गुरुवार, ४ ऑगस्ट, २०११

खाजगीकरणांतर्गत रस्ते चौपदरीकरणाच्या चार प्रकल्पांना पायाभूत सुविधा समितीची मान्यता

मुंबई, दि. 4 : महाराष्ट्र मंत्रीमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीच्या आज झालेल्या बैठकीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खाजगीकरणांतर्गत (बीओटी) चौपदरीकरणाच्या चार महत्त्वाच्या निविदा प्रस्तावांना आज मंजुरी देण्यात आली. याअंतर्गत एकूण 176.29 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे चौपदरीकरण करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे दिली.
मंत्रीमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीने मंजूर केलेल्या या प्रस्तावांमध्ये शिरोली (कोल्हापूर) ते सांगली, अहमदनगर-करमाळा-टेंभुर्णी, हडपसर-सासवड-बेलसरफाटा अधिक बेल्हा-पाबळ-उरुळीकांचन-जेजुरी-निरा आणि मोहोळ-कुरूल-कामती-मंद्रुप या रस्त्यांच्या चौपदरीकरण प्रकल्पांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
मंजूर झालेल्या प्रकल्पांची थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे :
1) शिरोली (कोल्हापूर) ते सांगली रस्ता (प्र. रा.मा. क्र.3 व रा.मा. 75) : या टप्प्यातील शिरोली ते अंकली आणि अंकली ते सांगली या 25.66 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे चौपदरीकरण आणि 26.95 किलोमीटर लांबीचे दुपदरीकरण करण्यात येणार आहे.
2) अहमदनगर-करमाळा-टेंभुर्णी (रा.मा. क्र. 141): या 61.71 किलोमीटर लांबीच्या रस्ता चौपदरीकरणास मान्यता देण्यात आली.
3) हडपसर-सासवड-बेलसरफाटा (रा.मा. क्र. 64) व बेल्हा-पाबळ-उरुळीकांचन-जेजुरी-निरा (रा.मा. क्र. 61) : या एकूण 41.06 किलोमीटरच्या रस्ते चौपदरीकरणास मान्यता देण्यात आली.
4) मोहोळ-कुरुल-कामती-मंद्रुप ते राज्यमार्ग क्र.13 ला जोडणारा रस्ता (रा.मा. क्र.149) : या एकूण 48.400 किलोमीटर लांबीच्या रस्ता चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.

