बिहारमध्ये सध्या निवडणुकांमुळे विविध आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी प्रचार सभांमध्ये झाडल्या जात आहेत. सत्तेवर येण्यासाठी सत्ताधारी अथवा विरोधक..कोणीही असले तरीही विविध युक्त्या, क्लुप्त्या केल्या जातात. दिवसा एकमेकांविरुद्ध तोफा डागून रात्री एकाच थाळीत जेवणारे..असा विचार राजकारण्यांबद्दल केला जातो. काही अंशी हे खरंही आहे. मतदारांना एकाच प्याल्यात उतरवून, स्वतः मात्र कुठेतरी काळोखात, किंवा उजेडातही एकमेकांचे प्याल्यांची भेट घालुन मेळ घालायचा असा प्रकार अनेक जण सर्रासपणे करतात. नीतिश कुमारांसह, लालुप्रसाद यादव, सुषमा स्वराज, छगन भुजबळ यांच्यासारखी दिग्गज मंडळी यासाठी प्रतिष्ठा पणाला लावत आहेत. नुकताच सुषमा स्वराज यांनी, "गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची जादू सगळीकडे चालेलच असे नाही" असे विधान करून मोदी यांना घरचा आहेर दिला आहे. तर राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे संयुक्त जनता दलाचे नेते शरद यादव यांनी, राहुल गांधी यांना गंगेत बुडवा असे सांगून त्यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी मध्यंतरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल देखील चुकीचे उद्गार काढून संघाचे मन दुखावले आहेच..परिणामी, राहुल गांधी यांना अजून भरपूर काही शिकण्याची गरज आहे, त्यांनी शायनिंग बंद करावे असे मत आता ज्येष्ठ मुरब्बी राजकारणी मंडळी व्यक्त करीत आहेत...! काहीही असले तरीही खरा जादूगार "मतदार"च आहेत यात शंका नाही. यावर कॉंग्रेस प्रवक्ते शकील अहमद यांनी यादवांवर टीका केली. बिहारमध्ये राहुल यांच्या सभांना होणारी गर्दी पाहून झालेल्या निराशेतूनच त्यांचे राजकीय संतुलन बिघडले आहे, असे विचार त्यांनी व्यक्त केले.