काही महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियात एका भारतीय वंशाच्या डॉक्टरांवर त्यांना शस्त्रक्रियेचा पुरेसा अनुभव नसल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यांनी केलेल्या शस्त्रक्रियेत रुग्णाचे निधन झाल्यामुळे हा ठपका ठेवण्यात आला. केवळ वैद्यकीय क्षेत्रातच नाही, परंतु अनेक क्षेत्र अशी आहेत, की जिथे अनुभवाशिवाय पुढचे पाऊल टाकू नये..टाकता येत नाही, टाकल्यास संबंधितांना धोका, हानी होऊ शकते. उदाहरणादाखल, रस्त्यावर वाहन चालवताना रस्त्याची माहिती नसल्यास एखाद्या खड्ड्यात वाहन जातेच नां..? अगदी तसेच आहे. मात्र यासाठी, असे सर्वच अनुभव घेण्यासाठी संधी मिळणे आणि मिळालेल्या संधीचे सोने करणे महत्वाचे आहे. यासाठी ज्येष्ठांनी, वरिष्ठांनी नवीन लोकांना, पदवी घेऊन नुकत्याच बाहेर पडलेल्या तज्ज्ञांना योग्य मार्गदर्शन केले पाहिजे. आपल्याला माहिती असलेले सर्व खाच-खळगे त्यांनी सांगणे आवश्यक आहे. नाहीतर कोणत्याही क्षेत्रातील पदवी प्राप्त करून अनुभव नसल्यास व्यर्थच जाणार आहे, वय वाढून काही उपयोग नाही...। हे सुद्धा खरं आहे, की केवळ अनुभवच घेत रहायचे का? ही बाब मात्र स्वतः व्यक्तीने ठरवावी. अनुभवाबरोबर त्या क्षेत्रात आणखी संशोधन करण्यासाठी त्यात प्रयोग करावेच लागतात. पण भलत्या-सलत्या रुग्णावर, ठिकाणी प्रयोग करू नये...। जुन्या लोकांनी नवीन लोकांना संधी द्यावी, हे मात्र नक्की।