सोमवार, ९ मे, २०११

लातूर-औसा-लामजना राज्यमार्गाची दुरुस्ती 5 जूनपूर्वी झालीच पाहिजे - छगन भुजबळ

मुंबई, दि. 4 मे : लातूर-औसा-लामजना या राज्य महामार्गाच्या दुरुस्तीचे काम येत्या 5 जूनपर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण झालेच पाहिजे, असे स्पष्ट निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना आज दिले.
या रस्त्याच्या कामाबाबत आज भुजबळ यांच्या मंत्रालयातील दालनात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार बसवराज पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) धनंजय धवड यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
औसा-लातूर हा 19 किलोमीटरचा चौपदरी तर औसा-लामजना हा 13 किलोमीटरचा दुपदरी मार्ग आहे. या मार्गांच्या दुरुस्तीबरोबरच आवश्यक त्या ठिकाणी योग्य त्या प्रकारचे फलक, दिशादर्शक बसविण्याची सूचनाही श्री. भुजबळ यांनी यावेळी केली.

'जर्मन अस्फाल्ट रोड ऍडिटिव्ह प्रायोगिक तत्त्वावर वापरा'
यानंतर झालेल्या अन्य एका बैठकीमध्ये श्री. भुजबळ यांनी डयुरोफ्लेक्स हे जर्मन अस्फाल्ट रोड ऍडिटिव्ह प्रायोगिक तत्त्वावर वापरून पाहण्याची सूचनाही सार्वजनिक बांधकाम सचिवांना केली.
सध्या सुरू असलेल्या डांबरीकरणाच्या कामातील एकूण लांबीपैकी एका भागातील काही लांबीमध्ये नियमित डांबरीकरण आणि 2 ते 3 किलोमीटर लांबीमध्ये 'डयुरोफ्लेक्स'चा प्रायोगिक तत्त्वावर वापर करावा आणि पावसाळयानंतर या ऍडिटिव्हच्या उपयुक्ततेबाबत अहवाल सादर करावा, अशी सूचना सर्व मुख्य अभियंत्यांना करण्यात यावी, असे निर्देशही श्री. भुजबळ यांनी यावेळी दिले.

खतवाटपाच्या नियोजनाची अंमलबजावणी प्रभावी व्हावी - छगन भुजबळ

नाशिक - "देशभरातच खतांची अडचण असून, केंद्राकडून राज्याला मिळणाऱ्या खताचे प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत वितरण होण्यासाठी कृषी विभागाने नियोजनाची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी,' असे स्पष्ट आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले.
येथील शासकीय विश्रामगृहात आज नाशिक जिल्ह्यातील खरीप हंगाम आढावा व नियोजनाची बैठक झाली. त्यात श्री. भुजबळ अध्यक्षस्थानावरून बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्षा मायावती पगारे, खासदार हरिश्‍चंद्र महाले, प्रतापदादा सोनवणे, समीर भुजबळ, राज्याचे कृषी आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी पी. वेलरासू यांच्यासह पंधरा तालुक्‍यांतील आमदार तसेच अधिकारी उपस्थित होते.
अवकाळी पावसाच्या नुकसानीची मदत, खतांचे वितरण, अपघात विमा योजना, ट्रॅक्‍टरचे अनुदान, तेल्या रोगावरील रखडलेले अनुदान या विषयावरील विविध प्रश्‍न उपस्थित करीत लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला धारेवर धरले.

आमदार माणिकराव कोकाटे, शिरीष कोतवाल यांनी खतांसंबंधी प्रश्‍न उपस्थित केले. ते म्हणाले, ""खतांच्या विक्रीतील लिंकिंग थांबली पाहिजे. खतांबाबत अधिकारी परस्पर कोटे ठरवून मोकळे होतात. त्यामुळे सहकारी सोसायट्यांना खते मिळत नाही. व्यापाऱ्यांकडून मात्र अव्वाच्या सव्वा दराने शेतकऱ्यांना खते घ्यावी लागतात. खत कंपन्या डिलरलाच थेट खते देतात. कंपन्यांना, सहकारी संस्थांना खते देण्यात त्यांना स्वारस्य नसते. नाशिकच्या तुलनेत जळगाव व नगरला जास्त खतपुरवठा होत असल्याचे निदर्शनास आले आहे.''
श्री. भुजबळ म्हणाले, ""देशातच खतांचा तुटवडा असल्याचे सांगितले जात आहे. यावर राज्य व जिल्हा पातळीवर व्यवस्थित नियोजन होणे आवश्‍यक आहे. जिल्ह्यासाठीचे खत केंद्राकडून आल्यावर ते माथाडी कामगारांकडून विनाविलंब उतरवले गेले पाहिजे. म्हणजे खताची पळवापळवी होण्याची शक्‍यता राहणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी धडक कारवाई करीत कंपन्यांची मनमानी मोडून काढावी.''

