शुक्रवार, ४ मार्च, २०११

डाव्यांनी फुलेंचा शेतर्‍यांचा आसूड स्वीकारला नाही: विचारवंत वानखेडे



मुंबई, ता. ४ (प्रतिनिधी) - महात्मा गांधी असो किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्याच विचारात जगातील सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत असे आपण मानत नाही..कुण्या एकाच्या विचारात अशी सर्व प्रश्नांची उत्तरे सापडत नसतात. महात्मा फुलेंना केवळ सामाजिक अंगाने डाव्यांनी स्वीकारले, मात्र शेतकर्‍यांच्या आसूड या अर्थाने त्यांना डाव्यांनी स्वीकारले नाही..शेतकरी आत्महत्येच्या गेल्या काही वर्षातील आकडेवारीचा अभ्यास केला असता हे लक्षात येते की पोळा जवळ आला की शेतकर्‍यांच्या आत्महत्येत वाढ होते..विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, लेखक आणि पत्रकार चंद्रकांत वानखेडे बोलत असतात आणि सभागृहात उपस्थित श्रोते आणि मान्यवर दंग होऊन ऐकतात व नकळत आत्मपरिक्षणही करू लागतात...!
हे चित्र प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये 'आपला चि वाद आपणांशी' या आत्मकथनाच्या दुसर्‍या आवृत्तीच्या पुनर्प्रकाशन समारंभात पहायला मिळाले. या समारंभात डॉ. रवी बापट, ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी, मनोविकास प्रकाशनचे अरविंद पाटकर, मी मराठी वृत्तवाहिनीचे संपादक सचिन परब यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा झाला. यानंतर रंगलेल्या प्रकट मुलाखतीत प्रतिमा जोशी यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना वानखेडे यांनी आपल्या जीवनसंघर्षातील अनुभवाचे बोल ऐकवले. शेतकर्‍यांच्या प्रश्नांबाबत वानखेडे यांच्या अभ्यासाला खुद्द पी. साईनाथ यांनी सलाम केला आहे. वानखेडे यांनी एस. एम. जोशी यांचे सहाय्यक म्हणूनही काही वर्षे काम केले आहे. "पोळा हा सण साजरा करताना शेतकरी आपल्या शेतावर काम करणार्‍या गड्याला पुरणपोळीचे जेवण खाऊ घालतो. आणि पोळ्याच्या आदल्या रात्री वर्षभर राबणार्‍या बैलाची खांदशेकणी करतो. खांदशेकणी बैलाच्या खांद्याला लोण्याने चोळले जाते. मात्र कर्जबाजारी झालेला शेतकरी आपण बैलाची खांदशेकणी वा गड्याला पुरणपोळीही खाऊ घालू शकत नाही, या दुःखानेच शेतकरी हतबल होऊन आत्महत्या करतो. शेतकर्‍यांच्या आत्महत्या ही संपलेल्या आंदोलनातून उत्पन्न झालेली 'सायलेंट मूव्हमेंट' " . या शब्दात त्यांनी भारत आणि इंडियातील विषमतेची दरी किती खोल आ हे हे दाखवून दिले.
या मुलाखतीत वानखेडे यांच्या पत्नी व सामाजिक कार्यकर्त्या माया यांनीही मेटीखेडा या आपल्या गावात ग्रामपंचायतीत सर्व महिला निवडून आणण्याच्या प्रयोगाची माहिती दिली.
उत्तम साहित्यकृती - डॉ. बापट
आरोग्य विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि साहित्यिक डॉ. रवी बापट यांनी आपल्याला हे पुस्तक खूप आवडल्याचे सांगतानाच वानखेडे यांनी अनेक मान्यवरांचे बुरखे टराटरा फाडल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन केले. समाजात मोठे म्हणून मिरवणारे लोक हे ढोंगी आहेत. त्यांचे खरे रूप उघडकीस आणल्याशिवाय जनता जागरूक होणार नाही. असे म्हणत त्यांनीही नाव न घेता काही सामाजिक कार्यकर्त्यांचे वस्त्रहरण केले. "मार्क्सवादी भ्रष्ट झाला तर क्रूर होतो आणि गांधीवादी भ्रष्ट झाला की ढोंगी होतो" हे वानखेडे यांचे वाक्य सुभाषितच असल्याचे ते म्हणाले

