सोमवार, ६ डिसेंबर, २०१०

नवीन पनवेल येथे शहीद तुषार चव्हाण उद्यानाचे पालकमंत्री तटकरे यांच्या हस्ते उदघाटन

नवीन पनवेल, ता. ५- येथील सेक्टर-११ मध्ये लेफ्टनंट तुषार शामराव चव्हाण नूतनीकृत उद्यानाचे राज्याचे जलसंपदामंत्री व रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री सुनिल तटकरे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. सिडकोचे अध्यक्ष नकूल पाटील अध्यक्षस्थानी होते.
यावेळी श्री. तटकरे म्हणाले, की भविष्यातील गरज ओळखून भौतिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यावर सिडकोचा भर आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे होणार असल्यामुळे सिडकोची जबाबदारी भविष्यात वाढणार आहे. नवी मुंबईचा विकास करताना सिडकोने प्रामुख्याने लोकोपयोगी मोकळ्या जागेवर सौंदर्यात भर घालणार्‍या उद्यानांची निर्मिती केल्यामुळे आजचा क्षण आपण पहात आहोत.
सिडकोचे अध्यक्ष नकूल पाटील म्हणाले, की नवीन पनवेल येथील झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाकरिता सकारात्मक विचार केला जात आहे. कार्यक्रमास नगरपरिषद अध्यक्ष सुनिल मोहोड, नगरसेविका शशिकला सिंह, शहीद लेफ्टनंट चव्हाण यांचे आई-वडिल, सिडकोचे मुख्य अभियंता ए. एस. पाटील, अतिरिक्त मुख्य अभियंता संजय चौधरी, जनसंपर्क अधिकारी डॉ. दिलीप वाटाणे, उद्यान अधिकारी टी. आर. कांबळे आदी उपस्थित होते. आभार सिडकोचे जनसंपर्क अधिकारी डॉ. मोहन निनावे यांनी केले.

जैतापूर प्रकल्पामुळे कोणतीही हानी नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार

नागपूर, ता. ५- जैतापूर प्रकल्पामुळे पर्यावरणाची कोणतीही हानी होणार नाही, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. विधान परिषद अधिवेशन प्रसंगी पत्रकारांच्या सुयोग या निवासस्थानी पवार यांनी दिलेल्या सदिच्छा भेटीत एका प्रश्नावर आपले मत व्यक्त केले.
जैतापूर प्रकल्पामुळे पर्यावरणाची कोणतीही हानी होणार नसून नागरीकांचा फायदाच होणार आहे. अणू ऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष अनिल काकोडकर यांनीही या प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे, असे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले. राज्याला डिसेंबर २०१२ पर्यंत भारनियमनमुक्त करण्याचे शासनाचे नियोजन आहे. राज्याच्या विविध भागात कार्यान्वित होणार्‍या नवीन ऊर्जा निर्मिती प्रकल्पांमुळे राज्याला वीज उपलब्ध होईल. याचबरोबर वाढीव वीज मिळण्याची विनंती देखील केंद्राकडे करण्यात आली आहे. साखर कारखान्यांच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पातून वीज निर्मिती केली जात आहे. फीडर सेपरेशन, सिंगल फेजिंग आदी सुधारणाही केल्या जात आहेत. दरवर्षी होणारी विजेची मागणी ध्यानात ठेवूनच नियोजन करण्यात आले आहे.
आपले मुख्यमंत्री चव्हाण यांच्याशी चांगले ट्यूनिंग असून त्यांच्या संसदेच्या अनुभवामुळे राज्यातील जनतेला चांगला रिझल्ट मिळेल असे पवार यांनी सांगितले. यावेळी सुयोग शिबिर प्रमुख प्रविण पुरो, मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रकाश सावंत, माहिती जनसंपर्क महासंचालनालयाचे उपसंचालक शिवाजी मानकर उपस्थित होते.