श्री. कोकाटे म्हणाले, ""शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी कृषी विभागाने नाशिक शहरातील स्वत:ची जागा या प्रकल्पासाठी ठेवावी.''
श्री. कोतवाल यांनी यासाठी बाजार समित्यांमध्येही स्वतंत्र व्यवस्था करणे शक्‍य असल्याचे सांगितले.
दरम्यान, अवकाळीतील प्रलंबित मदत, अपघात विमा मिळण्यात शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, तेल्या रोगाचे चार वर्षांपासून रखडलेले अनुदान याबाबत लोकप्रतिनिधींमधून प्रश्‍न उपस्थित करण्यात आले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कैलास मोते यांनी प्रास्ताविक केले व कृषी विभागाच्या नियोजनाचे सादरीकरण केले. या वेळी आरोग्य पत्रिका व जमीन सुपीकता निर्देशांकाच्या अहवालाचे प्रकाशनही करण्यात आले.

रविवार, ८ मे, २०११

एक+विसाव्या शतकातली आई आणि एक+विशीतली मुलं...

सोळावं वरीस धोक्याचं गं बाई..सोळावं वरीस धोक्याचं! असं अवघ्या काही वर्षांपूर्वी म्हटलं जात होतं. मात्र एकविसाव्या शतकात सोळाव्या वर्षी मुलांना बर्‍यापैकी समज येते आणि एकवीस वर्षांचा मुलगा स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी धडपडत असतो. एकविसाव्या शतकातली आई सुद्धा मुलाने चांगला उद्योग-धंदा करून नावलौकिक प्राप्त करावा किंवा चांगली नोकरी करून लवकरच एखादी सुन घरी येण्याची स्वप्न पहाते. हेच मुलींच्या बाबतीतही लागू होते. मात्र, मुलगी स्वतःच्या पायावर उभी राहिली, की तिचं एखादं छान स्थळ पाहून लग्न लावून जबाबदारीतून मोकळं कधी होऊ? याचा विचार कायम आई करत असते.
आईचं महत्व काय आहे? हे सांगण्याची विशेष गरज नाही. परंतू दिवसेंदिवस मुलांकडे नीट लक्ष देण्याची आणि त्यांना सुसंस्कारित करण्याची आईची जबाबदारी वाढते आहे. नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय करावा अशा घोषणा करणार्‍या सरकारने घोषणे पलिकडे काहीच न केल्यामुळे युवक मंडळी नोकरी करण्यास प्राधान्य देतात. त्यातल्या त्यात एमएनसी अर्थातच मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन/कंपनीमध्ये नोकरी करण्यासाठी जवळपास प्रत्येकाचाच कल असतो. कारण अगदी जोरात सुरू असलेले खाजगी क्षेत्रातील व्यवसाय, कारखाने बव्हंशी बंदही पडू शकतात असे गेल्या काही वर्षात दिसून आले आहे. मात्र ग्लोबलायझेशनच्या या दुनियेत कॉर्पोरेट सेक्टरला चांगले दिवस आले असल्याचे दशकापासून दिसून येते.
लठ्ठ पगार देऊन पात्र उमेदवारांना इथे नोकरीसाठी आकर्षित केले जाते. चांगल्या गुणवत्तेच्या तरूणांना तर याचा लाभ होतोच. मात्र कॉर्पोरेट क्षेत्रात कामासाठी तितकेच पिळूनही घेतले जात असल्याची उदाहरणे आहेत. सरासरी दिवसाचे आठ तास काम आणि पाच दिवसांचा आठवडा असे एकूण चाळीस तास फक्त काम असल्यामुळेही काही आळशी पण हुशार मंडळींचे चांगलेच फावते. मुलगा कामावरून घरी परत येईपर्यंत बिच्चार्‍या आईचे डोळे दाराकडे टक लावून मुलगा येण्याची प्रतीक्षा करतात. सातत्याने वाढणारी असुरक्षितता हे यामागचे एक प्रमुख कारण आहे, घरातून बाहेर पडल्यानंतर सहजासहजी कोणताही अपघात न होता घरी परत आलो तर आजचा दिवस सार्थक झाला...