मुख्य सामग्रीवर वगळा

नवी मुंबई मेट्रो शहराचा चेहरा बदलणार: पृथ्वीराज चव्हाण

मुंबई, ता. १ - नवी मुंबईने सर्वांगीण विकासासाठी वेग घेतला आहे. ही निश्चितच आदर्शदायी बाब आहे. देशातील पहिला मेट्रो प्रकल्प स्वतः सिडको महामंडळाकडून राबविण्यात येत आहे. विमानतळ व मेट्रो सारखे महत्वाकांक्षी प्रकल्प तसेच राज्य शासन व सिडकोच्या माध्यमातून उभारण्यात येणारे भविष्यातील विविध प्रकल्प आधुनिक पद्धतीने उभारून नवी मुंबई उपनगराचा 'सुपरसिटी' असा विकास करण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. प्रकल्पावर कोणताही अन्याय होऊ देणार नसल्याचे अभिवचन यावेळी त्यांनी दिले.
श्री. चव्हाण यांच्या हस्ते नवी मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या बेलापूर ते पेंधर मार्गिकेच्या विकासकार्याचे भूमिपूजन रविवारी (ता. १ मे) सेंट्रल पार्क मेट्रो रेल्वे स्थानक (नियोजित) नवी मुंबई येथे करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. श्री. चव्हाण पुढे म्हणाले, की नवी मुंबईतील अंतर्गत परिवहनास अधिक व्यापकता व गती देण्याची क्षमता या प्रकल्पात असून, नवी मुंबई प्रकल्पाची उभारणी ही सर्वस्वी सिडको महामंडळाची आहे. या प्रकल्पामुळे नागरीकरणास चालना मिळेल आणि यामुळे आर्थिक प्रगती सुद्धा साधली जाईल. विमानतळापाठोपाठ मेट्रो रेल्वे प्रकल्प व नागरीक सुविधा विकासाला मानवी चेहरा प्रदान करेल.
कार्यक्रमास जलसंपदामंत्री व रायगडचे पालकमंत्री सुनिल तटकरे, राज्य उत्पादनशुल्क व अपारंपारिक उर्जामंत्री व ठाण्याचे पालकमंत्री गणेश नाईक, सिडको अध्यक्ष नकुल पाटील, खासदार डॉ. संजीव नाईक, सिडको संचालक सुभाष भोईर, आमदार प्रशांत ठाकूर, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील पहिल्या टप्प्यात ११.१० किमी. लांबीच्या बेलापूर ते पेंढर मार्गिका क्र. १ च्या बांधकामास १९८४ कोटी खर्च अपेक्षित असून ११ रेल्वे स्थानके बांधण्यात येतील. हे काम १ मे २०१४ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. मोहन निनावे यांनी तर आभार मुख्य अभियंता बिपीनचंद्र मेहता यांनी मानले.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझे पसंतीचे सिडकोचे घर; गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत बुधवारी

 मुंबई- माझे पसंतीचे सिडकोचे घर; गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत 19 फेब्रुवारी 2025 पार पडणार २६,००० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार होण्याच्या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनाचे औचित्य साधून सिडको महामंडळाच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत बुधवार, दि. 19 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी २.०० ते ४.०० च्या दरम्यान पार पडणार आहे. प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळासोबतच सोडतीचे थेट प्रक्षेपण वेबकास्टींगच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यामुळे अर्जदार आपल्या सोयीच्या ठिकाणाहून या सोडतीचे साक्षीदार होऊ शकतात. सोडत प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण https://cidcohomes.com या संकेतस्थळावर करण्यात येणार आहे. अर्जदार सदर संकेतस्थळावर, त्यांच्या सिडको होम खात्यात लॉग इन करून सोडतीचा निकाल घरबसल्या देखील पाहू शकतात. याशिवाय सोडतीचे थेट प्रक्षेपण खारघर पूर्व (तळोजा): भूखंड क्र.१४, सेक्टर-३७, तळोजा पंचानंद, पनवेल, रायगड, ४१०२०८, खांदेश्वर: भूखंड क्र. १, सेक्टर-२८, खांदेश्वर रेल्वे स्टेशन, कामोठे, पनवेल, रायगड, ४१०२०९, खारघर: भूखंड क्र. ६३ ...

धुळे ,नंदुरबार व अकोला जिल्हापरिषदा आणि पंचायत समित्यांसाठी शांततेत मतदान- आज मतमोजणी

मुंबई दि.01 :- राज्यात धुळे ,नंदुरबार व अकोला या तीन जिल्हापरिषदाआणि त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांसाठी एकूण अंदाजे सरासरी ५६ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत व सुरळीत पार पडली अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाने दि.६ नोंव्हेबर २०१३रोजी धुळे ,नंदुरबार व अकोला या जिल्हापरिषदा व त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार मतदान घेण्यात आले. धुळे जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी५५टक्के, अकोला जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ५५ टक्के तसेच नंदूरबारजिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ६० टक्के मतदान झाले. वरील सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली असून उद्या दिनांक ०२ डिसेंबर, 2013 रोजी मतमोजणी होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल अशीही माहिती श्रीमती सत्यनारायण यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदभार स्वीकारला

मुंबई, ता. ११- महाराष्ट्राचे नूतन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (ता. ११) रात्री नऊच्या सुमारास मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील दालनात उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. सर्व लोकांना सोबत घेऊन जाण्याचे आपले धोरण असून केवळ बोलण्याऐवजी कृतीवर भर राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राजभवनावरील शपथविधीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर पवार यांनी नूतन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत मणिभवन आणि चैत्यभूमी येथे जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना वंदन केले. यानंतर मंत्रालयात राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण केली. मंत्रालयातील मिनी थिएटरमध्ये पत्रकारांशी वार्तालाप केल्यानंतर मुख्यसचिव, अप्पर मुख्यसचिव, सचिव तसेच अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांसमवेत बैठक घेतली. सुमारे दीड तास ही बैठक चालली. यावेळी राज्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. नागपूर येथे होणार्‍या आगामी हिवाळी अधिवेशनाचीही चर्चा करण्यात आली.