बुधवार, १९ फेब्रुवारी, २०२५

जामनेर- नमो कुस्ती महाकुंभ: अमृता पुजारी, विजय चौधरी यांचे वर्चस्व

 जळगाव, (क्रीडा प्रतिनिधी)- कुस्तीप्रेमींच्या जनसागरासमोर लाल मातीत झालेल्या संघर्षात भारतीय पहिलवानच भारी ठरले. नमो कुस्ती महाकुंभ २ अंतर्गत देवाभाऊ केसरी  आंतरराष्ट्रीय कुस्ती दंगलमध्ये महिला महाराष्ट्र केसरी अमृता पुजारी आणि ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीसह सर्वच भारतीय पहिलवानांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील परदेशी पहिलवानांना धूळ चारत आपले वर्चस्व दाखवून दिले.



देवाभाऊ केसरीच्या निमित्ताने आयोजित आंतरराष्ट्रीय दंगलमध्ये महाराष्ट्र केसरी विजेत्यांनी जगभरातील 9 देशांमधून आलेल्या नामवंत पहिलवानांना पराभूत करून कुस्तीच्या मैदानी परंपरेचा अभिमान वाढवला. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेप्रमाणे कुस्तीत महिलाना समान सन्मान देताना या मैदानातील पहिली आणि अंतिम कुस्ती महिलांची लावण्यात आली. कुस्तीच्या इतिहासात प्रथमच महिला कुस्तीला हा सन्मान मिळाल्यामुळे महिला कुस्तीपटूंमध्ये आणि कुस्तीप्रेमी मध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले.

आपल्या तालुक्यात कुस्तीच्या मैदानात लढण्यासाठी आंतरराष्ट्रीय पहिलवान येणार असल्यामुळे सुमारे पन्नास हजारांपेक्षा अधिक कुस्तीप्रेमींचा अथांग जनसागर पसरला होता. महाराष्ट्र केसरी विजेत्या अमृता पुजारीने रोमानियाच्या ऑलिम्पियन कॅटलिना क्सेन्टने हिच्यावर वर्चस्व गाजवत विजय मिळविला. शेवटच्या कुस्तीमध्ये अमृताने उत्कृष्ट डावपेच आणि चपळाईने गुण मिळवत आपला पराक्रम सिद्ध केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते विश्वविजेता व ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांची कुस्तीला सलामी देण्यात आली.  सर्व विजेत्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते मानाची गदा देऊन गौरविण्यात आले.

सोमवार, १७ फेब्रुवारी, २०२५

माझे पसंतीचे सिडकोचे घर; गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत बुधवारी

 मुंबई- माझे पसंतीचे सिडकोचे घर; गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत 19 फेब्रुवारी 2025 पार पडणार
२६,००० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार होण्याच्या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी
छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनाचे औचित्य साधून सिडको महामंडळाच्या “माझे पसंतीचे सिडकोचे
घर” गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत बुधवार, दि. 19 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी २.०० ते ४.००
च्या दरम्यान पार पडणार आहे. प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळासोबतच सोडतीचे थेट प्रक्षेपण वेबकास्टींगच्या
माध्यमातून करण्यात येणार आहे. यामुळे अर्जदार आपल्या सोयीच्या ठिकाणाहून या सोडतीचे साक्षीदार होऊ
शकतात.
सोडत प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण https://cidcohomes.com या संकेतस्थळावर करण्यात येणार आहे. अर्जदार
सदर संकेतस्थळावर, त्यांच्या सिडको होम खात्यात लॉग इन करून सोडतीचा निकाल घरबसल्या देखील पाहू
शकतात.
याशिवाय सोडतीचे थेट प्रक्षेपण खारघर पूर्व (तळोजा): भूखंड क्र.१४, सेक्टर-३७, तळोजा पंचानंद, पनवेल,
रायगड, ४१०२०८, खांदेश्वर: भूखंड क्र. १, सेक्टर-२८, खांदेश्वर रेल्वे स्टेशन, कामोठे, पनवेल, रायगड,
४१०२०९, खारघर: भूखंड क्र. ६३ अ, सेक्टर-१५, खारघर, पनवेल, रायगड, ४१०२१० येथील अनुभव
केंद्रांवर देखील करण्यात येणार आहे. यामुळे २६,००० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार होण्याच्या
क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी नागरिकांना सुलभरीत्या उपलब्ध होणार आहे, असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

