मुख्य सामग्रीवर वगळा

इंटरनेटवर मैत्री करताय...जरा जपून!




दशकापासून इंटरनेटच्या नेटमध्ये फक्त तरुणाईच गुंतली होती...!  आजकाल कुतूहलाने का होईनां वडिलधारी मंडळी सुद्धा इंटरनेटवर सर्फ करू लागली आहे. सोशल नेटवर्क, सामाजिक वेबसाइट्सच्या माध्यमातून मित्र-मंडळी जमवू लागली आहे. यानिमित्ताने, इंटरनेटवर मैत्री करताना जपून, विचारपूर्वक करावी, हेच इथे नमूद करावसं वाटतंय...!

Share life’s important moments with just right people!रोजचं काम सुरू असताना एका ठिकाणी ही ओळ दिसली आणि बस्स…! विचारचक्र सुरू झालं, हे वाक्य सर्वसामान्यांच्या जीवनात बरंच काही सांगून जातं, केवळ हृदयात नाही तर मनात सुद्धा घर करून जाणारी ही ओळ वाटली. लहानपणी आई-वडील बाहेर जाताना, अनोळखी व्यक्तीशी बोलू नका, त्यांना घरात घेऊ नका, आतूनच त्यांच्याशी बोला, खूपच भीती वाटली, काही काळंबेरं वाटलं तर अगदी आरडाओरड करा. प्रवासात जाताना कोणाला आपलं खरं नाव तर अजिबात सांगू नका... जवळपास असाच डोस प्रत्येकालाच देतात, आईवडीलच नाही, तर साssरी वडील मंडळी हाच डोस देतात, हा डोस आपल्याला का देतात? असं लहानपणी त्या वयामुळे वाटतं. मात्र सध्याचा काळ, वेळ, घटना पाहता हे खूपच मौलिक होतं असं आता वाटू लागलंय.

इंटरनेटचं, इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांचं महत्त्व वाढलं असलं तरीही वृत्तपत्राचं महत्त्व अजून कमी झालेलं नाही, कागद महाग झाला असला, तरी सुद्धा बातमीचं मूल्य अमूल्य आहे. अजून पेपर घ्यायला कोणी महाग झालेलं नाही. कोणतीही बातमी आदल्या दिवशी इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांवर पाहिली तरीही दुसर्‍या दिवशी सकाळच्या चहाच्या पहिल्या घोटाबरोबर हातात पेपर पाहिजेच, पेपर आलेला नसला, तर बेचैन होते. कारण फक्त एकच, इत्यंभूत माहिती! दररोजच्या घात-अपघाताच्या बातम्या, घडामोडींबरोबर, बौद्धिक खाद्य सुद्धा प्रसार माध्यमं देतातच. ते फक्त थोडंस शोधावं लागतं, इतकंच. कूर्म-गतीने का होईना, लोकांना आता इंटरनेट चं महत्त्व पटतंय. सदु-पयोगासाठी इंटरनेट इतकं पटकन माहिती देणारं दुसरं कोणतंही माध्यम नाही (शिक्षक, गुरुजन, संबंधित वगळून). खरंतर, इंटरनेट नंतर माहिती मिळण्याचं काही अंशी दुसरं आगार असेल, तर ते म्हणजे सध्याची अगदी शाळेत जाणारी मुलं सुद्धा...। वडिलधारी मंडळी करत असलेली चर्चा ऐकून अर्धे लक्ष अभ्यासात आणि अर्धे चर्चेकडे असलेली ही मुलं चर्चेत केव्हा सहभागी होतात आणि सोल्यूशन सुद्धा सांगून जातात हे कळतच नाही. हे सोल्यूशन मानणार्‍या, समजून घेणार्‍या पालकांची संख्या अजून पाहिजे तितकी जास्त नाही. आमचा मुलगा/मुलगी खूप हुश्शार आहे... अशी स्तुतीसुमनं लोकांसमोर उधळायला मात्र कोणी विसरत नाही. प्रत्यक्षात मात्र, मुलांना अजून ती लहान असून अशा चर्चांमध्ये डोकावू नये असा समज द्यायला सुद्धा विसरत नाहीत.