बुधवार, ३ ऑगस्ट, २०११

मुंबई अनुभवणार 'हवाई फॉम्युला-1' चा थरार

मुंबई, दि. 3: अनेक अभिनव उपक्रमांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात तत्पर असणाऱ्या मुंबईकरांना 'हवाई फॉर्म्युला-1' म्हणून जगभरात लोकप्रिय होत असलेल्या 'एअरो-जीपी' या विमान स्पर्धेचा थरार या वर्षअखेरीस अनुभवावयास मिळणार आहे. या स्पर्धेचे भारतातील संयोजक असलेल्या मे. आय इंडिया इनोव्हेटिव्ह मिडिया या कंपनीला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) विनावित्तीय सहकार्यासाठीचे पत्र काल प्रदान केले.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांची आय-इंडिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हरभजन सिंग सहगल यांनी गेल्या सोमवारी या स्पर्धेच्या आयोजनासंदर्भात भेट घेऊन त्यांना पॉवरपॉइंट सादरीकरण दाखविले आणि मुंबईमध्ये या उपक्रमाच्या आयोजनासाठी एमटीडीसीकडून सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
'इएसपीएन-स्टार' वाहिनीच्या माध्यमातून जगभरातील 50हून अधिक देशांत या चित्तथरारक स्पर्धेचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राच्या पर्यटनाच्या प्रसिद्धीच्या दृष्टीने हा अभिनव उपक्रम उपयुक्त ठरेल, असे मत श्री. भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केले. त्यानुसार काल सायंकाळी एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश ढाकणे यांनी सदर कंपनीला सहकार्य करण्याबाबतचे पत्र दिले.
'एअरो ग्रॅंड प्रिक्स (जीपी)-2011' ही हवाई स्पर्धा अनेक बाजूंनी अभिनव आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी ठरणार आहे. साधारण 6 ते 8 एअरोबेटिक विमाने एका ठराविक कक्षेत जमिनीपासून अवघ्या 50 फूट इतक्या कमी अंतरावर 400 किलोमीटर प्रति तास इतक्या प्रचंड वेगाने एकमेकांशी स्पर्धा करतील. केवळ एअर रेसिंग असेच स्पर्धेचे स्वरुप नाही, तर एअर कॉम्बॅट, बार्नस्टॉर्मिंग अशा कसरतींनी ही स्पर्धा अधिकच चित्तथरारक आणि रंजक ठरेल. स्पर्धेसाठी मोकळी जागा आवश्यक असल्याने ती समुद्रावर किंवा वाळवंटातच घेता येते. मुंबईच्या समुद्रावर ती घेण्यात येईल. स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी देश-विदेशांतील नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभेल, असे आयोजकांचे म्हणणे आहे. एकूण पाच दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत तीन दिवस सराव फेऱ्या तर अखेरचे दोन दिवस अंतिम फेरीचे सामने होतील. स्पर्धेसाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक बाबींची पूर्तता तसेच परवानग्या मिळविल्यानंतर स्पर्धेसाठी नोव्हेंबर-डिसेंबरमधील तारखा निश्चित करण्यात येतील, अशी माहिती संयोजकांनी यावेळी दिली.
--
एअरो-जीपी क्रीडा प्रकाराविषयी...
युके स्थित फ्लाइंग एसेस (Flying Aces) या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक जेफ झॅल्टमन यांच्या संकल्पनेतून सन 2005 पासून 'एअरो-जीपी' स्पर्धा अधिकृतरित्या भरविण्यास प्रारंभ झाला. पहिली स्पर्धा स्लोव्हेनिया (2005) येथे झाली. त्यानंतर माल्टा (2006), रोमानिया (2007 व 2008),  युके (2008), अबु धाबी (2009 व 2010) याठिकाणी ही स्पर्धा भरविण्यात आली. यंदा आयइंडिया इनोव्हेटिव्ह मिडिया कंपनीच्या पुढाकाराने आणि एमटीडीसीच्या सहकार्याने ही स्पर्धा या वर्षअखेरीस मुंबईत भरविण्यात येणार आहे.

मंगळवार, १९ जुलै, २०११

राज्याच्या पर्यटन विकासासाठी 50 कोटी रुपयांच्या योजनांना मान्यता

मुंबई, दि. 19 जुलै : महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन वर्षात राज्याच्या पर्यटन विभागातर्फे विविध महत्त्वपूर्ण योजनांसाठी सुमारे 50 कोटी रुपये खर्चाला आज प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे,  अशी माहिती राज्याचे पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे दिली.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून या निधीचे वितरण करण्यात येणार आहे. याअंतर्गत किल्ले मालिका (फोर्ट सर्किट), लोणार सरोवर परिसर विकास, एलिफंटा, अष्टविनायक, बुद्धिस्ट गुंफा/ लेणी, रायगड किल्ला आदी ठिकाणी पर्यटनविषयक सोयीसुविधा विकसित करण्याबरोबरच समुद्रकिनारे (बीच) सुरक्षा, जिल्हानिहाय पर्यटनाचा बृहत्आराखडा तयार करण्यासाठी ही तरतूद करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.


•        किल्ले मालिका (फोर्ट सर्किट) : थोर छत्रपती शिवरायांची जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या महाराष्ट्रात त्यांच्या महान कर्तृत्वाची साक्ष देणारे 350हून अधिक गड-किल्ले आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने राज्यातील प्रमुख अशा किल्ल्यांचा अभ्यास करण्यात येऊन पर्यटनदृष्ट्या चार किल्ले मालिका विकसित करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने शिवरायांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी आणि त्यांनी सर्वप्रथम जिंकलेल्या तोरणा गडाचा समावेश असलेल्या शिवनेरी-तोरणा-सिंहगड-लोहगड-राजमाची या किल्ले मालिकेचा पथदर्शी प्रकल्प म्हणून विकास करण्यासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या सर्व ठिकाणी भारतीय पुरातत्त्व विभाग, राज्य पुरातत्त्व विभाग यांच्या माध्यमातून देखभाल-दुरुस्ती तसेच स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून पर्यटनदृष्ट्या आवश्यक सोयीसुविधा विकसित करण्यात येणार असून पर्यटन विकास महामंडळ या कामी नोडल एजन्सी म्हणून काम पाहील.