गुरुवार, ६ फेब्रुवारी, २०२५

जामनेरमध्ये होणार ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय कुस्ती दंगल: फ्रान्स, मोल्दोवा, उझबेकिस्तान, जॉर्जिया, इराण, रोमानिया आणि एस्टोनियाचे पैलवान उतरणार

 मुंबई, दि. ४ - जळगाव जिल्ह्यातील जामनेर हे गाव इतिहास रचण्यासाठी सज्ज झाले आहे. येथील भूमीवर १६ फेब्रुवारी २०२५ रोजी 'नमो कुस्ती महाकुंभ-२' सोबत 'देवाभाऊ केसरी' ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्ती दंगल आयोजित करण्यात आली आहे. ‘शरीर तंदुरुस्त, खेळच सर्वोत्तम’ हा संदेश देत भारतीय महिला कुस्तीला प्रोत्साहन देणे हे या दंगलीचे मुख्य उद्दिष्ट आहे. या दंगलीमध्ये हिंदुस्थान , फ्रान्स, मोल्दोवा, उझबेकिस्तान, रोमानिया, जॉर्जिया, इराण आणि एस्टोनिया या देशांचे जागतिक विजेते, ऑलिंपियन, हिंद केसरी, रुस्तुम ए हिंद, भारत केसरी, महाराष्ट्र केसरी आणि उप-महाराष्ट्र केसरी सारखे महिला आणि पुरुष दिग्गज कुस्तीपटू सहभागी होणार आहेत. हे मोठे आयोजन मातीतील कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

याबद्दल बोलताना या ऐतिहासिक कुस्ती दंगलीचे प्रमुख आयोजक महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले कि, संपूर्ण महाराष्ट्रात या आयोजनाबद्दल प्रचंड उत्साह आहे. या कुस्ती दंगलमुळे जामनेर हे गाव जागतिक कुस्ती नकाशावर ठळकपणे झळकणार आहे. या निमित्ताने उत्तर महाराष्ट्रात एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्याची घोषणा करण्यात येणार आहे. हे क्रीडा संकुल सामान्य घरातील खेळाडूंना जागतिक दर्जाची सुविधा पुरवण्यासाठी मोठी भूमिका बजावेल.

कुस्ती रसिकांसाठी हा एक पर्वणीचा क्षण ठरणार आहे. जागतिक दर्जाच्या कुस्तीपटूंना एकाच मंचावर पाहण्याची ही अनोखी संधी आहे. ही स्पर्धा रविवार, १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता सुरू होऊन संध्याकाळी ८ वाजेपर्यंत चालणार आहे. कुस्तीला समर्पित असलेले हे आयोजन जामनेर येथे मोठ्या दिमाखात पार पडणार आहे. या ऐतिहासिक कुस्ती दंगलीचा साक्षीदार होण्यासाठी क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंत्री गिरीष महाजन यांनी  केले आहे.

खारघर येथे पार पडले वैदर्भियांचे तिसरे स्नेहसंमेलन

 मुंबई :  मुंबई आणि परिसरात राहणा-या वैदर्भियांनी कोकणी माणसाचा आदर्श ठेवत आपली मायभूमी विदर्भाच्या संपर्कात (कनेक्ट)राहून विदर्भाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन ज्येष्ठ बांधकाम व्यावयासिक व माजी अणुशास्त्रज्ञ डॉ. सुरेश हावरे यांनी केले. आपला विदर्भ सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थेच्या तिस-या वैदर्भीय स्नेहसंमेलनात अध्यक्षीय भाषणात बोलताना त्यांनी हे आवाहन केले.

 नवी मुंबई व मुंबई परिसरातील वैदर्भियांचे हक्काचे व्यासपीठ

म्हणून “आपला विदर्भ सामाजिक आणि सांस्कृतिक संस्था’’ गेल्या काही वर्षांपासून कार्यरत आहे. या संस्थेने रविवारी वैदर्भियांचे तिसरे स्नेहसंमेलन खारघर येथील एमटीडीसी रेसिडेन्सीत आयोजित केले होते. या संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. सुरेश हावरे, प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ सनदी अधिकारी चंद्रकांत डांगे उपस्थित होते. यावेळी आपला विदर्भचे अध्यक्ष एड. विजयकुमार कोहाड, सरचिटणीस प्रमोद चुंचूवार, कोषाध्यक्ष अनंत शिंदे, सचिव राजेंद्र नंदनकर, उपाध्यक्ष अश्विनी हडपे यांच्यासह सभागृहात मोठ्या संख्येने वैदर्भीय उपस्थित होते. यावेळी महिलांचा हळदी-कुंकू आणि बाळगोपाळांची लूट पार पडली.

