ करणार नाही.
८). दारू सौं. ना विचारून नंतरच प्यावी.
९). नवरोबा आपल्या आईस भेटण्यास जाणार नाही.

नवरोबांवर अशा नऊ अटी लादून प्रेयसी त्यांची सौभाग्यवती झाली होती.
# @ असलं प्रेम नक्कोच नको.. प्रेमासाठी वाट्टेल ते..म्हणतात नां, ते हेच!

पणशीकर यांच्या निधनामुळे मराठी रंगभूमीची अपिरिमित हानी

ज्येष्ठ अभिनेते प्रभाकर पणशीकर यांच्या निधनामुळे मराठी रंगभूमीची अपिरिमित हानी झाली आहे. या शब्दात राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
प्रभाकर पणशीकर यांनी "तो मी नव्हेच" मधील लखोबा लोखंडेच्या भूमिकेसह अनेक नाटकांमध्ये साकारलेल्या विविध भूमिका अविस्मरणीय ठरल्या.

ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकर यांचे निधन

"तो मी नव्हेच" सह विविध भूमिका साकार करून अभिनयास आकार देऊन ज्यांची छाप अखिल मराठी मनावर कायमची पडली असे ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकर (वय ७९) यांचे गुरुवारी (ता. १३) रात्री निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून श्वासोच्छ्वासास त्रास होत असल्यामुळे आणि किडनी बिघडल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

गुरुवार, १३ जानेवारी, २०११

पर्यटनवृद्धीसाठी भारत व त्रिनिदाद यांच्यात द्वि-पक्षीय सहकार्य वाढविण्याची गरज

मुंबई, ता. १३ - भारत आणि रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद व टोबॅगो यांच्यात पर्यटन क्षेत्रात द्वि-पक्षीय सहकार्य वाढीस लागावे यासाठी राज्याचे पर्यटनमंत्री म्हणून प्रयत्न करण्यास आपल्याला निश्चितपणे आनंद वाटेल, असे प्रतिपादन राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद व टोबॅगोचे पर्यटनमंत्री रुपर्ट ग्रिफीथ यांच्या नेतृत्वाखालील २१ सदस्यीय शिष्टमंडळाने आज सकाळी भुजबळ यांची भेट घेतली. यावेळी श्री. भुजबळ म्हणाले की, विश्वविख्यात क्रिकेटपटू ब्रायन लारा याच्यामुळे त्रिनिदादचे नाव जगभरात झाले आहे. या निसर्गसमृद्ध देशासोबत पर्यटन सहकार्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. दरवर्षी भारतातील सुमारे ११ दशलक्ष पर्यटक अन्य देशात पर्यटनासाठी जातात. वेगळ्या पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी उत्सुक असणार्‍या कित्येक भारतीय पर्यटकांसाठी त्रिनिदाद हा उत्तम पर्याय म्हणून पुढे येऊ शकतो. शिष्टमंडळाच्या होणार्‍या चर्चेतून सकारात्मक गोष्टी निश्चितपणे निष्पन्न होतील अशी आशा भुजबळ यांनी व्यक्त केली.
श्री. ग्रिफीथ यांनी त्रिनिदाद व टोबॅगोचे राष्ट्रीय वाद्य असलेल्या स्टील-पॅनची प्रतिकृती श्री. भुजबळ यांना भेट दिली. यावेळी त्रिनिदाद व टोबॅगो उच्चायुक्तालयाचे अधिकारी, एमटीडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक  अविनाश ढाकणे व पर्यटन विभागाचे उपसचिव राजीव निवतकर उपस्थित होते.

पुणे येथे शुक्रवारी पोलिसांची वार्षिक आढावा बैठक

पुणे, ता. १३ - पुणे शहराच्या पोलिस आयुक्त श्रीमती मीरा बोरवणकर आणि सहपोलिस आयुक्त अशोक धिवरे शुक्रवारी (ता. १४) दुपारी सव्वा बाराला पोलिस आयुक्त कार्यालयात गुन्हे प्रकटीकरण (दाखल व उघड) व इतर चांगली कामगिरीबाबत वार्षिक आढावा बैठक घेणार आहेत. यावेळी आढावा, गुन्हे प्रकटीकरण व इतर चांगल्या कामगिरीबाबत पत्रकार परिषदेत माहिती देण्यात येईल. बैठकीस अप्पर पोलिस आयुक्त गुन्हे, उत्तर, दक्षिण, तसेच पोलिस उपायुक्त गुन्हे आणि आर्थिक परिमंडळ १, २, ३, ४ उपस्थित राहतील.

मंत्रालयात मोफत आरोग्य तपासणीस उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई, ता. १३- रस्ते सुरक्षा पंधरवाड्यानिमित्त सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे ३५० कर्मचार्‍यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. श्री. भुजबळ यांनी स्वतःची रक्त-साखर तपासून शिबिराचे उद्घाटन केले. शासकीय वाहनचालक व कर्मचार्‍यांनी आपल्या आरोग्याची सातत्याने काळजी घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन यावेळी भुजबळ यांनी केले.
दिवसभरात सुमारे ३५० वाहनचालक, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, पोलिस कर्मचारी यांनी शिबिराचा लाभ घेतला. नेत्रचिकित्सा, रक्तदाब तपासणी आणि ई. सी. जी. तपासणी करण्यात आली. डॉ. विपुल गट्टाणी, डॉ. मुख्तार देशमुख, डॉ. संदेश श्रीप्रभू, डॉ. अजित कोठावाला, डॉ. महेश रावखंडे, डॉ. मयूर जावळे, डॉ. समीर अन्सारी, डॉ. रविकिरण पवार, आदी डॉक्टरांनी तपासणी केली.

बुधवार, १२ जानेवारी, २०११

दहशतवाद प्रतिकार पोलिस प्रशिक्षण संस्थेसाठी बारामती येथे जमीन उपलब्ध करणार

मुंबई, ता. १२- बारामती येथे नागरी दहशतवाद प्रतिकार पोलिस प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी राज्य शासनाकडून २० कोटी रूपये व जमीन उपलब्ध करून दिली जाईल. असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
पोलिस प्रशिक्षण केंद्रासंदर्भात मंत्रालयात समिती कक्षात ते बोलत होते. गृहमंत्री आर. आर. पाटील, अप्पर मुख्यसचिव उमेशचंद्र सरंगी, पोलिस महासंचालक डी. शिवानंदन उपस्थित होते. श्री. पवार म्हणाले की बारामतीजवळ बर्‍हाणपूर येथील जागा प्रशिक्षण केंद्रासाठी योग्य ठरेल. तेथील पालखी तळ सुरक्षित ठेवून उर्वरित जागेवर प्रशिक्षण केंद्र उभारता येईल. यासाठी केंद्राकडून २० कोटी रुपये मिळणार असून राज्यशासनही २० कोटी रुपये उपलब्ध करून देईल.
श्री. शिवानंदन म्हणाले की, राज्यात पोलिस प्रशिक्षण केंद्र आहे परंतु नागरी दहशतवाद प्रतिकार प्रशिक्षण केंद्र नाही. केंद्र शासनाने अशा प्रकारची प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी राज्यांना प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतली आहे. या ठिकाणी पोलिसांना दहशतवाद्यांचा प्रतिकार करण्याबाबत अत्याधुनिक प्रशिक्षण दिले जाईल. अशा प्रशिक्षणाची आपल्या पोलिसांना आवश्यकता आहे.