उत्तर महाराष्ट्राच्या हवाई क्षेत्रातील विकासाचा नवा अध्याय सुरू: भुजबळ

ओझर येथील विमानतळाच्या विकासा संदर्भात महाराष्ट्र शासन आणि एच. ए. एल. यांच्यात, मंत्री छगन भुजबळ आणि मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार झाला. यावेळी हस्तांदोलन करताना सचिव नंदकुमार जंत्रे आणि पी. वी. देशमुख
मुंबई, ता. ३ - नाशिक येथील ओझर विमानतळावर प्रवासी सुविधांच्या विस्तार आणि विकासामुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्राच्या हवाई वाहतूक क्षेत्राच्या विकासाचा एक नवा अध्याय सुरू होत आहे. या शब्दात राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
ओझर विमानतळावरून नागरी हवाई वाहतूक सुरू करण्यासाठी गेली अनेक वर्षे प्रयत्नशील असलेल्या श्री. भुजबळ यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात ओझर विमानतळाच्या आधुनिकीकरणासंदर्भात महाराष्ट्र शासन आणि हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड उपस्थित होते. सामंजस्य कराराबद्दल अत्यंत समाधानाची भावना व्यक्त करून श्री. भुजबळ म्हणाले की, सध्या ओझर विमानतळावर केवळ एचएएल च्या संरक्षण खात्याचा टर्मिनल कॉम्प्लेक्स आहे. आता सर्व सुविधांनी युक्त अशा पॅसेंजर टर्मिनल कॉम्प्लेक्सची निर्मिती करण्यात येणार असल्याने तिथून व्यापारी तत्वावरील खाजगी नागरी हवाई वाहतूक सुरू करण्यात अडचण येणार नाही. नांदेड, औरंगाबाद, जालना येथील विमानतळांच्या धर्तीवरच हा टर्मिनल विकसित करण्यात येईल. प्रवासी वाहतुकीबरोबरच स्थानिक कृषी उत्पादनांची निर्यात, प्रक्रिया उद्योग, पर्यटन तसेच विभागाच्या एकूणच औद्योगिक विकासालाही मोठी चालना मिळेल.
सचिव श्री. जंत्रे यांनी सांगितले की, सुमारे ४० कोटी रुपये खर्चाच्या या पॅसेंजर टर्मिनल कॉम्प्लेक्सच्या प्रकल्पामध्ये व्हिव्हीआयपी लाऊंज, पॅसेंजर लाऊंज याबरोबरच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत. सध्या मुंबई विमानतळावरील हवाई वाहतुकीस पर्यायी विमानतळ म्हणून अहमदाबाद विमानतळाचा वापर करण्यात येतो. तथापि, ओझर येथील विमानतळ विकसित झाल्यानंतर भविष्यात मुंबई विमानतळाला तो एक उत्कृष्ट पर्याय ठरू शकेल.
एचएएल चे व्यवस्थापकीय संचालक पी. व्ही. देशमुख म्हणाले की हा प्रकल्प आता 'ड्रीम प्रोजेक्ट' असून आजचा करार ४० कोटींचा असला तरीही यापूर्वीच हिंदुस्थान एरोनॉटिक्सने येथे कित्येक कोटी रुपये खर्च करून अत्याधुनिक सोयीसुविधा विकसित केल्या आहेत. मुंबई विमानतळासारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा आम्ही विकसित करीत आहोत. सुमारे २० कोटी रुपये खर्चून सात ते आठ विमानांचा पार्किंग लॉट नुकताच तयार केला आहे. ओझऱची दहा हजार फूट लांबीची धावपट्टी तेरा हजार फुटांची करण्याचा आमचा मानस आहे. जेणे करून एअरबस चे जंबो-जेटही येथे उतरू शकेल. देशात मुंबई विमानतळाची धावपट्टी केवळ दहा हजार फुटांची आहे, ही गोष्ट लक्षात घेतल्यास या विमानतळाचे महत्व लक्षात येऊ शकेल, असेही ते म्हणाले.

