मुख्य सामग्रीवर वगळा

विक्रोळी रेल्वे अपघात प्रकरणी शासनाकडून दखल पंधरा दिवसात संयुक्त बैठक: भुजबळ

मुंबई, ता. २२- विक्रोळी येथे रविवारी झालेल्या रेल्वे अपघातात तीन व्यक्ती ठार झाल्याची शासनाने गंभीर दखल घेतली असून पंधरा दिवसात यासंदर्भात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांच्यासह महानगरपालिका तसेच रेल्वे प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आज दिली.
विक्रोळी येथील रेल्वे अपघात प्रकरणी मंत्रालयातील दालनात श्री. भुजबळ यांनी आज बैठक घेतली. दुर्लक्ष करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याचे अधिकार राज्य शासनास असल्याचे भुजबळ यांनी रेल्वेला बजावले. यावेळी भुजबळ म्हणाले की, मुंबई महानगरमध्ये दरवर्षी सरासरी चार हजारपेक्षा अधिक व्यक्ती रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडतात. सुमारे २५०० व्यक्ती अपंग होतात. म्हणजेच दररोज सरासरी ११ ते १२ व्यक्ती मृत्युमुखी पडतात, पाच ते सहा व्यक्ती अपंग होतात. रेल्वे प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घ्यावी. विक्रोळीसारखी अशी जी ठिकाणे आहेत त्या सर्व ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे. विक्रोळी येथील या ठिकाणी ओव्हरब्रिज उभारण्याची प्रक्रिया येत्या पंधरा जानेवारीपर्यंत पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरवात करावी. यासाठी आवश्यक ते सर्वेक्षणही पूर्ण व्हावे. बैठकीस गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यासह रेल्वेचे प्रशासन अधिकारी, वरिष्ठ पोलिस अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान काल (ता. २१) विक्रोळी स्थानकात संतप्त नागरिकांनी रेल रोको आंदोलन केल्यामुळे रेल्वेची उपनगरी व मेल एक्सप्रेस सेवा सुमारे चार तास ठप्प झाली होती. गृहमंत्री आर. आर. पाटील, रेल्वे पोलिसांनी याप्रश्नी दिलेल्या आश्वासनानंतर रेल रोको आंदोलन मागे घेण्यात आले होते.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012