असे सूत्रच आता तयार झाले आहे. पूर्वीच्या आईला मुलगा कामावर गेल्यानंतर तितकी काळजी वाटत नव्हती. नोकरीवर जाताना सायकल, बस अथवा रेल्वेने अप-डाऊन करणे इतकीच मर्यादित साधनं होती. पण आजकाल अगदी शाळेतल्या मुलाला सुद्दा बाईक असते, रस्त्यावरून, गल्लीबोळातून भरधाव बाईक हाकताना मुलं दिसतात. नोकरीवरून अथवा शाळेतून मुलं घरी आल्यानंतर पूर्वी मित्र-मैत्रिणीकडे जात होती. आता ही परिस्थिती बदलली असून घरी आल्यानंतर आधी कॉम्प्यूटरवर फेसबुक, ऑर्कुट, ट्विटर सारख्या सोशल वेबसाइट्सनां भेट देऊन साइन-इन करून हाय-हॅलो, आपण घरीच आहोत..असे संदेश आउट केले जातात आणि मुलांचा तर तासन् तास फेसबुकवरच गप्पा मारण्यातच वेळ जातो. त्रयस्थ व्यक्तीस फ्रेंडशिप ची रिक्वेस्ट करताना आपल्या घरातच आपल्याशी मित्राप्रमाणे वागणार्‍या आई रुपी फ्रेंडचा विसर मुलांना पडतोय...यामुळे आई आणि मुलांमधला संवादही कुठे ना कुठे हरवला असल्याची जाणीव झाल्याशिवाय रहात नाही. परंतु सध्या संवादाअभावी फेसबुक सारखी स्थळंच मित्र असल्याची मुलांमध्ये भावना निर्माण झाली आहे.
आता तर शाळेतही कॉम्प्यूटर (संगणक) हा विषय असल्यामुळे दुसर्‍या इयत्तेतल्या विद्यार्थ्यालाही कॉम्प्यूटर ऑपरेट करता येतो. कॉम्प्यूटर ही आगामी दशकात काळाची गरज ठरणार असल्याचीच ही नांदी म्हणावी लागेल. त्यातच सातत्याने पुस्तकांच्या किंमतीत देखील होणारी वाढ, प्रचंड आणि पालकांना न झेपणारा शैक्षणिक खर्च यामुळे ई-लर्निंग योजना वाढीस लागून घरबसल्याच अभ्यास, शाळा अशा गोष्टी सुरू होतील, तो दिवस दूर नाही! अशा भविष्यामुळे आई देखील संगणक साक्षर होणे आवश्यक आहे. आपली मुलं कॉम्प्यूटरवर बसून काय करतात? कोणत्या वेबसाइट्स उघडतात, त्यातून काय साध्य करतात? याकडे लक्ष ठेवणं ही प्रत्येक आईचीच जबाबदारी ठरणार आहे, नव्हे ठरली आहे. इंटरनेटचा सदुपयोग केल्यास मुलं खरोखर सद् गृहस्थ आणि जीवनात यशस्वी होतील इतकी माहिती इंटरनेटवर असते. सध्या मुलांचे बाबाही दिवसभर कामानिमित्त बाहेर असल्यामुळे आणि रात्री उशीरा घरी येत असल्यामुळेच खरंतर आईची जबाबदारी वाढते आहे. आई सुशिक्षित असल्याचा फायदा आईने नक्की करून घ्यावा.
घरातल्या घरातच माणसांऐवजी कॉम्प्यूटरमध्ये हरवत असलेल्या मुलांना यातून बाहेर काढणं खूप गरजेचं असून केवळ आईच हे चांगल्या प्रकारे करू शकते. नेट सर्फिंग खूप केली म्हणून न रागावता, स्वतः मुलांकडून संगणक-साक्षर आणि इंटरनेट-प्रवीण होऊन आई सुद्धा मुलांना अभ्यासात मदत करू शकते. मुलं शाळेत, कॉलेजला गेल्यानंतर त्यांना लागणार्‍या नोट्सची माहिती घेऊन ती घरी परत येईपर्यंत त्या नोट्स काढून त्यांना देऊन त्यांचेही टेन्शन हलके झाल्यास कॉम्प्यूटरमध्ये हरविलेली आणि सोशल साईट्समध्ये व्यस्त असलेल्या मुलांना निश्चितच आई हीच आपला खरा फ्रेंड असल्याची जाणीव होऊन हरविलेला संवाद पुन्हा साधला जाईल हाच विश्वास!

