बुधवार, २७ ऑक्टोबर, २०१०

मुंबई येथे "बर्ड्स अँड बिग कॅट्स" छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन

"बर्ड्स अँड बिग कॅट्स" प्रदर्शन उदघाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, किरण शांताराम, अ‍ॅड. अधिक शिरोडकर आदी
जहांगिर आर्ट गॅलरी मुंबई येथे "बर्ड्स अँड बिग कॅट्स" या छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. नामवंत कायदेतज्ज्ञ अ‍ॅड. अधिक शिरोडकर यांनी काढलेल्या छायाचित्रांचे हे प्रदर्शन आहे.
अ‍ॅड. शिरोडकर यांच्या छायाचित्रणाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून निसर्ग आणि वन्यजीवांमध्ये रमले आहेत. त्यांनी काढलेली दुर्मिळ छायाचित्रे "बर्ड्स अँड बिग कॅट्स" या प्रदर्शनात आहेत. यावेळी श्री. भुजबळ म्हणाले, शिरोडकर यांनी पर्यावरण संवर्धनात मोलाचे योगदान दिले असून, हे प्रदर्शन मनाला आनंद आणि निसर्गाच्या वैविध्याचा परिचय करून देणारे आहे. डिजिटल युगात छायाचित्रणाची कला बरीच सुलभ झाली आहे. परंतु जुन्या कॅमेर्‍यांनी छायाचित्रण करताना खूप कसरत आणि मेहनत करावी लागते. मनासारख्या छायाचित्रासाठी विशिष्ट क्षणाची वाट पहावी लागत असून, संयमाच्या या परीक्षेत शिरोडकर यांनी अद्वितीय यश संपादन केले आहे. त्यांचा अभ्यास विचारात घेऊन त्यांना पर्यावरण विषयक विविध समित्यांवर सदस्य म्हणून घेण्यात आले आहे.
वन्यजीवनाविषयी असलेली ओढ आपल्याला शांत बसू देत नाही. दिवसेंदिवस पर्यावरणाचा र्‍हास होत आहे, जंगल कमी होत असून ग्लोबल वॉर्मिंगचे संकट आ वासून उभे ठाकले आहे. याविषयी जागृती व्हावी, या उद्देशाने हे प्रदर्शन आयोजित केल्याचे श्री. शिरोडकर यांनी सांगितले. कार्यक्रमास किरण शांताराम, विठ्ठल कामत आदी मान्यवर उपस्थित होते.

"व्हाइटवॉश" मुळे होताहेत जुने शब्द "वॉश"

