शनिवार, २३ फेब्रुवारी, २०१३

इंटरनेटवर मैत्री करताय...जरा जपून!




दशकापासून इंटरनेटच्या नेटमध्ये फक्त तरुणाईच गुंतली होती...!  आजकाल कुतूहलाने का होईनां वडिलधारी मंडळी सुद्धा इंटरनेटवर सर्फ करू लागली आहे. सोशल नेटवर्क, सामाजिक वेबसाइट्सच्या माध्यमातून मित्र-मंडळी जमवू लागली आहे. यानिमित्ताने, इंटरनेटवर मैत्री करताना जपून, विचारपूर्वक करावी, हेच इथे नमूद करावसं वाटतंय...!

Share life’s important moments with just right people!रोजचं काम सुरू असताना एका ठिकाणी ही ओळ दिसली आणि बस्स…! विचारचक्र सुरू झालं, हे वाक्य सर्वसामान्यांच्या जीवनात बरंच काही सांगून जातं, केवळ हृदयात नाही तर मनात सुद्धा घर करून जाणारी ही ओळ वाटली. लहानपणी आई-वडील बाहेर जाताना, अनोळखी व्यक्तीशी बोलू नका, त्यांना घरात घेऊ नका, आतूनच त्यांच्याशी बोला, खूपच भीती वाटली, काही काळंबेरं वाटलं तर अगदी आरडाओरड करा. प्रवासात जाताना कोणाला आपलं खरं नाव तर अजिबात सांगू नका... जवळपास असाच डोस प्रत्येकालाच देतात, आईवडीलच नाही, तर साssरी वडील मंडळी हाच डोस देतात, हा डोस आपल्याला का देतात? असं लहानपणी त्या वयामुळे वाटतं. मात्र सध्याचा काळ, वेळ, घटना पाहता हे खूपच मौलिक होतं असं आता वाटू लागलंय.

इंटरनेटचं, इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांचं महत्त्व वाढलं असलं तरीही वृत्तपत्राचं महत्त्व अजून कमी झालेलं नाही, कागद महाग झाला असला, तरी सुद्धा बातमीचं मूल्य अमूल्य आहे. अजून पेपर घ्यायला कोणी महाग झालेलं नाही. कोणतीही बातमी आदल्या दिवशी इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांवर पाहिली तरीही दुसर्‍या दिवशी सकाळच्या चहाच्या पहिल्या घोटाबरोबर हातात पेपर पाहिजेच, पेपर आलेला नसला, तर बेचैन होते. कारण फक्त एकच, इत्यंभूत माहिती! दररोजच्या घात-अपघाताच्या बातम्या, घडामोडींबरोबर, बौद्धिक खाद्य सुद्धा प्रसार माध्यमं देतातच. ते फक्त थोडंस शोधावं लागतं, इतकंच. कूर्म-गतीने का होईना, लोकांना आता इंटरनेट चं महत्त्व पटतंय. सदु-पयोगासाठी इंटरनेट इतकं पटकन माहिती देणारं दुसरं कोणतंही माध्यम नाही (शिक्षक, गुरुजन, संबंधित वगळून). खरंतर, इंटरनेट नंतर माहिती मिळण्याचं काही अंशी दुसरं आगार असेल, तर ते म्हणजे सध्याची अगदी शाळेत जाणारी मुलं सुद्धा...। वडिलधारी मंडळी करत असलेली चर्चा ऐकून अर्धे लक्ष अभ्यासात आणि अर्धे चर्चेकडे असलेली ही मुलं चर्चेत केव्हा सहभागी होतात आणि सोल्यूशन सुद्धा सांगून जातात हे कळतच नाही. हे सोल्यूशन मानणार्‍या, समजून घेणार्‍या पालकांची संख्या अजून पाहिजे तितकी जास्त नाही. आमचा मुलगा/मुलगी खूप हुश्शार आहे... अशी स्तुतीसुमनं लोकांसमोर उधळायला मात्र कोणी विसरत नाही. प्रत्यक्षात मात्र, मुलांना अजून ती लहान असून अशा चर्चांमध्ये डोकावू नये असा समज द्यायला सुद्धा विसरत नाहीत.

