रविवार, ३० जानेवारी, २०११

हेलमेट सक्ती किती 'सुरक्षित'...!

काही वर्षांपासून दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांना वाहन चालविताना हेलमेट लावणे आणि चारचाकी वाहनचालकांनी सीटबेल्ट लावण्याची सक्ती करण्यात आली. प्रारंभी देशाची राजधानी नवी दिल्ली येथे आणि पाठोपाठ काही प्रमुख शहरांमध्ये आणि नुकतेच मध्यप्रदेशातील इंदूर येथे हेलमेट सक्ती करण्यात आली आहे. हेलमेट सक्ती करणे किती परिणामकारक ठरेल याचा विचार होणे आवश्यक आहे.


दुचाकी वाहनचालक, कारचालक अर्थात चारचाकी वाहनचालक वाहन भरधाव चालवितात. विशेषतः शहराबाहेर, शहरातील प्रमुख मार्गांवर, राष्ट्रीय महामार्गावर अनेकदा गंभीर स्वरूपाचे अपघात होऊन अनेकदा यात वाहनचालकांचे जीव गमावल्याच्या घटना घडतात. दिवसेंदिवस या प्रकारे अपघात होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. अपघात झाल्यास किमान जीव गमावण्याची वेळ येऊ नये, "सर सलामत तो..." असे म्हणतात नां! याप्रमाणे न्यायालयाने दुचाकी वाहनचालकांसाठी वाहन चालविताना हेलमेट बेल्टसह लावणे अनिवार्य केले आहे. ठिकठिकाणी यासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या विशेष सभा, चर्चासत्रांमध्ये प्रतिष्ठितांसह ज्येष्ठ नागरिकांनी देखील या सक्तीस दुजोरा दिला. हेलमेट न लावणाऱ्या वाहनचालकास दंड आकारण्याची तरतूद देखील करण्यात आली. वाहनचालकाच्या मागे बसणाऱ्या व्यक्तीस देखील हेलमेट लावण्याची सक्ती करण्यात आली आहे. काही ठिकाणी हेलमेट लावण्यापासून महिला वाहनचालकांना सूट देण्यात आली आहे. परंतु अनेक शहरांमध्ये हेलमेट सक्तीस फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे शासकीय अधिकाऱ्यांच्या अहवालावरून दिसून येते.

हेलमेट लावून वाहन चालविले तरीसुद्धा व्हायचे ते अपघात होणारच...ही वस्तूस्थिती नाकारता येणार नाही! इंदूरनजीक गौतमपुरा-चंबळ मार्गावर नुकत्याच झालेल्या एका अपघातात हेलमेट लावून दुचाकी चालविणाऱ्या वाहनचालकास झालेल्या अपघातात या वाहनचालकाच्या डोक्याचे हेलमेटसह तुकडेतुकडे झाले. आयएसआय मार्क असलेले हेलमेट घातले असले तरीही तुकडे झालेच. कोणत्यातरी डंपरसारख्या अवजड भरधाव वाहनाने त्याला ठोस मारल्यामुळे बऱ्याच दूरपर्यंत हा वाहनचालक फरपटत जाऊन त्याचा मृत्यू झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. यावरून हेलमेट लावून वाहन चालविणे देखील किती सुरक्षित आहे, हेलमेट लावून वाहन चालविणे किती सुरक्षित, जीव वाचविण्यासाठी लाभप्रद ठरते हे विचार करण्यासारखे आहे.

केवळ हेलमेट लावून आणि सीटबेल्ट लावून वाहन चालविण्यापेक्षा दुचाकी, चारचाकी, अवजड वाहनचालकांनी (शासकीय वाहनचलकांसह) वाहन भरधाव न चालविता विशिष्ट मर्यादित वेगात वाहन चालविल्यास अपघातांचे प्रमाण नक्की कमी होईल. शासनाने देखील यावर गांभीर्याने विचार करून प्रत्यक्ष अंमलबजावणी केल्यास अपघातांचे प्रमाण निश्चितच कमी होईल यात शंका नाही.