ठराविक अंतरानंतर भाषा बदलते असे म्हणतात...काळाच्या ओघात काळाच्या प्रवाहाबरोबर जावे, असे म्हणतात...! टप्प्याटप्प्याने प्रवास करणार्‍या पथिकांना तर बदललेली भाषा लगेच जाणवते. एके काळी अस्खलित असणारी मराठी भाषाही याला अपवाद कशी असणार? गेल्या काही वर्षांपासून मराठी भाषेत इंग्रजी शब्द रूढ होत असल्याचा (मिंग्लीश) प्रत्यय सध्या येत आहे.
दीडशे वर्ष ब्रिटिशांनी भारतावर राज्य केले, यामुळे भारत आणि भारतीयांवर स्वाभाविकच इंग्रज आणि इंग्रजीचा पगडा बसला. तेव्हाची आणि आजची मराठी भाषा...यात बरेच अंतर असल्याचे दिसून येते. मराठी भाषेत इंग्रजीचा प्रवेश बहुदा "सॉरी.." या शब्दापासून झाला असावा. क्षमा करा, माफ करा, माफी असावी हे पूर्वीचे शब्द आजकाल अगदी बोटावर मोजण्याइतके लोक वापरताना दिसतात. यापेक्षा 'सॉरी' म्हणा आणि 'कामाला लागा' अशी विचारसरणी तयार झाली आहे. यापेक्षाही जास्त महत्वाचे असल्यास, एखादी घोडचूक झालेली असल्यास सहसा कार्यालये, नोकरी, उद्योग, कामाचे ठिकाण अर्थातच जॉबचा कॅम्पस् अशा ठिकाणी तर बहुतेक कामे होण्यासाठी 'चहा' हे पेय उपयोगी ठरते हा भाग वेगळा. चहा देखील आणला कोणी? अर्थातच चहा हे सुद्धा इंग्रजांचेच पेय होते. इंग्रज भारतातून परत जाताना सॉरी हा शब्द आणि चहा हे पेय सोडून गेले असावे..।
पूर्वी गावाच्या चौकात, मोकळ्या मैदानात होणार्‍या कुस्तीच्या स्पर्धा आता जवळपास नाहीशा झाल्या आहेत, काही शहरांमध्ये अजूनही होतात हा अपवाद. ठिकठिकाणी उभारलेल्या व्यायामशाळा, एखाद्या आठवडे बाजाराच्या मैदान, शाळेचे प्रांगण अशा ठिकाणी मुद्दाम तशी जमीन तयार करून तेथे कुस्ती खेळली जाते. कुस्ती या शब्दाची जागा देखील रेसलिंग या शब्दाने घेतली आहे. शुभरात्री या शब्दाऐवजी गुड-नाईट सहजपणे नकळत म्हटले जाते. सुप्रभात ऐवजी गुडमॉर्निंग, दिनचर्या ऐवजी रुटीन, हो ऐवजी ओके, सस्पेंड, कॅज्युअल, टाइम-लिमिट, चेंज, बॅकग्राउंड असे कितीतरी शब्द दररोजच्या बोलण्यात वापरले जातात. इंग्लिश + मराठी = मिंग्लीश असे नवीन समीकरण आता तयार झाले आहे. बर्‍याच प्रमाणात हे बदल आवश्यक सुद्धा आहेत, असेही अनेकदा प्रत्यय येतात. याचबरोबर, फक्त बॅकग्राउंड म्हणजेच पार्श्वभूमी हा शब्द उच्चारायचा असल्यास मागचे बॅकग्राउंड असा शब्दप्रयोग केला जातो, बॅकग्राउंड हे मागचेच असते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. पू्र्वी वापरले जाणारे "शाळा-बिळा, जिलबी-बिलबी, आलतू-फालतू, चहा-वहा, बटाटे-बिटाटे, बाजार-बिजार, भाजी-बीजी, नाश्ता-बिश्ता" असे शब्दांमागून येणारे अनेक शब्द मात्र अजून तसेच वापरले जातात. दिल्ली येथे काही दिवसांपूर्वी यशस्वीपणे संपन्न झालेल्या राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धा (कॉमनवेल्थ गेम् commonwealth games) च्या माध्यमातून "व्हाइटवॉश" हा मधुन-मधून ऐकला जाणारा शब्द आता सर्रासपणे नियमित वापरण्यास प्रसार माध्यमांसह, बोलीभाषेतही सुरवात झाली आहे. खरंतर, टक्कर, पराजय, हार, धुव्वा उडवणे या मूळ शब्दांच्या ऐवजी "व्हाइटवॉश" हा शब्दप्रयोग करण्यात आलेला दिसतो, अशा विविध इंग्रजी शब्दांमुळे मराठी शब्द पार धुतले गेले आहेत! हे मात्र खरं आहे, की मिंग्लीश जरी असले, तरीही हे नवीन मराठी टाकाऊ अजिबातच नाही, कालानुरुप होत असलेले हे बदल कोणीही नाकारू नये हे मात्र नक्की...!

Om..ओम्...!!!

मंगळवार, २६ ऑक्टोबर, २०१०

इंडो-चायना फटाके: यंदाचा आनंद ठरणार उद्याची डोकेदुखी...!

न्यायालयाच्या आदेशानुसार यंदा बहुसंख्य ठिकाणी 125 डेसिबलपेक्षा कमी आवाजाचे फटाके बाजारपेठेत उपलब्ध करण्यावर निर्मात्यांचा भर आणि विक्रेत्यांचा कल आहे. फटाक्यांच्या उत्पादनासाठी फटाके उत्पादकांनी चिनी फटाके उत्पादकांच्या सहकार्याने यंदा इंडो-चायना फटाके दिसतील. कमी आवाजाचे आणि या फटाक्यांमधून विविध रंग ओसंडून असल्यामुळे ग्राहकांना आणि शासनाला दोघांनाही आनंद होईलच. मात्र नव्याचे नऊ दिवस या उक्तीप्रमाणे लवकरच हा आनंद मावळून ही डोकेदुखी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. चीनने भारताचा किती मोठा भूभाग बळकावला आहे याची कल्पना देखील न करता येईल असे या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या लेख, बातम्यांवरून वाटते. सध्या देशातले इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे मार्केट चीनने अक्षरशः कॅप्चर केले आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. मोठ्या शहरांपासून छोट्या गावापर्यंत चायना मार्केट च्या वस्तुंना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. या वस्तू आपल्या देशात तयार झालेल्या तशाच वस्तूच्या तुलनेत स्वस्त मिळतात, अनेकदा यात नावीन्य देखील असल्याचे दिसते. भारतातील ग्राहकाची मानसिकता आपल्यापेक्षा चीननेच चांगली ओळखलेली दिसतेय.
इंडो-चायना फटाके तयार करण्याची कल्पना कोणाच्या डोक्यात आली, कुणास ठाऊक! परंतु याची फलप्राप्ती चांगली होणार नाही. ग्राहक एकदा हॅबिच्युअल झाल्यानंतर त्याला अपेक्षित ब्रँड मिळाल्याशिवाय त्याचे समाधान होत नाही. या फटाक्यांना देखील चांगला प्रतिसाद मिळाल्यास चीन लवकरच त्यांचे स्वतःचे फटाके देखील भारतीय बाजारपेठेत विक्रीस आणू शकते अशी भीती तज्ज्ञ जाणकारांकडून व्यक्त करण्यात आली आहे. ही भीती खरी ठरल्यास देशातील फटाके निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या शिवाकाशीसारख्या अनेक ठिकाणच्या फटाके तयार करण्याच्या कारखान्यांना ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागेल आणि शासन नेहमीप्रमाणे कोणतीही कृती करणार नाही असे मत व्यक्त करण्यात आले आहे.

