बुधवार, ११ मे, २०११

मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करून 15 दिवसांत अहवाल सादर करा: भुजबळ


मुंबई, दि. 11 मे : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 17वर सातत्याने होत असलेल्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी मुंबईपासून गोव्यापर्यंतच्या संपूर्ण महामार्गाची जाता-येता अशी दुतर्फा पाहणी करून 15 दिवसांच्या आत तपशीलवार अहवाल सादर करावा, असे आदेश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे दिले. सदर पाहणी करत असताना संबंधित जिल्ह्यातील अभियंत्यांनाही सोबत घ्यावे, अशी सूचनाही त्यांनी केली.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामातील अडथळे, महामार्गावर होणारे अपघात आणि त्यामुळे निर्माण होत असलेला जनक्षोभ लक्षात घेऊन श्री. भुजबळ यांनी आज मंत्रालयात संबंधितांची तातडीची बैठक बोलाविली होती. या बैठकीला अपर मुख्य सचिव उमेशचंद्र सरंगी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) धनंजय धवड, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एन.एच.ए.आय.) मुख्य अभियंता पी.एस. मंडपे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता (राष्ट्रीय महामार्ग) तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि जिल्हा वाहतूक पोलीस अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत श्री. भुजबळ यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. राष्ट्रीय महामार्गाच्या कामाशी तसा थेटपणे संबंध नसतानाही त्या कामात होणाऱ्या दिरंगाईबद्दल नागरिकांच्या नाराजीला राज्य शासनाला तोंड द्यावे लागते आहे, असे भुजबळ यांनी सुनावले. 'माणसं मरत असताना आपण केवळ बघ्याची भूमिका घेत आहात. या बाबीकडे संवेदनशीलपणे पाहिले पाहिजे,' अशी भावना व्यक्त केली.
या राष्ट्रीय महामार्गाच्या पनवेल ते इंदापूर या 84 किलोमीटर टप्प्यातील चौपदरीकरणाच्या कामाचा करारनामा 22 जानेवारी 2011 रोजी करण्यात आला असून या दिनांकाच्या सहा महिन्यात आर्थिक ताळेबंद (Financial Closure) झाल्यानंतर येत्या जुलैअखेरीस प्रत्यक्ष कामाला सुरवात करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी बैठकीत देण्यात आली. या टप्प्यातील चौपदरीकरणासाठी 67 गावांतील 170 हेक्टर जमिनीचे संपादन करणे आवश्यक आहे. आतापर्यंत या 67 गावांपैकी केवळ 10 गावांचे ऍवॉर्ड तयार झालेले असून अद्यापही 57 गावांचे ऍवॉर्ड तयार करण्याचे काम सुरू असल्याचे ऐकून श्री. भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली.
त्याचप्रमाणे या चौपदरीकरणाच्या कामासाठी एकूण 33 हेक्टर वनजमिनीचे संपादन आवश्यक होते. त्यापैकी अलिबाग वनविभागाकडील 26.604 हेक्टर वनक्षेत्र आणि रोहा वन विभागाकडील 6.403 हेक्टर वन जमिनीच्या संपादनाचा प्रस्ताव एन.एच.ए.आय.ने अलिबाग व रोहा वनविभागाकडे सन 2007मध्येच सादर करण्यात आलेला आहे. त्यांनी काढलेल्या शेऱ्यांची वेळोवेळी पूर्तता करण्यात येऊनही आणि सातत्याने पत्रव्यवहार केल्यानंतरही त्यांच्याकडून अद्याप हा प्रस्ताव नागपूर वनविभागाला सदर करण्यात आलेला नसल्याचे ऐकताच श्री. भुजबळ यांनी तीव्र संताप व्यक्त केला. यासंदर्भात सर्व संबंधित महसूल व वन विभागाचे अधिकारी, मुख्य सचिव, सचिव यांच्याशी चर्चा करण्याचे त्याचबरोबर सदर रस्त्याच्या परिस्थितीबाबत आणि अपघातांबाबत वृत्तपत्रातून प्रसिध्द झालेल्या कात्रणांसह केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री, वन विभाग यांच्याशी पत्रव्यवहार करण्याचे निर्देश श्री. भुजबळ यांनी सार्वजनिक बांधकाम सचिवांना दिले.
यावेळी भुजबळ यांनी जिल्हा वाहतूक पोलिसांकडूनही अपघात रोखण्यासाठी काय करता येईल, याविषयी जाणून घेतले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात चौपदरीकरण झालेल्या मार्गावर साईडपट्टया नसल्यामुळे वाहने कलंडून अपघात होतात, अशी माहिती त्यांना देण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यात 41 किलोमीटरपैकी 22 किलोमीटरचे जे काम पूर्ण झाले आहे, त्या टप्प्यातील साइडपट्टयांचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश श्री. भुजबळ यांनी यावेळी दिले. त्याचप्रमाणे आवश्यक त्या सर्व ठिकाणी गतिरोधक, दुभाजक, दिशादर्शक फलक, संकेतचिन्ह फलक, धोक्याची सूचना देणारे फलक आदींचीही तातडीने उभारणी करण्यासही त्यांनी सांगितले.
अपघातग्रस्त वाहन हटवण्यासाठी क्रेन भाडयाने घ्यावी लागत असल्यामुळे किंवा तातडीने उपलब्ध न झाल्यामुळेही वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागते, असेही पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावर यासंदर्भात केंद्रीय मंत्रालयाशी बोलून तोडगा काढावा किंवा जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी तातडीची गरज म्हणून एखादी तरी क्रेन ठेवता येईल का, याविषयी चाचपणी करावी, अशी सूचना त्यांनी श्री. सरंगी यांना केली.
महामार्गावर पोलिसांच्या संख्या वाढविणे गरजेचे असले तरी तातडीच्या प्रसंगी स्थानिक पोलिसांचे सहकार्य वाहतूक पोलिसांनी घ्यावे, असे श्री. सरंगी यांनी यावेळी सुचविले.