गुरुवार, ३ मार्च, २०११

कृषिधन...

हैदराबादच्या 'मॅनेज' या संस्थेतील विद्यार्थी संघास सर्वोत्कृष्ट सादरीकरणासाठी सार्व. बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ ३० हजारांचा धनादेश प्रदान करताना..

मुंबईमध्ये वॅक्स म्युझियमच्या उभारणीसाठी सर्वतोपरी सहकार्य: भुजबळ



हिंदवी स्वराज्याच्या या संस्थापकास विनम्र अभिवादन...!



मुंबई, ता. २ - लंडनमधील मादाम तुसाँ वॅक्स म्युझियमच्या तोडीचे वॅक्स म्युझियम मुंबईमध्ये उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे केले.
लोणावळा येथील 'सेलिब्रिटी वॅक्स म्युझियम' चे आर्टिस्ट सुनील कंदल्लूर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा मेण पुतळा तयार केला आहे. या पुतळ्याचा अनावरण समारंभ गिरगाव चौपाटीनजीकच्या इक्सिया इव्हेंट लाऊंजमध्ये श्री. भुजबळ यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते.
श्री. भुजबळ म्हणाले की, आपण स्वतः लंडन येथील मादाम तुसाँ म्युझियमला भेट दिली असून विविध देशांच्या महान व्यक्तींचे मेणाचे पुतळे असलेले हे म्युझियम पाहण्यासाठी अक्षरशः रांगा लागलेल्या असतात. तसे म्युझियम जगात कुठेही आपल्या पाहण्यात नाही. परंतू गेल्या आठवड्यात लोणावळा परीसरात कार्यक्रमाच्या निमित्ताने गेलो असताना मुद्दाम 'सेलिब्रिटी वॅक्स म्युझियम' भेट दिली आणि स्तंभित झालो. मादाम तुसाँ इतके हे म्युझियम भव्य नाही, मात्र सुनिल कंदल्लूर या कलाकाराची कामगिरी मात्र मादाम तुसाँ वॅक्स आर्टिस्टच्या तुलनेत कुठेही कमी नाही. त्या कलाकारांच्या तोडीचा हा कलाकार आपल्या देशात असल्याचा आपल्याला अभिमान आहे. तयार करण्यात आलेला हा पुतळा अत्यंत तेजस्वी आणि सजीव वाटत आहे. जणू काही छत्रपतीच या सभागृहात अवतीर्ण झाल्याचा भास होतो आहे. त्यांच्या पाणीदार डोळ्यांमधील तेज, धारदार नाक ही सारी वैशिष्ट्ये पुतळ्यात हुबेहुब उतरली आहेत. शिवरायांकडे पाहिल्यानंतर लोकांना आदरयुक्त जरब वाटते. तीच भावना या पुतळ्याकडे पाहिल्यानंतर होत असून पाहणारा नतमस्तक झाल्याशिवाय रहात नाही. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनीच या पुतळ्याची वाखाणणी करून प्रशस्तीपत्रक दिले आहे. यामुळे कलाकाराच्या कामगिरीला दाद दिल्याखेरीज रहावत नाही.
                              मेण-पुतळे तयार करण्याचे कोणतेही प्रशिक्षण नाही- कंदल्लूर
आपण मेण-पुतळे तयार करण्याचे कोणतेही शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले नसून मादाम तुसाँ म्युझियमला भेटही दिलेली नाही. परंतू चमत्कार अथवा साक्षात्कार म्हणून आपण काम करून पुतळे साकारत गेलो. गेल्या १३ वर्षात घेतलेल्या परिश्रमांचे मिळालेले फळ म्हणजे छत्रपतींचा पुतळा आपल्या हातून साकारला गेला. या शब्दात भारावून गेलेल्या आर्टिस्ट कंदल्लूर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी भुजबळ यांचाही मेण-पुतळा तयार करण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रमुख रोहिदास लोखंडे, म्युझियमचे संचालक ऍड. सुभाष कुमार उपस्थित होते. सूत्रसंचालन मोनाली कुलकर्णी यांनी केले.


