महानगरपालिका निवडणुका लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
महानगरपालिका निवडणुका लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १३ एप्रिल, २०१२

भिवंडी-निजामपूर, मालेगाव, चंद्रपूर, परभणी, लातूर महानगरपालिका मतदानासाठी यंत्रणा सज्ज

मुंबई, ता. १३, - भिवंडी-निजामपूर, मालेगाव, चंद्रपूर, परभणी, लातूर महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका मतदानासाठी यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी आज दिली. येत्या १५ एप्रिलला या महानगरपालिकांसाठी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होणार आहे.

श्रीमती सत्यनारायण यांनी सांगितले, की एकूण ३७१ जागांसाठी २ हजार ४०२ उमेदवार आपले नशीब अजमावणार आहेत. १ हजार ८५३ मतदान केंद्रांवर एकूण १५ लाख १८ हजार १७३ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यात ८ लाख ४५ हजार ८७८ पुरुष तर ६ लाख ७२ हजार २९५ महिला मतदार हक्क बजावणार आहेत. यासाठी २ हजार ४५० मतदान यंत्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. ९१० अतिरिक्त मतदान यंत्रांची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. ४३० संवेदनशील तर ७ अतिसंवेदनशील मतदानकेंद्रे आहेत. सर्व सातही संवेदनशील मतदानकेंद्रे परभणी येथील आहेत. सर्वाधिक २२४ मतदानकेंद्रे भिवंडी-निजामपूर येथे आहेत. अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

मतदारांनी अधिकाधिक संख्येने आणि निर्भयपणे आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन श्रीमती सत्यनारायण यांनी केले आहे.
महानगरपालिकानिहाय तपशील-
मालेगाव- जागा ८०, उमेदवार ४७१, मतदान केंद्रे ४६७, संवेदनशील मतदान केंद्रे १४४, मतदार संख्या ३, ६७, ३७४.
लातूर- जागा ७०, उमेदवार ४१८, मतदान केंद्रे ३०८, संवेदनशील मतदान केंद्रे ०, मतदार  संख्या २, ५१, २१०.
चंद्रपूर- जागा ६६, उमेदवार ४५८, मतदान केंद्रे २९९, संवेदनशील मतदान केंद्रे २१, मतदार संख्या २, ३६, ९९५.
परभणी- जागा ६५, उमेदवार ४२३, मतदान केंद्रे २६६, संवेदनशील मतदान केंद्रे ४१, मतदार संख्या २, ०३, ४४९.
एकूण- एकूण जागा ३७१, उमेदवार २, ४०२, मतदान केंद्रे १, ८५३, संवेदनशील मतदान केंद्रे ४३०, मतदार संख्या १५, १८, १७३.

गुरुवार, १६ फेब्रुवारी, २०१२

दहा महानगरपालिकांसाठी प्राथमिका अंदाजानुसार ५४ टक्के मतदान

मुंबई, ता. १६ : बृहन्मुंबई, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला आणि नागपूर या दहा महानगरपालिकांसाठी आज सुमारे ५४ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून किरकोळ प्रकार वगळता मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत व सुरळीत पार पडली अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली आहे. सकाळी साडेसातला मतदानाससुरवात झाली. ठाणे, नागपूर आणि अकोला येथे सकाळपासून मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता. राज्य निवडणूक आयुक्त यांनी स्वतः मतदान केल्यानंतर काही मतदान केंद्राची पाहणी केली.  
दहा महानगरपालिकांच्या निवडणुकांची प्रक्रिया शांततेत आणि सुरळीतपणे पार पाडण्यासाठी योगदान देणारे सर्व मतदार, अधिकारी, कर्मचारी, पोलिस आणि प्रसार माध्यमांचे श्रीमती सत्यनारायण यांनी आभार मानले आहेत.  
प्राथमिक अंदाजानुसार महानगरपालिकानिहाय मतदानाचे प्रमाण असे- बृहन्मुंबई- ४६, ठाणे- ५२, उल्हासनगर- ४३, नाशिक- ५८, पुणे-५३, पिंपरी-चिंचवड- ५६, सोलापूर-५८, अमरावती- ५८, अकोला- ५७, नागपूर- ५५, एकूण- ५४.