शुक्रवार, २८ जानेवारी, २०११

औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्राची स्पर्धा अन्य देशांशी-भुजबळ

मुंबई, ता. २७ - राज्याने सुरवातीपासूनच औद्योगिक क्षेत्रात आघाडी मिळवली असून याबाबतीत राज्याची स्पर्धा देशातील अन्य राज्यांशी नव्हे, तर अन्य देशांशी असल्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी नमूद केले आहे.
श्री. भुजबळ म्हणाले, की राज्यात १९८० मध्ये केवळ ४८६० लघुउद्योग होते. आज अशा सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगांची संख्या ३ लाख ५ हजार ६१ इतकी आहे. या क्षेत्रात सुमारे ४३ लाख ६९ हजार २९९ लाख रुपये इतकी प्रचंड गुंतवणूक झाली असून २३ लाख ८ हजार ९४४ जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. राज्यात लघु-मध्यम उद्योग अजूनही मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर या परिसरातच एकवटलेले दिसतात. अशा उद्योगांच्या विकासासाठी क्लस्टर डेव्हलपमेंट वर भर देण्याची नितांत आवश्यकता असून या दृष्टीने ग्लोबल परिषदेत चर्चा होईल असा विश्वास श्री. भुजबळ यांनी व्यक्त केला.

केंद्राच्या पर्यटन विकास निधीचा महाराष्ट्राने पुरेपूर लाभ घ्यावा- सुबोधकांत सहाय

मुंबई, ता. २७ - आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकृष्ट करण्याची भारताला मोठी संधी आहे. त्यादृष्टीने केंद्राकडून राज्यांना पर्यटन विकासासाठी निधी दिला जातो. पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र असलेल्या महाराष्ट्राने या निधीचा पुरेपूर लाभ घेण्याची गरज आहे. असे मत केंद्रीय पर्यटनमंत्री सुबोधकांत सहाय यांनी आज येथे व्यक्त केले. कफ परेड येथील  वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये द्वितीय ग्लोबल इकॉनॉमिक समेट-२०११ च्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.
श्री. सहाय म्हणाले की, भारतात कृषि व कृषि आधारित प्रक्रिया उद्योगांना देखील मोठे भविष्य आहे. देशात सुमारे पाच दशलक्ष डॉलर्स किंमतीची फळफळावळ, शेतमाल प्रक्रियेअभावी वाया जातात. आजमितीस आपण त्यापैकी केवळ सहा ते सात टक्के मालावरच प्रक्रिया करू शकतो. या पार्श्वभूमीवर लघु-मध्यम उद्योजकांना प्रक्रिया उद्योगातही गुंतवणुकीची मोठी संधी आहे.
गेल्या दोन दशकात भारतीय उद्योगाने मोठी झेप घेतली असून यात लघु-मध्यम उद्योगांचे अमूल्य योगदान आहे. संपूर्ण भारतीय उद्योगाचे प्रतिबिंब या उद्योगांमध्ये दिसते. या क्षेत्रात गुंतवणूक तसेच रोजगार निर्मितीच्याही सर्वाधिक संधी आहेत. असे केंद्रीय उद्योगमंत्री सलमान खुर्शीद म्हणाले.
यावेळी राज्याचे पर्यटन व सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ, पद्मश्री भवरलाल जैन, राष्ट्रीय लघुउद्योग विकास महामंडळ व्यवस्थापकीय संचालक डॉ. एच. पी. कुमार, न्यूयॉर्कचे वर्ल्ड ट्रेड सेंटर असोसिएशनचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर कोफी बोतेंग, मुंबई वर्ल्ड ट्रेड सेंटरचे चेअरमन कमल मोरारका आदी मान्यवर उपस्थित होते.

भवरलाल जैन यांना "जीवनगौरव"

मुंबई, ता. २७ - जैन इरिगेशन समूहाचे अध्यक्ष व खानदेशचे भूमिपुत्र भवरलाल जैन यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. येथील कफ परेड मधील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये द्वितीय ग्लोबल इकॉनॉमिक समेट-२०११ मध्ये हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी केंद्रीय पर्यटनमंत्री सुबोधकांत सहाय, राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ, राष्ट्रीय लघुउद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. एच. पी. कुमार, न्ययॉर्क येथील वर्ल्ड ट्रेड सेंटर्स असोसिएशनचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर कोफी बोतेंग, बँक ऑफ इंडियाच्या एक्सपोर्ट विभागाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रंगनाथन आदी मान्यवर उपस्थित होते.
मुंबई वर्ल्ड ट्रेड सेंटरचे चेअरमन कमल मोरारका यांनी स्वागत व ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज चे अध्यक्ष विजय कलंत्री यांनी प्रास्ताविक केले.