शुक्रवार, ६ मे, २०११

बहात्तर वर्षांचे तरूण शिकताहेत "इंटरनेट"...

जिद्द आणि चिकाटी हे दोन गुण अंगी असले तर नशीब सुद्धा बदलतं. अनेकदा जवळ अत्यंत मोजके पैसे घेऊन घराबाहेर पडलेली व्यक्ती तिच्या जिद्दिमुळे आणि चिकाटीमुळे मोठी उद्योगपती, मोठ्या पदावर विराजमान झाल्याची उदाहरणे आहेत. माणसाने मिळेल ते शिकत रहावं, अर्जित करावं त्याने लाभच होतो. याचबरोबर काळाबरोबर चालणारी व्यक्ती सुद्धा प्रगती करू शकते, तिचे कुठेही अडून रहात नाही, हे सिद्ध केलंय युवकांनाही लाजवेल अशा इंदूरच्या अवघे ७२ वय असलेल्या एन. पी. बरगले यांनी...!
भारतीय आयुर्विमा महामंडळातून उच्चपदस्थ पदावरून निवृत्त झाल्यानंतर श्री. बर्गले कधीही स्वस्थ बसलेले नाहीत. दररोज काही ना काही वाचन करणे, फिरायला जाणे ही त्यांची दैनंदिनी आहे. वाचाल तर वाचाल...या उक्तीप्रमाणे दररोज सकाळी वर्तमानपत्र वाचून स्वतःला अपडेट करूनच ते घराबाहेर पडतात. ग्लोबलायझेशनच्या काळात इंटरनेटचं महत्व वाढलं असल्याचं आणि हा आलेख उंचावतच राहणार असल्याचं महत्व त्यांना पटलं आहे. आपले चिरंजीव रविंद्र यांच्याकडून ते सध्या दररोज इंटरनेटचे धडे घेत आहेत. रविंद्र हे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अनुवादक म्हणून सध्या कार्यरत असून इंग्रजीवर त्यांचे प्रभुत्व आहे. मराठी भाषा सुद्धा त्यांना बर्‍यापैकी समजते. विशेषतः मराठी भाषेतला "ळ" या शब्दाचा उच्चार ते व्यवस्थित करतात. रविंद्र यांचेही जिज्ञासेमुळे सतत वाचन, लेखन सुरूच असते. यासाठी ते आई-वडिलांचे संस्काराचे आउटपुट...या शब्दात आपल्या भावना व्यक्त करतात. आपले वडिल सध्या माहितीचे आगार असलेल्या इंटरनेटची तसंच ट्विटर, फेसबुक, ऑर्कुट बद्दल माहिती जाणून घेत असून प्राथमिक माहिती जाणून घेत आहेत.
अनेक शहरांमध्ये अजून इंटरनेटचा वापर करण्यात बर्‍याच प्रमाणत तरूणाई उदासीन दिसते, शासकीय अधिकारी सुद्धा इंटरनेटचा फारसा उपयोग करताना दिसत नाहीत. श्री. एन. पी. बर्गले यांच्यापासून इंटरनेटची माहिती नसलेल्या, वापर न करणार्‍या तरूण मित्रांनी थोडातरी बोध घ्यावा, हीच अपेक्षा.

जेव्हा पुतळे बोलू लागतात...

मध्य प्रदेशातल्या धार येथील फडके स्टुडिओमध्ये तयार करण्यात आलेले हे पुतळे एकमेकांशी बोलत आहेत असा भास न झाल्यास नवलच...

