मंगळवार, २६ ऑक्टोबर, २०१०

इंडो-चायना फटाके: यंदाचा आनंद ठरणार उद्याची डोकेदुखी...!

न्यायालयाच्या आदेशानुसार यंदा बहुसंख्य ठिकाणी 125 डेसिबलपेक्षा कमी आवाजाचे फटाके बाजारपेठेत उपलब्ध करण्यावर निर्मात्यांचा भर आणि विक्रेत्यांचा कल आहे. फटाक्यांच्या उत्पादनासाठी फटाके उत्पादकांनी चिनी फटाके उत्पादकांच्या सहकार्याने यंदा इंडो-चायना फटाके दिसतील. कमी आवाजाचे आणि या फटाक्यांमधून विविध रंग ओसंडून असल्यामुळे ग्राहकांना आणि शासनाला दोघांनाही आनंद होईलच. मात्र नव्याचे नऊ दिवस या उक्तीप्रमाणे लवकरच हा आनंद मावळून ही डोकेदुखी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. चीनने भारताचा किती मोठा भूभाग बळकावला आहे याची कल्पना देखील न करता येईल असे या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या लेख, बातम्यांवरून वाटते. सध्या देशातले इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे मार्केट चीनने अक्षरशः कॅप्चर केले आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. मोठ्या शहरांपासून छोट्या गावापर्यंत चायना मार्केट च्या वस्तुंना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. या वस्तू आपल्या देशात तयार झालेल्या तशाच वस्तूच्या तुलनेत स्वस्त मिळतात, अनेकदा यात नावीन्य देखील असल्याचे दिसते. भारतातील ग्राहकाची मानसिकता आपल्यापेक्षा चीननेच चांगली ओळखलेली दिसतेय.
इंडो-चायना फटाके तयार करण्याची कल्पना कोणाच्या डोक्यात आली, कुणास ठाऊक! परंतु याची फलप्राप्ती चांगली होणार नाही. ग्राहक एकदा हॅबिच्युअल झाल्यानंतर त्याला अपेक्षित ब्रँड मिळाल्याशिवाय त्याचे समाधान होत नाही. या फटाक्यांना देखील चांगला प्रतिसाद मिळाल्यास चीन लवकरच त्यांचे स्वतःचे फटाके देखील भारतीय बाजारपेठेत विक्रीस आणू शकते अशी भीती तज्ज्ञ जाणकारांकडून व्यक्त करण्यात आली आहे. ही भीती खरी ठरल्यास देशातील फटाके निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या शिवाकाशीसारख्या अनेक ठिकाणच्या फटाके तयार करण्याच्या कारखान्यांना ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागेल आणि शासन नेहमीप्रमाणे कोणतीही कृती करणार नाही असे मत व्यक्त करण्यात आले आहे.

Ye hai India...

निसर्गाने स्वतःच भारताचा नकाशा तयार करण्याचा प्रयत्न...आपल्या देशावर मानवासह निसर्ग सुद्धा प्रेम करतो, हेच तर या माध्यमातून सांगायचे नसेल नां?

जादू चालणार..फक्त मतदारांची!

बिहारमध्ये सध्या निवडणुकांमुळे विविध आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी प्रचार सभांमध्ये झाडल्या जात आहेत. सत्तेवर येण्यासाठी सत्ताधारी अथवा विरोधक..कोणीही असले तरीही विविध युक्त्या, क्लुप्त्या केल्या जातात. दिवसा एकमेकांविरुद्ध तोफा डागून रात्री एकाच थाळीत जेवणारे..असा विचार राजकारण्यांबद्दल केला जातो. काही अंशी हे खरंही आहे. मतदारांना एकाच प्याल्यात उतरवून, स्वतः मात्र कुठेतरी काळोखात, किंवा उजेडातही एकमेकांचे प्याल्यांची भेट घालुन मेळ घालायचा असा प्रकार अनेक जण सर्रासपणे करतात. नीतिश कुमारांसह, लालुप्रसाद यादव, सुषमा स्वराज, छगन भुजबळ यांच्यासारखी दिग्गज मंडळी यासाठी प्रतिष्ठा पणाला लावत आहेत. नुकताच सुषमा स्वराज यांनी, "गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची जादू सगळीकडे चालेलच असे नाही" असे विधान करून मोदी यांना घरचा आहेर दिला आहे. तर राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे संयुक्त जनता दलाचे नेते शरद यादव यांनी, राहुल गांधी यांना गंगेत बुडवा असे सांगून त्यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी मध्यंतरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल देखील चुकीचे उद्गार काढून संघाचे मन दुखावले आहेच..परिणामी, राहुल गांधी यांना अजून भरपूर काही शिकण्याची गरज आहे, त्यांनी शायनिंग बंद करावे असे मत आता ज्येष्ठ मुरब्बी राजकारणी मंडळी व्यक्त करीत आहेत...! काहीही असले तरीही खरा जादूगार "मतदार"च आहेत यात शंका नाही. यावर कॉंग्रेस प्रवक्ते शकील अहमद यांनी यादवांवर टीका केली. बिहारमध्ये राहुल यांच्या सभांना होणारी गर्दी पाहून झालेल्या निराशेतूनच त्यांचे राजकीय संतुलन बिघडले आहे, असे विचार त्यांनी व्यक्त केले.