Ye hai India...

निसर्गाने स्वतःच भारताचा नकाशा तयार करण्याचा प्रयत्न...आपल्या देशावर मानवासह निसर्ग सुद्धा प्रेम करतो, हेच तर या माध्यमातून सांगायचे नसेल नां?

जादू चालणार..फक्त मतदारांची!

बिहारमध्ये सध्या निवडणुकांमुळे विविध आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी प्रचार सभांमध्ये झाडल्या जात आहेत. सत्तेवर येण्यासाठी सत्ताधारी अथवा विरोधक..कोणीही असले तरीही विविध युक्त्या, क्लुप्त्या केल्या जातात. दिवसा एकमेकांविरुद्ध तोफा डागून रात्री एकाच थाळीत जेवणारे..असा विचार राजकारण्यांबद्दल केला जातो. काही अंशी हे खरंही आहे. मतदारांना एकाच प्याल्यात उतरवून, स्वतः मात्र कुठेतरी काळोखात, किंवा उजेडातही एकमेकांचे प्याल्यांची भेट घालुन मेळ घालायचा असा प्रकार अनेक जण सर्रासपणे करतात. नीतिश कुमारांसह, लालुप्रसाद यादव, सुषमा स्वराज, छगन भुजबळ यांच्यासारखी दिग्गज मंडळी यासाठी प्रतिष्ठा पणाला लावत आहेत. नुकताच सुषमा स्वराज यांनी, "गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची जादू सगळीकडे चालेलच असे नाही" असे विधान करून मोदी यांना घरचा आहेर दिला आहे. तर राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे संयुक्त जनता दलाचे नेते शरद यादव यांनी, राहुल गांधी यांना गंगेत बुडवा असे सांगून त्यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी मध्यंतरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल देखील चुकीचे उद्गार काढून संघाचे मन दुखावले आहेच..परिणामी, राहुल गांधी यांना अजून भरपूर काही शिकण्याची गरज आहे, त्यांनी शायनिंग बंद करावे असे मत आता ज्येष्ठ मुरब्बी राजकारणी मंडळी व्यक्त करीत आहेत...! काहीही असले तरीही खरा जादूगार "मतदार"च आहेत यात शंका नाही. यावर कॉंग्रेस प्रवक्ते शकील अहमद यांनी यादवांवर टीका केली. बिहारमध्ये राहुल यांच्या सभांना होणारी गर्दी पाहून झालेल्या निराशेतूनच त्यांचे राजकीय संतुलन बिघडले आहे, असे विचार त्यांनी व्यक्त केले.

सोमवार, २५ ऑक्टोबर, २०१०

न्यूझीलंड मालिकेसाठी भारतीय संघ घोषित

न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी सोमवारी (ता. २५) भारतीय संघाची (टीम इंडिया) घोषणा करण्यात आली. मात्र घोषित झालेल्या संघात युवराजसिंग याचा समावेश करण्यात आलेला नाही. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत हरभजन सिंगबरोबर प्रग्यान ओझा, अमित मिश्रा यांना समावेश करण्यात आला आहे. पहिला कसोटी सामना ४ नोव्हेंबरपासून अहमदाबाद येथे सुरु होईल. दुसरा १२ ते १६ नोव्हेंबर दरम्यान हैदराबाद येथे, तर तिसरा सामना २० ते २४ नोव्हेंबर दरम्यान नागपूर येथे होईल.
अशी आहे टीम इंडिया: महेंद्रसिंह धोनी (कर्णधार) सचिन तेंडुलकर, सुरेश रैना, व्हिव्हिएस लक्ष्मण, राहुल द्रविड, गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, मुरली विजय, हरभजन सिंग, झहीर खान, ईशांत शर्मा, एस श्रीसंत, चेतेश्वर पुजारा, प्रग्यान ओझा, अमित मिश्रा.