बुधवार, २ मार्च, २०११

कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी देशातील तरुण पिढीचे योगदान मोलाचे: भुजबळ

मुंबई, दि. 2 मार्च :  देशातील कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी अत्याधुनिक माहिती व तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या तरूण पिढीचे योगदान अत्यंत मोलाचे ठरणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी काल येथे केले.
माटुंगा (पूर्व) येथील 'वेलिंगकर इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट ऍन्ड रिसर्च'च्या सभागृहात काल सायंकाळी झालेल्या 'कृषी-धन-2011' या कार्यक्रमात ते बोलत होते. द एनर्जी ऍन्ड रिसोर्सेस इन्स्टिटयूट (TERI) आणि वेलिंगकर इन्स्टिटयूट यांच्या संयुक्त सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी 'कृषी-धन' (www.teriin.org/events/krishidhan/) या वेबसाइटचेही श्री. भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाला वेलिंगकर इन्स्टिटयूटचे समूह संचालक डॉ. उदय साळुंखे, 'टेरी'च्या पश्चिम प्रादेशिक केंद्राच्या प्रमुख डॉ. अंजली पारसनीस, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे यांच्याबरोबरच देशातील विविध मॅनेजमेंट संस्थांचे शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
आपल्या पारंपरिक जीवनशैलीचा महत्त्वपूर्ण घटक असलेल्या कृषी क्षेत्राला वगळून आपण कदापि प्रगती करू शकणार नाही, असे स्पष्ट करून श्री. भुजबळ यांनी नुकत्याच सादर  झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी, अन्नधान्य व उत्पादन वृध्दीसाठी करण्यात आलेली भरीव तरतूद स्वागतार्ह बाब असल्याचे सांगितले.
कृषी क्षेत्राच्या प्रगतीमध्ये युवा उद्योजकांनी योगदान देण्याची अपेक्षा व्यक्त करताना ते म्हणाले, वाढती लोकसंख्या, वाढते शहरीकरण आणि शेतीखालील जमिनीचे घटते प्रमाण या पार्श्वभूमीवर उत्पादन वृध्दीचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. हरितक्रांतीमुळे देशामध्ये जी कृषी प्रगतीची लाट आली, ती पुढे नेण्यासाठी नवीन धोरणात्मक सुधारणांची आवश्यकता आहे. जलस्रोतांचे योग्य व्यवस्थापन, शेतकऱ्यांना उपयुक्त व दर्जेदार मार्गदर्शन व कौशल्य विकास, सुलभ दराने आर्थिक सहकार्य यांसह हवामानाबाबत जागृती व मार्गदर्शन, संगणकाधारित तंत्रज्ञानाचा विकास, भू-आरोग्याबाबत दक्षता आदी बाबतीत नवीन कृषी उद्योजक खूप योगदान देऊ शकतात. अंतराळ तंत्रज्ञान किंवा जैव-तंत्रज्ञान आदी नव्या शाखांतील ज्ञानाचा उपयोग कृषी क्षेत्राच्या विकासासाठी करणे ही काळाची गरज आहे.
कृषी-पर्यटनासारख्या वेगळया संकल्पनेचाही तरुण उद्योजकांना लाभ घेता येऊ शकेल, असे सांगून श्री. भुजबळ म्हणाले, ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठया प्रमाणात चालना देण्याची क्षमता कृषी-पर्यटनामध्ये आहे. यातून नियमित शेतीबरोबरच अधिकची मिळकत शेतकऱ्यांना होऊ शकते. स्थानिक बेरोजगारी तसेच हंगामी शेतीतून मिळणारे अल्प उत्पन्न आदी समस्यांवर कृषी पर्यटन एक चांगला उपाय ठरू शकते. पर्यटकांना आकर्षित करण्याबरोबरच स्थानिक शेतकऱ्यांसाठी सुध्दा कृषी पर्यटन एक चांगला अनुभव आणि मिळकतीचे साधन ठरू शकते. त्यामुळे या क्षेत्रामध्येही तरूण उद्योजकांनी गुंतवणूक करण्यासाठी पुढे येण्याची गरज श्री. भुजबळ यांनी व्यक्त केली.
यावेळी विविध राज्यांतून आलेल्या व्यवस्थापन संस्थांच्या विद्यार्थ्यांनी कृषी-उद्योगविषयक सादरीकरण केले. त्यामध्ये हैदराबादच्या 'मॅनेज' या संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या संघाला सर्वोत्कृष्ट सादरीकरणासाठी श्री. भुजबळ यांच्या हस्ते 30 हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.