'वेगनियंत्रणासाठी स्पीड मोजणाऱ्या कॅमेऱ्यांचा पर्याय उपयुक्त!'
महामार्गावर होणारे अधिकतर अपघात हे अतिवेगामुळेच होत असल्याची माहिती श्री. भुजबळ यांना यावेळी देण्यात आली. त्यावर महामार्गावर साधारण प्रत्येक 50 किलोमीटरच्या अंतरावर स्पीड मोजणारे कॅमेरे बसविण्याचा पर्याय उपयुक्त वाटतो, तसे करता येईल का, त्याचप्रमाणे वाहनचालकांच्या मद्यचाचणीसाठी महामार्गावर 8 ते 10 ठिकाणी तपासणी केंद्रे उभारता येतील का, याविषयी महामार्ग पोलिसांनी चाचपणी करावी, अशी सूचनाही श्री. भुजबळ यांनी केली.

'रात्रीच्या वेळी कंटेनर रस्त्याकडेला थांबविता येतील!'
मोठमोठया कंटेनरमुळे वाहतूक कोंडी आणि अपघात होण्याची शक्यता अधिक वाढते. त्यामुळे गणेशोत्सव काळात ज्याप्रमाणे असे कंटेनर रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेला थांबवून लहान वाहने पुढे काढली जातात. त्याच धर्तीवर सुट्टीच्या हंगामासाठी सुध्दा अशाच प्रकारचा निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत भुजबळ यांनी व्यक्त केले.

"सौर ऊर्जा निर्मिती" ठरणार काळाची गरज...

महाराष्ट्र, मध्य प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये वीजेचे संकट उभे आहे. वीज कंपनीचा वाढत असलेला तोटा आणि सातत्याने वाढणारा वीजेचा दर ग्राहकांवर लादला जात आहे. यावर पर्याय म्हणून लवकरच "सौर ऊर्जा" ही काळाची गरज ठरणार आहे.