याप्रसंगी, “चंद्रपूरच्या महाकालीची लोकपरंपराः माय धुरपता” हा अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहून विदर्भ-मराठवाड्यातील शेकडो वर्षांच्या संबंधांमागील लोकपरंपरा उलगडणारे ज्येष्ठ पत्रकार संजीव भागवत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना भागवत यांनी गोंड राजांनी मराठी भाषेच्या प्रचारात आणि लोककल्याण क्षेत्रात बजावलेल्या भूमिकेबाबत सविस्तर माहिती दिली.

 कोकणातील लोकांचा आदर्श घ्या- हावरे

 “कोकणातील प्रत्येक गावाची एक संघटना वा मंडळे असून मुंबईत राहूनही ते गावच्या विकासात योगदान देतात. या गावाच्या मंडळांनी चाळीत वा सोसायट्यांमध्ये गावाच्या मालकीची एक खोली घेतलेली असते. या खोलीत गावाकडून नोकरीसाठी येणा-या तरूणाची काही महिने राहण्याची सोय होते. कोकणी माणूस आधीमनिऑर्डरने आणि आता ‘जी-पे’ने पैसे पाठवतो. मात्र या उलट विदर्भाचा माणूम मुंबईत आला की विदर्भाशी कनेक्ट राहत नाही. तो आधीही मनिऑर्डरने पैसे पाठवत नव्हता आणि आताही जी-पे ने पैसे पाठवत नाही. हे चित्र बदलायला हवे. आपण विदर्भाच्या विकासासाठी मुंबईत राहून योगदान द्यायला हवे,” अशी भूमिका त्यांनी मांडली. आपला विदर्भ संस्थेने एखादा एप विकसित करून सदस्य नोंदणी, नोकरी शोधणे, विवाहासाठी स्थळ शोधणे या सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात, अशी सूचना त्यांनी केली.

  विदर्भापासून दूर हक्काचे कुटुंब- डांगे

 “आयआयटी खरगपूर येथे मी एमटेक करायला गेलो तेव्हा तेथील वसतीगृहासमोर एक फलक लागले होते. त्यावर लिहिले होते – टू द होम अवे फ्रॉम होम. आपला विदर्भ ही संस्था विदर्भापासून दूर राहणा-यांना कुटुंबापासून दूर राहूनही हक्काचे कुटुंब म्हणून कार्य करीत आहे. ही चांगली संकल्पना असून अधिकाधिक वैदर्भियांपर्यंत पोहोचायला हवी. विदर्भातील झाडीपट्टी रंगभूमीला मुंबईत मानाचे स्थान मिळवून देण्यासाठीही संस्थेने काम करावे,” असे डांगे म्हणाले.

सोमवार, २६ जुलै, २०२१

नवी मुंबई आणि नैना क्षेत्रातील उंचीबाबत वैध ना हरकत प्रमाणपत्र असणाऱ्या बांधकामांना मिळणार परवानगी

सिडको महामंडळाकडून नवी मुंबईमध्ये विकसित करण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या
पार्श्वभूमीवर, नवी मुंबई आणि नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र (नैना) येथील ज्या बांधकाम
प्रकल्पांना भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून उंचीबाबतचे वैध ना-हरकत प्रमाणपत्र मिळाले आहे, अशा
बांधकामांना परवानगी देण्यात येणार आहे. विमानतळ प्राधिकरणाकडून देण्यात आलेल्या ना-हरकत
प्रमाणपत्रात नमूद अनुज्ञेय उंचीपर्यंतची बांधकामे विकासकांना करता येणार आहेत.

ज्या विकासकांकडे बांधकाम उंचीबाबतची वैध प्रमाणपत्रे आहेत त्यांना लवकरच सिडकोकडून बांधकाम
प्रारंभ प्रमाणपत्र आणि भोगवटा प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे नवी मुंबई आणि नैना क्षेत्रांतील
बांधकाम प्रकल्पांसमोरचा अडथळा दूर होऊन या भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे. त्याचप्रमाणे,
संबंधित विकासक व नागरिक यांनाही या निर्णयामुळे निश्चितच दिलासा मिळणार आहे.


