गुरुवार, ३१ मार्च, २०११

आता लक्ष लंकेला विरुद्ध विजयी गुढी उभारण्याचे...

टीम इंडिया ने विश्वचषकाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणार्‍या पाकिस्तान संघाला हरवून अंतिम सामन्यात प्रवेश करून संपूर्ण क्रिकेट विश्वातून वाहवा मिळवली आहे. आता येत्या २ एप्रिलला मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये होणार्‍या अंतिम सामन्यात श्रीलंका संघाला हरवून हिंदू नववर्षाच्या सुरवातीपू्र्वीच विजयाची गुढी उभारण्याची अपेक्षा आणि सप्तरंगी स्वप्न चाहत्यांनी रंगविले आहे.
पाकिस्तानच्या संघाविरुद्ध खेळताना आपले शंभरावे शतक पूर्ण करण्याचे स्वप्न भंगल्यामुळे थोडी निराशा पदरी पडलेला सचिन अंतिम सामन्यात हे स्वप्न साकार करण्यासाठी निश्चित प्रयत्न करून नववर्षाची भेट देईल असा विश्वास देखील क्रिकेटच्या विश्वासह जनसामान्यांना वाटत आहे.

भारतीय संघाची कामगिरी अभिमानास्पद: अजित पवार

मुंबई, ता. ३० - पाकिस्तानवर दैदिप्यमान विजय मिळवून कोट्यवधी भारतीयांची मने जिंकणार्‍या भारतीय क्रिकेट संघाची कामगिरी अभिमानास्पद असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणार्‍या भारतीय संघाचे अभिनंदन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे. संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या या लढतीत संघभावनेच्या आधारे भारतीय संघाने विजयश्रीला गवसणी घातली. भारतीय संघाच्या विजयामुळे क्रिकेटप्रेमींचा आनंद द्विगुणीत झाला आहे. भारतीय संघाने अंतिम फेरीत इतिहास रचून विजयाची गुढी उभारावी, अशा शुभेच्छा श्री. पवार यांनी दिल्या आहेत.
दरम्यान, पाकिस्तानच्या संघावर विजय प्राप्त करून अंतिम सामन्यात स्थान मिळवलेल्या भारतीय संघाच्या या विजयामुळे रात्री अनेक ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात विजयी मिरवणुका काढण्यात आल्या. पुणे शहरात अनेक उपनगरांमध्ये दिवसभर शुकशुकाट असणारे प्रमुख रस्ते रात्री दिवस उजाडल्याप्रमाणे नागरिकांच्या गर्दीने फुलले होते.
ठंडा...ठंडा..कूल..कूल झाल्यानंतर कुटुंबियांसह आईस्क्रीम खाणारे लोक दिसत होते.

बुधवार, ३० मार्च, २०११

दे घुमाके...स्पेशल

भारत आणि पाकिस्तान यांच्यात बुधवारी (ता.30) झालेला सामना पाहण्यासाठी अशा प्रकारे व्यवस्था करण्यात आली होती.

"माही" च्या सैन्याने नमविले "रन" भूमीत पाक ला...





पंजाबपुत्र आणि भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या टीम इंडियाने आज मोहाली येथे पार पडलेल्या विश्वचषक 2011 च्या उपांत्य फेरीत पाकिस्तान संघाशी झालेल्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात पाकिस्तान संघाला 29 धावांनी गारद करून अंतिम सामन्यात आपले स्थान निश्चित केले. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये 2 एप्रिल रोजी होणाऱ्या सामन्यात देखील भारतीय संघालाच अपेक्षित विजय मिळून भारतच विश्वचषक करंडक स्पर्धेचा अंतिम विजेता ठरेल असे भाकित आतापासूनच वर्तविण्यात येत आहे. आजच्या सामन्यात सचिन तेंडुलकर शंभर धावांची शंभरी पूर्ण करण्यात असमर्थ ठरला असला, तरीही धावांच्या डोंगराच्या निकषावर सचिन याला आजचा सामनावीर घोषित करण्यात आले. मुंबई येथे होणाऱ्या अंतिम स्पर्धेत तरी सचिन आपली शंभर धावांची शंभरी पूर्ण करेल अशी अपेक्षा चाहत्यांनी व्यक्त केली आहे. आज सचिन याला किमान तीन वेळा जीवदान मिळाल्याचा लाभ घेत सचिनने 85 धावा काढल्या.
आजही संपूर्ण देशात ठिकठिकाणी पुन्हा एकदा दिवाळी साजरी करण्यात आली. अनेकांनी विश्वचषक अंतिम सामन्यासाठी फटाके आगाऊ आणून ठेवले आहेत. दरम्यान आजचा सामना अत्यंत महत्वपूर्ण मानला जात होता, विविध कार्यालयांमध्ये सामना पाहण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. दुपारी एकनंतर अनेक कार्यालये ओस पडली होती, तसेच रस्त्यांवर अघोषित संचारबंदी सारखे चित्र दिसत होते.

