गुरुवार, ५ जानेवारी, २०१२

मुंबई येथे 15 जानेवारीला छात्रभारतीतर्फे एक दिवसीय कार्यशाळा

मुंबई, ता. 5 - मुंबई येथे रविवारी (ता. 15) छात्रभारतीतर्फे युवकांसाठी एक दिवसीय कार्यशाळा (वर्कशॉप) आयोजित केली आहे. सकाळी नऊपासून सायंकाळी सहापर्यंत तळमजला, पोयाबावडी म्युनिसिपल स्कूल, कामगार मैदानाजवळ, केईएम समोर, परळ, मुंबई येथे हे आयोजन करण्यात आले आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी मार्गदर्शन करतील.

नाटक, सिनेमा, मालिका, वर्तमानपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रसासकीय संधी आणि सामाजिक, राजकीय परिस्थितीचे भान आदी विषयांवर यावेळी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. माध्यमं खुणावताहेत या विषयावर सकाळचे संपादक पद्मभूषण देशपांडे, तरुण मित्रांनो - कपिल पाटील (शिक्षक आमदार), मनोरंजनाची न्यारी दुनिया - सचिन गोस्वामी (मालिका आणि सिनेमा दिग्दर्शक), चला प्रशासकीय सेवेत - हाजी जतकर (उपायुक्त विक्रीकर), दिल्ली हादरवणारा फकीर - राजा कांदळकर (लेखक, पत्रकार), समारोप: आपण कोण? - ऍड. अरुण दोंदे (अध्यक्ष छात्रभारती) आदी मान्यवर मार्गदर्शन करतील. कार्यशाळेत प्राध्यापक देखील सहागी होऊ शकतात.
अधिक माहितीसाठी प्रा. जयवंत पाटील, प्रा. ईश्वर आव्हाड (9870329155), प्रा. उत्कर्षा मल्या, प्रा. आर. बी. पाटील, प्रा. सुरेश कोकीतकर, प्रा. लिना पगारे, प्रा. सुदाम वाघमारे, प्रा. चंद्रभान लांडे, भूषण वर्धमाने (9224762024), नेहा पांचाळ, सुमित जाधव यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बुधवार, ४ जानेवारी, २०१२

आचारसंहितेसंदर्भात तक्रारी महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांकडे कराव्यात- निवडणूक आयोग

मुंबई, ता. 4 - आचारसंहिता संदर्भातील तक्रारी संबंधित महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर कराव्यात, असे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी केले आहे.

राज्यातील 10 महानगरपालिका, 27 जिल्हा परिषदा आणि 309 पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या घोषणेनंतर संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेचा भंग होत असल्याबाबत अनेक तक्रारी राज्य निवडणूक आयुक्तांकडे आणि आयोगाच्या कार्यालयाकडे करण्यात येत आहेत. त्याऐवजी महानगरपालिका निवडणुकीच्या आचारसंहितेसंदर्भातील तक्रारी असल्यास त्या संबंधित महानगरपालिका आयुक्तांकडे सादर कराव्यात, तसेच जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या निवडणुकीच्या आचारसंहितेसंदर्भातील तक्रारी असल्यास त्या संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे द्याव्यात, असेही श्रीमती नीला सत्यनारायण यांनी आवाहन केले आहे.

अद्वितीय व्हा आणि चांगला विचार करा- कलाम

भुवनेश्वर, ता. 4 - अद्वितीय व्हा आणि चांगला विचार करा तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान कार्यात स्वतःस झोकुन द्या. असे आवाहन माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी आज येथे शाळेच्या विद्यार्थ्यांना केले. येथील केआयआयटी विद्यापीठाच्या प्रांगणात 99 व्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या उद्घाटनकार्यक्रमात ते बोलत होते. मंगळवारी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

पाच दिवस (7 जानेवारीपर्यंत) चालणाऱ्या या कार्यक्रमात नोबेल विजेत्यांसह 15,000 प्रतिनिधींपेक्षा जास्त प्रतिनिधी सहभागी होत आहेत. यावेळी श्री. कलाम म्हणाले की युवकांनी आपल्या स्वप्नातील कल्पनेनुसार कार्य करावे. सध्याचा काळ जोखीम पत्करण्याचा आहे. येणाऱ्या पीढीचे भविष्य उज्ज्वल असून त्यांचीही विशिष्ट स्वप्न आहेत. कठोर परीश्रम करा आणि सर्व समस्यांचे निराकरण स्वतःच करण्याचा प्रयत्न करा. चांगली पुस्तकं लिहा, चांगला माणूस बना आणि आपला मित्र वाटावा असे चांगले शिक्षक व्हा, असेही श्री. कलाम म्हणाले. एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की विज्ञानासाठी भरपूर पैसा लागतो आणि पैसा हा राजकारण्यांकडून येतो.