बुधवार, ४ मे, २०११

अजित पवार यांची 6 मे स सह्याद्री वाहिनीवर मुलाखत

मुंबई, ता. ४ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विशेष मुलाखत उद्या (ता. ५ मे) दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून रात्री आठ वाजता प्रसारित होणार आहे. पत्रकार राजू परुळेकर यांनी 'जय महाराष्ट्र' या कार्यक्रमात ही मुलाखत घेतली आहे.
या मुलाखतीमध्ये उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या गेल्या ५० वर्षातील प्रगतीचा आढावा घेतानाच भविष्यातील वैभवशाली महाराष्ट्राबाबतचे आपले विचार व्यक्त केले आहेत. राज्याची कृषीप्रगती, शैक्षणिक विकास, अर्थव्यवस्था, सिंचनक्षमता, उर्जास्थिती अशा विविध विषयांवर देखील उपमुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका मांडली असून उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्याविषयीचे गैरसमज दूरही केले आहेत. मा हिती व जनसंपर्क महासंचालनालयातील निर्मित 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमातील या एक तासाच्या मुलाखतीचे पुनःप्रसारण शुक्रवारी सकाळी साडेसात ते साडेआठ या वेळेत करण्यात येणार आहे.

मुंबई येथे राष्ट्रीय पातळीवर खुली लेख स्पर्धा

मुंबई, ता. ३ - मुंबई येथे संवादिनी संस्थेतर्फे राष्ट्रीय पातळीवर लेख स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. संवादिनी संस्था प्रामुख्याने ओबीसी वर्गासाठी कार्यरत असून या अनुषंगाने विविध उपक्रम राबविले जातात. याचा एक भाग म्हणून संस्थेने राष्ट्रीय पातळीवर लेख स्पर्धा आयोजित केली आहे.
लेख स्पर्धेचे विषय असे- १. बहुजनांच्या विकासात शासकीय योजनांची भूमिका, २. मी, माझी संस्था आणि बहुजन विकास, ३. आजचा बहुजन समाज आणि राजकारण, ४. आजच्या बहुजन स्त्रियांचे अस्तित्व इ.
उपरोक्त चार विषयांसाठी स्पर्धा असून शब्दमर्यादा १५०० ते २०००० पर्यंत असावी. ही लेख स्पर्धा सर्वांसाठी खुली असून २० मे २०११ पर्यंत अरूण लावंड, सी/२४, सहकार नगर, वडाळा, मुंबई - ३१ येथे पाठवावे. अधिक माहितीसाठी अरूण लावंड ९८६९७४६५१८ किंवा श्रीकृष्ण नाईक ९७५७१७५३९४ येथे संपर्क साधावा.

मंगळवार, ३ मे, २०११

गीतसम्राट हरपला: अजित पवार

मुंबई, ता. ३ - शब्दशृंगारात न्हालेल्या लावणीला मराठी चिरंतन गुंजत ठेवणारा आणि मराठी चित्रपट गीतांना आपल्या शब्दांनी सजवणारा गीतसम्राट हरपला आहे. अशा शब्दात गीतकार जगदीश खेबुडकर यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुःख व्यक्त केले आहे.
आपल्या शोकसंदेशात श्री. पवार म्हणाले, की खेबुडकरांच्या शब्दांनी भक्तांना दत्तगुरुंचं दर्शन घडवं, लहानग्यांना निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपल्याचं सांगितलं, कोल्हापूरच्या लवंगी मिरचीचा ठसका दाखवला, तर बुगडी सांडल्याची चुगली न करण्याची गळ देखील घातली. पिंजरा, सामना, साधी माणसं या चित्रपटातील त्यांच्या गीतांनी मराठी चित्रपटसृष्टीवर ठसा उमटवला आहे. मराठी चित्रपटगीतांना लोकप्रिय करणार्‍या गीतकारांमध्ये त्यांचे स्थान अत्युच्च होते. त्यांच्या लेखणीतून साकारलेली भक्तीगीते, भावगीते, लोकगीते, चित्रपटगीते मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवत राहील. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटगीते पोरकी झाली आहेत.