रेडिओ, फ्रीज, कूलर, फोन, मोबाईल या चैनीच्या वाटणार्‍या पूर्वीच्या वस्तू आज काळाची गरज ठरल्या आहेत. सध्या महाग आणि चैनीची वाटत असली तरीही "सौर ऊर्जा" (अर्थात सोलर एनर्जी) ही काळाची गरज नक्कीच ठरेल...
कोकणातील रत्नागिरी नजीक ९,९०० मेगावॉट क्षमतेचा आणि जगातील सर्वात मोठा मानला जाणारा नियोजित जैतापूर अणूऊर्जा प्रकल्प आहे. हा प्रकल्प भूकंप प्रवण क्षेत्रामध्ये असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मार्च ११ ला जपानमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता ८.९ रिश्टर स्केल असून यानंतर आलेली त्सुनामी लाट यामुळे झालेल्या नुकसानीतून आता तीन महिने उलटूनही देश पूर्णपणे सावरलेला नाही. आणखी भूकंप होऊन आणखी जीवित आणि वित्तहानी होण्याची भीती लोकांच्या मनातून गेलेली नाही. वास्तविक जपान हा देश तंत्रज्ञानात अग्रेसर असून स्थिरचित्ताने शांततेने निर्णय घेण्यासाठी या देशाचा नावलौकिक आहे. सुमारे ४८ फूट उंचीच्या एका लाटेने फुकुशिमा येथील तीनपैकी एका अणुभट्टीला तडाखा दिल्याने या भट्टीतून किरणोत्सर्ग होऊन या किरणोत्सर्गाचे अत्युच्च पातळी गाठलेले पाणी प्रशांत महासागरात देखील गेले असल्याची भीती व्यक्त करण्यात आली. कारण काहीही असले तरीही नुकसान झाले आहे हे नक्की!

नियोजित जैतापूर अणुप्रकल्प सुद्धा सध्या वादाच्या भोवर्‍यात आहे. या प्रकल्पामुळे फायदे होण्यापेक्षा तोटेच जास्त होणार असल्याचे स्थानिक जनतेचे मत आहे. जपानच्या फुकुशिमा अणुभट्टीचे उदाहरण भारतानेही डोळ्यासमोर ठेवण्याची गरज असल्याचा उल्लेख येथे करावासा वाटतो. भविष्यातील भूकंपाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर मध्य जपानमधील हामाओका अणुप्रकल्प बंद करण्याचा आदेश नुकताच पंतप्रधान नाओटो कान यांनी दिला आहे. हा आदेश व घेतलेला निर्णय अत्यंत महत्वाचा, लक्षवेधी आहे. मानव निसर्गाच्या सामर्थ्यापुढे टिकू शकत नाही ही बाब आता तज्ज्ञांनाही मानावीच लागेल. तरी सुद्धा जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प उभारणी करण्याचा अंतिम निर्णय झाल्यास रिश्टर स्केल ९.० तीव्रतेपेक्षा जास्त तीव्रतेचा भूकंप झाल्यास, त्सुनामी आल्यास जीवित आणि वित्तहानी होऊ नये म्हणून किंवा याचे प्रमाण शक्य तितके कमी होण्याच्या उपाययोजना अगोदर करून त्याचे प्रयोग, प्रात्यक्षिक करणे अत्त्यावश्यक आहे. देशात सध्या बहुतांशी वीज निर्मिती प्रकल्पांमध्ये कोळशाच्या सहाय्याने वीज निर्मिती करण्यात येत आहे. यासाठी लागणार्‍या कोळशाच्या किंमती वाढत आहेतच. वीज निर्मितीसाठी पुरवला जाणारा कोळसा, त्याची उपलब्धता, गुणवत्ता इ. बाबी फारशा गांभीर्याने घेतल्या जाताना दिसत नाहीत. परिणामी उपलब्ध होणार्‍या कोळशातून बराच कोळसा वाया जातो, फेकून द्यावा लागतो अशी वीज निर्मिती केंद्रांची ओरड असते. लोकसंख्या वाढीबरोबर वीजेची मागणी देखील वाढतच जाणार हे नाकारले जाऊ शकणार नाही. गेल्या काही वर्षात वीज महाग झाली असून सततच्या भार-नियमनामुळे अनेक वीजग्राहक वीजेची बिलं भरेनासे झाले असून 'वीज द्या- बिल घ्या' असा अनेकांचा सूर आहे, याचबरोबर वाढत्या थकीत बाकीमुळे वीज कंपनीचा तोटा वाढतो आहे. हा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याचे दिसते. अनेक शासकीय, निमशासकीय संस्थांकडे वीजेची मोठ्या प्रमाणात थकबाकी असून वीज चोरीकडे राजकीय दबावामुळे दुर्लक्ष करावे लागत असल्याचे काही अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