मंगळवार, ३ जानेवारी, २०१२

दहा महानगरपालिका- 16 फेब्रुवारी; जिल्हापरिषदा, पं.स.- 7 फेब्रुवारीला मतदानः आचारसंहिता लागू

मुंबई, ता. 3 - बृहन्मुंबईसह दहा महानगरपालिका तसेच 27 जिल्हापरिषदा आणि 309 पंचायत समित्यांचा सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रम राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी आज येथे जाहीर केला. यानुसार महानगरपालिकांसाठी 16 फेब्रुवारी 2012 ला मतदान होईल. तर, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी 7 फेब्रुवारीला मतदान होईल. यासर्व ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.

येथील सचिवालय जिमखान्यात झालेल्या पत्रकार परिषदेत श्रीमती सत्यनारायण यांनी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. राज्य निवडणूक आयोगाचे अप्पर मुख्य सचिव चाँद गोयल उपस्थित होते. यावेळी श्रीमती सत्यनारायण म्हणाल्या की, आम्ही महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी 2012 आणि इ. दहावीची परीक्षा 1 मार्चपासून सुरू होत आहे. परीक्षांचा कालावधी लक्षात घेऊन निवडणुकांचा कार्यक्रम आखण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही आणि निवडणुका वेळेवर घेण्याची जबाबदारी देखील व्यवस्थित पार पाडेल.
महानगरपालिका निवडणूक कार्यक्रम

महानगरपालिका निवडणुकीसाठी 24 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधीत नामनिर्देशनपत्रे दिली व स्वीकारली जातील. सार्वजनिक सुट्टी व रविवारी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली 1 फेब्रुवारीला नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. तसेच याच दिवशी वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत 3 फेब्रुवारी असेल. 4 फेब्रुवारीला निवडणूक चिन्हांचे वाटप व निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. याच दिवशी मतदान केंद्रांची मतदारनिहाय यादी प्रसिद्ध होईल. 16 फेब्रुवारीला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 यावेळात मतदान होईल. याच दिवशी सायंकाळी 6.30 वाजता किंवा सर्व केंद्रांवरील मतदान समाप्तीनंतर मतमोजणी होईल. स्थानिक परिस्थितीनुसार यात बदल होऊन दुसऱ्या दिवशी ही मतमोजणी होऊ शकते.

उमेदवारांच्या निवडणूक खर्चात वाढ (रुपयात)-
अ वर्ग महानगरपालिका (मुंबई) 1,35,000 वरून 5,00,000
ब वर्ग महानगरपालिका (पुणे व नागपूर) 1,00,000 वरून 4,00,000
क वर्ग महानगरपालिका (पिंपरी-चिंचवड, ठाणे, नाशिक व नवी मुंबई)- 1,00,000 वरून 4,00,000.
ड वर्ग महानगरपालिका (उर्वरित सर्व) 1,00,000 वरून 3,00,000
जिल्हा परिषदा- 60,000 वरून 3,00,000
पंचायत समित्या- 40,000 वरून 2,00,000

मतदारांच्या सोयीसाठी-

राज्य निवडणूक आयोगाचे www.mahasec.com हे नवे अद्ययावत संकेतस्थळ
मतदान केंद्र मध्यवर्ती ठिकाणी.
उर्वरित महानगरपालिका, जि.प., पं. समितीसाठी मतदान केंद्रावरील मतदारांची कमाल संख्या 800
रांगा टाळण्यासाठी मतदान केंद्रावरील कमाल मतदार संख्येत घट
अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी रॅम्पची व्यवस्था
अंध, अपंग, गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिकांना मतदानासाठी प्राधान्य
राजकीय पक्षांच्या महत्वाच्या पुढाऱ्यांच्या प्रवास खर्चास उमेदवाराच्या खर्चातून सूट
आता मार्करपेनने मतदाराच्या बोटावर निशाणी
आधार कार्ड - सुद्धा चालणार
प्राण्यांचा क्रूरपणे वापर करण्यास मनाई.

जिल्हा परिषद/पंचायत समित्या निवडणूका
जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे देण्यास 18 जानेवारीपासून सुरवात होईल व 23 जानेवारी दुपारी 3 वाजेपर्यंत स्वीकारण्यात येतील. छाननी व वैध उमेदवार यादी 24 जानेवारीला प्रसिद्ध होईल.

सोमवार, २ जानेवारी, २०१२

सचिन...सिडनी येथे महाशतक झळकण्याची अपेक्षा!

क्रिकेट जगताचा बादशहा...अगदी पॅव्हेलियनमध्ये बसलेल्या प्रतिस्पर्ध्यांना सुद्धा खुर्चीला खिळवून ठेवणारा सचिन क्रिकेट खेळण्यासाठी कोणत्याही देशात गेला, तरीही मैदानावर जाताना मॅचचे प्रत्यक्ष वर्णन करणाऱ्यापासून अम्पायरसुद्धा खुश होणारच. शतकाचे महाशतक झळकवण्यासाठी योग्य संधीच्या शोधातल्या सचीनने गेल्या काही दिवसात संयम मात्र अजिबात सोडला नाही. सिडनी येथे सचिनचे हे शतक नक्की झळकणार असल्याची अपेक्षा अनेक चहाते व्यक्त करीत आहेत.