डॉ. संजय मुखर्जी
उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको

सिडकोकडून नवी मुंबईच्या रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात 1160 हेक्टरवर आंतरराष्ट्रीय विमानतळ
साकारण्यात येत आहे. सदर विमानतळामुळे नजीकच्या नवी मुंबई तसेच नैना क्षेत्रातील बांधकामांच्या उंचीवर
मर्यादा घालण्यात आल्या होत्या. यामुळे अनेक बांधकाम प्रकल्पांना, विशेष नियोजन प्राधिकरण या नात्याने,
सिडकोकडून बांधकाम ना-हरकत प्रमाणपत्र मिळाले असले तरी त्यांचा विकास रखडला होता.

या पार्श्वभूमीवर सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी पुढाकार घेऊन
भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि विमानतळ विकसित करणारी सवलतधारक कंपनी नवी मुंबई
इंटरनॅशनल एअरपोर्ट लि. यांच्या सहकार्याने या प्रश्नाबाबत मार्ग काढला. या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी
सिडको, भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लि. यांच्या प्रतिनिधींच्या
अनेक बैठका झाल्या. यानंतर ज्या बांधकाम प्रकल्पांना भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून उंचीविषयक ना-
हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे व जे वैध आहे, अशा बांधकामांना बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र आणि भोगवटा
प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला असे सिडकोतर्फे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

शुक्रवार, १६ जुलै, २०२१

सिडको मेट्रो मार्ग क्र. 1अंमलबजावणीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल; लवकरच करारनामा

सिडको महामंडळाकडून विकसित करण्यात येत असलेल्या नवी मुंबई मेट्रो मार्ग क्र. 1 च्या परिचालन
आणि देखभाल (ऑपरेशन ॲन्ड मेन्टेनन्स) सेवांकरिता, सिडकोकडून नुकतेच महामेट्रोला स्वीकारपत्र
(एलओए) देण्यात आले आहे. मार्ग क्र. १ अंमलबजावणीच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.  दरम्यान, या संदर्भात लवकरच सिडको आणि महामेट्रो यांच्यात करारनामा करण्यात येणार आहे.



“नवी मुंबईतील मेट्रो प्रकल्पाची नवी मुंबईकरांना अनेक वर्षे प्रतीक्षा आहे. लवकरात लवकर हा मेट्रो
प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून प्रकल्पासमोरील सर्व अडथळे आम्ही दूर केले आहेत. महामेट्रोने नागपूर मेट्रो विक्रमी वेळेत पूर्ण करून दर्जेदार प्रकल्प उभा केला. पुणे मेट्रोचे काम देखील महा मेट्रो वेगाने करत आहे. त्यामुळे त्यांची आजवरची कामगिरी बघता नवी मुंबई मेट्रो देखील लवकरात लवकर कार्यान्वित करून प्रवाशांच्या सेवेत रुजू होईल, असा मला विश्वास आहे.”

- एकनाथ शिंदे, नगरविकास मंत्री, महाराष्ट्र


मेट्रो मार्ग क्र. 1 च्या अभियांत्रिकी सहाय्यासाठी महामेट्रोची नियुक्ती करण्यात आल्यानंतर, या मार्गावर
परिचालन आणि देखभाल सेवा पुरविण्याकरिता सिडकोकडून महामेट्रोला स्वीकारपत्र देण्यात आले आहे.
यामुळे या मार्गावरील कामे वेगाने पूर्ण होऊन, लवकरच या मार्गावर प्रवासी सेवा सुरू करणे शक्य होईल.
सिडकोच्या सर्व महत्वाकांक्षी प्रकल्पांना गती देणे हे माझे मुख्य उद्दीष्ट आहे. त्याचाच प्रारंभ मेट्रो प्रकल्पाच्या या महत्वपूर्ण निर्णयाने झाला आहे.