लवकरच वीज किमान ८ टक्क्यांनी महाग होणार असल्याचे वीज नियामक आयोगाने सूचित केले आहे. ठिकठिकाणच्या ट्रान्सफार्मरला लागणारे इंधन देखील महाग झाले आहे. उन्हाळ्यात वीजेची मागणी जास्त होत असून ग्रामीण भागात विशेषतः शेतीला जास्त पाण्याची आवश्यकता असते, परंतु किमान बारा तासांच्या भार-नियमनामुळे, अचानक उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे काही वेळा तर पीक हातचे जाण्याच्या, जळण्याच्या आणि शेतकरी बांधवांचा हाती आलेला घास पुन्हा पडत असल्याच्या घटना घडतात.

सोमवार, ९ मे, २०११

नवी मुंबई येथे १० मे स सिडकोमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम

मुंबई, ता. ९ - सिडको बी. सी. एम्प्लॉईज असोसिएशनतर्फे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२० जयंती कार्यक्रम होईल. सिडको एम्प्लॉईज युनियनचे सरचिटणीस मिलिंद बागूल अध्यक्षस्थानी व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित असतील.
मंगळवारी (ता. १० मे) सिडको सभागृह, सिडको भवन, सातवा मजला, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथे कार्यक्रम होणार आहे. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून सहाय्यक व्यवस्थापक अनिता पगारे, सिडको अध्यक्ष नकुल पाटील, व्यवस्थापकीय संचालक सिडको तानाजी सत्रे, विधान परिषद सदस्य व संचालक-सिडको सुभाष भोईर, संचालक सिडको नामदेव भगत, सिडको कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष निलेश तांडेल उपस्थित राहतील, असे सहाय्यक जनसंपर्क अधिकारी अनंतसिंग राजपूत यांनी कळविले आहे.

गोंदे ते पिंपळगाव टप्प्याचे बहुतांश काम आगामी सहा महिन्यात पूर्ण: भुजबळ

नाशिक (प्रतिनिधी) - आगामी सहा महिन्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवरील गोंदे ते पिंपळगाव या साठ किलोमीटरपैकी पंचेचाळीस किलोमीटर रस्त्याचे सहापदरीकरण पूर्ण होणार असून उर्वरित पंधरा किमी अंतरावरील काम जून २०१२ पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी दिली. यामुळे मुंबई ते धुळे जिल्ह्यातील मध्यप्रदेश सीमेपर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग आगामी दीड वर्षाच्या आत चौपदरी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रकल्पग्रस्तांनी सामंजस्याची भूमिका घेण्याचे नाशिकच्या पालकमंत्र्यांचे आवाहन


नाशिक (प्रतिनिधी) - जिल्ह्याच्या विकासासाठी लागणार्‍या जमिनीच्या भूसंपादनात प्रकल्पग्रस्तांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी, राजकीय आकसापोटी विकासकामांना खीळ बसेल असे प्रयत्न कुणीही करू नये असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. मुंबई आग्रा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा आढावा घेताना पत्रकारांच्या प्रश्नांना ते उत्तरे देत होते.
ते म्हणाले, की प्रत्येकाला विकास हवा आहे. विकास कामांमुळे जमिनीचे भाव वधारतात. शासनाला एक इंचही जमीन विनाकारण नको आहे. शेतकर्‍यांनी योग्य त्या मोबदल्यात विकासकामांना सहकार्य करावे. विकासाची खरी बाजू जनतेसमोर आणून शासकीय यंत्रणेच्या चुका निदर्शनास आणून देण्याचे आवाहन यावेळी श्री. भुजबळ यांनी प्रसार माध्यमांना केले. भूसंपादनापोटी काही ठिकाणी शेतकर्‍यांना एकरी ६५ लाखापर्यंत भाव देऊनही मोर्चे निघणे ही बाब भूषणावह नाही. आजही कारखानदारांची पहिली पसंती पुण्याकडे आहे कारण तिथे मूलभूत सुविधांचा विस्तार झाला आहे.