'ये लालटेन लालूजी का है!'
यावेळी 'टेरी'च्या पश्चिम विभागीय प्रमुख अंजली पारसनीस यांनी श्री. भुजबळ यांना सौर-कंदील भेट दिला. तो स्विकारत असतानाच त्याचा स्वीच ऑन करून श्री. भुजबळ यांनी तो आपल्या एका हातात धरला आणि विद्यार्थ्यांकडे पाहात आपल्या नेहमीच्या मिश्कील शैलीत 'ये लालटेन लालूजी का है!' त्यांच्या या हजरजबाबीपणावर सभागृहात प्रचंड हशा पिकला. टाळयांच्या गजरात विद्यार्थ्यांनी त्यांना दाद दिली.

खाडीपात्रातील गाळ उपसण्यासाठी २० कोटी रुपयांची मदत: अजित पवार

मुंबई, ता. १ - रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि ठाणे जिल्ह्यांच्या खाडी पात्रातील गाळ उपसण्यासाठी २० कोटी रुपये देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे सांगितले.
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाह्य इंजिनधारक आणि बिगर यांत्रिक नौकांना केरोसीनचा पुरवठा करण्यासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. श्री. पवार म्हणाले की, कोकणच्या खाडीपात्रातील गाळ उपसण्यासाठी दोन ड्रेझरची खरेदी करण्यात येणार आहे. परंतु ड्रेझर येईपर्यंत शेजारच्या राज्यांमधून भाडोत्री ड्रेझर आणून गाळ उपसण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला पाच कोटी रुपये देण्यात येतील.
बाह्य इंजिनधारक आणि बिगर यांत्रिक नौकांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून करेसीन पुरवण्यासंदर्भात मत्स्यव्यवसाय विभागाने इतर राज्यांचा अभ्यास करून आठवडाभरात केंद्र सरकारला प्रस्ताव पाठविण्याचे आदेशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले.
उद्योगमंत्री नारायण राणे, पशुसंवर्धन व मत्स्यव्यवसायमंत्री मधुकर चव्हाण, पशुसंवर्धन व मत्स्यव्यवसाय सचिव अनिल डिग्गीकर, मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. बी. पाटील, सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर आदी उपस्थित होते.

नवी मुंबई प्रकल्पग्रस्त खातेदारांच्या १२.५ टक्के भूखंड वाटप

मुंबई, ता. २ - नवी मुंबई प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचे प्रकल्पग्रस्त खातेदारांना शासन निर्णयाप्रमाणे १२.५ टक्के भूखंड वाटप करण्यात येत असून, या भूखंड वाटपाच्या संचिकेतील माहिती मिळणेसाठी प्रकल्पग्रस्त खातेदारांना सिडको कार्यालयात वारंवार यावे लागू नये, या उद्देशाने भूमी व भूमापन विभागातर्फे प्रकल्पग्रस्त खातेदारांच्या नावांची व संचिका क्रमांकाची यादी तयार करण्यात आली आहे.
सिडको भवन येथील माहिती केंद्रात व www.cidcoindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध असून या यादीत तालुकानिहाय प्रत्येक गावातील भूधारकाच्या संचिकांचा तपशील जसे संचिका क्रमांक, पात्रता धारकाचे नाव याबाबत माहिती तसेच ज्या भूधारकांची पात्रता शिल्लक आहे त्यांची ज्येष्ठता यादी उपलब्ध असून, यापुढे ज्येष्ठतेनुसार भूखंडांचे वाटप करण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ६७९१, ८१०५/८१०६ या क्रमांकावर संपर्क साधून व वरील संकेतस्थळावर आपल्या संचिकेचा तपशील प्राप्त करू शकतात.