मला जे जमलं ते सगळ्यांनाच जमेल असे नाही-भुजबळ

नागपूर, ता. ५- मला जे जमलं ते सगळ्यांनाच जमेल असे नाही, या शब्दात राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. महाराष्ट्र विधान परिषदेतून पाच डिसेंबरला निवृत्त होणार्‍या अकरा सदस्यांच्या निरोप समारंभानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
विधानपरिषदेचे अकरा सदस्य पाच डिसेंबरला निवृत्त होत असल्याबद्दल एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना भुजबळ यांच्या मनोगतावर शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. उपमुख्यमंत्री अजित दादा यांचा रोख भुजबळ यांच्याकडेच असल्याचे सूचित करण्याचा प्रयत्न श्री. रावते यांनी केला. यावर भुजबळ यांनी त्यांच्या टिप्पणीवर बोलताना म्हणाले, की अभिनय ही एक अभिजात कला आहे. ती कोणालाही सहजसाध्य नाही. नाट्य आणि नाटकीपणा यातही फरक असतो. माझ्या या नाट्यामुळेच मी २५ वर्षे तुमचा नेता होतो. विरोधी पक्षनेता बनलो आणि सत्तारूढ पक्षाला धारेवर धरले ते देखील याच नाट्याच्या जोरावर, याचं भान असू द्या. मला जे जमलं ते सगळ्यांनाच जमेल असे नाही.
तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सदस्य डॉ. एन. पी. हिराणी यांच्या वेगळ्या पैलूवर प्रकाश टाकताना, डॉ. हिराणी हे उत्तम नाट्य अभिनेते आहेत, मात्र त्यांनी आपल्या वागण्या-बोलण्यात कधीही नाटकीपणा जाणवू दिला नाही या शब्दात त्यांचे कौतुक केले. यानंतर नाट्य विषयावर शिवसेना नेते रावते व भुजबळ यांच्यात शाब्दिक चकमक झाली.
सुमारे तीस वर्षे वरिष्ठ सभागृहाचे सदस्य राहिलेल्या बी. टी. देशमुख यांना काही उद्योजकांच्या विरोधी प्रयत्नांमुळे निवडणूकीत निवडून येण्यापासून वंचित रहावे लागल्याची खंत भुजबळ यांनी व्यक्त केली. निवडणुकीच्या माध्यमातून विधीमंडळात थेट प्रवेश न करू शकणार्‍या विविध क्षेत्रातील विद्वान, तज्ज्ञ व्यक्तींच्या अनुभवाचा लाभ कायदेमंडळास व्हावा या दृष्टीने विधान परिषद सभागृहाची रचना करण्यात आली आहे. परंतू, या सभागृहापासून सरस्वतीपुत्र दूर रहायला लागले आणि लक्ष्मीपुत्रच पुढे येऊ लागल्यास व्यासपीठाचे औचित्य आणि पावित्र्य राहणार नाही अशी भीती श्री. भुजबळ यांनी व्यक्त केली.

रविवार, ५ डिसेंबर, २०१०

थंडीस सुरवात: गहू पीकास पोषक हवामान

मध्य प्रदेश, महाराष्ट्रासह देशात ठिकठिकाणी गेल्या आठवड्यापासून थंडीस सुरवात झाली आहे. मध्यंतरी अनेक ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे यंदा पावसाळा बराच लांबला होता. डिसेंबर महिना उजाडला तरी देखील पाऊस सुरू असल्यामुळे थंडी पडण्याबद्दल साशंक असतानाच दोन दिवसांपासून वातावरणात बदल जाणवू लागला आहे.
सर्वत्र कमी अधिक प्रमाणात थंडी जाणवू लागली आहे. रात्रीच्या किमान तापमानात लक्षणीय घसरण झाल्यामुळे पाऊस पूर्ण गेल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. गहू, हरभरा या रब्बी पिकांना हे वातावरण पोषक असून शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत.