लातूर-औसा-लामजना राज्यमार्गाची दुरुस्ती 5 जूनपूर्वी झालीच पाहिजे - छगन भुजबळ

मुंबई, दि. 4 मे : लातूर-औसा-लामजना या राज्य महामार्गाच्या दुरुस्तीचे काम येत्या 5 जूनपर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण झालेच पाहिजे, असे स्पष्ट निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना आज दिले.
या रस्त्याच्या कामाबाबत आज भुजबळ यांच्या मंत्रालयातील दालनात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार बसवराज पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) धनंजय धवड यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
औसा-लातूर हा 19 किलोमीटरचा चौपदरी तर औसा-लामजना हा 13 किलोमीटरचा दुपदरी मार्ग आहे. या मार्गांच्या दुरुस्तीबरोबरच आवश्यक त्या ठिकाणी योग्य त्या प्रकारचे फलक, दिशादर्शक बसविण्याची सूचनाही श्री. भुजबळ यांनी यावेळी केली.

'जर्मन अस्फाल्ट रोड ऍडिटिव्ह प्रायोगिक तत्त्वावर वापरा'
यानंतर झालेल्या अन्य एका बैठकीमध्ये श्री. भुजबळ यांनी डयुरोफ्लेक्स हे जर्मन अस्फाल्ट रोड ऍडिटिव्ह प्रायोगिक तत्त्वावर वापरून पाहण्याची सूचनाही सार्वजनिक बांधकाम सचिवांना केली.
सध्या सुरू असलेल्या डांबरीकरणाच्या कामातील एकूण लांबीपैकी एका भागातील काही लांबीमध्ये नियमित डांबरीकरण आणि 2 ते 3 किलोमीटर लांबीमध्ये 'डयुरोफ्लेक्स'चा प्रायोगिक तत्त्वावर वापर करावा आणि पावसाळयानंतर या ऍडिटिव्हच्या उपयुक्ततेबाबत अहवाल सादर करावा, अशी सूचना सर्व मुख्य अभियंत्यांना करण्यात यावी, असे निर्देशही श्री. भुजबळ यांनी यावेळी दिले.

खतवाटपाच्या नियोजनाची अंमलबजावणी प्रभावी व्हावी - छगन भुजबळ

नाशिक - "देशभरातच खतांची अडचण असून, केंद्राकडून राज्याला मिळणाऱ्या खताचे प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत वितरण होण्यासाठी कृषी विभागाने नियोजनाची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी,' असे स्पष्ट आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले.
येथील शासकीय विश्रामगृहात आज नाशिक जिल्ह्यातील खरीप हंगाम आढावा व नियोजनाची बैठक झाली. त्यात श्री. भुजबळ अध्यक्षस्थानावरून बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्षा मायावती पगारे, खासदार हरिश्‍चंद्र महाले, प्रतापदादा सोनवणे, समीर भुजबळ, राज्याचे कृषी आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी पी. वेलरासू यांच्यासह पंधरा तालुक्‍यांतील आमदार तसेच अधिकारी उपस्थित होते.
अवकाळी पावसाच्या नुकसानीची मदत, खतांचे वितरण, अपघात विमा योजना, ट्रॅक्‍टरचे अनुदान, तेल्या रोगावरील रखडलेले अनुदान या विषयावरील विविध प्रश्‍न उपस्थित करीत लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला धारेवर धरले.

आमदार माणिकराव कोकाटे, शिरीष कोतवाल यांनी खतांसंबंधी प्रश्‍न उपस्थित केले. ते म्हणाले, ""खतांच्या विक्रीतील लिंकिंग थांबली पाहिजे. खतांबाबत अधिकारी परस्पर कोटे ठरवून मोकळे होतात. त्यामुळे सहकारी सोसायट्यांना खते मिळत नाही. व्यापाऱ्यांकडून मात्र अव्वाच्या सव्वा दराने शेतकऱ्यांना खते घ्यावी लागतात. खत कंपन्या डिलरलाच थेट खते देतात. कंपन्यांना, सहकारी संस्थांना खते देण्यात त्यांना स्वारस्य नसते. नाशिकच्या तुलनेत जळगाव व नगरला जास्त खतपुरवठा होत असल्याचे निदर्शनास आले आहे.''
श्री. भुजबळ म्हणाले, ""देशातच खतांचा तुटवडा असल्याचे सांगितले जात आहे. यावर राज्य व जिल्हा पातळीवर व्यवस्थित नियोजन होणे आवश्‍यक आहे. जिल्ह्यासाठीचे खत केंद्राकडून आल्यावर ते माथाडी कामगारांकडून विनाविलंब उतरवले गेले पाहिजे. म्हणजे खताची पळवापळवी होण्याची शक्‍यता राहणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी धडक कारवाई करीत कंपन्यांची मनमानी मोडून काढावी.''