अनुभवी मार्गदर्शकास मुकलो- उपमुख्यमंत्री

मुंबई, ता. १२- महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस ऍड. गुरूनाथ कुलकर्णी यांच्या निधनाने एका ज्येष्ठ आणि अनुभवी मार्गदर्शकाला आम्ही मुकलो आहोत. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोकभावना व्यक्त केल्या.
त्यांनी पक्षाच्या स्थापनेपासून पक्ष कार्यालयात समन्वयक म्हणून महत्वाची जबाबदारी पार पाडली आहे. विविध निवडणुकांच्या वेळी ते निवडणूक आयोग आणि निवडणुकीसंदर्भातील कायदेविषयक मार्गदर्शकाची भूमिका बजावत असत. म्हणून त्यांना गुरूजी म्हणून संबोधले जात होते. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी पक्ष संघटनेची पडद्यामागची मात्र महत्वाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली. कर्तृत्वाची पावती म्हणून पक्षाने त्यांना विधान परिषदेवर पाठवून अधिक महत्वाची जबाबदारी सोपविली होती. कोकणच्या प्रश्नावर देखील ते नेहमीच आक्रमक भूमिका घेत असत. त्यांच्या निधनाने कोकण आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुरूनाथ कुलकर्णी यांचे निधन

मुंबई, ता.१२- राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरूनाथ कुलकर्णी (वय ७०) यांचे प्रदीर्घ आजारानंतर आज दुपारी कोकिलाबेन रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची अपरिमित हानी झाल्याची शोकभावना राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.
श्री. भुजबळ यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासूनच गुरूनाथ कुलकर्णी यांनी पक्षाच्या विस्तारासाठी समर्पणशील भावनेने कार्य केले. पक्षाच्या घटनेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यावर त्यांचा भर असे. केंद्रिय मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांबरोबर त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे एकहाती सांभाळली. आपल्या संयमी आणि अभ्यासपूर्ण भाषणांनी त्यांनी विधान परिषदेच्या कामकाजावर देखील छाप पाडली. त्यांच्या निधनामुळे गोरगरीबांविषयी अत्यंत आस्था असणारा एक कृतीशील सामाजिक नेता राज्याने गमावला आहे.
गुरुवारी (ता. १३) दुपारी बाराला त्यांच्या देहावर दादर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

चिनी "मांज्या" प्रमाणेच अन्य वस्तूंवर बंदी आणण्याची गरज

दरवर्षाप्रमाणे यंदाही गुजरातमध्ये पतंग महोत्सवानिमित्त सुमारे दोनशे देशांमधील प्रतिनिधींचा सहभाग आहे. चीनच्या मांज्यावर यंदाही शासनाने बंदी कायम ठेवली आहे. याप्रमाणेच आपल्या देशात चिनी बनावटीच्या विक्री होत असलेल्या अन्य वस्तूंवर देखील बंदी आणण्याची गरज आहे.
पतंग उडविण्यासाठी आवश्यक असलेला दोरा म्हणजेच मांज्या..! भारतीय बनावटीच्या या मांज्या वर चिनी बनावटीच्या मांज्याने मध्यंतरी कुरघोडी करून भारतीय मांज्याची पतंग कापली होती. परिणामी चिनी मांज्याला प्रचंड उठाव आल्यामुळे आणि हा मांज्या तुलनेत अधिक धारदार असल्यामुळे विशेषतः हातांना नुकसान होण्याची शक्यता होती. यामुळे शासनाने या मांज्यावर बंदी घातली आहे. भारतीय मांज्यासाठी एका दृष्टीने हे पथ्यावरच पडले म्हणायचे. या बंदीमुळे तरी बिचार्‍या भारतीयांनी बनविलेल्या मांज्याला उठाव आला असेल. देशात मोबाईलपासून सणासुदिला वापरण्यात येणारी विद्युत रोषणाई, फटाके, मुलांची खेळणी, विविध वस्तू अशा अनेक बाबतीत चिनी वस्तूंनी भारतीय बाजारपेठ व्यापली आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. यासाठी शासनाचे व्यापारविषयी असलेले धोरण, नीति, धारणा जबाबदार असल्याचे व्यापार्‍यांचे मत आहे. कुटुंबप्रमुखाने स्वतःच्या मुलाकडे दुर्लक्ष करून दुसर्‍याच्या मुलाचे संगोपन करण्यासारखीच ही तर्‍हा म्हणावी लागेल. एकीकडे देशात बेरोजगारीची समस्या भेडसावत असून यातून बाहेर पडण्याचा मार्ग बेरोजगारच काय शासनाला सुद्धा पाहिजे तसा सुचत नसल्याचे चित्र आहे, तर दुसरीकडे अशा प्रकारे चिनी वस्तू भारतीय बाजारपेठ व्यापत आहेत. देशी वस्तूंपेक्षा चिनी वस्तू स्वस्त असल्यामुळे दोन पैसे बचत होत असल्याने अनेक ग्राहक चिनी वस्तूंचे अक्षरशः अधीन झाले आहेत. चिनी मांज्याप्रमाणेच अन्य वस्तूंवर देखील बंदी आणल्यास बेरोजगारी कमी होईल, हीच अपेक्षा!

थंडीचा जोर कमी

सुमारे महिनाभर देशात अनेक राज्यांमध्ये आलेली थंडीची लाट या आठवड्यात कमी होत असल्याचे जाणवत आहे. अनेक शहरांमध्ये दिवसा थोडी ऊबदार हवा आणि रात्री मात्र गारवा जाणवत आहे. रात्रीच्या किमान तापमानात देखील वाढ झाली असून गेल्या आठवड्यात शून्याकडे सरकणारा पारा आता दहा कडे सरकत असून अनेक राज्यांमध्ये रात्रीचे किमान तापमान आता पाच अंशांपेक्षा जास्त होत आहे. थंडीचा जोर कमी झाल्याचे जाणवताच मध्यप्रदेशमध्ये काही शाळांनी इयत्ता आठवीचे वर्ग पुन्हा सुरू करण्याची शासनाकडे मागणी केली. परंतु तज्ज्ञ आणि विविध अधिकार्‍यांच्या झालेल्या बैठकीत शाळा सोमवार (ता. १६) पासूनच सुरू करण्याचा निर्णय कायम करण्यात आला आहे. थंडीमुळे अचानाक शाळांना सुट्या जाहीर करण्यात आल्यामुळे मात्र अनेक पालक मुलांसह गावांना गेले.