सोमवार, १३ फेब्रुवारी, २०१२

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१२ - महिला उमेदवारांसाठी केवळ अडीच हजार रुपये अनामत रक्कम

मुंबई, ता. १३ - महानगरपालिका निवडणुकीतील महिला उमेदवारांना नियमाप्रमाणे केवळ अडीच हजार रुपयेच अनामत रक्कम म्हणून जमा करणे आवश्यक असते, असे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी केले आहे.

महानगरपालिका निवडणुकीसाठी महिला उमेदवारांना केवळ अडीच हजार रुपयेच अनामत रक्कम भरणे आवश्यक असताना काही ठिकाणी पाच हजार रुपये अनामत रक्कम म्हणून घेण्यात आली आहे. यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यामुळे हे स्पष्टीकरण करण्यात आले. त्यानुसार ज्या महिला उमेदवारांकडून पाच हजार रुपये अनामत रक्कम घेण्यात आली आहे त्यांना अडीच हजार रुपये तात्त्काळ परत करण्यात यावेत. तसेच यापुढे होणार्‍या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये नियमातील तरतुदीनुसारच अनामत रक्कम घेतली जाईल, याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना देण्याबाबत सर्व महानगरपालिका आयुक्तांना कळविण्यात आले आहे.

महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर जाहीर प्रचार करता येत नाही. परंतु घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर बंदी नाही. याचबरोबर प्रचार समाप्तीनंतर किंवा मतदानाच्या दिवशी केवळ वृत्तपत्रांमध्ये जाहिराती प्रसिद्ध करण्यासही हरकत नसल्याचे राज्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

शनिवार, २१ जानेवारी, २०१२

राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त मतदार जागृती अभियान - नीला सत्यनारायण

मुंबई, ता. 21 - महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका लक्षात घेऊन 25 जानेवारी या राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त सप्ताहभर मतदार जागृती अभियान राबवावे, असा सूचना राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी महानगरपालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

या निवडणुकीत पैसे किंवा दारूचा वापर होऊ नये यासाठी महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांच्या दक्षता समित्यांच्या मदतीने या अभियानाच्या माध्यमातून जनजागृती करायची आहे. तसेच राज्य निवडणूक आयोगाने मतदार जागृतीसाठी तयार केलेल्या सीडींमध्ये आवश्यक ते बदल करून या सीडी स्थानिक केबल टीव्हीवरून प्रसारित कराव्यात आणि इतर माध्यमांद्वारेही या अभियानाची व्यापक प्रसिद्धी करावी. त्याचबरोबर मतदारांना आवाहन करणारे फलकही लावण्यात यावेत, अशा सूचना देखील श्रीमती सत्यनारायण यांनी दिल्या आहेत.

विविध प्रलोभनांचा वापर करून सर्रासपणे मतदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न काही उमेदवार किंवा राजकीय पक्षांकडून करण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी राज्य निवडणूक आयोगाकडे येत आहेत. ते टाळण्यासाठी आणि या निवडणुका निर्भय आणि मुक्त वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने या अभियानाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत एक सकारात्मक संदेश पोहोचवावा, असे आवाहनही श्रीमती सत्यनारायण यांनी केले आहे.

बुधवार, ४ जानेवारी, २०१२

आचारसंहितेसंदर्भात तक्रारी महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांकडे कराव्यात- निवडणूक आयोग

मुंबई, ता. 4 - आचारसंहिता संदर्भातील तक्रारी संबंधित महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर कराव्यात, असे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी केले आहे.

राज्यातील 10 महानगरपालिका, 27 जिल्हा परिषदा आणि 309 पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या घोषणेनंतर संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेचा भंग होत असल्याबाबत अनेक तक्रारी राज्य निवडणूक आयुक्तांकडे आणि आयोगाच्या कार्यालयाकडे करण्यात येत आहेत. त्याऐवजी महानगरपालिका निवडणुकीच्या आचारसंहितेसंदर्भातील तक्रारी असल्यास त्या संबंधित महानगरपालिका आयुक्तांकडे सादर कराव्यात, तसेच जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या निवडणुकीच्या आचारसंहितेसंदर्भातील तक्रारी असल्यास त्या संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे द्याव्यात, असेही श्रीमती नीला सत्यनारायण यांनी आवाहन केले आहे.