श्री. कोकाटे म्हणाले, ""शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी कृषी विभागाने नाशिक शहरातील स्वत:ची जागा या प्रकल्पासाठी ठेवावी.''
श्री. कोतवाल यांनी यासाठी बाजार समित्यांमध्येही स्वतंत्र व्यवस्था करणे शक्‍य असल्याचे सांगितले.
दरम्यान, अवकाळीतील प्रलंबित मदत, अपघात विमा मिळण्यात शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, तेल्या रोगाचे चार वर्षांपासून रखडलेले अनुदान याबाबत लोकप्रतिनिधींमधून प्रश्‍न उपस्थित करण्यात आले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कैलास मोते यांनी प्रास्ताविक केले व कृषी विभागाच्या नियोजनाचे सादरीकरण केले. या वेळी आरोग्य पत्रिका व जमीन सुपीकता निर्देशांकाच्या अहवालाचे प्रकाशनही करण्यात आले.

रविवार, ८ मे, २०११

एक+विसाव्या शतकातली आई आणि एक+विशीतली मुलं...

सोळावं वरीस धोक्याचं गं बाई..सोळावं वरीस धोक्याचं! असं अवघ्या काही वर्षांपूर्वी म्हटलं जात होतं. मात्र एकविसाव्या शतकात सोळाव्या वर्षी मुलांना बर्‍यापैकी समज येते आणि एकवीस वर्षांचा मुलगा स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी धडपडत असतो. एकविसाव्या शतकातली आई सुद्धा मुलाने चांगला उद्योग-धंदा करून नावलौकिक प्राप्त करावा किंवा चांगली नोकरी करून लवकरच एखादी सुन घरी येण्याची स्वप्न पहाते. हेच मुलींच्या बाबतीतही लागू होते. मात्र, मुलगी स्वतःच्या पायावर उभी राहिली, की तिचं एखादं छान स्थळ पाहून लग्न लावून जबाबदारीतून मोकळं कधी होऊ? याचा विचार कायम आई करत असते.
आईचं महत्व काय आहे? हे सांगण्याची विशेष गरज नाही. परंतू दिवसेंदिवस मुलांकडे नीट लक्ष देण्याची आणि त्यांना सुसंस्कारित करण्याची आईची जबाबदारी वाढते आहे. नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय करावा अशा घोषणा करणार्‍या सरकारने घोषणे पलिकडे काहीच न केल्यामुळे युवक मंडळी नोकरी करण्यास प्राधान्य देतात. त्यातल्या त्यात एमएनसी अर्थातच मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन/कंपनीमध्ये नोकरी करण्यासाठी जवळपास प्रत्येकाचाच कल असतो. कारण अगदी जोरात सुरू असलेले खाजगी क्षेत्रातील व्यवसाय, कारखाने बव्हंशी बंदही पडू शकतात असे गेल्या काही वर्षात दिसून आले आहे. मात्र ग्लोबलायझेशनच्या या दुनियेत कॉर्पोरेट सेक्टरला चांगले दिवस आले असल्याचे दशकापासून दिसून येते.
लठ्ठ पगार देऊन पात्र उमेदवारांना इथे नोकरीसाठी आकर्षित केले जाते. चांगल्या गुणवत्तेच्या तरूणांना तर याचा लाभ होतोच. मात्र कॉर्पोरेट क्षेत्रात कामासाठी तितकेच पिळूनही घेतले जात असल्याची उदाहरणे आहेत. सरासरी दिवसाचे आठ तास काम आणि पाच दिवसांचा आठवडा असे एकूण चाळीस तास फक्त काम असल्यामुळेही काही आळशी पण हुशार मंडळींचे चांगलेच फावते. मुलगा कामावरून घरी परत येईपर्यंत बिच्चार्‍या आईचे डोळे दाराकडे टक लावून मुलगा येण्याची प्रतीक्षा करतात. सातत्याने वाढणारी असुरक्षितता हे यामागचे एक प्रमुख कारण आहे, घरातून बाहेर पडल्यानंतर सहजासहजी कोणताही अपघात न होता घरी परत आलो तर आजचा दिवस सार्थक झाला...