रविवार, ३० नोव्हेंबर, २०१४
नवी मुंबई सायन्स फाउंडेशन तर्फे ‘जागतिक अणुउर्जा दिवस’
वाशी : नवी मुंबई सायन्स फाउंडेशन, भारतीय किरणोत्सार संरक्षण परिषद आणि महाराष्ट्र अॅकेडमी ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविदयालय येथील बॅरीस्टर पी.जी. पाटील सभागृहात मंगळवार २ डिसेंबर २०१४ रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत ‘जागतिक अणुउर्जा दिवस’ साजरा करण्यात येणार आहे.
जागतिक अणुउर्जा दिवसानिमित्त ‘भविष्यातील उर्जा आणि पर्यावरणाचे एकत्रित जतन’ या विषयावर भारत सरकारच्या अणुउर्जा आयोगाचे माजी चेअरमन व पद्मभूषण डॉ. अनिल काकोडकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तसेच, इतरही काही मान्यवरांना सबंधित विषयांवर माहिती सांगण्यासाठी आमंत्रित केले असल्याची माहिती नवी मुंबई सायन्स फाउंडेशनचे चेअरमन डॉ. अरुण भागवत यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी ‘अणुउर्जा निर्मिती आणि किरणोत्साराचा वापर व यातील सुरक्षितता’ या विषयावर भारत सरकारच्या अणुउर्जा विभागातील मान्यवर शास्त्रज्ञ आणि नवी मुंबईच्या महाविदयालयाचे शिक्षक, विद्यार्थी आणि प्राचार्य यांच्यात परिसंवाद स्वरूपाची चर्चा होणार असल्याची माहिती नवी मुंबई सायन्स फाउंडेशनचे संयोजक एस.पी. अगरवाल यांनी दिली. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन नवी मुंबई सायन्स फाउंडेशनचे सदस्य मधुकर बेल्लारी यांनी केली आहे.
शनिवार, २९ नोव्हेंबर, २०१४
जानेवारी ते एप्रिल 2015 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर
मुंबई दि. 29 – जानेवारी ते एप्रिल 2015 मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच विभाजनामुळे व नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व रिक्त पदांसाठी पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज जाहीर केला आहे.
या कार्यक्रमानुसार सदर निवडणुकांसाठी इच्छूक उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल करताना ती ऑनलाईन पध्दतीने भरणे अनिवार्य आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती, नागपूर आणि चंद्रपूर या 14 जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी गुरुवार दि. 4 डिसेंबर 2014 ते सोमवार दि. 8 डिसेंबर 2014 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार असून रविवार दि. 7 डिसेंबर 2014 हा सार्वजनिक सुट्टीचा दिवस असल्याने फक्त ऑनलाईन नामनिर्देशनपत्रे भरता येतील. मंगळवार दि. 9 डिसेंबर 2014 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार आहे. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक गुरुवार दि. 11 डिसेंबर 2014 हा असून मंगळवार दि. 23 डिसेंबर 2014 रोजी मतदान घेण्यात येईल. या निवडणुकांची मतमोजणी संबंधित ग्रामपंचायतींच्या प्रत्येक मतदान केंद्रावरील मतदान संपल्यानंतर किंवा संध्याकाळी 6 वाजता करण्यात येईल. बुधवार दि. 24 डिसेंबर 2014 रोजी या निवडणुकांचे निकाल प्रसिध्द करण्यात येतील.
नांदेड आणि गडचिरोली या जिल्ह्यातील निवडणूक कार्यक्रम वरीलप्रमाणेच असून या दोन जिल्ह्यातील निवडणुकांची मतमोजणी बुधवार दि. 24 डिसेंबर 2014 रोजी होणार असून त्याच दिवशी निवडणुकांचे निकाल प्रसिध्द करण्यात येतील. फक्त गडचिरोली जिल्ह्यातील मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत राहणार असून अन्य सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत असेल.
सार्वत्रिक निवडणूक असलेल्या संबंधित ग्रामपंचायतीच्या संपूर्ण क्षेत्रात तसेच पोटनिवडणुका असलेल्या ग्रामपंचायतीच्या संबंधित प्रभागाच्या क्षेत्रात आज रात्री 12.00 वाजल्यापासून आचारसंहिता लागू होईल व निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अस्तित्वात राहील असे राज्य निवडणूक आयुक्तांनी म्हटले आहे.