सदस्यांचे वेतन कापण्याची तरतूद होणे आवश्यक

लोकसभेच्या अधिवेशनात चौदा दिवस सभा तहकूब करण्यात आली. महाराष्ट्राच्या विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांच्या गोंधळामुळे दुपारपर्यंत सभा तहकूब करण्यात आली. लोकसभा अथवा विधानसभा अधिवेशन असले, तरीही यासाठी दररोज लाखो रुपये खर्च होतो. सदस्यांच्या निवास व्यवस्थेपासून सुरक्षेपर्यंत सर्वच तरतूद शासनास करणे आवश्यक असते. या अधिवेशनासाठी सदस्यांना दररोजचा भत्ता दिला जातो. एकूण लाखोंच्या घरात असलेल्या या खर्चासाठी सामान्य नागरिकांकडूनच कर आदी माध्यमातूनच जमा झालेल्या पैशातूनच हा भत्ता दिला जातो, हे जगजाहीर आहे. नुकत्याच झालेल्या संसदेच्या अधिवेशनात विरोधकांमुळे अनेकदा सभा तहकूब झाली.
विरोधक अथवा सत्तारूढ पक्षाच्या सदस्यांनी कोणत्याही उपाययोजनेस अथवा नवीन अंमलबजावणी, प्रश्नोत्तरी, चर्चा या मार्गांनी देखील समस्येचे निराकरण होत नसल्यास, दिवसभर सभा तहकूब करावी  लागल्यास सत्तारूढ आणि विरोधी अशा दोन्ही सदस्यांना दररोज दिल्या जाणाऱ्या भत्त्यात कपात करण्याची तजवीज, तरतूद कायद्यात करण्यात यावी, त्यांना त्या दिवसाचा कोणताही भत्ताच किंबहुना देण्यात येऊ नये, दंड म्हणून त्यांच्याकडून प्रति दिवस किमान एक हजार ते पाच हजारांपर्यंत पैसे अधिकृत रितीने वसूल करून तो पैसा शासनाच्या महसूलात जमा करण्यात यावा. पोटाला चिमटा बसल्यास सर्व सुरळीत सुरू होऊन, वेळ, काळ, अर्थ अपव्यय होणार नाही, हीच अपेक्षा...!

शुक्रवार, ३ डिसेंबर, २०१०

अपंग विद्यार्थ्यांचे "रामायण ऑन व्हील्स" वाखाणण्यासारखे...

पुणे येथे नुकतेच अपंग विद्यार्थ्यांनी "रामायण ऑन व्हील्स" हे महानाट्य सादर केले. चांगल्या शरीरयष्टीच्या धडधाकट मुलांनी यांचा आदर्श घेण्याची आवश्यकता आहे. या अपंग विद्यार्थ्यांनी त्यांच्या अपंगत्वाकडे दुर्लक्ष करून अनेक दिवस तासन् तास मेहनत केली. या महानाट्यास मिळालेला प्रतिसाद आणि त्यांचे अभिनय कौशल्य खरोखर वाखाणण्यासारखे आहे. हातपाय धडधाकट असूनही काम नसल्याचे रडगाणे गाणार्‍या मुलांनी, युवकांनी अपंग मुलांचे हे गुण लक्षात घेऊन स्वतः देखील एखादा मोठा गट स्थापन करून अशाप्रकारचे महानाट्य अथवा कोणतेही चांगले काम, कार्य करावे, हीच अपेक्षा...!

गुरुवार, २ डिसेंबर, २०१०

स्मार्टकार्ड माध्यमातून पथकर : प्रायोगिक चाचण्या सुरू- भुजबळ

आधुनिक स्मार्ट कार्डद्वारे पथकर गोळा करण्याच्या यंत्रणेच्या प्रायोगिक चाचण्या सध्या सुरू आहेत. अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी दिली. हिवाळी अधिवेशनाच्या वार्तांकनासाठी येणार्‍या पत्रकारांच्या सुयोग निवासस्थानास त्यांनी आज दिलेल्या सदिच्छा भेटीत ते बोलत होते.
श्री. भुजबळ म्हणाले, की पथकर गोळा करणार्‍या नाक्यांवर कर भरण्यासाठी सध्या वाहनांना थांबावे लागते. त्यांना असे थांबावे लागू नये, यासाठी आधुनिक स्मार्ट कार्डच्या माध्यमातून पथकर गोळा करण्याच्या यंत्रणेच्या प्रायोगिक चाचण्या सध्या सुरू आहेत. या चाचण्या यशस्वी झाल्या की टोल नाक्यांवर वाहनधारकांना अजिबात थांबावे न लागता टोल वसूल करता येऊ शकेल.