मंगळवार, २९ मार्च, २०११

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।
IndiBlogger - The Largest Indian Blogger Community

भारत-पाक संघाच्या सामन्याची उत्कंठा वाढतेय क्षणाक्षणाला...

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थान निश्चित करण्यासाठी होणार असलेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्यासाठी केवळ चोवीस तास (हे वृत्त लिहिपर्यंत) बाकी आहेत. भारताने उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी गत विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाला चांगलीच धूळ चाखल्यामुळे संपूर्ण क्रिकेट विश्वातील क्रिकेटच्या चाहत्यांच्या भारतीय संघाकडून अपेक्षा वाढल्या आहेत. भारत आणि पाकिस्ता यांच्यापैकी विजेता ठरणारा संघ अंतिम सामन्यात खेळेल हे निश्चित आहे. या सामन्याबद्दल संपूर्ण देशात वृत्तपत्र माध्यमांसह विविध प्रसार माध्यमे आणि सामान्यांची उत्कंठा देखील क्षणाक्षणाला वाढते आहे. अनेक ठिकाणी सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यालयांमध्ये मात्र सुटी नसल्यामुळे कर्मचार्‍यांचा हिरमोड झाला आहे. अनेक नोकरदारांनी तर हा सामना पाहण्यासाठी चक्क सुटी टाकली असून काही कर्मचारी ऐनवेळी कारण सांगून सुटी घेण्याच्या विचारात आहेत.
सचिन तेंडुलकर आपले शंभरावे शतक या सामन्यात पूर्ण करतो अथवा नाही, यावर सट्टेबाजी सुरू आहे.

शुक्रवार, २५ मार्च, २०११

संकटांना घाबरू नका, त्यावर मात करायला शिका: सिंधुताई सपकाळ

अंधार झाल्याशिवाय पहाट उगवतच नसते म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यात एक अंधार येत असतो, एक रात्र येते अंधारी त्याचं नाव संकट असतं, पण आता बायानो तुम्हाला सांगते, जर तुमच्यावर संकट कोसळलं तर त्यावर पाय देऊन उभं राहिला शिका. संकटाची उंची तुमच्यापेक्षाही कमी होईल म्हणून संकटाला घाबरू नका, मरू नका, डरू नसा त्यावर स्वार व्हायला शिका आणि संकट त्याच्यावरच येतात जो सहन करू शकतो. असे मनोगत सिंधुताई सपकाळ यांनी सिडको भवनमध्ये आयोजित, शंभराव्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने, समारंभात व्यक्त केले. सिडकोचे अध्यक्ष नकुल पाटील अध्यक्षस्थानी होते.
सिंधुताई सपकाळ यांनी श्रोत्यांना हासू व आसू यांच्या हिंदोळ्यावर सर्वांना खिळवून ठेवत, स्त्री हीच सर्वांना सावरणारा स्तंभ असतो हे स्पष्ट करून स्त्रीची तुलना सायकलच्या मागच्या चाकाशी केली. कारण पुढचं चाक स्त्री-पुरुषाच्या हाती देते. कारण मागच्या चाकावर पूर्ण प्रवास अवलंबून असतो हे ती जाणते. कुटुंबाच्या जबाबदार्‍या सांगताना त्यात सायकलला गती देणारी चेन, ओझे सावरणारी कॅरियर, प्रकाश दाखविणारा डायनामो तसेच आधार देणारे स्टँड अशा अनंत पातळ्यांवरच्या जबाबदार्‍या सायकलच्या मागच्या चाकाप्रमाणे स्त्रीच सांभाळू शकते.
आजवर आपल्याला आधी भाषण करावं लागलं नंतरच मदतनिधी दिला गेला, परंतू सिडकोच्या लेकरांनी मात्र भाषणाच्या आधीच मदतनिधी दिल्याचे गौरवोदगार सिंधुताईंनी काढले. कार्यक्रमास पुष्पलता पाटील, अनुराधा सत्रे यांच्यासह सिडको कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष निलेश तांडेल, सरचिटणीस मिलिंद बागूल, मुख्य सामाजिक सेवा अधिकारी रीमा दीक्षित तसेच वरिष्ठ संख्यातज्ज्ञ रीटा अब्बी आदी मान्यवर उपस्थित होते.