शनिवार, १५ नोव्हेंबर, २०१४
जळगावात 28 पासून ‘कृषी व डेअरी’ प्रदर्शन; चार दिवसीय प्रदर्शनात असणार प्रात्यक्षिकांवर भर
जळगाव (प्रतिनिधी) - जैन इरिगेशन सिस्टीम्स् लि. व पुणे येथील डीएसके मिल्कोट्रॉनिक्स् प्रयोजित ‘कृषी व डेअरी एक्स्पो 2014’या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे येथील शिवतीर्थ मैदानावर 28 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. अॅग्रोवर्ल्ड हे या प्रदर्शनाचे आयोजक असून प्लँटो कृषीतंत्र व जलश्री सहप्रायोजक आहेत. या चार दिवसीय प्रदर्शनासाठी महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, जळगाव जिल्हा परिषद, आत्मा व नाबार्ड या शासकीय संस्थांचे सहकार्य लाभले आहे. जळगावात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात ‘डोम स्ट्रक्चर’मध्ये हे प्रदर्शन होत असून 120 स्टॉलधारक सहभागी होत आहेत.
सध्याची दुष्काळी परिस्थिती, पाणी टंचाई, हवामानाचा लहरीपणा, दरातील चढ-उतार, शेतमजुरांची टंचाई या बाबींमुळे शेतकरी चिंतीत आहे. याचाच विचार करून गरजेवर आधारीत उपाय सुचविण्याचा प्रयत्न या प्रदर्शनाच्या निमित्ताने करण्यात येणार आहे.थोडक्यात प्रात्यक्षिकांवर भर तसेच नाविन्यपूर्ण बाबींचा समावेश हेच या प्रदर्शनाचे वैशिष्ट्ये असेल. मग त्यात अत्याधुनिक सूक्ष्म सिंचन प्रणाली, यंत्र, तंत्र, अवजारे, नवीन वाण, फवारणी, खते, काढणी पूर्व व पश्चात तंत्रज्ञान, दरातील चढ-उतारामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी साठवणूकगृह, रॅपनिंग चेंबर, अत्यल्प खर्चात उपलब्ध असलेले डीहायड्रेशन तंत्र (निर्जलीकरण), दुग्धव्यवसाय सहज व सोपा करण्यासाठी व छोट्या पशूपालकांनाही परवडतील अशी दूध काढणी यंत्र, ‘काऊ कंफर्ट’ तंत्र पहावयास मिळेल. शेततळे,शेडनेट, पॉलिहाऊस, मल्चिंग, गोड्या पाण्यातील मोती संवर्धन यांचे प्रात्यक्षिक तसेच त्यासाठी उपलब्ध शासकीय योजना व बँकांचे अर्थसहाय्य असे सर्व काही एकाच छताखाली उपलब्ध असेल, अशी माहीती ‘अॅग्रोवर्ल्ड’च्या शैलेंद्र चव्हाण यांनी दिली. याशिवाय,शेती, माती, पाणी, प्रक्रीया व पूरक उद्योग या विषयातील पुस्तकही प्रदर्शनस्थळी असतील. महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग,राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, राज्यातील अकोला, राहुरी व परभणी हे तीन कृषी विद्यापीठ, सहा कृषी विज्ञान केंद्र, आत्मा,पशूसंवर्धन विभाग, मत्स, रेशीम, पणन, वखार महामंडळ या सर्व शासकीय संस्थांसाठी स्वतंत्र दालनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात विविध शासकीय योजनांची माहीती तसेच त्याबाबतचे प्रात्यक्षिक पहावयास मिळेल, असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी किसनराव मुळे यांनी स्पष्ट केले.
शुक्रवार, ५ सप्टेंबर, २०१४
ज. स. सहारिया राज्य निवडणूक आयुक्तपदी विराजमान
मुंबई दि. 5- माजी मुख्य सचिव आणि नवनियुक्त राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आपल्या पदाचा कार्यभार आज सकाळी स्वीकारला.
नवीन प्रशासन भवनातील राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात आज सकाळी श्री.सहारिया यांचे आगमन झाल्यावर राज्य निवडणूक आयोगाचे सचिव मधुकर गायकवाड यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
गुरुवार, ७ ऑगस्ट, २०१४
एकनाथ ठाकूर यांच्या निधनाने बँकिंग व्यवसायाचा मानवी चेहरा हरपला --उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रध्दांजली
मुंबई, दि.7 :- सारस्वत बँकेचे अध्यक्ष आणि माजी खासदार एकनाथ ठाकूर यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. देशातील बँकिंग व्यवसायाला मानवी चेहरा देणारं, सामाजिक बांधिलकी जपणारं दिलखुलास व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड गेलं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना श्रध्दांजली अर्पण केली.
उपमुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात पुढे म्हणतात की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या म्हापणसारख्या दुर्गम खेड्यात जन्म झालेल्या ठाकूर साहेबांनी गरिबीशी सामना करत स्टेट बँकेसारख्या अग्रगण्य बँकेत नोकरी मिळविली. बँकिंग व्यवसायाशी आलेला हा पहिला संबंध त्यांच्या अखेरपर्यंत कायम राहिला. महाराष्ट्रातल्या तरुणांना बँकिंग व्यवसायाची दारं खुली करण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती. त्यांनी स्थापन केलेल्या नॅशनल स्कूल ऑफ बँकिंगने लाखो तरुणांना बँकिंग व्यवसायात नोकरी मिळवून दिली. नाशिकचं कुसुमाग्रज प्रतिष्ठान, कोकण मराठी साहित्य परिषदेसारख्या विविध सामाजिक संस्थांच्या जडणघडणीत त्यांचं योगदान मोलाचं होतं. त्यांच्या नेतृत्वाखाली सारस्वत बँकेने केलेली प्रगती इतर बँकांसाठी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहे.
गेली तब्बल 42 वर्षे कर्करोगाशी झुंजत असताना त्यांनी प्रचंड आत्मविश्वास आणि इच्छाशक्तीचं दर्शन घडवलं. त्यांचं संपूर्ण जीवन महाराष्ट्रीय युवकांसाठी मार्गदर्शक आहे. त्यांच्या निधनाने राज्याच्या बँकिंग आणि सामाजिक क्षेत्राचं फार मोठं नुकसान झालं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.
मंगळवार, ५ ऑगस्ट, २०१४
नवी मुंबईने पाडला स्वेच्छा सीसीटीव्ही कॅमेरा देखरेखीचा नवा पायंडा
नवी मुंबई, (प्रतिनिधी) - सीसीटीव्ही देखरेखीसाठी स्वेच्छेने आचारसंहिता राबविणारे नवी मुंबई हे देशातील पहिलेच शहर ठरले आहे. शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता संभाव्य गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी वर्दळीच्या ठिकाणी छुप्या कॅमेऱ्यांद्वारे देखरेख ठेवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यामुळे सिडकोने स्वेच्छा सीसीटीव्ही कॅमेरा देखरेखीची आचारसंहिता तयार केली. सिडको अधिकारकक्षेतील खाजगी तसेच सरकारी आस्थापनांनी या आचारसंहितेला मान्यता दिली आहे.
सीसीटीव्ही प्रकल्पासाठी सिडकोने सुकाणू समिती स्थापन केली होती. राज्य शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव श्री. राजेश अग्रवाल हे या समितीचे अध्यक्ष आहेत. प्राइसवॉटरहाऊसकूपर्स हे सिडकोचे या प्रकल्पासाठी सल्लागार आहेत. समितीने नवी मुंबईतील सर्व खाजगी आणि सरकारी संघटना, संस्था आणि कंपन्यांच्या वरिष्ठांशी या संहितेबाबत चर्चा करून ती निश्चित केली.
या संहितेनुसार रेल्वे स्थानके, दुकाने, मॉल्स, चित्रपटगृह, हॉटेल्स, धार्मिक स्थळे, शाळा, महाविद्यालये, गृहनिर्माण प्रकल्प, कारखाने, गोदामे अशा विविध सार्वजनिक स्थळी छुपे कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. ही आचार संहिता नवी मुंबई पोलीस, महाराष्ट्र शासन आणि सिडको यांच्या वेबसाईटवर पहावयास मिळेल.
लवकरच नवी मुंबईतील सिडकोच्या अधिकारक्षेत्रात सुमारे 500 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील. या कॅमेऱ्यांचे चित्रिकरण नवी मुंबई पोलीस मुख्यालयात उपलब्ध राहील.
सोमवार, ७ जुलै, २०१४
नवी मुंबईकरांना टोलचा भार लावणार नाही – उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
मुंबई - (प्रतिनिधी) - सायन ते कळंबोली हा दहा पदरी रस्ता मोकळा करण्यात आला आहे. या रस्त्याचा ९५ टक्के भाग सिडकोच्या कार्यक्षेत्रात येतो. सिडकोच्या उभारणीत येथील स्थानिक शेतकऱ्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे या रस्त्यावरील टोलचा भार नवी मुंबईकरांवर पडू नये, यासाठी आपण आजच्या कॅबिनेट बैठकीत सिडकोतर्फे १२०० कोटी देण्याची मागणी करणार असल्याचे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. विष्णूदास भावे नाट्यगृह,वाशी येथे पार पडलेल्या नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या निर्धार मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली.