खासगीकरणातून बांधा-वापरा-हस्तांतरीत करा अर्थात बीओटी तत्वावर रस्त्यांची कामे करताना ही संपूर्ण प्रक्रिया राज्य शासनाच्या वतीने अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबविली जाते. हे रस्ते पूर्णपणे केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार बांधले जातात. यासंबंधीचे प्रस्ताव वित्त व नियोजन विभाग, मुख्यमंत्री तसेच मंत्रीमंडळ पायाभूत उपसमिती इ. टप्प्यांवर मंजूर झाल्यानंतरच कंत्राटदारांकडे कामे सोपविली जातात. या कामासंदर्भात अटी न पाळणार्‍या कंत्राटदारांबाबत, अशा रस्त्यांच्या बाबतीत तक्रारी किंवा अनियमितता आढळल्यास त्या शासनाच्या निदर्शनास आणाव्यात, यावर कारवाई करण्यात येईल. परंतु सरसकट पथकर न आकारण्याची मागणी करणे राज्यात सध्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या कोट्यवधी रुपये खर्चाच्या पायाभूत सुविधा विकासाच्या कामांसाठी मारक ठरेल व खासगीकरणातून रस्त्यांच्या कामासाठी कोणीही पुढे येणार नाही.
एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, की पावसाळ्यात शासकीय निकषांनुसार ६५ मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्यास अतिवृष्टी समजून नुकसान भरपाई दिली जाते. परंतू हे पावसाळ्यापुरतेच मर्यादित असते. मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसाकरिता हा निकष न लावता, नुकसानीची पाहणी करून शेतकर्‍यांना नुकसानभरपाई देण्याची शासनाची भूमिका आहे.
नागपूर येथे विधीमंडळ अधिवेशनासाठी येणार्‍या पत्रकारांच्या नवीन निवासस्थानासंबंधीच्या सुमारे साडेचार कोटी रुपये खर्चाची योजना मान्यतेच्या प्रतीक्षेत असल्याचे त्यांनी सांगितले. शिबीर प्रमुख पत्रकार प्रवीण पुरो यांनी भुजबळ यांचे स्वागत केले. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचलनालयाच्या नागपूर विभागाचे संचालक भि. म. कौशल, उपसंचालक (वृत्त) शिवाजी मानकर तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यातील २३ पथकर नाके बंद;११ पथकर नाक्यांवरील वसुलीस स्थगिती: भुजबळ

संग्रहित छायाचित्र
नागपूर, ता.१- राज्यात अर्थसंकल्पीय निधीतून तसेच खासगीकरणांतर्गत (बीओटी) करण्यात आलेले २३ पथकर नाके कायमस्वरुपी बंद तर ११ पथकर नाक्यांवरील वसूलीस स्थगिती देण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

श्री. भुजबळ म्हणाले, की राज्यात खासगीकरणांतर्गत तयार करण्यात आलेले रस्ते सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी निविदा शर्तींनुसार संबंधित उद्योजकांवर आहे. तथापि, आठ प्रकल्पांच्या उद्योजकांनी रस्त्यांचे नूतनीकरण वेळेत न केल्यामुळे त्यांच्य पथकर वसूलीस स्थगिती देण्यात आली आहे. भविष्यातही जे उद्योजक रस्त्याचे नूतनीकरण करणार नाहीत, त्यांची पथकर वसूली स्थगित करण्यात यावी, असे निर्देशही भुजबळ यांनी विभागाच्या मुख्य अभियंत्यांना दिले आहेत.

उद्योजकांनी वेळोवेळी देखभाल-दुरुस्ती अथवा नूतनीकरण न केल्यामुळे स्थगिती देण्यात आलेले रस्ते: १) पूर्णा-शिरूर रस्ता (राज्यमार्ग क्र. ६०), २) वडगाव-चाकण-शिक्रापूर (राज्यमार्ग क्र. ५५), ३) सातारा-पंढरपूर-मोहोळ (राज्यमार्ग क्र. ७४), ४) अक्कलकोट-मैंदर्गी (जि. सोलापूर), ५) अहमदनगर-करमाळा (राज्यमार्ग क्र. १४१), ६) अहमदनगर-दौंड (राज्यमार्ग क्र. १०), ७) अहमदनगर-टाकळी काझी-जामखेड-खर्डा रस्ता ८) अहमदनगर-आष्टी-जामखेड रस्ता (राज्यमार्ग क्र. १४२) इ.
राज्यात खासगीकरणांतर्गत तयार केलेल्या रस्त्यावरील खड्डे भरण्याबाबत उद्योजकांना सूचना देण्यात आल्या होत्या. तथापि मुंब्रा-कौसा बाह्यवळण रस्ता, अक्कलकोट-मैंदर्गी-निंबाळ रस्ता आणि टेंभूर्णी-कुर्डूवाडी-बार्शी-लातूर राज्यमार्गावरील बार्शी बाह्यवळण मार्ग या तीन मार्गांची कामे करणार्‍या उद्योजकांनी वेळेत खड्डे न भरल्याने तेथील पथकर वसुलीस स्थगिती देण्यात आली आहे.
बार्शी बाह्यवळण रस्त्यावरील खड्डे भरण्यात आल्यामुळे तेथील वसुली सुरू करण्यात आली आहे.