गुरुवार, २७ जानेवारी, २०११

भेसळ करणार्‍या माफिया टोळ्यांवर 'मोक्का' अंतर्गतच कारवाईची गरज

मुंबई, ता. २७ - भेसळ करणार्‍या माफिया टोळ्यांवर 'मोक्का' अंतर्गतच कारवाई करण्याची गरज आहे. या शब्दात राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री तसेच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मागणी केली आहे.
मालेगावचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना माफियांनी जाळून मारण्याच्या घटनेबद्दल श्री. भुजबळ यांनी संताप व्यक्त केला. पेट्रोल-डीझेल भेसळ करणार्‍या माफियांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या सोनवणे यांना माफियांनी जाळून मारल्याचे समजताच श्री. भुजबळ यांनी आमदार पंकज भुजबळ यांच्यासह नाशिककडे तातडीने प्रयाण केले.
भेसळ करणार्‍या माफियांचा प्रश्न खूप जुना असून गेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभांमधून देखील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह आपण अशा टोळ्यांची दहशत रोखण्याची गरज व्यक्त केली होती. या टोळ्या संपविण्यासाठी त्यांच्यावर भेसळ प्रतिबंधक पथकांकडून नव्हे, तर थेट पोलिसांकडूनच कारवाई होण्याची गरज आहे. कायद्याला आव्हान देणार्‍या व कायदा हातात घेणार्‍या या प्रवृत्तींवर 'मोक्का' सारखी कडक कारवाई केलीच पाहिजे अशी आग्रही मागणी यावेळी त्यांनी केली.

प्रजासत्ताक दिनानिमित्त नागरिकांना शासनातर्फे शुभेच्छा

मुंबई, ता. २६ - देशाच्या ६२ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री तसेच संपूर्ण मंत्रीमंडळ, शासकीय प्रतिनिधी यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय घटनाकारांना अभिप्रेत असलेल्या समता, बंधुता आणि सहिष्णुता या तत्वांचा अंगिकार करण्यासाठी सारे प्रतिबद्ध होऊ या, अशा आशयाच्या आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सोमवार, २४ जानेवारी, २०११

तळपणार्‍या स्वरभास्कराचा अंत - अजित पवार

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या निधनाने हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या क्षितिजावर दीर्घ काळ अभूतपूर्व तेजाने तळपणार्‍या स्वरभास्कराचा अस्त झाला आहे. या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. संगीताच्या ध्यासापोटी वयाच्या अकराव्या वर्षापासून भीमसेन जोशी यांनी केलेले कष्ट, प्रयत्न यातून एका अद्भूत गायकीचा जन्म झाला. पंडितजींनी गायलेल्या अभंगरचना, शास्त्रीय संगीतातील त्यांनी आळवलेले विविध राग, चीज, पुण्यात त्यांच्या गुरुंच्या स्मरणार्थ सन १९५३ पासून सातत्याने साजरा होणारा सवाई गंधर्व महोत्सव अजरामर राहतील. पंडित भीमसेन जोशी यांच्या रुपाने एक मौलिक रत्न आज आपण गमावले आहे, असेही श्री. पवार म्हणाले.

हळहळलं अवघ्या रसिक जनांचं मन...