मंगळवार, ३ जानेवारी, २०१२

दहा महानगरपालिका- 16 फेब्रुवारी; जिल्हापरिषदा, पं.स.- 7 फेब्रुवारीला मतदानः आचारसंहिता लागू

मुंबई, ता. 3 - बृहन्मुंबईसह दहा महानगरपालिका तसेच 27 जिल्हापरिषदा आणि 309 पंचायत समित्यांचा सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रम राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी आज येथे जाहीर केला. यानुसार महानगरपालिकांसाठी 16 फेब्रुवारी 2012 ला मतदान होईल. तर, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी 7 फेब्रुवारीला मतदान होईल. यासर्व ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.

येथील सचिवालय जिमखान्यात झालेल्या पत्रकार परिषदेत श्रीमती सत्यनारायण यांनी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. राज्य निवडणूक आयोगाचे अप्पर मुख्य सचिव चाँद गोयल उपस्थित होते. यावेळी श्रीमती सत्यनारायण म्हणाल्या की, आम्ही महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी 2012 आणि इ. दहावीची परीक्षा 1 मार्चपासून सुरू होत आहे. परीक्षांचा कालावधी लक्षात घेऊन निवडणुकांचा कार्यक्रम आखण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही आणि निवडणुका वेळेवर घेण्याची जबाबदारी देखील व्यवस्थित पार पाडेल.
महानगरपालिका निवडणूक कार्यक्रम

महानगरपालिका निवडणुकीसाठी 24 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधीत नामनिर्देशनपत्रे दिली व स्वीकारली जातील. सार्वजनिक सुट्टी व रविवारी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली 1 फेब्रुवारीला नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. तसेच याच दिवशी वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत 3 फेब्रुवारी असेल. 4 फेब्रुवारीला निवडणूक चिन्हांचे वाटप व निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. याच दिवशी मतदान केंद्रांची मतदारनिहाय यादी प्रसिद्ध होईल. 16 फेब्रुवारीला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 यावेळात मतदान होईल. याच दिवशी सायंकाळी 6.30 वाजता किंवा सर्व केंद्रांवरील मतदान समाप्तीनंतर मतमोजणी होईल. स्थानिक परिस्थितीनुसार यात बदल होऊन दुसऱ्या दिवशी ही मतमोजणी होऊ शकते.

उमेदवारांच्या निवडणूक खर्चात वाढ (रुपयात)-
अ वर्ग महानगरपालिका (मुंबई) 1,35,000 वरून 5,00,000
ब वर्ग महानगरपालिका (पुणे व नागपूर) 1,00,000 वरून 4,00,000
क वर्ग महानगरपालिका (पिंपरी-चिंचवड, ठाणे, नाशिक व नवी मुंबई)- 1,00,000 वरून 4,00,000.
ड वर्ग महानगरपालिका (उर्वरित सर्व) 1,00,000 वरून 3,00,000
जिल्हा परिषदा- 60,000 वरून 3,00,000
पंचायत समित्या- 40,000 वरून 2,00,000

मतदारांच्या सोयीसाठी-

राज्य निवडणूक आयोगाचे www.mahasec.com हे नवे अद्ययावत संकेतस्थळ
मतदान केंद्र मध्यवर्ती ठिकाणी.
उर्वरित महानगरपालिका, जि.प., पं. समितीसाठी मतदान केंद्रावरील मतदारांची कमाल संख्या 800
रांगा टाळण्यासाठी मतदान केंद्रावरील कमाल मतदार संख्येत घट
अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी रॅम्पची व्यवस्था
अंध, अपंग, गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिकांना मतदानासाठी प्राधान्य
राजकीय पक्षांच्या महत्वाच्या पुढाऱ्यांच्या प्रवास खर्चास उमेदवाराच्या खर्चातून सूट
आता मार्करपेनने मतदाराच्या बोटावर निशाणी
आधार कार्ड - सुद्धा चालणार
प्राण्यांचा क्रूरपणे वापर करण्यास मनाई.

जिल्हा परिषद/पंचायत समित्या निवडणूका
जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे देण्यास 18 जानेवारीपासून सुरवात होईल व 23 जानेवारी दुपारी 3 वाजेपर्यंत स्वीकारण्यात येतील. छाननी व वैध उमेदवार यादी 24 जानेवारीला प्रसिद्ध होईल.

कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप

(पनवेल):  राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...