असे सूत्रच आता तयार झाले आहे. पूर्वीच्या आईला मुलगा कामावर गेल्यानंतर तितकी काळजी वाटत नव्हती. नोकरीवर जाताना सायकल, बस अथवा रेल्वेने अप-डाऊन करणे इतकीच मर्यादित साधनं होती. पण आजकाल अगदी शाळेतल्या मुलाला सुद्दा बाईक असते, रस्त्यावरून, गल्लीबोळातून भरधाव बाईक हाकताना मुलं दिसतात. नोकरीवरून अथवा शाळेतून मुलं घरी आल्यानंतर पूर्वी मित्र-मैत्रिणीकडे जात होती. आता ही परिस्थिती बदलली असून घरी आल्यानंतर आधी कॉम्प्यूटरवर फेसबुक, ऑर्कुट, ट्विटर सारख्या सोशल वेबसाइट्सनां भेट देऊन साइन-इन करून हाय-हॅलो, आपण घरीच आहोत..असे संदेश आउट केले जातात आणि मुलांचा तर तासन् तास फेसबुकवरच गप्पा मारण्यातच वेळ जातो. त्रयस्थ व्यक्तीस फ्रेंडशिप ची रिक्वेस्ट करताना आपल्या घरातच आपल्याशी मित्राप्रमाणे वागणार्‍या आई रुपी फ्रेंडचा विसर मुलांना पडतोय...यामुळे आई आणि मुलांमधला संवादही कुठे ना कुठे हरवला असल्याची जाणीव झाल्याशिवाय रहात नाही. परंतु सध्या संवादाअभावी फेसबुक सारखी स्थळंच मित्र असल्याची मुलांमध्ये भावना निर्माण झाली आहे.
आता तर शाळेतही कॉम्प्यूटर (संगणक) हा विषय असल्यामुळे दुसर्‍या इयत्तेतल्या विद्यार्थ्यालाही कॉम्प्यूटर ऑपरेट करता येतो. कॉम्प्यूटर ही आगामी दशकात काळाची गरज ठरणार असल्याचीच ही नांदी म्हणावी लागेल. त्यातच सातत्याने पुस्तकांच्या किंमतीत देखील होणारी वाढ, प्रचंड आणि पालकांना न झेपणारा शैक्षणिक खर्च यामुळे ई-लर्निंग योजना वाढीस लागून घरबसल्याच अभ्यास, शाळा अशा गोष्टी सुरू होतील, तो दिवस दूर नाही! अशा भविष्यामुळे आई देखील संगणक साक्षर होणे आवश्यक आहे. आपली मुलं कॉम्प्यूटरवर बसून काय करतात? कोणत्या वेबसाइट्स उघडतात, त्यातून काय साध्य करतात? याकडे लक्ष ठेवणं ही प्रत्येक आईचीच जबाबदारी ठरणार आहे, नव्हे ठरली आहे. इंटरनेटचा सदुपयोग केल्यास मुलं खरोखर सद् गृहस्थ आणि जीवनात यशस्वी होतील इतकी माहिती इंटरनेटवर असते. सध्या मुलांचे बाबाही दिवसभर कामानिमित्त बाहेर असल्यामुळे आणि रात्री उशीरा घरी येत असल्यामुळेच खरंतर आईची जबाबदारी वाढते आहे. आई सुशिक्षित असल्याचा फायदा आईने नक्की करून घ्यावा.
घरातल्या घरातच माणसांऐवजी कॉम्प्यूटरमध्ये हरवत असलेल्या मुलांना यातून बाहेर काढणं खूप गरजेचं असून केवळ आईच हे चांगल्या प्रकारे करू शकते. नेट सर्फिंग खूप केली म्हणून न रागावता, स्वतः मुलांकडून संगणक-साक्षर आणि इंटरनेट-प्रवीण होऊन आई सुद्धा मुलांना अभ्यासात मदत करू शकते. मुलं शाळेत, कॉलेजला गेल्यानंतर त्यांना लागणार्‍या नोट्सची माहिती घेऊन ती घरी परत येईपर्यंत त्या नोट्स काढून त्यांना देऊन त्यांचेही टेन्शन हलके झाल्यास कॉम्प्यूटरमध्ये हरविलेली आणि सोशल साईट्समध्ये व्यस्त असलेल्या मुलांना निश्चितच आई हीच आपला खरा फ्रेंड असल्याची जाणीव होऊन हरविलेला संवाद पुन्हा साधला जाईल हाच विश्वास!