मंगळवार, १ मार्च, २०११

राज्यात प्रीपेड वीज मीटर बसविणार

मुंबई येथे मंत्रालयात प्रीपेड वीज मीटर योजनेचा शुभारंभ करताना उपमुख्यमंत्री अजित पवार, ऊर्जा विभागाचे मुख्यसचिव सुब्रतो रथो, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता आदी.
मुंबई, ता. १ - मोबाईल फोनच्या धर्तीवर राज्यात वीज बिलासाठी प्रीपेड मीटर लावण्यास प्रारंभ झाला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या योजनेस आज सुरवात झाली.
मंत्रालयात झालेल्या या कार्यक्रमास ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव सुब्रतो रथो, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पहिल्या टप्प्यात राज्यात सुमारे २५ हजार प्रीपेड वीजमीटर लावले जाणार आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचे वीज मीटर लावणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य आहे. सुरवातीस पुणे, नागपूर, औरंगाबाद, पेण, कल्याण, कोल्हापूर परीसर तसेच महाबळेश्वर, माथेरान, चिखलदरा अशा पर्यटनस्थळी प्रीपेड वीजमीटर लावले जातील.
प्रीपेड मीटर लावणार्‍या ग्राहकांना वीज बिलात पाच टक्के विशेष सवलत देण्यात येणार आहे. या मीटरमधील वैधता संपल्यानंतर ऑनलाईन रिचार्ज करण्याची सुविधा आहे. कुठल्याही राष्ट्रीय सणांच्या दिवशी किंवा सुटीच्या दिवशी रिचार्ज अभावी वीज कनेक्शन खंडित होणार नाही. त्यासाठी खास हॅप्पी अवर्स ची त्यात सुविधा आहे. कुठल्याही राष्ट्रीय सणांच्या किंवा सुटीच्या दिवशी रिचार्ज अभावी वीज कनेक्शन खंडित होणार नाही. त्यासाठी खास हॅप्पी अवर्स ची त्यात सुविधा आहे.
या प्रीपेड मीटरची किंमत २ हजार ६०० रुपये असून त्याचा भार वीज ग्राहकांवर पडणार नाही. महावितरणतपर्फे हे मीटर बसविले जाणार आहेत. हे मीटर वापराच्या दृष्टीने सुलभ असल्यामुळे कुणालाही अडचण येणार नाही. याचे कार्य प्रीपेड मोबाईल फोनप्रमाणेच असून या योजनेला महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने मंजूरी दिली आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती मेण-पुतळ्याचे छगन भुजबळ यांच्या हस्ते बुधवारी अनावरण

मुंबई, ता. १ - अखिल महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती मेण-पुतळ्याचे उद्या (ता. २ मार्च) सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते अनावरण करण्यात येणार आहे. मरिन ड्राइव्ह येथील इक्सिया इव्हेंट लाउंजमध्ये सायंकाळी चारला अनावरण समारंभ होईल.
छत्रपती शिवरायांचे जगभरात अनेक पुतळे असले तरी मेणापासून बनविण्यात आलेला हा शिवरायांचा जगातील पहिलाच पुतळा आहे. भारतातील एकमेव वॅक्स आर्टिस्ट असलेलेल तसेच लोणावळा येथील "सेलिब्रिटी वॅक्स म्युझियम" चे संकल्पक-कलाकार सुनिल कंदल्लूर यांनी हा पुतळा तयार केला आहे. आजपर्यंत त्यांनी पन्नासहून अधिक व्यक्तींचे मेणाचे पुतळे तयार केले आहेत. शिवाजी महाराजाचा पुतळा त्यांच्या लौकिकास साजेसा असा बनविण्यात आला असून पाहणार्‍यास, शिवाजी महाराज पुन्हा भूतलावर अवतरल्याचा भास झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास वॅक्स म्युझियमचे संचालक ऍड. सुभाष कुमार यांनी व्यक्त केला आहे. उद्या अनावरणानंतर हा पुतळा लोणावळा येथील वॅक्स म्युझियममध्ये स्थापित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