•        रायगड किल्ला विकास : एकेकाळी शिवराज्याची राजधानी असलेल्या बुलंद रायगडावर भारतीय पुरातत्त्व विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त सहकार्यातून पर्यटकांसाठी मूलभूत सोयीसुविधांच्या उपलब्धतेबरोबरच संवर्धनाचे काम करण्यात येणार आहेत. त्यासाठी 4 कोटी रुपयांचा निधी  मंजूर करण्यात आला आहे.

•        लोणार सरोवर परिसर विकास : जागतिक वारशांपैकी एक असलेले लोणार सरोवर हा जगभरातील अभ्यासक, शास्त्रज्ञ यांच्याबरोबरच पर्यटकांच्या दृष्टीने सुद्धा आकर्षणाचा विषय राहिलेला आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्याबरोबरच सरोवर परिसराची स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रश्न त्याचबरोबर सरोवर परिसरातील जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पुणे येथील सायन्स ॲन्ड टेक्नॉलॉजी पार्क यांच्या सहकार्याने व जिल्हाधिकारी यांच्या मार्फत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार आहे.

•        अष्टविनायकांच्या ठिकाणी सोयीसुविधांची उपलब्धता : केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे; तर, देशभरातील धार्मिक पर्यटकांचे श्रद्धास्थान असलेल्या अष्टविनायक ठिकाणांचा (महड, मोरगाव, थेऊर, सिद्धटेक, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री व पाली) विकास करण्यासाठीही 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. संबंधित ठिकाणांकडील पोच (ॲप्रोच) मार्गांची सुधारणा, निवास व्यवस्था यांच्यासह पर्यटकांसाठी अन्य आवश्यक सोयीसुविधांविषयी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी आराखडे सादर करणे अपेक्षित आहे. त्यानुसार संबंधित विकासकामांना प्रारंभ करण्यात येईल.

•        बुद्धिस्ट गुहा/ लेण्यांचा विकास : महाराष्ट्रात बुद्धकालीन प्राचीन गुंफा व लेणी मोठ्या प्रमाणात आहेत. केवळ देशातीलच नव्हे, तर जगभरातील पर्यटकांचा ओघ ही लेणी पाहण्यासाठी राज्यात येत असतो. या पार्श्वभूमीवर किल्ले मालिकेच्या धर्तीवर महाराष्ट्रातील विविध ठिकाणी लेणी मालिका विकसित करण्याचा विभागाचा मानस आहे. या लेणी परिसराच्या विकासाबरोबरच पुरातत्त्व विभागातर्फे देखभाल-दुरुस्तीही गरजेची असल्याने त्यासाठी प्राथमिक स्वरुपात 5 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

•        एलिफंटा येथे सुविधा विकास : मुंबईनजीक घारापुरी बेटावर असलेल्या एलिफंटा गुंफा सुद्धा जगभरातील पर्यटकांचे आकर्षण आहेत. या ठिकाणच्या सार्वजनिक सुविधांमध्ये वाढ करण्याबरोबरच फ्लोटींग जेटी उभारणे, स्वच्छतालये उभारणे, दिशादर्शक माहितीफलक उभारणे, वन विभागाच्या सहकार्याने उद्यानाचा विकास करणे, माहिती केंद्र उभारणे आदी कामांसाठी 2.50 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

•        समुद्रकिनारे सुरक्षा यंत्रणा : महाराष्ट्राला सुमारे 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. या कोकण किनाऱ्यावर कित्येक निसर्गरम्य ठिकाणे आहेत. पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने तारकर्ली, गणपतीपुळे, हरिहरेश्वर, बोर्डी आणि मुरुड-जंजिरा या पाच ठिकाणी रिसॉर्टही उभारण्यात आली आहेत. या प्रत्येक ठिकाणी पर्यटकांसाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा विकसित करण्यासाठी प्रत्येकी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तारकर्ली आणि गणपतीपुळे या दोन ठिकाणांसाठीचा निधी देण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आलेला असल्यामुळे उर्वरित तीन ठिकाणांसाठी 1.50 कोटी रुपयांचा निधी आज मंजूर करण्यात आला आहे.

