मुख्य सामग्रीवर वगळा

उत्तर महाराष्ट्राच्या हवाई क्षेत्रातील विकासाचा नवा अध्याय सुरू: भुजबळ

ओझर येथील विमानतळाच्या विकासा संदर्भात महाराष्ट्र शासन आणि एच. ए. एल. यांच्यात, मंत्री छगन भुजबळ आणि मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार झाला. यावेळी हस्तांदोलन करताना सचिव नंदकुमार जंत्रे आणि पी. वी. देशमुख
मुंबई, ता. ३ - नाशिक येथील ओझर विमानतळावर प्रवासी सुविधांच्या विस्तार आणि विकासामुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्राच्या हवाई वाहतूक क्षेत्राच्या विकासाचा एक नवा अध्याय सुरू होत आहे. या शब्दात राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
ओझर विमानतळावरून नागरी हवाई वाहतूक सुरू करण्यासाठी गेली अनेक वर्षे प्रयत्नशील असलेल्या श्री. भुजबळ यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात ओझर विमानतळाच्या आधुनिकीकरणासंदर्भात महाराष्ट्र शासन आणि हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड उपस्थित होते. सामंजस्य कराराबद्दल अत्यंत समाधानाची भावना व्यक्त करून श्री. भुजबळ म्हणाले की, सध्या ओझर विमानतळावर केवळ एचएएल च्या संरक्षण खात्याचा टर्मिनल कॉम्प्लेक्स आहे. आता सर्व सुविधांनी युक्त अशा पॅसेंजर टर्मिनल कॉम्प्लेक्सची निर्मिती करण्यात येणार असल्याने तिथून व्यापारी तत्वावरील खाजगी नागरी हवाई वाहतूक सुरू करण्यात अडचण येणार नाही. नांदेड, औरंगाबाद, जालना येथील विमानतळांच्या धर्तीवरच हा टर्मिनल विकसित करण्यात येईल. प्रवासी वाहतुकीबरोबरच स्थानिक कृषी उत्पादनांची निर्यात, प्रक्रिया उद्योग, पर्यटन तसेच विभागाच्या एकूणच औद्योगिक विकासालाही मोठी चालना मिळेल.
सचिव श्री. जंत्रे यांनी सांगितले की, सुमारे ४० कोटी रुपये खर्चाच्या या पॅसेंजर टर्मिनल कॉम्प्लेक्सच्या प्रकल्पामध्ये व्हिव्हीआयपी लाऊंज, पॅसेंजर लाऊंज याबरोबरच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत. सध्या मुंबई विमानतळावरील हवाई वाहतुकीस पर्यायी विमानतळ म्हणून अहमदाबाद विमानतळाचा वापर करण्यात येतो. तथापि, ओझर येथील विमानतळ विकसित झाल्यानंतर भविष्यात मुंबई विमानतळाला तो एक उत्कृष्ट पर्याय ठरू शकेल.
एचएएल चे व्यवस्थापकीय संचालक पी. व्ही. देशमुख म्हणाले की हा प्रकल्प आता 'ड्रीम प्रोजेक्ट' असून आजचा करार ४० कोटींचा असला तरीही यापूर्वीच हिंदुस्थान एरोनॉटिक्सने येथे कित्येक कोटी रुपये खर्च करून अत्याधुनिक सोयीसुविधा विकसित केल्या आहेत. मुंबई विमानतळासारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा आम्ही विकसित करीत आहोत. सुमारे २० कोटी रुपये खर्चून सात ते आठ विमानांचा पार्किंग लॉट नुकताच तयार केला आहे. ओझऱची दहा हजार फूट लांबीची धावपट्टी तेरा हजार फुटांची करण्याचा आमचा मानस आहे. जेणे करून एअरबस चे जंबो-जेटही येथे उतरू शकेल. देशात मुंबई विमानतळाची धावपट्टी केवळ दहा हजार फुटांची आहे, ही गोष्ट लक्षात घेतल्यास या विमानतळाचे महत्व लक्षात येऊ शकेल, असेही ते म्हणाले.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझे पसंतीचे सिडकोचे घर; गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत बुधवारी

 मुंबई- माझे पसंतीचे सिडकोचे घर; गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत 19 फेब्रुवारी 2025 पार पडणार २६,००० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार होण्याच्या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनाचे औचित्य साधून सिडको महामंडळाच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत बुधवार, दि. 19 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी २.०० ते ४.०० च्या दरम्यान पार पडणार आहे. प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळासोबतच सोडतीचे थेट प्रक्षेपण वेबकास्टींगच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यामुळे अर्जदार आपल्या सोयीच्या ठिकाणाहून या सोडतीचे साक्षीदार होऊ शकतात. सोडत प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण https://cidcohomes.com या संकेतस्थळावर करण्यात येणार आहे. अर्जदार सदर संकेतस्थळावर, त्यांच्या सिडको होम खात्यात लॉग इन करून सोडतीचा निकाल घरबसल्या देखील पाहू शकतात. याशिवाय सोडतीचे थेट प्रक्षेपण खारघर पूर्व (तळोजा): भूखंड क्र.१४, सेक्टर-३७, तळोजा पंचानंद, पनवेल, रायगड, ४१०२०८, खांदेश्वर: भूखंड क्र. १, सेक्टर-२८, खांदेश्वर रेल्वे स्टेशन, कामोठे, पनवेल, रायगड, ४१०२०९, खारघर: भूखंड क्र. ६३ ...

धुळे ,नंदुरबार व अकोला जिल्हापरिषदा आणि पंचायत समित्यांसाठी शांततेत मतदान- आज मतमोजणी

मुंबई दि.01 :- राज्यात धुळे ,नंदुरबार व अकोला या तीन जिल्हापरिषदाआणि त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांसाठी एकूण अंदाजे सरासरी ५६ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत व सुरळीत पार पडली अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाने दि.६ नोंव्हेबर २०१३रोजी धुळे ,नंदुरबार व अकोला या जिल्हापरिषदा व त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार मतदान घेण्यात आले. धुळे जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी५५टक्के, अकोला जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ५५ टक्के तसेच नंदूरबारजिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ६० टक्के मतदान झाले. वरील सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली असून उद्या दिनांक ०२ डिसेंबर, 2013 रोजी मतमोजणी होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल अशीही माहिती श्रीमती सत्यनारायण यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदभार स्वीकारला

मुंबई, ता. ११- महाराष्ट्राचे नूतन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (ता. ११) रात्री नऊच्या सुमारास मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील दालनात उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. सर्व लोकांना सोबत घेऊन जाण्याचे आपले धोरण असून केवळ बोलण्याऐवजी कृतीवर भर राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राजभवनावरील शपथविधीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर पवार यांनी नूतन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत मणिभवन आणि चैत्यभूमी येथे जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना वंदन केले. यानंतर मंत्रालयात राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण केली. मंत्रालयातील मिनी थिएटरमध्ये पत्रकारांशी वार्तालाप केल्यानंतर मुख्यसचिव, अप्पर मुख्यसचिव, सचिव तसेच अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांसमवेत बैठक घेतली. सुमारे दीड तास ही बैठक चालली. यावेळी राज्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. नागपूर येथे होणार्‍या आगामी हिवाळी अधिवेशनाचीही चर्चा करण्यात आली.