सिडको महामंडळाच्या दिनदर्शिका व दैनंदिनीचे प्रकाशन

सिडको महामंडळाच्या २०११ च्या दिनदर्शिका व दैनंदिनीचे प्रकाशन सिडकोच्या नोंदणीकृत कार्यालयात निर्मल येथे संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष नकुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव टी. सी. बेंजामीन, सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे, कोकण विभागीय आयुक्त एस. एस. संधू, संचालक व विधानपरिषदेचे आमदार सुभाष भोईर, नामदेव भगत आणि सचिव प्रदीप रथ उपस्थित होते. जनसंपर्क अधिकारी डॉ. दिलीप वाटाणे यांनी दैनंदिनी आणि दिनदर्शिकेतील वैशिष्ट्यांची माहिती दिली

पनवेल-इंदापूर टप्प्याच्या चौपदरीकरणाचे काम तत्काळ सुरू करणार

मुंबई, ता. १२- मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेल ते इंदापूर या टप्प्यातील चौपदरीकरणाच्या कामास केंद्र सरकारची मंजुरी मिळाली असून सुमारे ५५३ कोटी रुपये खर्चाचे काम तत्काळ सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
मुंबई-गोवा राज्यमार्ग क्र. १७ वरील इंदापूर ते झाराप या चार टप्प्यातील रस्त्याच्या चौपदरीकरणाचा सुसाध्यता अहवाल तपासण्याचे काम सुरू असून ते येत्या मार्च २०११ पर्यंत पूर्ण होईल. यानंतर या कामाचा अहवाल केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येऊन मंजुरीनंतर चौपदरीकरणाचे हे काम त्वरीत सुरू करण्याच्या दृष्टीने आपण स्वतः प्रयत्नशील आहोत. हे काम इंदापूर ते कशेळी घाट (लांबी ७७ किमी), कशेळी घाट ते संगमेश्वर (लांबी ९९ किमी), संगमेश्वर ते टाकेवाडी (लांबी १०७ किमी), टाकेवाडी ते झाराप (लांबी ८३ किमी) याप्रमाणे चार टप्प्यात आहे.
झाराप ते पत्रादेवी हे सुमारे २१ किमी रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर असून येत्या डिसेंबर २०११ पर्यंत हे पूर्ण होईल.

सिडकोतर्फे अर्बनहाट येथे मकरसंक्रांत मेळा

बेलापुर, ता. १२ - सिडकोतर्फे आठ जानेवारीपासून १७ जानेवारीपर्यंत मकर संक्रांत मेळ्याचे आयोजन अर्बन हाट सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथे करण्यात आले आहे. मकर संक्रांत मेळ्याचे मुख्य आकर्षण ठरलेल्या महाराष्ट्राच्या प्रसिद्ध पैठणी साड्यांबरोबरच तामिळनाडू, कर्नाटक आणि पश्चिम बंगालमधील रेशीम व कॉटनच्या साड्या, ड्रेस मटेरियल, ज्यूटच्या उत्पादनांबरोबरच हँडबॅग्ज, विविध कलाकुसरीच्या जरीकाम केलेल्या पर्स व विविध राज्यातील बचत गटांच्या दर्जेदार उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्री करण्यात येत आहे.
कलाकृतींच्या निर्मितीसह शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना हस्ताक्षर सुधारण्याच्या पद्धतींची प्रात्यक्षिके देखील आकर्षण ठरली आहेत. येथे फुड प्लाझामध्ये पंजाबी पाककृतींबरोबरच विविध राज्यांचे वैशिष्ट्य असलेले खाद्यपदार्थ तसेच ऑम्फिथिएटरमध्ये शनिवार व रविवारी सायंकाळी साडेसात ते नऊ दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे. मेळ्यातील स्टॉल्स आणि फुडप्लाझाच्या नोंदणीसाठी के. एस. व्ही. नायर, व्यवस्थापक- अर्बन हाट सिडको यांच्याशी दूरध्वनी क्रमांक ०२२ २७५६ १२८४, ९५९४५ २११६९ तसेच manager.urbanhaat@gmail येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मंगळवार, ११ जानेवारी, २०११

अमेरिकन महिला लोकप्रतिनिधी शिष्टमंडळ राजकीय व व्यावसायिक भेटीवर

मुंबई, ता. १०- अमेरिकेतील महिला लोक प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. यात मूळच्या भारतीय मात्र सध्या अमेरिकेतील आयोवा प्रांताच्या सिनेटर स्वाती दांडेकर यांचा समावेश होता.
अमेरिकन महिला लोकप्रतिनिधींच्या या शिष्टमंडळाने नागपूर येथे भुजबळ यांच्या रामटेक निवासस्थानी त्यांची भेट घेतली. यावेळी भुजबळ यांनी विविध विषयांवर चर्चा केली. महात्मा फुले यांनी भारतात सर्वप्रथम समतेचा लढा उभारताना अमेरिकेत अफ्रो-अमेरिकन बांधवांवर सुरू असलेल्या अत्याचारांचाही विरोध केला आणि त्यांच्या लढ्याला पाठिंबा देणारे ते पहिले आशियाई नागरिक होते, असे सांगताच शिष्टमंडळातील सदस्या भारावून गेल्या. भुजबळ यांनी भारतातील प्रकल्प मान्यतेची प्रक्रिया, प्राधान्यक्रम आणि सार्वजनिक-खासगी सहभागातून राज्यात सुरू असलेल्या प्रकल्पांच्या विषयी देखील तपशीलवार माहिती दिली.
नॉर्थ डकोटाचे सिनेट लीडर रॉबर्ट स्टेनजेम यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळात स्वाती दांडेकर यांच्यासह अमेरिकन नॅशनल फाऊंडेशन फॉर विमेन लेजिस्लेचर्स या संघटनेच्या अध्यक्ष जेनिटा वॉल्टन, संघटनेच्या उपसंचालक क्रिस्टल ऍडिक्सन, लुइझियाना प्रांताच्या नीता रुसीच हटर, सेंट कॅरोलिनाच्या जॉइस डिकन्सन, केंटुकी प्रांताच्या टीना वॉर्ड-प्युघ, नासा च्या विज्ञान व तंत्रज्ञान विभाग उपसंचालक क्रिस्टील जॉन्सन, अलायन्स फॉर युएस इंडिया बिझिनेस या संस्थेचे अध्यक्ष संजय पुरी आणि संचालक नेहा कारखानीस यांचा समावेश होता. हे शिष्टमंडळ अहमदाबाद येथे भेट देऊन नवी दिल्ली येथे देखील जाणार आहे.