डॉ. संजय मुखर्जी,
उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको


नवी मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या आणि नवी मुंबईतील नोड
परस्परांना अधिक सुलभरीत्या जोडले जावेत या उद्देशाने सिडकोतर्फे नवी मुंबई मेट्रो प्रकल्पांतर्गत एकूण 4
उन्नत मार्ग (एलिव्हेटेड कॉरिडॉर) विकसित करण्यात येत आहेत. त्यांपैकी 11.10 कि.मी. च्या 11 स्थानकांसह
तळोजा येथे आगार असलेलेल्या बेलापूर ते पेंधर या मार्गावर मेट्रोची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे.
सद्यस्थितीत मार्ग क्र. 1 वर उभारण्यात येणाऱ्या 11 स्थानकांपैकी 1 ते 6 स्थानकांच्या उभारणीची
कामे लवकरात लवकर पूर्ण करणे आणि प्रकल्पासाठी आर्थिक स्रोत निर्माण करणे, तसेच या क्षेत्रातील
महामेट्रोचा अनुभव व कार्यकुशलता विचारात घेऊन सिडकोने महामेट्रोची नियुक्ती केली. महामेट्रो कंपनीस

नुकत्याच यशस्वीरीत्या कार्यान्वित झालेल्या नागपूर मेट्रो टप्पा 1 आणि पुणे मेट्रो प्रकल्पांतर्गत विकसित
करण्यात येत असलेल्या मार्ग क्र. 1 आणि 2 च्या बांधणी, अंमलबजावणी आणि परिचालन आणि निगराणीचा
अनुभव आहे. या मार्गाच्या अभियांत्रिकी सहाय्यासाठी महामेट्रोकडून 20 तज्ज्ञ अभियंत्यांच्या गटाची नियुक्ती
करण्यात आली आहे.


या मार्गावरील परिचालन आणि देखभाल सेवांकरिता सिडकोला रु. 885 कोटी इतका खर्च अंदाजित
आहे. हा खर्च संपूर्ण महाराष्ट्रात तुलनात्मकरित्या सर्वात कमी आहे. महामेट्रोशी परिचालन आणि देखभाल
सेवा प्रदान करण्याच्या कराराचा कालावधी हा, या मार्गावर वाणिज्यिक परिचालन सुरू होण्याच्या तारखेपूर्वी
1 वर्ष आणि वाणिज्यिक परिचालन सुरू झाल्याच्या तारखेपासून पुढील 10 वर्षे इतका असणार आहे.
हा मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर नवी मुंबईकरांना लवकरच पर्यावरणस्नेही आणि आरामदायक
प्रवासाचा एक उत्तम पर्याय निर्माण होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

गुरुवार, ३१ डिसेंबर, २०२०

कोविड योद्ध्यांचा पुरस्काराने गौरव

 


कामोठे: कोविड काळात अतिशय भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. पनवेल महापालिका क्षेत्र आणि संपूर्ण तालुक्याचा विचार करता राज्य शासन ठामपणे आपल्या मागे उभे राहिले. पालकमंत्री आदिती तटकरे यांनी हात आखडता न घेता आर्थिक निधी पुरविला, अशी स्पष्टोक्ती कोकण शिक्षण मतदार संघाचे आ. बाळाराम पाटील यांनी दिली.
कोकण शिक्षक मतदार संघाचे आ. बाळाराम पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ३५ कोविड योद्ध्यांना कोविड देवदूत पुरस्कार देवून गौरविण्यात आले. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, वाढदिवस हे निमित्त आहे. सर्व कार्यक्रम रद्द करून केवळ कोविड देवदूतांचा सत्कार करण्यासाठी, त्यांच्या कामाची कदर करून शाबासकीची थाप देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

कोविड काळात सरकारी आणि काही सेवाभावी खासगी डॉक्टर, समाजसेवक दिवस-रात्र राबले, परंतु कुणाचाही मोबाईल बंद नव्हता ही वाखाणण्याजोगी बाब नोंद करावीच लागेल. सर्वांचीच फार ओढाताण होत असताना, रुग्णांना दिलासा देणे, त्यांची व्यवस्था करणे अवघड असतानाही त्यात आपण सारे यशस्वी झालो, याचा अभिमान वाटत असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार कांतीलाल कडू, सुदाम पाटील, शिवसेनेच्या कामोठे आघाडी प्रमुख सुवर्णा वाळूंज आदींची भाषणे झाली.
व्यासपीठावर आ. बाळाराम पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, शेकाप नेते काशिनाथ पाटील, ज्येष्ठ पत्रकार कांतीलाल कडू, पनवेल जिल्हा कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष सुदाम पाटील, समाजवादीचे जिल्हाध्यक्ष अनिल नाईक, नगरसेविका प्रज्योती म्हात्रे, गणेश कडू, डॉ. नागनाथ येमपल्ले, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव सुरदास गोवारी, नारायणशेठ घरत, शंकरशेठ म्हात्रे, माया अहिरे, समाजसेवक बागूल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश म्हात्रे यांनी केले.

