गुरुवार, ९ डिसेंबर, २०१०

धन्य ती संसद..

संसदेचे आज विसाव्या (२०) दिवशी सुद्धा कामकाज झाले नाही. विरोधकांच्या गदारोळामुळे आज पुन्हा एकदा संसदेचे कामकाज बंद पाडण्यात आले.
संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज दुपारपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आले होते. विविध भ्रष्टाचार प्रकरणांसाठी संयुक्त संसदीय समिती नेमण्याची मागणी करत संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये गोंधळ घालण्यात आला. यापूर्वी १९ दिवस संसदेचे कामकाज बंद पाडण्यात आल्याचे वृत्त आहे. आज दुपारनंतर देखील संसदेचे कामकाज होऊ शकले नसल्याच्या वृत्तास सूत्रांनी दुजोरा दिला आहे. विरोधक अथवा सत्तारूढ पक्षाचे सदस्य असले तरी देखील काळ, अर्थाचा अपव्यय होऊ न देता चर्चा करून शेवटी तोडगा काढणे, उपाययोजना करणे, समाधान शोधून काढणे अत्यंत आवश्यक आहे.

बुधवार, ८ डिसेंबर, २०१०

विदर्भात पर्यटनाद्वारे अर्थकारणास चालना शक्य-भुजबळ

नागपूर, ता. ८ - विदर्भात मुबलक प्रमाणात असलेल्या वनसंपदेचा तसेच वन्यजीव सृष्टीचा येथील स्थानिक निसर्ग पर्यटनास (इको-टुरिझम) चालना देण्यासाठी अत्यंत चांगला उपयोग होणार आहे. या माध्यमातून स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती करण्यासह अर्थकारणासही मोठ्या प्रमाणात चालना देणे शक्य आहे. असे मत पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.
विदर्भाचा एकात्मिक पर्यटन विकास करण्यासाठी तसेच निसर्ग पर्यटनास चालना देण्यासाठी वन आणि पर्यटन विभागांच्या संयुक्त सहकार्यातून नेमके काय करता येऊ शकेल याचा आढावा घेण्यासाठी श्री. भुजबळ यांनी आज दुपारी आढावा बैठकीचे आयोजन केले होते. रवीभवनमधील श्री. भुजबळ यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली.
विदर्भातील पर्यावरणास कोणतीही हानी न पोहोचवता आपल्याला येथील निसर्ग पर्यटनाचा विकास करायचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पर्यटन उद्योग हा आज जगातील सर्वाधिक मोठा उद्योग बनला असल्याचे सांगून यामुळे राज्यात विविध प्रकारच्या पर्यटनास चालना देण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. अन्य देशांचे वन, पर्यावरणविषयक कायदे वेगळे असले तरी किमान आपल्याच देशातील मध्यप्रदेश, कर्नाटक आदी राज्यांनी निसर्ग पर्यटनास चालना देण्यासाठी पर्यटनस्थळी पर्यटकांना ज्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, तशाच प्रकारच्या सुविधा आपणही आपल्या वनांमध्ये उपलब्ध करण्यासाठी काही करता येईल काय, याचा विचार केला पाहिजे. वनांमध्ये काहीच करता येणार नाही, असा दृष्टीकोन ठेवण्याऐवजी वनांना धक्का न पोहोचवता पर्यटकांसाठी अधिकाधिक काय करता येईल, असा दृष्टीकोन विकसित करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
विदर्भातील वनांना भेट देणार्‍या पर्यटकांची संख्या गेल्या तीन वर्षात तीन पटींनी वाढली आहे, हे खरे असले तरीही पर्यटकांनी केवळ वनात फिरून जाणे अभिप्रेत नाही. स्थानिक पर्यावरणास हानी न पोहोचविता त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्यास पर्यटकांची संख्या वाढून विदर्भाच्या स्थानिक अर्थकारणास चालना मिळेल, असेही ते म्हणाले.
बैठकीस पर्यटन विभागाचे प्रधान सचिव आनंद कुलकर्णी, नागपूरचे जिल्हाधिकारी प्रवीण दराडे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक किरण कुरूंदकर, सह-व्यवस्थापकीय संचालक अविनाश ढाकणे आदी अधिकारी उपस्थित होते.

राजकारणी होण्यासाठी निश्चित शिक्षण अनिवार्य करण्याची गरज...