शंभरीची शंभरी गाठण्यापासून सचिन केवळ दोन पावले दूर..

क्रमांक एक चा विश्वविख्यात क्रिकेटपटू होऊन देखील आपल्या साध्या राहणी, सुशील स्वभावाची ख्याती प्राप्त केलेला अनेक चाहत्यांचा सुपरहिरो सचिन तेंडुलकर आपल्या शंभर धावांची शंभरी अर्थात शतकांचे शतक गाठण्यापासून केवळ दोन पावले दूर आहे.
आजतागायत सचिनने कसोटी सामन्यांमध्ये एकूण ५१ शतके झळकावली असून एक दिवसीय सामन्यांमध्ये ४७ शतके झळकावली आहेत. ९८ वे शतक नुकतेच बंगळूर येथे विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध खेळताना पूर्ण केले आहे. सर ब्रॅडमन यांच्याशी तुलना केली जाणारा सचिन...एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या सचिन तेंडुलकरला शाळेपासूनच क्रिकेटची खूप आवड होती. आपल्या 'शारदा विद्यामंदिर' शाळेत क्रिकेटचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्याकडून त्याने क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली. शाळेत असतानाच जीवलग मित्र विनोद कांबळीबरोबर त्याने ६६४ धावांची भागीदारी रचली होती. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी त्याने मुंबई संघातून गुजरात संघाविरुद्ध खेळून नावलौकिक प्राप्त केला. सचिन तेंडुलकर याच्या कुटुंबियांचे, सचिन देव बर्मन म्हणजेच एस. डी. बर्मन हे आवडते संगीत दिग्दर्शक होते, यांच्या नावावरूनच त्याचे नाव "सचिन" ठेवले गेल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात.