सोमवार, १० जानेवारी, २०११

आली लहर...केला कहर!

सर्वत्र थंडी 'मी' म्हणत असून शीतलहरीचे लोणावळा परिसरातील हे विहंगम दृश्य. अती थंडीमुळे सूर्याने सुद्धा थंडीपासून बचाव करण्यासाठी धुक्याची ही चादर तर पांघरली नसेल नां...! (picture taken through mobile/cell  phone, by me) 

आणखी आठवडा थंडीची लाट राहणार..

मकरसंक्रांत येऊन ठेपली तरीही थंडी कमी होत नसून गेल्या महिन्यापासून थंडी आहे तशीच टिकून आहे. अनेक शहरांचे किमान तापमान पाच अंशांपर्यंत स्थिरावले आहे. राजधानी दिल्लीचे कमाल तापमान देखील अवघे बारा अंश सेल्सिअस खाली येऊन हिवाळ्यातील दिल्लीचे आजपर्यंतचे सर्व उच्चांक मोडित निघाले. मध्य प्रदेशासह काही राज्यांनी शाळांना पंधरा जानेवारीपर्यंत सुट्या घोषित केल्या आहेत. थंडीची ही लाट आणखी किमान आठवडाभर तरी कायम राहणार असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

गुरुवार, ६ जानेवारी, २०११

'क्षण' तोच...'पण' नवा...!!!

I myself exposed this photograph...

मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीस सिडकोने ५० हेक्टर जमीन त्वरीत द्यावी : उपमुख्यमंत्री

मुंबई, ता. ६ - मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीचा वाढता व्याप लक्षात घेऊन सिडकोने ठरलेल्या दरानुसार बाजार समितीस ५० हेक्टर जमीन त्वरित उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे दिले.
मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीच्या विविध प्रश्नांसंदर्भात मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात बैठक झाली, यावेळी ते बोलत होते. सहकार व पणन राज्यमंत्री प्रकाश सोळंके, आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह विविध विभागांचे सचिव, सिड को व बाजार समितीचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
श्री. पवार यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षात बाजार समितीच्या उलाढालीत चार पटींनी वाढ झाली आहे. तसेच खाद्यतेल, ऊस, केळी, गुरे, फुले आदींसाठी नवीन आवाराची उभारणी करावयाची आहे. शिवाय कोल्ड स्टोरेज, वेअरहाऊस सारख्या सुविधा उपलब्ध करून द्यावयाच्या आहेत. त्यासाठी बाजार समितीला अधिक जागेची आवश्यकता आहे. शेतकर्‍यांच्या हिताचा विचार करून सिडकोने ५० हेक्टर जमीन तातडीने उपलब्ध करून द्यावी. त्याचबरोबर शासकीय जागा उपलब्ध असल्यास मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव ठेवावा.
बाजार आवाराच्या विकासासाठी वाढीव एफएसआय संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून प्रश्न सोडविला जाईल. कमीत कमी जागेत जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने बाजार समितीने प्रयत्न करावेत. घनकचर्‍यापासून वीजनिर्मिती व कंपोस्ट युनिटला नवी मुंबई महापालिकेने परवानगी द्यावी अथवा बाजार आवारातील संपूर्ण कचरा नियमितपणे उचलावा.
गोरेगाव येथील आरे कॉलनीत महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळाने चार एकर जागेवर फुलबाजार प्रकल्पाची उभारणी केली आहे. बाजार समितीला फुलांच्या घाऊक बाजारपेठांच्या विकासासाठी जमिनीची आवश्यकता असल्याने हा प्रकल्प मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीला भाडे तत्वावर चालविण्यास देण्यासंदर्भात महामंडळाशी चर्चा करून आवश्यक ती कार्यवाही करून त्याबाबत प्रस्ताव सादर करावा.

पतसंस्थांमधील आर्थिक गुन्ह्यांप्रकरणी कठोर शिक्षा व्हावी- उपमुख्यमंत्री

मुंबई, ता.६- पतसंस्थांमधील आर्थिक गुन्ह्यांप्रकरणी कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टीने आयपीसीमध्ये बदल करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही त्वरित सुरू करावी. असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे दिले.
राज्यातील नागरी, ग्रामीण आणि बिगरशेती पतसंस्थांच्या विविध प्रश्नांसंदर्भात उपमुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. सहकार व पणन राज्यमंत्री प्रकाश सोळंके, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोकाटे आदींसह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
श्री. पवार म्हणाले, की पतसंस्थांमध्ये गैरव्यवहार करणार्‍यास कठोर शिक्षा व्हायला हवी. तरच गैरप्रकार करणार्‍यांना आळा बसेल. गेरव्यवहार करणारी कुठलीही व्यक्ती कायद्याच्या कचाट्यातून सुटता कामा नये. यासंदर्भातील गुन्हे त्वरित निकाली काढण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टच्या स्थापनेची कार्यवाही करावी. यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. त्याचबरोबर कर्जाच्या वसुलीसंदर्भातील अडचणी विचारात घेऊन संबंधित जिल्ह्याच्या पोलिस अधिक्षकांना आवश्यक त्या सहकार्याच्या सुचना दिल्या जातील.

रहमान यांनी लोकअपेक्षेचा विचार करणे आवश्यक

ए. आर. रहमान यांनी भविष्यकाळात देशहितासाठी कोणतेही गीत तयार करताना लोकअपेक्षेचा विचार करणे आवश्यक आहे.
मध्यंतरी झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धांच्या स्वागतम् हे रहमान यांचे गीत लोकांच्या अपेक्षा पूर्ण करून न शकल्यामुळे त्यांनी माफी मागितली होती. या गाण्यासाठी शासनास चक्क पाच कोटी रुपये मोजावे लागले होते(कोट्यवधींचा घोटाळा वेगळाच). आय एम् सॉरी म्हणून रहमान मोकळे झाले. वास्तविक घेतलेल्या पाच कोटिंपैकी चार कोटी अथवा काही कोटींची रक्कम तरी त्यांनी शासनास परत करणे आवश्यक होते. परंतु तसे झाले नाही. शासनाने देखील भविष्यकाळात ही बाब ध्यानात ठेवणे आवश्यक आहे.

रस्ते सुरक्षा अभियानानिमित्त मंत्रालयात शुक्रवारी वैद्यकीय शिबीर

मुंबई, ता. ६ रस्ते सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने शुक्रवारी (ता. ७) सकाळी दहाला मंत्रालयात वाहनचालकांसाठी वैद्यकीय शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
जानेवारी महिन्याच्या पहिल्या सप्ताहात साजरा करण्यात येणार्‍या रस्ते सुरक्षा अभियानानिमित्त मंत्रालयात वाहनचालकांसाठी दरवर्षी वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येते. यंदाही मंत्रालय आवारात वाहनगृह क्र. १ ८ ते २५ येथे उद्या सात जानेवारीला सकाळी दहा ते सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत वाहनचालकांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त वाहनचालकांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दक्षिण उपविभागतर्फे करण्यात आले आहे.