प्राध्यापक होण्यासाठी यापुढे नेट परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक होणार असून याप्रमाणेच राजकारणात देखील निश्चित स्वरूपाचे शिक्षण अनिवार्य करणे आवश्यक आहे.
देशातील निरक्षरतेचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. पूर्वी केवळ इयत्ता दहावी मॅट्रिक उत्तीर्ण किंवा दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या व्यक्तीकडे आदराने पाहिले जात होते. अर्थात तेव्हा परिस्थिती देखील तशीच होती. परंतु सातत्याने होणारा विकास, शिक्षणासाठी शासनाने उचललेली पावलं, बदललेलं समाज-मन यामुळे आज निरक्षरतेचे प्रमाण कमी होऊन साक्षरता वाढली आहे. काही ठिकाणी आजही रात्रशाळांमध्ये अभ्यासवर्ग घेतले जातात. काळाच्या ओघात दहावीचे शिक्षण म्हणजे नाममात्र शिक्षण झाले असून आता उच्च शिक्षा विभूषित व्यक्तीकडे आदराने पाहिले जाते. पूर्वीचा "गावचा पोर्‍या" आता गावात साहेब होऊन कर्तव्य बजावतोय, परदेशात सेवा देऊन गावाचे, देशाचे नाव उज्ज्वल करतोय.
पूर्वीची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी सुद्धा आता पूर्णपणे शंभराच्या घरात पोहोचली आहे. ५०% गुण म्हणजे भरपूर झाले... असा समज आता गैर झाला आहे. आता प्रचंड स्पर्धा असून ९०%, ९५%, ९९.९९% गुण प्राप्त करणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. यासाठी आपल्या पाल्याला वाट्टेल ते शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचा पालकांचा, क्वचित प्रसंगी शैक्षणिक संस्थेचा प्रयत्न असतो. अवघ्या पाच वर्षांपूर्वी देखील पीएच. डी. करणारी व्यक्ती म्हणजे प्रचंड विद्वान् असे मत असलेला प्रवाह आज बदलून त्याही पलिकडे गेला आहे. जागतिकीकरणामुळे पीएच. डी. आता मागे पडण्याच्या मार्गावर आहे अर्थात पीएच. डी. करणे म्हणजे पोरखेळ नाही ही बाब वेगळी लिहायची गरज नाही. परंतू हुशारीच आजकाल वाढली असल्याचे आजकाल नवीन पिढीवरून दिसून येते. शाळा, कॉलेजमध्ये शिकवताना शिक्षक, प्राध्यापक काही चुकल्यास विद्यार्थीच त्यांना त्याविषयी सांगतात...इतकी आजकालचे विद्यार्थी तयार असतात.
न्यायालयाने बहुदा अशा विविध गोष्टींचा सखोल अभ्यास करूनच प्राध्यापक होण्यासाठी भविष्यकाळात एम.फील., पीएच. डी. अशा पदव्या पुरेशा न ठरवता राष्ट्रीय चाचणी परीक्षा म्हणजेच 'नेट' परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असल्याचा निर्णय दिला असावा.
देशाचे राजकारण आणि राजकारणी जगात विख्यात असून कमी शिकलेली व्यक्ती राजकारण करते असे धोरण आता चुकीचे ठरले आहे. राजकारणातही शिक्षीत मंडळी, युवक प्रवेश करू लागले आहेत. राजकारणावर केवळ एखादे गाव नाही, तर संपूर्ण देशाचे भवितव्य देखील अवलंबून असू शकते. देशासाठी अथवा गावासाठी घेतलेला निर्णय, एखादे सत्कार्य होण्यासाठी, उपक्रम, योजना राबविण्यासाठी अडचणी येत असल्यास शासनासमोर संसद, विधानसभेत चर्चारुपाने मांडून त्यावर उपाययोजना करणे, समस्या सोडविणे आणि निर्णय घेणे महत्वाचे असते. जनतेचा प्रतिनिधी म्हणून निवडून दिलेला राजकारणीच हे करू शकतो. परंतू सोबत शिक्षणाची जोड असल्यास व्यक्तीमत्व विकासासह देशाचा विकास देखील सहज होईल, हाच विश्वास!

वाराणसी ब्लास्ट- पुन्हा शांत का आहे सरकार?

वाराणसी येथे काल (ता. ७) संध्याकाळी बॉम्बस्फोट होऊन दोन ठार तर सुमारे २५ जखमी झाले. दोन जीवंत बॉम्ब जप्त करण्यात आले. दरम्यान याप्रकरणी दोन संशयितांना सुरक्षा यंत्रणेने ताब्यात घेतले आहे.
या हल्ल्याची जबाबदारी एका अतिरेकी संघटनेने स्वीकारल्यानंतर देखील सरकारने कठोर पावले उचलण्याऐवजी केवळ शांततेचे आवाहन केले आहे.  मुंबईवर २६-११ चा भीषण हल्ला होऊन देखील तेव्हा संधी असूनही आणि पुरावे उपलब्ध असून देखील पाकिस्तान विरुद्ध कोणतीही कारवाई झाली नाही. आता पुन्हा एकदा या माध्यमातून संधी आहे. सरकारने शांत न बसता काहीतरी करण्याची गरज आहे.