मंगळवार, २९ डिसेंबर, २०२०

एड्सग्रस्त मुलांना जयश्री फाऊंडेशनतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप


ख्रिसमस - नाताळ सणानिमित्त वाशी येथील डिझायर सोसायटी मधील एड्स ग्रस्त मुलांना जयश्री फाऊंडेशनचे अध्यक्ष वैभव जाधव यांच्या तर्फे विविध जीवन आवश्यक वस्तूंचे वाटप व नम्रता मधगायकर यांच्या तर्फे  ब्लँकेट वाटप तसेच नवी मुंबई स्टुडंट्स अँड युथ फाऊंडेशन आणि शाईन कॉम्प्युटर्सच्या माध्यमातून एक महिने मोफत संगणक प्रशिक्षण देण्यात येणार आहे, सदर कार्यक्रमासाठी नवी मुंबई स्टुडंट्स अँड युथ फाऊंडेशन संस्थेचे अध्यक्ष मनोज महाराणा यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते . सदर ठिकाणी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांना भविष्यात येणाऱ्या संकटांवर मात करून एक सक्षम नागरिक बनण्यासाठी प्रोत्साहन पर मोलाचे मार्गदर्शन महाराणा यांनी उपस्थित मुलांना तसेच आयोजकांना केले.
सदर कार्यक्रमादरम्यान जयश्री फाऊंडेशनचे प्रथमेश मडकईकर, नीरज बोडके, आशिष सावंत, प्रियांका जाधव, अतिश खोत, प्रथम पाटील, साहिल कलांतरे, हर्ष तांडेल,श्रावणी माने आणि साक्षी गुंजाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.नवी मुंबई स्टुडंट्स अँड युथ फाऊंडेशनचे सचिव अक्षय डिगे, संस्थेचे सरचिटणीस  राहुल साबळे, विद्यार्थी प्रमुख सुयेश मूढे , सरचिटणीस मुकुल इंगळे,अनिल शहा आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सोमवार, ६ जुलै, २०२०

कोरोना...! आणखी खबरदारी

सुमारे चार महिन्यांपासून कोरोना विषाणूमुळे सगळे त्रस्त झाले आहेत. भारतासह अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर ताण पडला. देशात सतत लॉकडाउन करूनही अनेक नागरिकांना अजून याचे फारसे गांभीर्य नसल्याचे चित्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या आलेखावरून स्पष्ट होते. शासन, पोलिस, प्रशासन, प्रिंट-इलेक्ट्रॉनिक्स मीडिया यांनीही कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, फैलाव होवू नये यासाठी आपपल्या परीने शक्य तेवढी काळजी घेतली प्रयत्न केले. परंतु अद्याप देशातील एकही राज्य कोरोनामुक्त झालेले नसून शासनाने अनलॉक करून शिथीलता देऊन अर्थव्यवस्थेस गती देण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र अजून सुद्धा काळजी करण्यासारखीच परिस्थिती आहे.
सर्वत्र व्यवहार पूर्ववत होण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे तर सूज्ञ नागरीक कोरोनापासून बचाव कसा व्हावा, आपल्याला कोरोनाची लागण होवू नये यासाठी शक्य तेवढी काळजी घेत आहेत. परंतु कोरोनाकडे दुर्लक्ष करणारे लोकही कमी नाहीत, तर दुसरीकडे अनेक ठिकाणी पोलिस कर्मचारी, शासकिय कर्मचारी, डॉक्टर, मीडियाकर्मी आदी महत्त्वाच्या घटकांना देखील त्यांनी शक्य तितकी काळजी घेऊनही कोरोनाची बाधा झाली आहे.
कोरोना प्रतिबंधक लस अद्याप तयार झालेली नाही, आणि लस तयार झाली तरीही नेहेमी औषधे, लस घेऊन चालणार नाही. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढवणे हा सर्वोत्तम उपाय असल्याचे मत तज्ज्ञ मंडळींनी व्यक्त केले आहे. यासाठी दररोज सकाळी किमान अर्धा तास तरी स्वतःच्या आरोग्यासाठी देणे आवश्यक आहे. योगासने, प्राणायाम यासारखे दुसरे माध्यम सध्यातरी नसावे. योगासने करू न शकणाऱ्या लोकांनी अगदी आवश्यक असल्यासच घराबाहेर पडावे, तोंडाला मास्क व्यवस्थित लावावा, नाकाखाली मास्क जाणार नाही याची काळजी घ्यावी.