झाले इंदूरकर रसिक मंत्रमुग्ध: गीतरामायण

येथील लोकमान्य नगरमध्ये रविवारी (ता. २४) आयोजित गीत रामायण कार्यक्रमात श्रीधर फडके यांच्या गीतांनी इंदूरच्या रसिक-श्रोत्यांना अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. स्व. सुधीर फडके उर्फ बाबूजी यांचे स्मरण यावेळी प्रत्येकाला झाले.
श्री. श्रीधर फडके यांच्या प्रत्येक पदाला आणि गीताला रसिकांनी भरभरुन दाद दिली, विवेक घळसासी यांच्या निवेदनाने श्रोत्यांना खुर्च्यांना खिळवून ठेवले. गेले तीन दिवस घळसासी यांच्या सुरू असलेल्या रामकथेच्या प्रवचनाचा समारोप काल करण्यात आला. श्रीधर फडके यांनी सादर केलेल्या गीत रामायणाच्या सुरेल स्वरांचे श्रेय बाबूजी आणि ग.दि. माडगूळकर यांना असल्याचे सांगून आपण फक्त त्यांचे महान कार्य सुरू ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. गाताना शब्दांमागील भावनांसह स्पष्ट शब्दोच्चार करणे आणि भावगीत संगीतबध्द करताना शब्दांच्या वजनासकट त्यातला भाव, कवीची भूमिका रसिकांपर्यंत पोहोचवणे, तसेच या दोन्हींसह गाणे ‘जिवंत करणे’ या गोष्टींना आपल्या कारकीर्दीत त्यांनी सर्वाधिक महत्त्व दिले. संगीतातली नवी वळणे आत्मसात करताना त्यांचा एक धागा परंपरेशी घट्ट जोडलेला होता, त्यामुळेच बाबुजी सुरांच्या गाभ्यापर्यंत पाहोचू शकले व शब्दातील अभिप्रेत भाव रसिकांपर्यंत पोहोचू शकला.
श्रीधर फडके यांनी सादर केलेल्या "राम जन्मला, कुश-लव रामायण गाती, पराधीन आहे जगती, माता न तू वैरिणी, जय गंगे जय भागीरथी, जेथे राघव.." इ. अनेक गीतांनी रसिक मने न्हाऊन निघाली.
आपण आपले वडिल म्हणजेच स्व. बाबूजी यांना घाबरत होतो, गीतरामायणातील पद सर्वप्रथम आपण आपल्या आईला सर्वप्रथम ऐकवले, हे पद ऐकवताना मला अचानक बाबूजी तिथे आल्याचे जाणवले आणि साक्षात बाबूजी तिथे उभे असल्याचे पाहून पार घाबरगुंडी उडाली, मात्र त्यांनी कौतुकाने पाठीवर हात फिरवून गाणे सुरू ठेवण्याची सुचना केल्याने खूप आनंद झाला, असे सांगितले. गीतरामायणाची रचना १९५५ मध्ये करण्यात आली, गीतरामायणातील विविध शब्दांवर बाबूजींनी दिलेला जोर त्याचे महत्व आदी गोष्टी विशद केल्या. गीतरामायण कितीही कथन केले तरीही वेळ अपूर्णच वाटतो, सर्वकाही आपल्या समोरच सुरू असल्याची हे गाताना आपल्याला अनुभूती येते या शब्दात मनोगत व्यक्त केले. काही दिवसांपूर्वी श्रीधर फडके यांना साठ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. ‘संगीत मनमोही रे’ ही नुकतीच प्रकाशित झालेली त्यांची सीडी यावेळी श्रीधर फडके यांच्या स्वाक्षरीसह वितरीत करण्यात आली.
श्रीधर फडके यांनी इंदूरकर अजूनही मराठी टिकवण्याचा प्रयत्न करीत असल्याबद्दल त्यांचे कौतुक करून मराठी बोलणारा आजकाल मुंबईत दुर्मिळ होत चाललाय असे मत व्यक्त केले. पार्षद विनिता धर्म यांनी सूत्रसंचालन केले.

सिडकोच्या गृहनिर्माण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; अंतिम यादी १० सप्टेंबरला

 सिडकोच्या ऑगस्ट २०२६ गृहनिर्माण योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, योजनेअंतर्गत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या ४,७...