शुक्रवार, ६ मे, २०११

बहात्तर वर्षांचे तरूण शिकताहेत "इंटरनेट"...

जिद्द आणि चिकाटी हे दोन गुण अंगी असले तर नशीब सुद्धा बदलतं. अनेकदा जवळ अत्यंत मोजके पैसे घेऊन घराबाहेर पडलेली व्यक्ती तिच्या जिद्दिमुळे आणि चिकाटीमुळे मोठी उद्योगपती, मोठ्या पदावर विराजमान झाल्याची उदाहरणे आहेत. माणसाने मिळेल ते शिकत रहावं, अर्जित करावं त्याने लाभच होतो. याचबरोबर काळाबरोबर चालणारी व्यक्ती सुद्धा प्रगती करू शकते, तिचे कुठेही अडून रहात नाही, हे सिद्ध केलंय युवकांनाही लाजवेल अशा इंदूरच्या अवघे ७२ वय असलेल्या एन. पी. बरगले यांनी...!
भारतीय आयुर्विमा महामंडळातून उच्चपदस्थ पदावरून निवृत्त झाल्यानंतर श्री. बर्गले कधीही स्वस्थ बसलेले नाहीत. दररोज काही ना काही वाचन करणे, फिरायला जाणे ही त्यांची दैनंदिनी आहे. वाचाल तर वाचाल...या उक्तीप्रमाणे दररोज सकाळी वर्तमानपत्र वाचून स्वतःला अपडेट करूनच ते घराबाहेर पडतात. ग्लोबलायझेशनच्या काळात इंटरनेटचं महत्व वाढलं असल्याचं आणि हा आलेख उंचावतच राहणार असल्याचं महत्व त्यांना पटलं आहे. आपले चिरंजीव रविंद्र यांच्याकडून ते सध्या दररोज इंटरनेटचे धडे घेत आहेत. रविंद्र हे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अनुवादक म्हणून सध्या कार्यरत असून इंग्रजीवर त्यांचे प्रभुत्व आहे. मराठी भाषा सुद्धा त्यांना बर्‍यापैकी समजते. विशेषतः मराठी भाषेतला "ळ" या शब्दाचा उच्चार ते व्यवस्थित करतात. रविंद्र यांचेही जिज्ञासेमुळे सतत वाचन, लेखन सुरूच असते. यासाठी ते आई-वडिलांचे संस्काराचे आउटपुट...या शब्दात आपल्या भावना व्यक्त करतात. आपले वडिल सध्या माहितीचे आगार असलेल्या इंटरनेटची तसंच ट्विटर, फेसबुक, ऑर्कुट बद्दल माहिती जाणून घेत असून प्राथमिक माहिती जाणून घेत आहेत.
अनेक शहरांमध्ये अजून इंटरनेटचा वापर करण्यात बर्‍याच प्रमाणत तरूणाई उदासीन दिसते, शासकीय अधिकारी सुद्धा इंटरनेटचा फारसा उपयोग करताना दिसत नाहीत. श्री. एन. पी. बर्गले यांच्यापासून इंटरनेटची माहिती नसलेल्या, वापर न करणार्‍या तरूण मित्रांनी थोडातरी बोध घ्यावा, हीच अपेक्षा.

जेव्हा पुतळे बोलू लागतात...

मध्य प्रदेशातल्या धार येथील फडके स्टुडिओमध्ये तयार करण्यात आलेले हे पुतळे एकमेकांशी बोलत आहेत असा भास न झाल्यास नवलच...

कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप

(पनवेल):  राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...