सोमवार, २५ ऑक्टोबर, २०१०

न्यूझीलंड मालिकेसाठी भारतीय संघ घोषित

न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी सोमवारी (ता. २५) भारतीय संघाची (टीम इंडिया) घोषणा करण्यात आली. मात्र घोषित झालेल्या संघात युवराजसिंग याचा समावेश करण्यात आलेला नाही. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत हरभजन सिंगबरोबर प्रग्यान ओझा, अमित मिश्रा यांना समावेश करण्यात आला आहे. पहिला कसोटी सामना ४ नोव्हेंबरपासून अहमदाबाद येथे सुरु होईल. दुसरा १२ ते १६ नोव्हेंबर दरम्यान हैदराबाद येथे, तर तिसरा सामना २० ते २४ नोव्हेंबर दरम्यान नागपूर येथे होईल.
अशी आहे टीम इंडिया: महेंद्रसिंह धोनी (कर्णधार) सचिन तेंडुलकर, सुरेश रैना, व्हिव्हिएस लक्ष्मण, राहुल द्रविड, गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, मुरली विजय, हरभजन सिंग, झहीर खान, ईशांत शर्मा, एस श्रीसंत, चेतेश्वर पुजारा, प्रग्यान ओझा, अमित मिश्रा.

झाले इंदूरकर रसिक मंत्रमुग्ध: गीतरामायण

येथील लोकमान्य नगरमध्ये रविवारी (ता. २४) आयोजित गीत रामायण कार्यक्रमात श्रीधर फडके यांच्या गीतांनी इंदूरच्या रसिक-श्रोत्यांना अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. स्व. सुधीर फडके उर्फ बाबूजी यांचे स्मरण यावेळी प्रत्येकाला झाले.
श्री. श्रीधर फडके यांच्या प्रत्येक पदाला आणि गीताला रसिकांनी भरभरुन दाद दिली, विवेक घळसासी यांच्या निवेदनाने श्रोत्यांना खुर्च्यांना खिळवून ठेवले. गेले तीन दिवस घळसासी यांच्या सुरू असलेल्या रामकथेच्या प्रवचनाचा समारोप काल करण्यात आला. श्रीधर फडके यांनी सादर केलेल्या गीत रामायणाच्या सुरेल स्वरांचे श्रेय बाबूजी आणि ग.दि. माडगूळकर यांना असल्याचे सांगून आपण फक्त त्यांचे महान कार्य सुरू ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. गाताना शब्दांमागील भावनांसह स्पष्ट शब्दोच्चार करणे आणि भावगीत संगीतबध्द करताना शब्दांच्या वजनासकट त्यातला भाव, कवीची भूमिका रसिकांपर्यंत पोहोचवणे, तसेच या दोन्हींसह गाणे ‘जिवंत करणे’ या गोष्टींना आपल्या कारकीर्दीत त्यांनी सर्वाधिक महत्त्व दिले. संगीतातली नवी वळणे आत्मसात करताना त्यांचा एक धागा परंपरेशी घट्ट जोडलेला होता, त्यामुळेच बाबुजी सुरांच्या गाभ्यापर्यंत पाहोचू शकले व शब्दातील अभिप्रेत भाव रसिकांपर्यंत पोहोचू शकला.
श्रीधर फडके यांनी सादर केलेल्या "राम जन्मला, कुश-लव रामायण गाती, पराधीन आहे जगती, माता न तू वैरिणी, जय गंगे जय भागीरथी, जेथे राघव.." इ. अनेक गीतांनी रसिक मने न्हाऊन निघाली.
आपण आपले वडिल म्हणजेच स्व. बाबूजी यांना घाबरत होतो, गीतरामायणातील पद सर्वप्रथम आपण आपल्या आईला सर्वप्रथम ऐकवले, हे पद ऐकवताना मला अचानक बाबूजी तिथे आल्याचे जाणवले आणि साक्षात बाबूजी तिथे उभे असल्याचे पाहून पार घाबरगुंडी उडाली, मात्र त्यांनी कौतुकाने पाठीवर हात फिरवून गाणे सुरू ठेवण्याची सुचना केल्याने खूप आनंद झाला, असे सांगितले. गीतरामायणाची रचना १९५५ मध्ये करण्यात आली, गीतरामायणातील विविध शब्दांवर बाबूजींनी दिलेला जोर त्याचे महत्व आदी गोष्टी विशद केल्या. गीतरामायण कितीही कथन केले तरीही वेळ अपूर्णच वाटतो, सर्वकाही आपल्या समोरच सुरू असल्याची हे गाताना आपल्याला अनुभूती येते या शब्दात मनोगत व्यक्त केले. काही दिवसांपूर्वी श्रीधर फडके यांना साठ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. ‘संगीत मनमोही रे’ ही नुकतीच प्रकाशित झालेली त्यांची सीडी यावेळी श्रीधर फडके यांच्या स्वाक्षरीसह वितरीत करण्यात आली.
श्रीधर फडके यांनी इंदूरकर अजूनही मराठी टिकवण्याचा प्रयत्न करीत असल्याबद्दल त्यांचे कौतुक करून मराठी बोलणारा आजकाल मुंबईत दुर्मिळ होत चाललाय असे मत व्यक्त केले. पार्षद विनिता धर्म यांनी सूत्रसंचालन केले.