थंडीने गारठला मध्य प्रदेश- शाळांना सुट्या जाहीर

मध्यप्रदेशात शीतलहर कायम असून मालवा प्रांताच्या अनेक भागात दव गोठून बर्फ तयार झाले आहे. पचमढी येथे अवघे १ अंश सेल्सिअस तापमान असून काही ठिकाणी शून्य अंश तापमान आहे. शासनाने मध्य प्रदेशातील शाळांना दहा दिवसांच्या सुट्या जाहीर केल्या आहेत.
शाजापूर येथे बुधवारी (ता. ५) पारा घसरून अवघ्या १.५ अंश सेल्सिअस तर नौगाव येथे १.७, शिवपुरी १.५, दमोह १.२, पचमढी १.०, टीकमगड ०.६, मंडला ०.६, दतिया आणि उमरिया अनुक्रमे शून्य अंश, उज्जेन, बैतुल येथे अनुक्रमे २.२ भोपाळ २.३, इंदूर ५.०, सागर ४.०, देवास ६.४, मंदसोर ३.६, नीमच ३.५, रतलाम ३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. धुक्यामुळे रेल्वे विलंबाने धावत असून हवाई वाहतुकीवर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे. प्रदेशात थंडीने कहर केला असून थंडीची लाट आल्यामुळे मध्य प्रदेश शासनाने प्रदेशातील शासकीय व खासगी शाळांच्या इ. आठवीपर्यंतच्या वर्गांना आजपासून (ता. ६) १५ जानेवारीपर्यंत सुट्या जाहीर केल्या आहेत.

विमानतळ प्रकल्पग्रस्तांना १२.५ टक्के भूखंडांच्या वाटपाकरिता सिडकोची विशेष मोहिम

मुंबई, ता. ६- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या अंतर्गत येणार्‍या गावातील प्रकल्पग्रस्तांच्या संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदल्यात द्यावयाच्या साडेबारा टक्के योजनेचे भूखंड वाटपाकरिता भूमी व भूमापन विभागातर्फे विशेष मोहिम सुरू करण्यात आली आहे.
२२ डिसेंबरला प्रकल्प बाधीत कृती समितीच्या बैठकीत ही विशेष मोहिम प्राधान्याने राबवून वाटपाची प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्याबाबतचा निर्णय व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे यांनी जाहीर केला होता. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ क्षेत्रात येणार्‍या कोंबडभुजे, तरघर, उलवे, गणेशपुरी, वाघीवली वाडा, ओवळे (मुळगाव) कोली, कोपर, चिंचपाडा आणि वाघीवली या दहा गावांमधील पूर्वी संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदल्यात १२.५ टक्के भूखंड वाटप केलेले नाही अशा प्रकल्पग्रस्तांसाठी या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी तीन स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली असून त्यात तीन सहाय्यक भूमी व भूमापन अधिकारी आणि १० कर्मचार्‍यांचा समावेश करण्यात आला आहे. बैठकीनंतर सुरू केलेल्या कार्यवाहीत आतापर्यंत १०० प्रकरणांची प्रक्रिया सुरू केली असून ३० प्रकरणात वाटपपत्रेही देण्यात आली आहेत. तर करंजाडे, वडघर आणि चिंचपाडा येथील १४० भागधारकांना इरादापत्र देण्यात आले आहे.
या मोहिमे अंतर्गत द्यावयाची इरादापत्रे व पाटपपत्रे व भाडेपट्टा करारनाम्याच्या अनुषंगाने प्रकल्पग्रस्तांनी त्यांची आवश्यक कागदपत्रे व वारसदाखले मुख्य भूमी व भूमापन अधिकारी, सिडको भवन, भूमी व भूमापन विभाग, सातवा मजला सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथे त्वरित सादर करून विशेष मोहिम जलदगतीने राबविण्यास सहकार्य करावे, असे आवाहन सिडको प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

बुधवार, ५ जानेवारी, २०११

बारामती येथे प्रायोगिक तत्वावर बहुमजली औद्योगिक संकुल उभारावे -उपमुख्यमंत्री

मुंबई, ता. ५- बारामती येथे प्रायोगिक तत्वावर बहुमजली औद्योगिक संकुल (फ्लॅटेड इंडस्ट्रियल इस्टेट) उभारावे आणि ते गरजू लघुउद्योजकांना देण्यात यावे असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे दिले.
बारामती चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत मंत्रालयात झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. उद्योग राज्यमंत्री सचिन अहिर, उद्योग विभागाचे प्रधान सचिव ए. एम. खान, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव सुब्रत रथो, महावितरण कंपनीचे कार्यकारी संचालक अजय मेहता, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. शिवाजी, बारामती चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष धनंजय जामदार आदी उपस्थित होते.
बारामती औद्योगिक क्षेत्रातील विविध प्रश्नांचा आढावा घेताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, पुणे आणि नाशिकच्या धर्तीवर बहुमजली औद्योगिक संकुल असावे. त्यामुळे अनेक लघुउद्योजकांना तयार गाळे मिळतील. याबाबत त्वरित कार्यवाही सुरू करावी. तसेच एमआयडीसीने उद्योजकांना एकोणीस प्रकारच्या सेवा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिल्या असून या सेवांना मिळणार्‍या प्रतिसादाचा अभ्यास करावा.
बारामती औद्योगिक क्षेत्र शहर आणि ग्रामीण भागात विभागले आहे. या क्षेत्रासाठी स्वतंत्र पोलिस ठाणे स्थापन करण्याची मागणी आहे. त्याऐवजी संपूर्ण औद्योगिक क्षेत्र बारामती ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत समाविष्ट करावे.
पियाजिओ, डायनामिक्स, भारत फोर्ज, आयएसएमटी आदी कंपन्यांमधील कामे प्राधान्याने स्थानिक लघुउद्योजकांनाच मिळावी यासाठी आपण कंपन्यांच्या व्यवस्थापनास तसे पत्र लिहिणार आहोत. सौर उर्जेवर रस्त्यांवरील दिवाबत्तीची व्यवस्था करणे शक्य आहे का? याचाही अभ्यास करावा.
बारामती चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे पदाधिकारी सर्वश्री संदीप मेणसे, भारत जाधव, पोपटराव गवळे, महादेव गायकवाड, आशिष पल्लोड, शरद सूर्यवंशी, शिवाजी निंबाळकर, रमणिक थोरात, गिरिष कुलकर्णी आदी उपस्थित होते.