गुरुवार, २४ मार्च, २०११

भारतीय संघ विजयाच्या रंगात रंगलाः रंगपंचमीचा पंच



गुरुवारी (ता. 24 मार्च) अहमदाबाद येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघात अक्षरशः करो या मरो..प्रमाणे जबरदस्त चुरशीच्या ठरलेल्या विश्वचषक सामन्यात अखेर भारतीय संघाच्या संयमी खेळीने संघाने देशातील नागरिकांना रंगपचमीनिमित्त विजयाची भेट दिली. काही षटकांमुळे श्वास रोखलेल्या प्रेक्षकांना आणि इलेक्ट्रॉनिक वाहिनीवर हा सामना पाहणाऱ्यांचे श्वास रोखून धरले होते. परंतू युवराज सिंग आणि सुरेश रैना हे दोघेही विजयाचे शिल्पकार ठरले. युवराजसिंग याला सामनावीर घोषित करण्यात आले. प्रेक्षकांना अपेक्षित यश मिळवून देऊन कांगारूंच्या संघाला रंगपंचमीचा पंच मारून हम भी कुछ कम नही...हे दाखवून दिले. पाच गडी आणि 14 चेंडू राखून भारताने कांगारूंवर विजय मिळवला.


रंगपंचमी जणू काही दिवाळी...

आजच्या महत्वपूर्ण सामन्याची विजयीपताका रोवण्यासाठी पंधरा धावांची आवश्यकता असतानाच भारताने विजय मिळवल्यासारखेच चित्र स्पष्ट झाल्यामुळे देशातील अनेक शहरांमध्ये आतषबाजी करण्यात आली. सामना संपल्यानंतर बराच वेळ ठिकठिकाणी आतषबाजी सुरूच होती, जणूकाही दिवाळीच साजरी करण्यात येत असल्याचा भास होत होता. विश्वचषकाचा गतविजेता आणि यंदाही प्रबळ दावेदार म्हणून ज्या संघाकडे पाहिले जात होते अशा ऑस्ट्रेलिया संघाला आता बाहेर जावे लागल्यामुळे यंदाच्या विश्वचषकाचा दावेदार म्हणून भारताकडून अपेक्षा उंचावल्या आहेत. यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान मोहाली येथे उपांत्यफेरी खेळली जाणार असून भारतीय संघावर या सामन्यात बराच दबाव असेल अशी प्रतिक्रिया क्रणधार महेंद्रसिंग धोनी यांनी व्यक्त केली.

रंग-पंच-मी...



देशात साजरे केल्या जाणाऱ्या विविध सण-वार, उत्सव, महोत्सवांचे स्वरूप गेल्या दशकात बदलत आहे. वर्षानुवर्ष असलेली बंधने आता बंधनातून मुक्त होऊन स्वच्छंदी विहार करत आहेत. मर्यादा सुद्धा अमर्यादपणे अथांग वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहापणे वहात आहेत हे चित्र तर गेल्या पाच वर्षात स्पष्ट झालेच आहे. परिणामी महिला देखील पुरुषांप्रमाणेच कुटुंबाला हातभार लावण्यासाठी घराबाहेर पडल्या आहेत. स्त्री-पुरुष भेद हे अंतर बव्हंशी कमी झाले असून कामानिमित्त महिला देखील अहोरात्र पुरुषांप्रमाणेच रस्त्याने येताजाताना दिसत आहेत. इतकेच नव्हे, तर आजकालच्या नवीन ट्रेंडनुसार होळी, धूळवड, रंगपंचमी अशा सणवार, उत्सवांना मोठ्या संख्येने महिला सुद्धा मित्र-मैत्रीणींकडे धूळवड, रंग खेळण्यासाठी थाटामाटात जाताना दिसतात. परंतु विविध रंगांनी रंगलेले चेहरे धुण्यासाठी मात्र बरीच मेहनत घ्यावी लागते. रंग तयार करताना करण्यात आलेले रसायनाचे मिश्रण किंवा अबीराऐवजी पेन्ट्स चा वाढलेला वापर हे याचे कारण आहे. रस्त्याने जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनचालकांवर, पादचाऱ्यांवर सर्रासपणे पाण्याने भरलेले, रंगांनी भरलेले फुगे फेकल्यामुळे गंभीर स्वरूपाचे अपघात होणे, या घटना सुद्धा वाढल्या आहेत. एकमेकांना रंग लावताना अर्थातच रंग पंच करताना, रंगाने भरलेले फुगे पथिकांवर फेकताना पुरेशी काळजी घेऊन जीवितहानी होणार नाही याची काळजी घ्यावी, हीच अपेक्षा. मात्र रंगांची उधळण कमी न करता नैसर्गिक रंगांची नवरंगी उधळण करून जल्लोषात सर्व गोष्टी घडतील हाच विश्वास...!