सचिनने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना १९८९ साली पाकिस्तानविरुद्ध कराची येथे खेळला. त्या सामन्यात त्याने वासिम अक्रम, इम्रान खान, अब्दुल कादिर आणि वकार युनूससारख्या दिग्गज गोलंदाजांचा सामना केला. सचिनची आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील सुरुवात निराशाजनक झाली. वकार युनूसचा सुद्धा हा पहिला आंतरराष्ट्रीय सामना होता, त्याने सचिनला १५ धावांवर त्रिफळाचीत केले. याचे उट्टे सचिनने फैसलाबाद येथील कसोटी सामन्यात आपले पहिले अर्धशतक झळकावून काढले. सचिनची आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमधील सुरुवातही खराब झाली. १८ डिसेंबरला झालेल्या आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात खाते उघडण्यापूर्वीच पुन्हा वकार युनूसने त्याला बाद केले. या मालिकेनंतर न्यूझीलंडच्या दौर्‍यात त्याचे पहिले कसोटी शतक १२ धावांनी हुकले. त्या सामन्यात नंतर भारताच्या प्रशिक्षकपदी आलेल्या जॉन राईटने सचिनचा झेल पकडला परिणामी सचिन जगातला सर्वात तरूण शतकी खेळी करणारा खेळाडू बनण्यापासून वंचित राहिला. अखेर १९९० सालच्या इंग्लंडच्या दौर्‍यात सचिनने आपले पहिले कसोटी शतक झळकावले. परंतु या काळात तो फारसे चांगले खेळू शकला नाही. तेंडुलकरला खरा सूर त्याच्या १९९१-९२ सालच्या ऑस्ट्रेलियन दौर्‍यात गवसला, यावेळी त्याने पर्थमधील वेगवान आणि उसळत्या खेळपट्टीवर सुंदर शतकी खेळी केली. सचिनला आत्तापर्यंत कसोटी सामन्यांमध्ये ११ वेळा सामनावीराचा बहुमान मिळाला आहे व २ वेळा तो बॉर्डर-गावसकर चषकामध्ये ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकावीर ठरला होता. यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचताना सचिनला अनेकदा अपमान देखील सहन करावे लागले, हे वेगळे लिहिण्याची गरज नाही.
सचिनने एकदिवसीय सामन्यात १७,०००पेक्षा अधिक धावा काढल्या आहेत. विश्वचषक स्पर्धेत सचिन आणखी कोणकोणते विक्रम नोंदवतो, याकडे संपूर्ण जगातील त्याच्या चाहत्यांचे लक्ष आहे.
सचिनची ९८ शतके याप्रमाणे:
धावसंख्या      देश
119                 इंग्लंड
148                 ऑस्ट्रेलिया
114                 ऑस्ट्रेलिया
111                 दक्षिण आफ्रिका
165                 इंग्लंड
104                श्रीलंका
142                श्रीलंका
179                वेस्ट इंडिज
122               इंग्लंड
177               इंग्लंड
169              दक्षिण आफ्रिका
143             श्रीलंका
139            श्रीलंका
148            श्रीलंका
155           ऑस्ट्रेलिया
177           ऑस्ट्रेलिया
113          न्यूझिलंड
136         पाकिस्तान
124         श्रीलंका
126         न्यूझिलंड
217         न्यूझिलंड
116        ऑस्ट्रेलिया
122        झिम्बाब्वे
201        झिम्बाब्वे
126        ऑस्ट्रेलिया
155        दक्षिण आफ्रिका
103        इंग्लंड
176        झिम्बाब्वे
117        वेस्ट इंडिज
193        इंग्लंड
176        वेस्ट इंडिज
241       ऑस्ट्रेलिया
194       पाकिस्तान
248       बांग्लादेश
109       श्रीलंका
101       बांग्लादेश
122       बांग्लादेश
154       ऑस्ट्रेलिया
153      ऑस्ट्रेलिया
109      ऑस्ट्रेलिया
103      इंग्लंड
160      न्यूझिलंड
100     श्रीलंका
105      बांग्लादेश
143      बांग्लादेश
100      दक्षिण आफ्रिका
106      दक्षिण आफ्रिका
203       श्रीलंका
214       ऑस्ट्रेलिया
111        दक्षिण आफ्रिका
146       दक्षिण आफ्रिका
   
   

110       ऑस्ट्रेलिया
115       न्यूझिलंड
105       वेस्ट इंडिज
112      श्रीलंका
127      केनिया
137      श्रीलंका
100      पाकिस्तान
118     पाकिस्तान
110     श्रीलंका
114     दक्षिण आफ्रिका
104     झिम्बाब्वे
117     न्यूझिलंड
100     ऑस्ट्रेलिया
143     ऑस्ट्रेलिया
134     ऑस्ट्रेलिया
100    केनिया
128    श्रीलंका
127    झिम्बाब्वे
141     ऑस्ट्रेलिया
118    झिम्बाब्वे
124    झिम्बाब्वे
140    केनिया
120    श्रीलंका
186     न्यूझिलंड
122     दक्षिण आफ्रिका
101    श्रीलंका
146    झिम्बाब्वे
139     ऑस्ट्रेलिया
122     वेस्ट इंडिज
101     दक्षिण आफ्रिका
146    केनिया
105     इंग्लंड
113    श्रीलंका
152    नामिबिया
100     ऑस्ट्रेलिया
102     न्यूझिलंड
141    पाकिस्तान
123    पाकिस्तान
100    पाकिस्तान
141     वेस्ट इंडिज
100     वेस्ट इंडिज
117     ऑस्ट्रेलिया
163     न्यूझिलंड
138    श्रीलंका
175     ऑस्ट्रेलिया
200     दक्षिण आफ्रिका
120     इंग्लंड

कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप

(पनवेल):  राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...