विशेष म्हणजे क्रिकेटमध्ये विश्वविक्रम प्रस्थापित करणारे आजपर्यंतचे खेळाडू पाहिले तर या सगळ्यांची उंची जेमतेमच असल्याचे सहज जाणवते. सर ब्रॅडमन, रिकी पॉइंटिंग, सुनिल गावस्कर ही नावं यासाठी लगेच डोळ्यासमोर येतात. यांची उंची कमी असली तरीही शारीरिक आणि बौद्धिक उंची फारच उंच आहे. तिथपर्यंत पोहोचायला अजून अनेकांना बरेच दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

रविवार, १ जानेवारी, २०१२

नूतनवर्षाभिनंदन...

प्रिय वाचकबंधूंनो...
आमचे भारतासह समस्त युनायटेड स्टेट्स, नॉर्वे, तैवान, कॅनडा आदी देशांमधील वाचकबांधव, हितचिंतक, मार्गदर्शक, अभ्यागतांना इंग्रजी नववर्ष 2012 च्या हार्दिक शुभेच्छा...!

रविवार, २५ डिसेंबर, २०११

मुखेड नगरपरिषदेसाठी ७३ टक्के मतदान

मुंबई, ता. २५- नांदेड जिल्ह्यातील मुखेड नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज ७३ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज निवडणुक आयोगाने व्यक्त केला आहे. येथे एकूण १७ जागा असून दुपारपर्यंत सुमारे ६० टक्के मतदान झाले होते. कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याचे निवडणूक आयोगाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

शनिवार, २४ डिसेंबर, २०११

निवडणूक प्रचारात प्राण्यांचा वापर क्रूरपणे करू नये: निवडणूक आयोग

मुंबई, ता. २३ - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रचारात प्राण्यांचा वापर क्रूरपणे न करण्याचे आवाहन राज्याचे निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी केले आहे.

भारतीय घटनेच्या अनुच्छेद ३४३ के व २४३ झेडए अन्वये राज्यातील स्थानिक स्वराज्या संस्थांच्या निवडणूकांची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर सोपविण्यात आली आहे. या निवडणुकांचे नियंत्रण आणि संचलन राज्य निवडणूक आयोगाकडून केले जाते. या निवडणुकांदरम्यान काही उमेदवार किंवा राजकीय पक्ष निवडणूक प्रचारासाठी किंवा काही बाबींचा निषेध करण्यासाठी प्राण्यांचा वापर करतात, असे निवडणूक आयोगाच्या लक्षात आले आहे. बैल, हत्ती, गाढव आदी प्राण्यांना अमानवी पद्धतीने वागविले जाते. गाढवांना चपलांचा हार घालणे, त्यांच्या तोंडाला काळे फासणे यासारखे क्रूर प्रकार करून प्राण्यांचे हाल केले जातात. हे प्रकार अमानवी असल्याने प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम १९६० च्या उद्देशांशी विसंगत आहेत. यामुळे यापुढे स्थानिक स्वराज्या संस्थांच्या निवडणुकांच्या प्रचारात किंवा त्यासाठीच्या मिरवणुकांमध्ये प्राण्यांचा वापर क्रूरपणे करू नये. या सूचनांचे पालन न करणार्‍यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश सर्व संबंधितांना दिले असल्याचे राज्याचे निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी सांगितले.

सहा नगरपरिषदांसाठी ६८ टक्के मतदान

मुंबई, ता. २३- नांदेड जिल्ह्यातील पाच आणि लातूर जिल्ह्यातील एक अशा सहा नगरपरिषदांसाठी शुक्रवारी (ता. २३) झालेल्या मतदानात सरासरी ६८ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज निवडणूक आयोगाने व्यक्त केला आहे. सर्वत्र मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्याचे राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी कळविले आहे.

नांदेड जिल्ह्यातील बिलोली, कंधार, कुंडलवाडी, मुदखेड, देगलूर आणि लातूर जिल्ह्यातील अहमदपूर या सहा नगरपरिषदांसाठी शुक्रवारी (ता. २३) मतदान झाले. दुपारी साडेतीनपर्यंत कुंडलवाडी येथे सर्वाधिक ५९.२७ टक्के तर कंधार येथे ५८.४६ टक्के मतदान झाले होते. या दोन्ही ठिकाणी मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत होता. दुपारनंतर सर्वच ठिकाणी मतदानास वेग आला. सर्व सहा नगरपरिषदांसाठी सरासरी ६८ टक्के मतदान झाले असून कुठेही अनुचित घटना घडली नसल्याचे निवडणूक आयोगाने कळविले आहे.

सिडकोच्या गृहनिर्माण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; अंतिम यादी १० सप्टेंबरला

 सिडकोच्या ऑगस्ट २०२६ गृहनिर्माण योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, योजनेअंतर्गत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या ४,७...