अर्थसंकल्पीय निधीतून करण्यात आलेल्या परंतू नव्या पथकर धोरणानुसार पथकर वसूली बंद करण्यात आलेले रस्ते- कोरपणा-कोडशी रस्त्यावरील पैनगंगा नदीवरील पुलाचे बांधकाम, कल्याण-बापगाव-पडघा रस्त्यावरील उल्हास नदीवरील गांधारी पुलाचे बांधकाम, पालघर-दारशेत रस्त्यावरील वैतरणा पुलाचे बांधकाम, बल्लारशा-गोंडपिंपरी आलापल्ली रस्त्यावरील कोठारी नदीवरील पूल, नागभीड-वडसा मार्गावरील हरदोली गावाजवळील वैनगंगा नदीवरील पूल, अलूरपुरी-कवठे-वाडाधरी रस्त्यावर सांगवी गावाजवळील पूल, दर्यापूर-रामतीर्थ-करतखेडा-म्हैसांग रस्त्यावर पूर्णा नदीवरील पूल, जळगाव-इदगाव-चिंचोली रस्त्यावरील तापी नदीवरील पूल. इ.

बुधवार, १ डिसेंबर, २०१०

मध्य प्रदेशात गुलाबी थंडीची चाहुल...

गेल्या महिन्यात सर्वत्र झालेल्या अवकाळी पावसामुळे यंदा थंडी उशीरा पडते की काय? असा विचार डोकावत असतानाच मध्य प्रदेशात दोन दिवसापासून हवामानात बदल झाला आहे. काही भागात सकाळी धुके दिसत असून वाहनांवर दव पडलेले दृश्य सकाळी दिसते. नोकरीनिमित्त बाहेरगावी जाणार्‍या लोकांच्या अंगावर स्वेटर, मफलर, कानटोपी तर महिलांच्या अंगावर शाल दिसत आहे. पारा देखील खाली घसरला असून रात्रीच्या किमान तापमानात घट झाली आहे. गुलाबी थंडीत पहाटे फिरायला जाणार्‍यांची संख्या वाढली आहे. तज्ज्ञांनी देखील आता पावसाळा संपला असण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

उत्तम कांबळे यांना मानाचा मुजरा...

दैनिक सकाळचे मुख्य संपादक, साहित्यिक आणि नियोजित अखील भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष उत्तम कांबळे यांचे साहित्य आता कन्नड भाषेत देखील प्रकाशित करण्यात येणार आहे. श्री. कांबळे यांच्या समृद्ध लेखणीतून तयार झालेल्या प्रत्येक शब्दाने साहित्य आणखी समृद्ध परिपक्व केल्याचे हे द्योतक ठरावे. मराठी भाषेत आणि विशेष म्हणजे लेखणी-साहित्यात किती गोडवा आहे हे यावरून लक्षात येते. श्री. कांबळे यांनी लेखणीत मराठी शब्द असे वळविले की दुसर्‍या भाषेला सुद्धा मराठीकडे वळावे लागले असून फलश्रृती म्हणजे कन्नड भाषेत देखील त्यांच्या साहित्याचा अनुवाद करण्यात येणार आहे. साहित्यिक सर्जू काटकर यांनी, कांबळे यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे रूपांतर कन्नडमध्ये केल्यानंतर कन्नड भाषेत सुद्धा अल्पावधीतच हे पुस्तक बहुश्रृत झाले. श्री. कांबळे यांच्यावर आईने मायेने फिरवलेला हात आणि मोरपिसाच्या मंद वार्‍याची झुळूक आणि शब्दांचा दरवळ या जादूने हे साध्य झाले आहे.
इंग्रजाळलेली मराठी बोलणार्‍या, मराठी असूनही एकमेकांशी इंग्रजी अथवा दुसर्‍या भाषेत संवाद साधणार्‍या बांधवांनी यातून बोध जरूर घ्यावा, ही अपेक्षा..!

कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप

(पनवेल):  राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...