एकलहरे प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा प्रश्न तातडीने मार्गी लावू- उपमुख्यमंत्री

मुंबई, ता. ४- एकलहरे विद्युत प्रकल्पग्रस्तांना प्रकल्पग्रस्त दाखले उपलब्ध करण्याबरोबरच त्यांना किंवा त्यांच्या वारसांना प्रशिक्षण देऊन विद्युत वितरण कंपनी अंतर्गत नोकरीत थेट सामावून घेण्याबाबत योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार समीर भुजबळ यांना दिले. विद्युत प्रकल्पाच्या विविध मागण्यांबाबत पवार यांच्या समिती कक्षात झालेल्या बैठकीत त्यांनी सांगितले.
औष्णिक वीज प्रकल्पाच्या फ्लायअ‍ॅशमधील काही हिस्सा स्थानिक तसेच प्रकल्पबाधित व्यावसायिकांना उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी बैठकीस उपस्थित असलेल्या अधिकार्‍यांना दिले. जमीन हस्तांतरणाची कार्यवाही तत्काळ पूर्ण करून एकलहरे परिसरातील झोपडपट्टीवासियांच्या पुनर्वसनाचा प्रश्नही मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच एकलहरे येथील दोन जुने संच आवसायनात काढून ६६० मेगावॉटचा एकच प्रकल्प उभारण्यात यावा, या मागणीचा पुढील टप्प्यात विचार करण्यात येईल असे ते म्हणाले.

नाशिकमधील विकासकामांबाबत स्वतंत्र बैठकीचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

मुंबई, ता. ४- नाशिकमधील विविध विकासकामे तसेच पायाभूत सुविधा विकासाच्या संदर्भात तत्काळ स्वतंत्र बैठक घेऊन सर्व संबंधित प्रश्न मार्गी लावण्यात येतील असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी खासदार समीर भुजबळ यांना दिले.
नाशिक शहराशी संबंधित विविध विकासकामांबाबत समीर भुजबळ यांनी आज मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांची मंत्रालयात भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना उपरोक्त आश्वासन दिले. खासदार भुजबळ यांनी यावेळी नाशिक महानगरपालिकेच्या अखत्यारितील काही प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले.
निवेदनातील काही प्रमुख मागण्या अशा- १) नाशिक महानगरपालिकेच्या सेवेत पेस्ट कंट्रोलचे काम ठेकेदारी पद्धतीने करणार्‍या कर्मचार्‍यांना सेवेत सामावून घेण्याची कार्यवाही तत्काळ करण्यात यावी. २) नाशिक महापालिका हद्दीत शासनामार्फत कार्यरत असलेल्या अंगणवाड्यांमधील मुख्य सेविका, अंगणवाडी मदतनीस, अंशकालिन शिक्षिका आदी कर्मचार्‍यांना महापालिका सेवेत सामावून त्यांची निश्चित वेतनश्रेणी लागू करावी. त्यासंदर्भातील कर्मचारी आकृतीबंधास शासन स्तरावर तातडीने मान्यता मिळावी. ३) सन २००३ पासून महापालिकेत रोजंदारीने कार्यरत असलेल्या सुमारे बाराशे कर्मचार्‍यांना सेवेत कायम करण्यात आले आहे. परंतु प्रशासनाकडून चुकीने नामोल्लेख राहून गेलेल्या चार कर्मचार्‍यांना देखील सेवेत कायम करण्याचा निर्णय शासनाने तातडीने घ्यावा. इ.

पंढरपूर शहराच्या विकासाचा आराखडा त्वरीत तयार करावा: उपमुख्यमंत्री

मुंबई येथे मंत्रालयात पंढरपूर शहराच्या विकास कामांच्या आढावा बैठकीत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार, सोलापूरचे पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे, आमदार भारत भालके आदी.
मुंबई, ता. ४- पंढरपूर शहराच्या दहा किलोमीटर परिसराचा विकास आराखडा त्वरीत तयार करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
पंढरपूर शहराच्या विकास आराखड्यासंदर्भात मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, आमदार भारत भालके, माजी आमदार सुधाकर परिचारक आदींसह पंढरपूरचे नगराध्यक्ष उपस्थित होते.
श्री. पवार यांनी पंढरपूर विकास प्राधिकरण, नगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाशी संबंधित बाबींचा आढावा यावेळी घेतला. पंढरपूरच्या विकासासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल. विकास कामे करताना शासनाच्या विविध विभाग आणि यंत्रणांमध्ये समन्वय राखावा. कामे दर्जेदार होण्याच्या दृष्टीने सर्व उपाययोजना कराव्यात. विभागीय आयुक्त सर्व कामांवर देखरेख करतील आदी सूचना दिल्या.
शहरातील रस्ते, नगरपालिकेच्या महागाई भत्ता, अनुदान, यात्रा अनुदान, स्टॉर्म वॉटर ड्रेन, राज्य सरोवर संवर्धन योजना, यात्राकर आदींबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हा स्तरावरही त्वरित बैठक घेण्याचे आदेश देखील पवार यांनी पुणे विभागीय आयुक्तांना दिले.

मंगळवार, ४ जानेवारी, २०११

अपघातग्रस्तांना मदत करणार्‍यांना अजिबात त्रास न होण्याची तरतूद आवश्यक

अपघातग्रस्तांना मदत करणार्‍या सभ्य नागरिकांना त्रास कमीत कमी होईल याबाबत कायदे करण्याचे विचाराधीन असल्याचे नुकतेच राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सांगितले. परंतु त्रास कमी होण्याऐवजी त्रास अजिबात न होणे यासाठी तरतूद होणे आवश्यक आहे.
कोणत्याही सभ्य नागरिकाने रस्त्यावर एखादा अपघात पाहिल्यास, एखादा गुन्हा घडताना पाहिल्यास संबंधितास सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून मदत केली जाते, गुन्हेगारास पोलिसांच्या सुपूर्द केले जाते. परंतु याचा चांगला परिणाम होण्याऐवजी अशा नागरिकांना त्रासच जास्त होतो. अत्यंत जाचक असे प्रश्न विचारणे, जखमी अथवा अपघातग्रस्तास रुग्णालयात दाखल करताना प्रथम पोलिस तक्रारीबाबत रुग्णालय प्रशासनाने विचारणा करणे अन्यथा संबंधितास दाखल न करणे, एखाद्या घटनेतील साक्षीदारास पोलिसांनी ती व्यक्तीच घटनेस जबाबदार असल्याप्रमाणे त्या व्यक्तीवर प्रश्नांची सरबत्ती, भडिमार करणे या बाबी सामोर्‍या आल्या आहेत. फलस्वरूप मदत करणार्‍यांचे प्रमाण हळूहळू कमी होत आहे. रस्त्यावर विशेषतः महामार्गावर अपघात झाल्याचे आणि जखमी विव्हळत असल्याचे दिसत असताना देखील उगाच कायद्याचा ससेमिरा नको...म्हणून अनेकदा वाहनचालक पुढे निघून जातात. राज्याच्या गृहमंत्र्यांचा निर्णय स्वागतार्ह असला तरीही कौतुकास्पद निश्चितच नाही. अपघातग्रस्तांना मदत करणार्‍यांना कायदेशीर कारवाईचा त्रास अजिबात न होण्याची तरतूद कायद्यात केल्यास शासनाचा देखील संभाव्य त्रास कमी होईल, हाच विश्वास.