बुधवार, २३ मार्च, २०११

राज्यातील सर्व घटकांना सामावून घेणारा, समन्यायी अर्थसंकल्प- छगन भुजबळ

मुंबई, दि. 23 मार्च : राज्यातील शहरी तसेच ग्रामीण भागाला समान न्याय तसेच समाजातील सर्व घटकांना विकासाची समान संधी देणारा असा अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी सादर केला आहे, अशा शब्दांत सार्वजनिक बांधकाम तथा पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.
उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सन 2011-12 चा महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर केला. त्याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करताना श्री. भुजबळ यांनी म्हटले आहे की, अर्थसंकल्पात राज्यातील सर्व घटकांच्या विकासाचे सूतोवाच करण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी तीन लाखांपर्यंत शून्य ते 2 टक्के व्याजदराने कर्ज देण्याचा निर्णय घेतानाच कृषी संजीवनी योजनेची घोषणाही स्तुत्य आहे. दोन लाख हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्याचा निर्धार करून त्या दृष्टीने पाटबंधारे विभागासाठी सुमारे 6300 कोटी तर जवाहर विहीर योजनेसाठी 221 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. फलोत्पादन वृध्दी, निर्यात केंद्रे, फार्म पॅक हाऊसिंग या बरोबरच सिंचन प्रकल्प, महाराष्ट्र सुजल योजना, रोजगार हमी योजना यांच्यासाठी भरीव तरतूद करून राज्यातील शेतकरी व कष्टकरी वर्गाला न्याय दिला आहे. प्राथमिक आरोग्य सुविधांच्या सक्षमीकरणासाठीही भरीव तरतूद करण्यात आली आहे. सन 2012 अखेरपर्यंत राज्य भारनियमनमुक्त करण्याच्या दिशेनेही अर्थसंकल्पात करण्यात आलेली तरतूद समाधानकारक आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
राज्याचा रस्ते विकास आणि गडकिल्ले विकासासाठी अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीचे स्वागत करून श्री. भुजबळ यांनी म्हटले आहे की, रस्तेविकासासाठी 2750 कोटी रुपयांची तरतूद केली असून त्यातून 1075 किलोमीटर रस्तेविकासाचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील. गडकिल्ल्यांच्या विकासासाठी विशेषत: सिंधुदुर्ग, विजयदुर्गसाठी विशेष तरतूद त्याचप्रमाणे सिंहगड, रायगड, शिवनेरी, प्रतापगड याठिकाणी दृकश्राव्य प्रयोगासह पर्यटकांसाठी विविध सुविधा विकसित करण्यासाठी केलेली तरतूदही राज्याच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राज्यातील मागासवर्गीय तसेच अल्पसंख्य समाजाच्या विकासासाठीही अर्थसंकल्पात उपयुक्त अशी तरतूद केली आहे. राज्यातील अनुसूचित जाती- जमातींसाठी तसेच आदिवासी उपयोजनेअंतर्गत वित्तमंत्र्यांनी भरीव तरतूद केली आहे. वित्तमंत्र्यांनी अल्पसंख्याक समाजातील गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांसाठी जाहीर केलेली मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजनाही अत्यंत स्वागतार्ह असल्याचेही श्री. भुजबळ यांनी नमूद केले आहे.

कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप

(पनवेल):  राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...