मुलांचं ऐकून, त्यांच्याकडून इंटरनेटचं प्रशिक्षण घेणारी मंडळीही कमी नाहीत. मुलं शाळेत गेल्यानंतर दैनिक कामं आटोपून दुपारी फावल्या वेळात इंटरनेटवर सर्फिंग करणारे आजी-आजोबा सुद्धा आता दिसू लागलेत. मुलांचे आई-बाबा सुद्धा याला अपवाद नाहीत. वीकएन्ड किंवा कामावरून रात्री घरी आल्यानंतर थोडा वेळ नेट सर्फिंग करणे हा अनेकांचा नित्यनियम झाल्याचे दिसून येते. सध्या सोशल वेबसाइटच्या माध्यमातून मैत्री जोडण्याचं जणू पेव फुटलंय. अनेकांना वर्षानुवर्ष न भेटलेले मित्र भेटतात, परीचय होतात. तरुणाईच काय, अगदी शाळेत असलेली पोरं सुद्धा इंटरनेटवर अक्षरशः असतात (असंच म्हणाव लागेल). वयाची तीशी (३० वर्षे) पार केलेली मंडळी, मध्यम वयीन, प्रौढ सुद्धा सोशल वेबसाइट किंवा इंटरनेटवर तासन-तास घुटमळतात. दिवसभर घरात कोणीही नसल्याने एकटेपणा घालवायला, सुट्टीच्या दिवशी वेळ घालवायला इंटरनेट हे एक चांगले माध्यम बनल्याचे कोणीही नाकारू शकत नाही. अशावेळी कोणाशीतरी मैत्री करावी असे अनेकांना वाटत असेलच, कॉलेजमध्ये जाणार्‍या युवकांपासून मध्यम वयीन लोकांपर्यंत ही संख्या भरपूर आहे. दररोज पेपर वाचनाची सवय असल्यामुळे एक दिवस जरी पेपर आला नाही, वाचला गेला नाही, तर जशी घालमेल होते, चुकल्याचुकल्यासारखे वाटते, तसेच एकमेकांशी परीचय झाल्यानंतर दररोज एकमेकांशी बोलल्याशिवाय अर्थातच चॅटिंग केल्याशिवाय चुकल्याचुकल्यासारखी वाटणारी भरपूर मंडळी आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून मैत्री झाल्यानंतर नकळत फसवणुक होण्याच्या घटनांमध्ये दररोज वाढ होत आहे.

Don’t post photos that looks stunning… ही ओळ वाचल्यानंतर विशेषतः महिलांच्या दृष्टीने याचा उल्लेख करावासा वाटतो...! आजकाल कॉम्प्यूटर हा जणू काही आवश्यकच झाला आहे. जवळपास प्रत्येक घरात टीव्ही असतो, तसेच दिवस लवकरच येतील आणि सामान्यजनांकडेही कॉम्प्यूटर असेल, सगळं जग लवकरच खूप्पच जवळ येईल याची ही नांदी आहे. इंटरनेटवर ओळख झाल्यानंतर कोणीही आपला फोटो पोस्ट करतोच. त्यातल्या त्यात आपण सगळ्यात छान दिसत असलेला फोटो पोस्ट करण्यात तर मित्र-मैत्रिणींची जणू स्पर्धाच लागलेली असते. मात्र, यात भावनेला आवर घालून दूरदृष्टीने संभाव्य धोके लक्षात घेऊन शक्यतो फोटो पोस्ट करू नये, लावू नयेत. अगदी पोस्ट करायचे ठरवल्यास साधारण फोटो पोस्ट करावा असे आग्रहाने नमूद करावेसे वाटते. आप्त-स्वकिय, जीवलग मित्र-मैत्रिणी, समूह यांच्याशिवाय शक्यतो बाहेर मैत्री करू नये. काही अडचण आल्यास आपल्या पालकांना सांगावे अथवा पालकांसह, कायदेतज्ञ किंवा संबंधित पोलिस ठाणे, सायबर गुन्हे शाखेशी विनाविलंब संपर्क साधावा.

काळ अक्षरशः भरभर पुढे जातोय, जग मोठं, आयुष्य छोटं होतंय. आपण संपलो तरी कामं संपणार नाहीत अशी सध्याची परिस्थिती आहे. काळाच्या ओघात जगाबरोबर चालणं, प्रवाहाबरोबर पुढे वाटचाल करत रहाणं हे जरी खरं असलं तरीही आपण करत असलेलं कार्य, जोडत असलेली योग्य असल्याबाबत जाणून घेणं आवश्यक आहे. आयुष्याचे कोणतेही क्षण महत्त्वाचेच असून योग्य पावले वेळीच उचलल्यास हेच क्षण सोनेरी ठरतील, यात शंकाच नाही!

शनिवार, १६ फेब्रुवारी, २०१३

How to increase Traffic on Blog...!