अवघी अवनी गारठली थंडीने

गेल्या आठवड्यात देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये थंडीने अक्षरशः कहर केला असून जणू काही पृथ्वीच गारठली असल्यासारखे वाटत आहे. मध्य प्रदेशात नुकतेच उज्जेन येथे ५ अंश सेल्सिअस तर इंदूर येथे ६ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. काही ठिकाणी थंडीमुळे गारठून मृत्यूमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत.
अनेक जण अंगावर थंडीपासून बचाव करणारे स्वेटर आदी कपडे चोवीस तास परिधान करीत आहेत. मध्यप्रदेशातील इंदूर येथे एक जानेवारीपासून हेलमेटची सक्ती करण्यात आली असून अद्याप हेलमेट वापरणार्‍या दुचाकीधारकांची संख्या अल्प असली, तरीही ती वाढत आहे. हेलमेटमुळे चेहेर्‍याचा थंडीपासून चांगला बचाव होऊन डोळे, कानांना गार हवा लागत नसल्याने हेलमेट विक्रीच्या दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी दिसत आहे. सकाळी चहा, पोहे, जिलबी, वडे अर्थातच स्नॅक्स घेण्यात नागरिक स्वारस्य देत आहेत. काही भागात संक्रांतीपर्यंत सकाळच्या शाळांची वेळ देखील सकाळी नऊनंतर करण्यात आली आहे.

सोमवार, ३ जानेवारी, २०११

नव्या दशकाच्या दहा "द.." चा दम!


'गेलेला काळ आणि वेळ पुन्हा येत नसते' असे म्हणतात, म्हणून 'मिळेल त्या संधीचे सोने करावे' असा सल्ला वडिलधारे देतात. दहा वर्षाचा काळ देखील थोडा-थोडका नसतो. माणसाने त्याच्या आयुष्यातले वाईट दिवस विसरावे मात्र गतकाळ विसरू नये. "कालाय तस्मै नमः" प्रमाणे येणार्‍या काळाला, उगवत्या सूर्याला नमस्कार करावा. नुकत्याच पूर्ण झालेल्या दशकाल्या कळत-नकळत झालेल्या चुका पुन्हा होऊ नये या अपेक्षेने नव्या जोमाने, उमेदीने कामाला सुरवात करावी...

नव्या दशकात शासनासह समाजातल्या सगळ्याच घटकांकडून या १० "द" च्या अपेक्षा:
            दहशतवाद निर्मूलन: आज भारतासह सगळ्या जगासमोर प्रमुख मुद्दा बनलेले संकट दहशतवाद हे आहे. काही देश आपल्या सीमेलगत असलेल्या देशांची जमीन बळकावण्यासाठी तर काही देश दुसर्‍या देशात हिंसाचार वाढवण्यासाठी दहशतवादी तयार करत आहेत, येन केन प्रकारेण त्यांना मदत करून दहशतवादास खतपाणी घालत
आहेत. सध्या भारतावर तिसरी महाशक्ती म्हणून पाहिले जात आहे. आजमितीस देश संरक्षण क्षेत्रात सुद्धा बर्‍यापैकी विकसित झाला असून जमीन, पाणी आणि अंतराळ अशा तीनही ठिकाणी वापरता येणारी क्षेपणास्त्रे विकसित करण्यात भारताला यश मिळाले आहे. इतकेच नव्हे, तर मानवरहित टेहळणी विमान देखील भारत आता बनवू शकतो. परंतू इतका सगळा साठा, सज्जता, परिपूर्णता असूनही देशावर दहशतवादाचे संकट आहे. देशाच्या महानगरांइतकेच महत्वाच्या शहरांवर आता अतिरेकी आपले लक्ष्य केंद्रित करीत आहेत. अतिरेक्यांच्या या नापाक कृत्त्याला शेजारी राष्ट्र चिथावणी देत आहे ही बाब जगजाहीर आहे. परंतु सध्या महासत्ता असलेले देश भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांना
व्यवस्थित कुरवाळत असून जखमांवर मीठ चोळण्यात यशस्वी होत असल्याचेच अभ्यासाअंती जाणवते. दहशतवाद्यांनी थेट संसदेवर आणि मध्यंतरी मुंबईवर हल्ला करून देशाच्या सुरक्षेलाच आव्हान दिले आहे. परंतु राजकीय निर्णय प्रक्रियेमुळे सुरक्षा यंत्रणा काहीही करण्यात हतबल झाल्या आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासारख्या महनीयांच्या या देशात शांतता प्रस्थापित होण्याऐवजी दिवसेंदिवस हिंसेचा आलेख वाढत असल्याचे दृश्य असून खर्‍या अर्थाने देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी दहशतवाद निर्मूलन ही काळाची गरज ठरली आहे.

दारिद्र्य निर्मूलन: देशातील दारिद्र्य रेषेखालील नागरिकांची संख्या कमी करायचे वास्तविकतः सरकारचे धोरण आहे, नव्हे योजना आहे. परंतु सातत्याने वाढणार्‍या महागाईमुळे दारिद्र्य रेषा उंचावते आहे. वाढत्या महागाईचा परिणाम श्रीमंतांवर आणि बड्या मंडळींवर अजिबात होत नाही. शासकीय कर्मचार्‍यांना देखील दरवर्षी बोनससह आयोगाच्या शिफारसींनुसार गलेलठ्ठ वेतन मिळत असल्यामुळे त्यांच्यावरही याचा फारसा परिणाम होत नाही. झळ बसते ती केवळ मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय, काही अंशी खासगी क्षेत्रात नोकरी करणार्‍या घटकांना आणि सर्वसामान्य नागरिकांनाच...! नुकतेच लोकप्रतिनिधी आमदार-खासदारांचे वेतन देखील वाढले आहे. यामुळे शासनाच्या तिजोरीवर
कोट्यवधींचा बोजा पडणार आहे. शासनास प्रचंड महसूल देऊ शकणार्‍या वीज कंपनीला सुद्धा भारनियमन आणि मोफत वीज, चुकवेगिरी यामुळे नुकसान होऊन परिणती वीज दरवाढीत झाली आहे. हा सर्व पैसा शासन सामान्य नागरिकांकडूनच कर रुपात वसुल करते. तुटपुंज्या वेतनात मध्यमवर्गीय, सर्वसामान्यांना इतकी देणी देणे शक्य नसल्यामुळे त्यांचा आर्थिक दर्जा घसरून दारिद्र्य रेषा उंचावत आहे. शासनाने विविध प्रकारचे लादण्यात आलेले कर कमी करून सामान्यांना दिलासा देणे व तुलनेने दारिद्र्य निर्मूलन करणे गरजेचे आहे.