ठाणे जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात टोलनाके आहेत. हे टोलनाके कसे कमी करता येतील, यावरही विचारविमर्श चालू असल्याचे अजित पवार म्हणाले. MMRDA, सिडको आणि राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्यांचा समन्वय साधून हे टोलनाके बंद करण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच Light Motor Vehicle ला दुचाकी, तीन चाकी आणि एसटीप्रमाणे टोलमधून वगळता येऊ शकते का? याचीही चाचपणी चालू केल्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले.
शनिवार, ५ जुलै, २०१४
राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांना भावपूर्ण निरोप
मुंबई दि. 5 (प्रतिनिधी) - राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांना कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांतर्फे आज भावपूर्ण निरोप देण्यात आला.
राज्य निवडणूक आयुक्त पदाची पाच वर्षांची यशस्वी कारकीर्द पूर्ण करुन श्रीमती सत्यनारायण आज निवृत्त होत आहेत. यानिमित्त आज आयोगाच्या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यातर्फे त्यांना एका अनौपचारिक समारंभात भावपूर्ण निरोप देण्यात आला. याप्रसंगी राज्य निवडणूक आयोगाचे सचिव, मधुकर गायकवाड यांच्या हस्ते त्यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देण्यात आला.
कोणत्याही प्रकारे आपला औपचारिक निरोप समारंभ करु नये अशा प्रकारच्या सूचना श्रीमती सत्यनारायण यांनी आधीच कार्यालयातील अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारत त्यांनी निरोप घेतला आणि सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. हा आगळावेगळा निरोप समारंभ भाषणाविनाच पार पडला.
शनिवार, २८ जून, २०१४
पारगाव ग्रामस्थांनी दिले नवी मुंबई विमानतळ भूखंडासाठी संमतीपत्र
मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी सिडकोने जाहीर केलेले आणि राज्य शासनाने मंजूरी दिलेले नुकसान भरपाई, पुनर्वसन आणि पुन:स्थापना पॅकेज मान्य असून यासंदर्भातील गावांचे सर्वेक्षण करण्यासंदर्भात आणि आपल्या जमिनी सिडकोकडे हस्तांतर करण्यास सहमत असल्याचे पत्र पारगाव ग्रामस्थांनी सिडको व्यवस्थापनाकडे सादर केले.
दिनांक 26 जून 2014 रोजी पारगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन आपले सहमतीपत्र सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक श्री. संजय भाटिया यांचेकडे सुपूर्द केले. या शिष्टमंडळात सरपंच श्रीमती बेबी वाघ, उपसरपंच श्री. संतोष म्हात्रे, सदस्य श्री. विकास पाटील, प्रफुल्ल मेहर, प्रल्हाद नाईक, जागृती कारेकर, वंदना पाटील यांचेसमवेत डॉ. प्रकाश पाटील, बाबूराव पाटील, सदाशिवराव पाटील, भास्कर पाटील, रत्नदीप पाटील, विजय पाटील, सुहास पाटील, सुरेश म्हात्रे, मोहनराव नाईक यांचा समावेश होता.
औरंगाबाद झालर क्षेत्रातून सिडकोची माघार - सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय
औरंगाबाद (वि. प्र.) - औरंगाबाद झालर क्षेत्र हे राज्यातील विविध नवीन शहरांपैकी एक असून सिडकोची त्यासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ति करण्यात आली आहे. सिडको संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या (मंगळवार 24 जून 2014) बैठकीत औरंगाबाद झालर क्षेत्र नियोजन आणि विकासाची जबाबदारी अन्य प्राधिकरणाकडे सोपवावी याबाबत एकमत झाले. सिडकोला या जबाबदारीतून मुक्त करावे यासाठी शासनाला पत्र पाठविण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. बैठकीस सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया, सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा, प्रधान सचिव, नगरविकास-1 मनुकुमार श्रीवास्तव, जेएनपीटीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक एन. एन. कुमार, संचालक नामदेव भगत, वसंत भोईर आणि कंपनी सचिव प्रदीप रथ हे उपस्थित होते.
भूसंपादनास होत असलेला स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध, पायाभूत सुविधा विकास कर देण्यास नागरिकांचा नकार तसेच विकासाची अंदाजे किंमत आणि विकास कामांवर होणारा खर्च यातील वाढती तफावत या कारणास्तव संचालक मंडळाने हा निर्णय घेतला आहे. झालर क्षेत्राच्या आराखड्याबाबत हरकती आणि सूचना मागविण्याच्या तारखेस 3 जुलै 2014 पर्यंत मुदतवाढ द्यावी असेही बैठकीत ठरले.