लिफ्ट वापर...
शक्य असल्यास लिफ्टचा वापर न करता जिन्याने ये-जा करावी. जिन्याच्या रेलिंगला स्पर्श करू नये. लिफ्ट वापरणे अगदी आवश्यक असेल तर हातात ग्लोज घाला किंवा कागदाने लिफ्टच्या बटणास, दरवाज्यास, हँडलला स्पर्श करावा, लिफ्टमधून बाहेर पडल्यानंतर लिफ्टसाठी वापरलेले ग्लोज, कागद कचऱ्याच्या डब्यात टाकावे किंवा डिस्पोज ऑफ करावे म्हणजे जास्त चांगले.

घर...
घरात प्रवेशद्वाराजवळच सॅनिटायझर ठेवून बाहेरुन आल्यानंतर याचा वापर करावा किंवा सोबत सॅनिटायझरची छोटी बाटली (स्टँडर्ड सॅनिटायझर तज्ञांच्या सल्ल्याने घ्यावे) खिशात ठेवावी, गरज असेल तेव्हा सॅनिटायझरने हात स्वच्छ करावा. बराच वेळ बाहेर असल्यास, भरपूर गर्दी असलेल्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी गेल्यास साबणाने घरी परतल्यानंतर स्वच्छ आंघोळ करावी. शक्य झाल्यास आपले स्वतःचे कपडे आपणच धुवून काढावे.

बाहेरील व्यक्ती...
अत्यावश्यक कामासाठी घरी प्लंबर, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक, वॉशिंग मशीन, फॅन आदी दुरुस्ती करणारी व्यक्ती आल्यास सर्वप्रथम त्यास आपल्यासमोर हातास सॅनिटायझर लावण्यास सांगावे, त्याच्या कामाशिवाय शक्यतो अन्य वस्तूंना हात लावू देऊ नये, आपण देखील त्याच्यापासून शक्य तेवढे दूर थांबावे.

रोग-प्रतिकारक शक्ती वाढवणे हितावह...
कोणताही रोग, विकार, आजार असो... तुमच्या प्रतिकारशक्तीवर बरेच काही अवलंबून असते. प्रतिकारशक्ती उत्तम असल्यास कोरोनासारखा महाभयंकर असा विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी असते. प्रयत्न करणे आपल्या हातात असल्यामुळे, दररोज किमान अर्धा तास तरी योगासनांच्या मार्गदर्शकांच्या सल्ल्याने योगासने करावी.
काढा- पाण्यात (व्यक्तीपरत्वे प्रमाण ठरवून) तुळस, 4-5 काळी मिरी/मिरपूड, सुंठ, मनुका, गवतीचहा, हळद, गूळ, चिमुटभर दालचिनी इ. रकमा टाकून सर्व जवळपास निम्मे उकळवून (तज्ज्ञांचा सल्ला घेऊन) काढा घ्यावा...काढा तयार झाल्यानंतर थोडे दूध घातले तरीही चालेल. चहाऐवजी काढाच घेतला तरीही अपाय नाही. (हा काढा कोरोनासाठी नाही, मात्र याचे सेवन नियमित केल्यास प्रतिकारशक्ती वाढू शकते)

कोरोनाच्या प्रादुर्भावाने काहीगोष्टी मात्र विचारनीय ठरल्या आहेत, त्यांचा अभ्यास केला जाऊन त्यादृष्टीने दृष्टीकोन बदलण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. पावसाळा म्हटला की सर्दी, पडसे, डोकेदुखी, ताप, अंगदुखी, डोळ्यांना खाज सुटणे, खोकला या गोष्टी आल्याच...! हे विकार झाल्यास शासनाची, वैद्यकीय तज्ज्ञांची काय भूमिका असेल, अशा रुग्णांना कसे ट्रीट केले जाईल याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे...

कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप

(पनवेल):  राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...