शुक्रवार, २२ ऑक्टोबर, २०१०

कथा ई-एज्युकेटेड चोराची...।

दिल्ली येथे राष्ट्रकुल स्पर्धेच्या संयोजन समिती मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या कार्यालयात कॉम्प्यूटरची रॅम (रँडम ऍक्सेस मेमरी) चोरल्यामुळे एका संशयित सफाई कर्मचार्‍याला ताब्यात घेण्यात आले. बिच्चारा! @ हा सफाई कर्मचारी देखील ई-एज्युकेटेड किंवा माहिती तंत्रज्ञान विषयात प्रवीण असावा, किंवा बेरोजगारीची कुर्‍हाड याच्यावरही कोसळली असावी. अनेकांनी कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला आहे, आपण हजारांचा भ्रष्टाचार केल्यास कुठे बिघडले? असे याला वाटले असावे आणि कार्यभाग साधला असावा. परंतु मांजर डोळे मिटुन दूध पिताना कोणी ना कोणी त्याला पाहतेच नां...। अगदी तेच केलंय क्लोज-सर्किट कॅमेर्‍यांच्या डोळ्यांनी...।

शाहीर आत्माराम पाटील यांना एक लाखांच्या मदतीची भुजबळ यांची घोषणा

शाहीर आत्माराम पाटील यांच्या औषधपाण्याचा आणि उपचाराचा खर्च भुजबळ फाऊंडेशनतर्फे केला जाईल. याचबरोबर त्यांना एक लाख रुपयांची मदत देखील दिली जाईल अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली.
मुंबई येथील डॉ. शिरोडकर स्मारक मंदिरात शाहीर आत्माराम पाटील यांच्या जीवनाची कहाणी सांगणार्‍या प्रभाकर ओव्होळ लिखित, "ऐका शाहिराची कथा" या पुस्तकाचे प्रकाशन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. प्रकाशन सोहळ्यात ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य, माहिती आयुक्त विजय कुवळेकर, डॉ. रवी बापट, मनोविकास प्रकाशनाचे अरविंद पाटकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना भुजबळ यांनी, या पुस्तकाच्या हजार प्रती शासनाच्या वतीने घेतल्या जातील असे सांगून शाहीर पाटील यांना शुभेच्छा दिल्या.
शाहीर आत्माराम पाटील म्हणाले की, आपले लेखन समाजासाठी असावे अशी सूचना साने गुरुजींनी केल्यानुसार आपण आजपर्यंत हेच पथ्य पाळत आलो आहोत. यावेळी श्री. कुवळेकर यांनी हा प्रकाशन सोहळा नसून कृतज्ञता समारंभ असल्याचे मत व्यक्त केले.

कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप

(पनवेल):  राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...