वाळुज महानगराचे विशेष नियोजन प्राधिकरण म्हणूनसुद्धा सिडकोवर जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. या नियोजित महानगरातील मूळ जमिनधारकांनी आपल्या जमिनी छोट्या-मोठ्या भूखंडांमध्ये विभागून विकण्यास प्रारंभ केला आहे. या भूखंडांसाठी कुठल्याही पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत त्यामुळे नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोने पहिल्या टप्प्यातील विकासात या भूखंडांच्या विक्रीस परवाने देण्याबाबत नियमावली ठरविली. संचालक मंडळाने या नियमावलीस या बैठकीत संमती दिली.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ वगळता 8670 हेक्टर क्षेत्र या महानगराकरिता अधिसूचित करण्यात आले आहे. यातील 1730.11 हेक्टर क्षेत्राच्या विकासाच्या आराखड्यास महाराष्ट्र राज्य नगरनियोजन कायद्यान्वये राज्य शासनाने 14-8-2001 रोजी मान्यता दिली आहे. या क्षेत्रातील भूखंडांच्या विक्रीसाठी अंतर्गत रस्त्यांची निर्मिती, जल वाहिन्या, मलनिसारण वाहिन्या, पदपथावरील दिवे आणि वृक्षारोपण या पायाभूत सुविधांचा विकास करणे मूळ जमिनधारकास बंधनकारक करण्यात आले आहे. औरंगाबाद आणि वाळुज महानगरातील मालमत्तांच्या हस्तांतरण शुल्कातही सिडकोने 10% ने वाढ केली आहे. ही वाढ 2014-15 या वर्षाकरता आहे.
सिडकोच्या विकास आराखड्यानुसार वाळुज महानगरामध्ये नगर-1, 2, 3 आणि 4 असे नियोजन करण्यात आले आहे. वाळुज महानगरातील 6939.89 हेक्टर परिसर नागरीकरण अयोग्य क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. यातील नगर-3 चा परिसर नागरीकरण अयोग्य क्षेत्रात मोडत असल्याकारणाने नगर नियोजनातून वगळण्यात यावा असा निर्णयही घेण्यात आला आहे. हा परिसर औद्योगिक विकास महामंडळाकडे सुपूर्द करावा असा निर्णयही घेण्यात आला. नागपूर घोटी एक्सप्रेस हायवे हा नवा रस्ता वाळुज महानगराच्या नजीक असल्याकारणाने या पट्ट्यात नगर-5 आणि नगर-6 यांची निर्मिती करण्याच्या दृष्टीने आराखडा सिडकोने तयार केला असून संचालक मंडळाने त्यास मान्यता दिली. हे क्षेत्र नवी मुंबई विमानतळ प्रभावीत क्षेत्र अर्थात नैनाच्या धर्तीवर विकसित करण्याची योजना सिडकोने आखली आहे.
नैना क्षेत्रातील विकास करांची पुनर्रचना करण्यात यावी या प्रस्तावासही मान्यता देण्यात आली. हा प्रस्ताव लवकरच शासनास सादर केला जाणार आहे. संचालक मंडळाने आणखी काही महत्वाच्या प्रस्तावांनाही मान्यता दिली.
नवी मुंबईतील तळोजा रेल्वे स्थानकावरून मेट्रो रेल्वे जाणार असल्याने मेट्रोच्या व्हायडक्टच्या कामास मध्य रेल्वेने आक्षेप घेतला होता. त्यानंतर सिडकोच्या संबंधित अधिकाऱ्यांनी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांसमवेत या समस्येवर मार्ग काढण्यासाठी बोलणी केली. मध्य रेल्वेने सुचविलेल्या केबल पुलाचा प्रस्ताव सिडकोने या बैठकीत मान्य केला.
नवी मुंबईतील सिडकोच्या अधिकार क्षेत्रातील सर्व नोडमधील तसेच नोड व्यतिरिक्तच्या क्षेत्रातील आरक्षित मूल्याच्या पुनर्रचनेत बदल करावयाच्या प्रकल्प अहवालासही संचालक मंडळाने मान्यता दिली. हे मूल्य 31-3-2014 पर्यंत लागू होते. आरक्षित मूल्यात 12.5% नी वाढ झाल्यामुळे पुनर्रचना करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप
(पनवेल): राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...
-
पनवेल (ता. ११): यंदाचे चौथे एकदिवसीय राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलन पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मार्च महिन्...
-
नवी मुंबई, प्रतिनिधी- नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (DGCA) संचालक श्री. फैज अहमद किडवई यांनी मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी ...
-
मुंबई, ता. 2 - वाशी, नवी मुंबई येथे सिडकोतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या प्रदर्शन संकुलाची निर्मिती या शहराला नवीन ओळख प्रदान करेल आणि भवि...