  • Post great content.
  • Use most general/simple keywords.
  • Use keywords for each article, topic, subject.
  • Avoid hard words, though it is English or Marathi or any other language Blog.
  • If possible update blog as possible as regular.
  • Post current topics, events, happenings.
  • Give wishs to readers,visitors on occasion of festivals, season!
  • Use internet for good work always only!

रविवार, १० फेब्रुवारी, २०१३

संत नामदेवांच्या कर्तृत्वाकडे महाराष्ट्राचं दुर्लक्षच - डॉ कोतापल्ले


आजी माजी संमेलनाध्यक्षांच्या हस्ते महानामाचं प्रकाशन

चिपळूण- महाराष्ट्रातील प्रबोधनाची सुरुवात करून संत नामदेवांनी तर समतेची पताका देशभर नेली. पण दुर्दैवानं नामदेवांकडं महाराष्ट्राचं दुर्लक्ष झालं. 'महानामा' या ग्रंथातून नामदेवरायांच्या राष्ट्रव्यापी कार्यावर नवा प्रकाशझोत पडेल, असा विश्वास चिपळूण येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केला. संत नामदेवांच्या कामाची सामाजिक सांस्कृतिक अंगाने मांडणी करणा-या पत्रकार सचिन परब आणि श्रीरंग गायकवाड संपादित 'महानामा' या पुस्तकाचं कोत्तापल्ले आणि मागील संमेलनाध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते प्रकाशन झालं. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संत साहित्याचे अभ्यासक आमदार उल्हास पवार, कवयित्री प्रभा गणोरकर उपस्थित होते.

मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाविषयी कोत्तापल्ले पुढं म्हणाले,  संत नामदेव हे मराठीतील आद्य आत्मचरित्रकार, आद्य प्रवासवर्णनकार. पण त्यांच्याकडं आपलं दुर्लक्ष झालं. या पुस्तकाच्या निमित्तानं पुन्हा एकदा नामदेवरायांच्या कार्याला उजाळा मिळेल. तर डहाके यांनी नामदेवांच्या उत्तर भारतातील कर्तृत्वावर प्रकाशझोत टाकला. ते म्हणाले, 'महाराष्ट्राबाहेर जाऊन संपूर्ण देशावर प्रभाव टाकणाऱ्या नामदेवांचं कर्तृत्व फार थोर होतं. आजही पंजाबात गेल्यावर नामदेवांच्या राज्यातून आलेले म्हणून महाराष्ट्रीयांना आदर मिळतो.'
प्रभा गणोरकर यांनी संत नामदेव हे आपले आवडते कवी असल्याचं सांगितलं. एक सर्वसामान्य माणूस ते महान संत असा त्यांच्या काव्यात दिसणारा त्यांचा प्रवास अचंबित करणारा आणि मोहवून टाकणारा आहे, असं त्यांनी सांगितलं. उल्हासदादा पवार म्हणाले, 'नामदेवमहाराजांचा अधिकार फार मोठा आहे. त्यांनी २० वेळा भारतभ्रमण केलं. त्यापैकी १२ वेळा ते उत्तरेत गेले आणि ८ वेळा दक्षिणेत गेले. आजही आपल्याकडं जातीपातींचं राजकारण केलं जातं. अगदी साहित्य संमेलनाच्या मांडवातही त्याचे पडसाद उमटतात. अशा वेळी ८०० वर्षांपूर्वी संत चोखोबांची समाधी पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिरासमोर उभारणाऱ्या नामदेवांचं स्मरण करणं आवश्यक आहे. ते स्मरण हे महानामा पुस्तक नक्कीच करून देतं.'
दिवाळी अंक असतात तर महाराष्ट्राचा सर्वात मोठा सोहळा असणा-या आषाढीचे अंक का नाहीत, अशी भूमिका घेऊन गेल्या आषाढीत रिंगण या आषाढी अंकाची सुरुवात झाली. त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. त्या अंकात संपादित केलेले लेख अधिक सविस्तरपणे मांडत तसेच नव्या लेखांची भर टाकून महानामा हा ग्रंथ तयार झाला आहे. रिंगणप्रमाणेच महानामाचंही महाराष्ट्रभर स्वागत होईल, अशी खात्री संपादक सचिन परब आणि श्रीरंग गायकवाड यांनी व्यक्त केली. याप्रसंगी कलमनामाचे संपादक युवराज मोहिते यांच्यासह अनेक पत्रकार आवर्जून उपस्थित होते. मनोविकास प्रकाशनचे संचालक आशिश पाटकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. 