खेबुडकर यांच्या निधनामुळे श्रेष्ठ कवी काळाच्या पडद्याआड - भुजबळ


मुंबई, दि. 3 मे : अनेक वर्षांपासून आपल्या गीतांच्या माध्यमातून मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ कवी व गीतकार जगदीश खेबुडकर यांचे मंगळवारी (ता. ३ मे) दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. गेल्या 15 दिवसांपासून कोल्हापूर येथील आधार रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
ज्येष्ठ गीतकार जगदीश खेबुडकर यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीतील एक श्रेष्ठ कवी काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
श्री. भुजबळ यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, सोपी, सहजसुंदर शब्दरचना, नादमाधुर्य आणि गेयता ही जगदीश खेबुडकर यांच्या लेखणीची प्रमुख वैशिष्टये होती. पी. सावळाराम, शांता शेळके आणि ग.दि. माडगूळकर यांच्या बरोबरीने मराठी चित्रपटसृष्टीचे सुवर्णयुग अधिक श्रवणीय बनविण्यामध्ये खेबुडकर यांचा मोलाचा वाटा राहिला. लावणी हा गीतप्रकार सर्वाधिक हाताळणाऱ्या खेबुडकरांनी तितक्याच ताकतीने भक्तिगीते, भावगीते, बालगीते, प्रेमगीते सुध्दा लिहीली. 'पिंजरा'मधील लावण्यांसह त्यांची 'कुठं कुठं जायाचं हनिमूनला', 'सोळावं वरीस धोक्याचं', 'बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला', 'राजा ललकारी अशी दे', 'ऐरणीच्या देवा', 'देहाची तिजोरी', 'शुभं करोती म्हणा मुलांनो', 'सत्य शिवाहून सुंदर हे'.. अशी एकापेक्षा एक सरस गीते अजरामर बनली आहेत. खेबुडकरांच्या उल्लेखाशिवाय मराठी चित्रपटसृष्टीचा इतिहास कधीही पूर्ण होऊ शकणार नाही, असेही श्री. भुजबळ यांनी म्हटले आहे.

अंधेरी येथील नूतन 'आरटीओ' इमारतीचा पहिला मजला 15 दिवसांत सुसज्ज करावा - छगन भुजबळ


मुंबई, दि. 2 मे : अंधेरी (पश्चिम) येथील प्रादेशिक परिवहन विभागाचे (आरटीओ) कामकाज नूतन इमारतीतून सुरू व्हावे, या दृष्टीने या इमारतीच्या किमान पहिल्या मजल्याचे संपूर्ण काम येत्या 15 दिवसांच्या आत पूर्ण करावे, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या सर्व कामाची पाहणी करण्यासाठी आपण स्वत: भेट देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अंधेरी (पश्चिम) येथील महाराष्ट्र शासनाच्या मालकीच्या व प्रादेशिक परिवहन विभागाच्या ताब्यातील भूखंडाच्या खाजगीकरणाच्या माध्यमातून सुरू असलेल्या पुनर्विकासाच्या कामाचा श्री. भुजबळ यांनी आज मंत्रालयातील आपल्या दालनात आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
प्रादेशिक परिवहन विभागाची इमारत स्टील्ट अधिक दुमजली असणार आहे. हे बांधकाम पूर्ण झाले असून अंतर्गत सजावटीचे काम बाकी असल्याची माहिती श्री. भुजबळ यांना देण्यात आली. त्यावर ते म्हणाले, इमारतीच्या पहिल्या मजल्याचे काम तातडीने पूर्ण करुन घ्यावे, जेणे करून प्रादेशिक परिवहन विभागाचे कामकाज नव्या इमारतीत स्थलांतरित करता येऊ शकेल. त्याचबरोबर पाणी व विजेच्या जुन्या जोडण्याही नव्या इमारतीत स्थलांतरित करून द्या. म्हणजे विभागाच्या कामात काही अडचण उद्भवणार नाही. या कामासाठी आवश्यकता भासल्यास अतिरिक्त मनुष्यबळाचाही वापर करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या भूखंडावरील झोपडपट्टी पुनर्वसनासह नाला सरळीकरण व भूखंडातून जाणाऱ्या प्रस्तावित डी.पी. रोडसंदर्भात संबंधित नगरविकास विभाग, गृहनिर्माण विभाग तसेच मुंबई महानगरपालिका यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढण्याची सूचनाही श्री. भुजबळ यांनी यावेळी केली.

महाराष्ट्र सदन, हायमाऊंटचे काम प्रगतीपथावर
या बैठकीत श्री. भुजबळ यांनी नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन तसेच हायमाऊंट राज्य अतिथीगृहाच्या कामकाजाच्या प्रगतीविषयीही माहिती घेतली. महाराष्ट्र सदनाचे बांधकाम पूर्ण झाले असून सध्या लँडस्केपिंगचे काम सुरू असून ते झाले की अंतर्गत सजावटीचे काम सुरू करण्यात येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली. हायमाऊंट या एकूण नऊ मजल्यांच्या इमारतीच्या पाचव्या स्लॅबचे काम सध्या सुरू असून पहिल्या मजल्याच्या भिंतींच्या बांधकामालाही सुरवात करण्यात आली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप

(पनवेल):  राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...