मंगळवार, ७ डिसेंबर, २०१०

आजपर्यंतचे मुख्य निवडणूक आयुक्त

1. सुकुमार सेन : २१ मार्च १९५० ते १९ डिसेंबर १९५८
   2. के.व्ही.के. सुंदरम : २० डिसेंबर १९५८ ते ३० सप्टेंबर १९६७
   3. एस.पी. सेन वर्मा : १ ऑक्टोबर १९६७ ते ३० सप्टेंबर १९७२
   4. डॉ. नागेन्द्र सिंह : १ ऑक्टोबर १९७२ ते ६ फेब्रुवारी १९७३
   5. टी. स्वामीनाथन : ७ फेब्रुवारी १९७३ ते १७ जुन १९७७
   6. एक्स.एल. शकधर : १८ जुन १९७७ ते १७ जुन १९८२
   7. आर.के. त्रिवेदी : १८ जुन १९८२ ते ३१ डिसेंबर १९८५
   8. आर.व्ही.एस. पेरी शास्त्री : १ जानेवारी १९८६ ते २५ नोव्हेंबर १९९०
   9. श्रीमती व्ही. एस. रमादेवी : २६ नोव्हेंबर १९९० ते ११ डिसेंबर १९९०
  10. टी.एन. शेषन् : १२ डिसेंबर १९९० ते ११ डिसेंबर १९९६
  11. एम. एस. गिल : १२ डिसेंबर १९९६ ते १३ जुन २००१
  12. जे. एम. लिंगदोह : १४ जुन २००१ ते ७ फेब्रुवारी २००४
  13. टी. एस. कृष्णमूर्ती : ८ फेब्रुवारी २००४ ते १५ मे २००५
  14. बी.बी. टंडन : १६ मे २००५ to २८ जुन २००६
  15. एन. गोपालस्वामी : २९ जुन २००६ ते १९ एप्रिल २००९
  16. नवीन चावला : २० एप्रिल २००९ पासून अद्याप...
यापैकी टी. एन. शेषन् यांनी निवडणूक आयोगाचे महत्व शासन व मतदारांना पटवून दिल्यापासून नागरीक निवडणूक आयोगाबाबत जागरूक झाले. टी. एन. शेषन् यांची कारकीर्द महत्वाची मानली जाते.

मनोहर जोशी यांची प्रकृती स्थिर

मुंबई, ता. ६- लोकसभेचे माजी अध्यक्ष व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार मनोहर जोशी यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी सांगितले आहे. मनोहर जोशी यांच्यावर दोन दिवसांपूर्वी लिलावती हॉस्पिटलमध्ये अँजिओप्लास्टी करण्यात आली. कृषिमंत्री शरद पवार, महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायण, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, राज्यसभेच्या माजी उपसभापती नजमा हेपतुल्ला यांनीही दूरध्वनीवरून त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे व मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी तसेच शिवसैनिकांनी जोशी यांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली.  माजी उपमुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनीही श्री. जोशी यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीविषयी विचारपूस केली.

सरबजितसिंग याच्या जगण्याच्या आशेला पालवी

(वृत्तसंस्था)- अनेक वर्षांपासून पाकिस्तानमध्ये तुरूंगात जीवंतपणीच जगण्याची आशा मावळलेल्या भारतीय वंशाच्या सरबजितसिंग याच्या जगण्याच्या आणि तुरूंगातून सुटका होण्याच्या आशेला पालवी फुटली आहे. त्याच्या वकीलांनी दिलेल्या माहितीमुळे त्याच्या कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार राहिला नाही.
काही वर्षांपूर्वी लाहोर येथील बॉम्बस्फोट प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सरबजितसिंग याला न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली आहे. संबंधित प्रकरणात मनजितसिंग ही व्यक्ती खरा आरोपी असल्याचे सरबजितसिंग याचे वकील ओवेस शेख यांनी सांगितले असून ते लवकरच तसे पुरावे देखील न्यायालयात सादर करणार आहेत. मनजितसिंग सुमारे तीन वर्षे कॅनडा पोलिसांच्या ताब्यात असून, तो बॉम्बस्फोटाच्या वेळी लाहोरमध्ये होता असे पुरावे सापडल्याचे शेख यांनी सांगितले. सरबजितसिंग याने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासाठी भेटवस्तू बनविल्या असून त्या त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यात येतील असेही ते यावेळी म्हणाले.

सोमवार, ६ डिसेंबर, २०१०

महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

महापरिनिर्वाण दिनानिमित्त सीडी प्रकाशन

जन्माचे सार्थक झाले भीमा तुझ्यामुळे या सीडीचे अनावरण करताना उपमुख्यमंत्री अजित पवार. शेजारी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, पाणीपुरवठा मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, प्रमोद हिंदूराव

सुवर्णपदक विजेत्या महाराष्ट्र संघाचे उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

नागपूर, ता. ५- अमृतसर येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय  खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या १४ वर्षांखालील मुलींच्या संघाने सुवर्णपदक पटकावल्याबद्दल उपमुख्यमंत्री व खोखो असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. महाराष्ट्राच्या मुलींनी या स्पर्धेत कौशल्यपूर्ण खेळ दाखवत आपली चुणूक दाखविली आहे. त्यांची ही कामगिरी कौतुकास्पद आहे. कर्णधार निकिता पवार, प्राजक्ता कुचेकर, पौर्णिमा सपकाळ आदींचा संघात समावेश होता. चंद्रकांत कांबळी यांनी मार्गदर्शक म्हणून तर एस. जी. भास्करे यांनी व्यवस्थापक म्हणून काम पाहिले.

कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप

(पनवेल):  राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...