महानामा या अडीचशे पानी ग्रंथाला ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांची प्रस्तावना आहे. तसेच पंजाब, राजस्थान, दिल्ली, गुजरात, नामदेवांचं जन्मगाव नरसी, कर्मभूमी पंढरपूर येथे प्रत्यक्ष जाऊन नामदेवांच्या पाऊलखुणा शोधत केलेले रिपोर्ताज आहेत. तर भालचंद्र नेमाडे, भारतकुमार राऊत, अशोक कामत, कै. म. वा. धोंड, कै. मु. श्री. कानडे, नि. ना. रेळेकर, रामदास डांगे, लंडन येथील खालसा कॉलेजच्या प्राचार्य माधवी आमडेकर, भास्कर हांडे, अभिनेते गोविंद नामदेव, वीणा मनचंदा, शिवाजीराव मोहिते, संजय सोनवणी, ओमश्रीश दत्तोपासक, आप्पासाहेब पुजारी, मंगला सासवडे, अझीझ नदाफ, दिलीप जोशी, सुनील यावलीकर, शामसुंदर सोन्नर, अंजली मालकर यांच्या अभ्यासपूर्ण लेखांमधे नामदेवांच्या कर्तृत्वाचा चहुअंगाने वेध घेण्यात आला आहे. पुस्तकाची किंमत २५० रुपये आहे. हे पुस्तक महाराष्ट्रभर प्रमुख विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे. 
(संपर्कः मनोविकास प्रकाशनः ०२०-६५२६२९५०)

रविवार, ३ फेब्रुवारी, २०१३

कौतुकाचा आनंद म्हणजे सायीवर घातलेली पिठीसाखर... -बाबासाहेब पुरंदरे

  इंदूर (ता. ३ फेब्रु.): मुलांना मिळालेलं पारितोषिक कोणतंही असो, त्यांचं कौतुक केलच पाहिजे. मुलांना त्यांना मिळालेल्या पारितोषिकाचं आईवडिलांनी केलेलं कौतुक म्हणजे दुधावरच्या सायीवर घातलेल्या पिठीसाखरेसारख्या आनंदासारखाच असतो. या शब्दात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी, येथील महाराष्ट्र साहित्य सभेच्या आयोजित पारितोषिक वितरण सोहळ्याचे कौतुक केले.

येथील महाराष्ट्र साहित्य सभेच्या ५५ व्या शारदोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील यशस्वी प्रतिभावंतांना प्रीतमलाल दुवा सभागृहात शिवशाहीर तथा श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी बाबासाहेब पुरंदरे यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, सध्याचा काळ हा स्पर्धेचा असून कोणत्याही स्पर्धेत आता यश संपादन करणे वाटते तेवढे सोपे राहिले नाही. मात्र प्रयत्न केल्यास यश हे पदरात पडतेच, पालकांनी मुलांचं यश कितीही लहान स्वरुपात असलं तरीसुद्धा त्याचं कौतुक अर्थात appreciation हे केलंच पाहिजे, कष्टाने मिळविलेल्या अशा गुणांचा अंगीकार केला पाहिजे. प्रतिभावंतांच्या या कर्तृत्वावर महाराष्ट्र साहित्य सभेने फुंकर घालण्याचं कार्य या माध्यमातून केलं आहे.

यावेळी श्री. पुरंदरे यांनी समर्थ रामदास स्वामी यांचे साहित्य म्हणजे एक महान देणगी लाभली असल्याचे सांगून अहिल्यादेवी होळकर यांचं महत्त्व देखील जिजाबाई यांच्याइतकच असल्याचे गौरवोद्गार काढले. याचबरोबर वेरूळ येथील १६ व्या (कैलास) लेणीचा उल्लेख करून कर्तृत्व म्हणजे काय असतं हे ही लेणी पाहून लक्षात येतं. या लेणीतील चित्राच्या स्वरुपात साहित्यातील रौद्र, श्रृंगार, हास्य, भय, भक्ती आदी रस कोरलेले असल्याचे सांगून ही लेणी आवर्जून पाहण्याचं आवाहन केलं.

क्षणचित्रे-
  • राष्ट्रीय महापुरुषाची वेशभुषा केलेला पारितोषिक विजेता शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतच पारितोषिक घेण्यास आल्याचा आनंद बाबासाहेबांच्या चेहर्‍यावरून ओसंडून वाहत होता. त्यांनी यावेळी उठून मुजरा केला.
  • श्रीदुर्गासप्तशतीचा अनुवाद मराठीत करणार्‍या भगिनीस पारितोषिक वितरणापूर्वी बाबासाहेबांनी पवित्र मनाने पादत्राणे काढून नंतर हा पुरस्कार दिला


कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप

(पनवेल):  राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...