•        जिल्हानिहाय पर्यटनाचा बृहत्आराखडा तयार करणे : महाराष्ट्राच्या अंतरंगामध्ये अद्यापही पर्यटकांना माहिती नसलेली कितीतरी स्थानिक पर्यटनस्थळे आहेत. अशा अद्यापही पर्यटनाच्या नकाशावर न आलेल्या परंतु पर्यटन विकासाची क्षमता असलेल्या पर्यटनस्थळांच्या विकासासाठी पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्याच्या पर्यटनाचा बृहत्आराखडा तयार करण्याची महत्त्वपूर्ण योजना हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून अशा पर्यटनस्थळांबाबत प्रस्ताव तयार करून महामंडळाच्या सहकार्याने संबंधित प्रस्तावावर अंतिम निर्णय घेण्यात येईल. प्राथमिक टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यासाठी किमान 5 लाख रुपये या प्रमाणे 2 कोटी रुपयांचा निधी या योजनेसाठी मंजूर करण्यात आला आहे.

•        दिशादर्शक व मार्गदर्शक फलकांची उभारणी : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील राज्यातील सर्व प्रमुख रस्त्यालगत ठिकठिकाणी असलेल्या पर्यटनस्थळांची माहिती देणारे दिशादर्शक व मार्गदर्शक फलक उभारण्यासाठी पर्यटन महामंडळास विशेष परवानगी देण्याचा निर्णय नुकताच सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची मोठी सोय होणार आहे. यासाठी पर्यटन महामंडळाला 5 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शनिवार, १६ जुलै, २०११

उपमुख्यमंत्र्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

मुंबई ता. १६ - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर २२ जुलैचा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, मुंबईतील बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांच्या मृत्युमुळे मला तीव्र दुःख झाले असून येत्या २२ जुलै रोजी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय मी घेतला आहे. कार्यकर्ते आणि हितचिंतकांनीही माझा वाढदिवस साजरा करू नये. सेच वाढदिवसानिमित्त कोणतेही कार्यक्रम आयोजित करू नयेत.

बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना आधार देण्याबरोबरच स्फोटातील जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन देखील श्री. पवार यांनी केले आहे.

बुधवार, १३ जुलै, २०११

मुंबई येथे सिरियल ब्लास्ट १०० जखमी- १३ ठार

मुंबईचे वातावरण सुरळीत होत आहे असे वाटत असतानाच बुधवारी (ता. १३) संध्याकाळी मुंबई पुन्हा एकदा सिरियल बॉम्ब स्फोटामुळे हादरली आहे. अतिरेक्यांनी केलेल्या या हल्ल्यात सुमारे ११३ जखमी आणि २० ठार झाल्याचे आत्तापर्यंत वृत्त हाती आले आहे.
दादर, झवेरी बाजार आणि ओपेरा हाऊस परीसरात सायंकाळी ६.४५ ते ७.०० दरम्यान झालेल्या बॉम्बस्फोटामुळे मुंबई हादरली आहे.

औरंगाबाद महानगरपालिकेच्या थकित वीजबिलावरील व्याज माफ करणार- अजित पवार

मुंबई, ता. १२ - औरंगाबाद महानगरपालिकेने पाणीपुरवठा योजनेच्या वीजबिलापोटीच्या महावितरणाची थकबाकी दोन महिन्यात एकरकमी भरल्यास त्यावरील २११ कोटी रुपयांचे व्याज माफ करण्यात येईल, असे उपमुखमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज औरंगाबाद महानगरपालिकेच्या पाणी प्रश्नाबाबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की औरंगाबाद महानगरपालिकेकडे १९९० पासून १०० कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यावर आतापर्यंत जवळपास २११ कोटी रुपयांचे व्याज झाले आहे. महानगरपालिकेने थकबाकीची रक्कम दोन महिन्यात महावितरणकडे जमा केल्यास थकबाकीवरील २११ कोटी रुपयांचे व्याज माफ करण्यात येईल. यासाठी महानगरपालिकेने सर्व पाणी जोडण्यांना मीटर लावावे तसेच पाणीपुरवठा व्यवस्था सक्षम करण्यासाठी पाणी वापरावरून विविध क्षेत्रांसाठीचे पाण्याचे दर ठरविणे आवश्यक आहे. यासंबंधी आमसभेचा ठराव पारित करून महानगरपालिकेने तो शासनाकडे पाठवावा.

यावेळी शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता, पाणीपुरवठा विभाग मुख्यसचिव मालिनी शंकर, ऊर्जा विभागाचे मुख्य सचिव सुब्रत रथो, नगरविकास विभागाचे सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सर्वश्री आमदार सतीश चव्हाण, डॉ. कल्याण काळे, सतीश वाघचौरे, प्रदीप जैस्वाल आदी मान्यवर उपस्थित होते.