दौर्बल्यमुक्ती: दौर्बल्य अर्थातच दुबळेपणा...एखाद्या विषयावर पक्का, योग्य निर्णय घेऊ न शकणार्‍या विशेषतः युवकांना याची गरज आहे. इंटरव्ह्यू ला जाताना तयारी करून गेल्यानंतर देखील अनेकदा प्रत्यक्ष उत्तर/उत्तरे देऊ न शकणार्‍या युवकांना पालक, शिक्षकांनी मानसिकरित्या उत्तम तयार करणे व आत्मविश्वास वाढविण्याची गरज आहे. सध्याचा काळ हा प्रचंड धावपळीचा आहे, नोकरी करेन, तर अमुक एक नोकरीच करेन..अमुक-अमुक पदाचीच नोकरी करेन..। असे म्हणण्याचा काळ आता जवळपास संपुष्टात आला आहे. येत्या दशकात स्पर्धा वाढणार असून परिणामी मिळेल ते काम आणि मिळेल ती नोकरी करून मिळतील तितके पैसे (शक्यतो जास्त पगार) पदरात पाडून घेण्याची ही वेळ आहे.
अपेक्षानुरूप नोकरी अथवा काम न मिळाल्यास हिरमोड होऊ न देता दुसर्‍या नोकरी, उद्योग-व्यवसायाच्या शोधार्थ जाण्याचीच ही वेळ आहे.

दरडोई उत्पन्नवाढ: शासनाने दरडोई उत्पन्नवाढ चांगल्या प्रकारे होऊन प्रत्येक नागरीक किमान कुटुंबापुरते तरी अर्थार्जन करू शकेल इतकी व्यवस्था करणे आवश्यक आहे.

दंडूकेशाही: लोकशाही असलेल्या या देशात आजही दंडूकेशाहीचा वापर राजरोसपणे सुरू आहे. समाजाला घडविण्यात, दिशा देण्यात, शासन आणि समाज, नागरीक यांना जोडणारा मधला दुवा मानल्या जाणार्‍या मीडिया अर्थातच वृत्तपत्र क्षेत्रास दंडूकेशाहीचा अनुभव मोठ्या प्रमाणात येत आहे. आपले मत, मते परखड, निर्भिडपणे मांडण्याचे स्वातंत्र्य..हा विषय हळुहळू बंद होत असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. सद्य स्थितीत राजकारणी मंडळी देखील वृत्तपत्र क्षेत्रात प्रवेश करीत असून परिणामी काही वृत्तपत्रं मुखपत्र बनली आहेत. दंडूकेशाहीची झळ सर्वाधिक वृत्तपत्र क्षेत्राचा कणा असलेल्या बातमीदार, पत्रकार, प्रतिनिधी या घटकाला बसते. गावपातळीवर एखाद्या दैनिकात संबंधित वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर दंडूकेशाहीचा वापर आजही होत आहे. आगामी दशकात शासनाने याबाबत आचारसंहिता, कायदा अस्तित्वात आणण्याची गरज आहे.

दायित्व: समाज आणि शासन या दोन्ही घटकांचे एकमेकांविषयी दायित्व, जबाबदारी असून कोणीही आपले दायित्व विसरू नये. येत्या दहा वर्षात राजकारणी, राजकीय पक्ष प्रबळ होतील. नवीन राजकारणी, राजकीय पक्ष जन्माला येतील. केवळ स्वार्थासाठी कार्य न करता समाजातील प्रत्येक घटकाने आपले दायित्व ओळखून एक नागरीक या भावनेने कार्य केल्यास भारत प्रथम क्रमांकाची महासत्ता म्हणून निश्चितच ओळखला जाईल.

देशभक्ती: कोणतेही जाती-पातीचे राजकारण न करता केवळ समाजकारणासाठी राजकारण करून प्रत्येकात असलेली देशभक्ती जोपासल्यास सर्व-धर्म-सम-भाव संकल्पना सार्थ ठरेल. भारतात स्थायिक झालेल्या परंतू मूळ दुसर्‍या देशाचे नागरीक असलेल्या नागरिकांनी देखील आपण आता भारत देशाचेच नागरीक असून देशाशी एकनिष्ठ राहण्याची देशभक्ती अंगी बाळगल्यास खर्‍या अर्थाने धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून जग भारताकडे बघेल आणि देशाच्या यशाच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला जाईल यात शंका नाही.

दूरदृष्टी: मुख्यत्वे प्रशासनाने दशकासह अर्थातच दहा वर्षांसह पुढील पाच दशकांची गरज ओळखून प्रकल्प राबविल्यास पुन्हा एकदा सोन्याचा धूर निघेल.

दंडसंहिता बदल: दिवसेंदिवस लोकभावना, मते-मतांतरे, दृष्टीकोन, जनादर, हित-अहित, संधी-स्वार्थ अशा विविध गोष्टींमध्ये कालानुरूप बदल होत आहे. इतिहास पाहिल्यास दर दहा वर्षांनी काही ना काही बदल आणि गरजा मोठ्या
प्रमाणावर झाले असल्याचे लक्षात येते. परिणामी पूर्वीचे नियम, आचारसंहिता, घटना यात बदल करणे आवश्यक होत आहे. काही बाबतीत नियम कडक करण्याची देखील गरज आहे.

दरवाढ नियंत्रण: वारंवार केल्या जाणार्‍या विविध वस्तूंवरील कर तसेच जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढीवर नियंत्रण करणे ही आज सामान्यातीसामान्य नागरिकाची गरज ठरली आहे. परिणामी शासनाच्या तिजोरीवर याचा भार पडून चुकवेगिरीचे प्रमाण बोकाळले आहे. समान दर आणि कर लागू केल्यास आगामी दशकात शासन आवश्यक तितका निधी जनयोजनांसाठी सहज प्रदान करू शकेल.

नव्या आशा-अपेक्षांचे स्वागत..

लेखणी च्या सर्व वाचक, हितचिंतकांना नवीन वर्षाच्या अनंत शुभेच्छा! आपणां सर्वांच्याच सहकार्य आणि सूचनांमुळे आजपर्यंत लेखणीचे लिखाण अविरत सुरू आहे. हा प्रवास आणखी असाच किंबहुना यापेक्षाही चांगला सुरू रहावा असे वाटते.
आपण लेखणी कडून असलेल्या आपल्या अपेक्षा कळवाव्या, म्हणजे आणखी सुधारणा करता येईल.
आपल्या मित्रमंडळींना देखील लेखणी ची लिंक देऊन लेखणी ब्लॉग वाचावयास सांगावा, ही विनंती-प्रार्थना.

कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप

(पनवेल):  राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...