मुलांचं ऐकून, त्यांच्याकडून इंटरनेटचं प्रशिक्षण घेणारी मंडळीही कमी नाहीत. मुलं शाळेत गेल्यानंतर दैनिक कामं आटोपून दुपारी फावल्या वेळात इंटरनेटवर सर्फिंग करणारे आजी-आजोबा सुद्धा आता दिसू लागलेत. मुलांचे आई-बाबा सुद्धा याला अपवाद नाहीत. वीकएन्ड किंवा कामावरून रात्री घरी आल्यानंतर थोडा वेळ नेट सर्फिंग करणे हा अनेकांचा नित्यनियम झाल्याचे दिसून येते. सध्या सोशल वेबसाइटच्या माध्यमातून मैत्री जोडण्याचं जणू पेव फुटलंय. अनेकांना वर्षानुवर्ष न भेटलेले मित्र भेटतात, परीचय होतात. तरुणाईच काय, अगदी शाळेत असलेली पोरं सुद्धा इंटरनेटवर अक्षरशः असतात (असंच म्हणाव लागेल). वयाची तीशी (३० वर्षे) पार केलेली मंडळी, मध्यम वयीन, प्रौढ सुद्धा सोशल वेबसाइट किंवा इंटरनेटवर तासन-तास घुटमळतात. दिवसभर घरात कोणीही नसल्याने एकटेपणा घालवायला, सुट्टीच्या दिवशी वेळ घालवायला इंटरनेट हे एक चांगले माध्यम बनल्याचे कोणीही नाकारू शकत नाही. अशावेळी कोणाशीतरी मैत्री करावी असे अनेकांना वाटत असेलच, कॉलेजमध्ये जाणार्‍या युवकांपासून मध्यम वयीन लोकांपर्यंत ही संख्या भरपूर आहे. दररोज पेपर वाचनाची सवय असल्यामुळे एक दिवस जरी पेपर आला नाही, वाचला गेला नाही, तर जशी घालमेल होते, चुकल्याचुकल्यासारखे वाटते, तसेच एकमेकांशी परीचय झाल्यानंतर दररोज एकमेकांशी बोलल्याशिवाय अर्थातच चॅटिंग केल्याशिवाय चुकल्याचुकल्यासारखी वाटणारी भरपूर मंडळी आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून मैत्री झाल्यानंतर नकळत फसवणुक होण्याच्या घटनांमध्ये दररोज वाढ होत आहे.

Don’t post photos that looks stunning… ही ओळ वाचल्यानंतर विशेषतः महिलांच्या दृष्टीने याचा उल्लेख करावासा वाटतो...! आजकाल कॉम्प्यूटर हा जणू काही आवश्यकच झाला आहे. जवळपास प्रत्येक घरात टीव्ही असतो, तसेच दिवस लवकरच येतील आणि सामान्यजनांकडेही कॉम्प्यूटर असेल, सगळं जग लवकरच खूप्पच जवळ येईल याची ही नांदी आहे. इंटरनेटवर ओळख झाल्यानंतर कोणीही आपला फोटो पोस्ट करतोच. त्यातल्या त्यात आपण सगळ्यात छान दिसत असलेला फोटो पोस्ट करण्यात तर मित्र-मैत्रिणींची जणू स्पर्धाच लागलेली असते. मात्र, यात भावनेला आवर घालून दूरदृष्टीने संभाव्य धोके लक्षात घेऊन शक्यतो फोटो पोस्ट करू नये, लावू नयेत. अगदी पोस्ट करायचे ठरवल्यास साधारण फोटो पोस्ट करावा असे आग्रहाने नमूद करावेसे वाटते. आप्त-स्वकिय, जीवलग मित्र-मैत्रिणी, समूह यांच्याशिवाय शक्यतो बाहेर मैत्री करू नये. काही अडचण आल्यास आपल्या पालकांना सांगावे अथवा पालकांसह, कायदेतज्ञ किंवा संबंधित पोलिस ठाणे, सायबर गुन्हे शाखेशी विनाविलंब संपर्क साधावा.

काळ अक्षरशः भरभर पुढे जातोय, जग मोठं, आयुष्य छोटं होतंय. आपण संपलो तरी कामं संपणार नाहीत अशी सध्याची परिस्थिती आहे. काळाच्या ओघात जगाबरोबर चालणं, प्रवाहाबरोबर पुढे वाटचाल करत रहाणं हे जरी खरं असलं तरीही आपण करत असलेलं कार्य, जोडत असलेली योग्य असल्याबाबत जाणून घेणं आवश्यक आहे. आयुष्याचे कोणतेही क्षण महत्त्वाचेच असून योग्य पावले वेळीच उचलल्यास हेच क्षण सोनेरी ठरतील, यात शंकाच नाही!

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012