माझे माहेर पंढरी, विठ्ठल नामाचा रे टाहो...अशा अनेक भजनांपासून प्रभू अजि गमला..अशी विविध नाट्यगीते, मिले सुर मेरा तुम्हारा...आदी प्रकार सादर करून केवळ रसिकांना थक्क करून सोडणार्‍या आणि जागेवरच खिळवून ठेवणार्‍या पंडित भीमसेन जोशी यांच्या निधनामुळे अवघं रसिक जनांचं मन हळहळलं आहे.
आपल्या मुलाने अभियंता व्हावे असे वडिलांना वाटत असताना, लहानपणापासूनच संगीत क्षेत्राकडे कल असणार्‍या पंडित भीमसेन जोशी यांच्या व वडिलांच्या मतभेदामुळे अत्यंत लहान वयातच भीमसेन जोशी यांनी घर सोडले होते. ग्वाल्हेर येथे किराणा घराण्याचे रामभाऊ कुंदगोळकर उर्फ सवाई गंधर्व यांच्याकडे त्यांनी दीक्षा घेतली. पंडितजींनी त्यांचे गुरू सवाई गंधर्व यांच्या स्मरणार्थ दरवर्षी सवाई गंधर्व संगीत महोत्सव पुणे येथे १९५२ साली सुरू केला. आजही दरवर्षी पुणे येथे सवाई गंधर्व पुण्यतिथी महोत्सव उत्साहात साजरा केला जातो. नामवंत गायक येथे येऊन हजेरी लावणे हे भाग्य समजतात.
कोणत्याही कलाकाराला साजेशा अशा पंडित भीमसेन जोशी यांनी केवळ मराठी रसिकच नाही, तर गैरमराठी रसिकांची मने देखील आपल्या खड्या आवाजामुळे जिंकली होती. मराठी व्यतिरिक्त कानडी आणि हिंदी भाषेतही त्यांनी उपशास्त्रीय संगीतास सुरवात केली. पु.ल.देशपांडे यांनी गंमतीने 'हवाईगंधर्व' ही पदवी बहाल केली. कारण त्यांना वारंवार करावा लागणारा विमान प्रवास मानला जायचे. पंडितजींच्या गायनाला सुरवात झाल्यानंतर मैफलित झोपेमुळे पेंगणारे रसिक त्वरीत खडबडून जागे व्हायचे.
पंडितजींना मिळालेले विविध पुरस्कार-
* भारतरत्न पुरस्कार
    * पद्मश्री पुरस्कार
    * संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार
    * पद्मभूषण पुरस्कार
    * पद्मविभूषण पुरस्कार
    * संगीताचार्य
    * पुण्यभूषण पुरस्कार
    * स्वरभास्कर पुरस्कार
    * तानसेन पुरस्कार
    * डॉक्टरेट डि. लिट्.

भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षितीजावर तळपणारा 'स्वरभास्कर' मावळला

मुंबई, ता. २४ - पंडित भीमसेन जोशी यांच्या निधनामुळे भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्राच्या क्षितिजावर तेजाने तळपणारा 'स्वरभास्कर' मावळला, या शब्दात सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.
किराणा घराण्याचे शिष्य असलेल्या पंडित भीमसेन जोशी यांचे ख्याल गायकीवर प्रचंड प्रभुत्व होते. कन्नड, हिंदी आणि मराठीमध्ये त्यांनी भक्तीगीते आणि अभंगांचे सादरीकरण केले. शास्त्रीय संगीतातील तज्ज्ञ आणि दर्दी रसिकांबरोबरच सामान्य नागरिकांच्या मनावरही त्यांनी गारूड केले. त्यांचा विशिष्ट खर्जातील आवाज आणि ताना घेण्याची पद्धत रसिकांवर मोहिनी घालत असे. अलिकडे, मिले सुर मेरा तुम्हारा..., आणि भारतबाला च्या राष्ट्रगीताच्या व्हिडिओमध्येही त्यांचे गायन आणि व्यक्तीमत्व यांची छाप अखिल भारतीयांच्या मनावर उमटली. पुण्यात सवाई गंधर्व पुण्यतिथीच्या माध्यमातून आपल्या गुरुंना आदरांजली वाहण्याचा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला. त्यांचे सुपुत्र श्रीनिवास जोशी यांच्यासह अनेक शिष्यांची देणगी या गायकाने देशाला दिली असून त्यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे, असेही श्री. भुजबळ यांनी म्हटले आहे.

पंडित भीमसेन जोशी यांचे निधन

सुमारे पन्नास वर्षांपासून संगीत क्षेत्रात आपल्या खड्या आवाजाने वर्चस्व प्रस्थापित केलेल्या पंडित भीमसेन जोशी यांची प्राणज्योत आज मालवली.
आपल्या स्वरांची नदी जगाच्या दहा दिशांना अथांग वाहणार्‍या संगीतसम्राट तसेच ख्याल गायकीसाठी सर्वश्रृत असलेल्या पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेली भजने देखील प्रसिद्ध होती. शास्त्रीय संगीत व भजन यासह त्यांनी अनेक चित्रपटगीते, ठुमरी देखील वेगळ्या शैलीत गायल्यामुळे प्रसिद्ध आहे. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.केवळ मराठीच नाही, तर संपूर्ण देशासह विदेशातील रसिक भीमसेन जोशी यांच्या आवाजाने संगीत मैफल सुरू असताना जागेवरच खिळवून ठेवत होते.
आपल्या गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध करून त्यांच्यावर भुरळ घातली होती.

कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप

(पनवेल):  राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...