सोमवार, ११ जुलै, २०११

ठळक बातम्या

* पुरी एक्सप्रेस अपघात- लोहमार्गावर बॉम्बस्फोटाने पुरी एक्सप्रेस घसरली १३ जखमी
* कालका एक्सप्रेस अपघात- आतापर्यंत ६२ मृतदेह काढण्यात यश
* तेलंगाणा मागणी- ओस्मानिया विद्यापीठाचे विद्यार्थ्यांचे आज उपोषण

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्यांचा मुंबई येथे आता 14 जुलैला गौरव समारंभ

मुंबई, दि. 5 : रांची येथे झालेल्या 34 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील महाराष्ट्राच्या पदक विजेत्या खेळाडूंचा राज्य शासनातर्फे करण्यात येणाऱ्या गौरव समारंभाच्या तारखेत बदल झाला असून आता हा समारंभ 14 जुलै 2011 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता येथील के. सी. महाविद्यालयात होणार आहे. पूर्व नियोजनानुसार हा समारंभ 15 जुलैला होणार होता. या बदलाची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन क्रीडा व युवक कल्याण मंत्री पद्माकर वळवी यांनी केले आहे.

महाराष्ट्राने या स्पर्धेत 41 सुवर्ण, 44 रौप्य आणि 47 कास्य अशी एकूण 132 पदके संपादन करून देदीप्यमान कामगिरी केली आहे. सांघिक व वैयक्तिक क्रीडा प्रकारात ही कामगिरी बजावणाऱ्या 212 खेळाडूंचा आणि त्यांच्या 31 क्रीडा मार्गदर्शकांचा या समारंभात गौरव केला जाईल. सुवर्णपदक विजेत्यास 5 लाख, रौप्यपदक विजेत्यास 3 लाख, तर कास्यपदक विजेत्यास 1.50 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल. क्रीडा मार्गदर्शकांना सुवर्णपदकासाठी 50 हजार, रौप्यपदकासाठी 30 हजार, तर कास्यपदकासाठी 20 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल. एकूण 9.30 कोटी रुपयांची बक्षिसे दिली जातील.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते खेळाडूंचा आणि मार्गदर्शकांचा गौरव केला जाईल. उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील, क्रीडा व युवक कल्याणमंत्री पद्माकर वळवी, राज्यमंत्री भास्कर जाधव, आमदार ॲनी शेखर, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव सुमित मलिक आदी यावेळी उपस्थित राहतील.

गुरुवार, ७ जुलै, २०११

बुधवार, ६ जुलै, २०११

खासगी वाहनचालकांच्या कल्याणासाठी मंडळ स्थापन करण्याचा शासनाचा निर्धार

मुंबई, ता. ६ - खासगी वाहनचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याचा निर्धार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

मंगळवारी (ता. ५) मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याबाबत बैठक झाली, यावेळी ते बोलत होते. श्री. पवार म्हणाले की, खासगी वाहनचालकांना विमा योजनेचा लाभ मिळवून देण्याबरोबरच त्यांना निवृत्ती वेतन देणे आवश्यक आहे. रिक्षा, खासगी बस, ट्रक, टॅक्सी यासारख्या सार्वजनिक वाहतूक करणार्‍या वाहन चालकांना अत्यंत खडतर परिस्थितीस सामोरे जावे लागते. हा घटक सामान्य जनतेला देत असलेली सेवा लक्षात घेऊन त्यांच्या सुरक्षित भवितव्यासाठी माथाडी कामगारांच्या धर्तीवर कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याचा विचार शासन करते आहे.

मंडळाची स्थापना करण्यासाठी परिवहन विभाग आणि कामगार विभाग पुढाकार घेईल. यासाठी तामिळनाडूमध्ये अशा प्रकारे स्थापन करण्यात आलेल्या मंडळाचा अभ्यास केला जाईल. या बैठकीला कामगारमंत्री हसन मुश्रीफ, परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, वित्त विभागाचे मुख्य सचिव सुधीर श्रीवास्ताव, कामगार विभागाच्या मुख्य सचिव कविता गुप्ता, नियोजन विभागाचे सचिव प्रदीप व्यास, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर आदी मान्यवर उपस्थित होते.

कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप

(पनवेल):  राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...