सोमवार, ४ जुलै, २०११

नवी मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्पासंदर्भात कार्यशाळा संपन्न

मुंबई, ता. ३ - नवी मुंबईत सीबीडी बेलापूर ते पेंधर या पहिल्या मेट्रो रेल्वे मार्गिकेच्या विकास कामास एक मे २००१ पासून सुरवात करण्यात आली. सिडकोतर्फे प्रथमच मेट्रो रेल्वे प्रकल्प हाती घेण्यात आला असून सिडकोच्या सर्व अभियंते, अधिकार्‍यांना मेट्रो रेल्वेच्या बारकाव्यांची माहिती होण्याच्या दृष्टीकोनातून कार्यशाळा घेण्यात आली.
कार्यशाळेत मेट्रो प्रणाली, स्थापत्य, अभियांत्रिकी कार्य, रोलिंग स्टॉक, विद्युत पुरवठा, सिग्नलिंग, स्वयंचलित प्रवास शुल्क संकलन आदी बारकाव्यांविषयी माहिती देण्यात आली.
प्रास्ताविक 'द लुईस बर्जर ग्रुप' चे पुनीत अरोरायांनी प्रास्ताविक केले. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे यांनी कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला. अतिरिक्त मुख्य अभियंता एन. एस. पितळे, अधिक्षक अभियंता बी. एस. कुलकर्णी, दीपक हरताळकर, एस. व्ही. वैद्य यांनी परीश्रम घेतले.

राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष जे. पी. डांगे यांची सिडकोस भेट

मुंबई, ता. ३ - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षमतावृद्धीसाठी तसेच विविध नियोजन संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सामायिक बाबी सोडविण्याच्या अनुषंगाने संबंधित संलग्न विषयांची माहिती जाणून घेण्यासाठी राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष जे. पी. डांगे यांनी नुकतीच विभाग प्रमुखांशी चर्चा केली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळ्यांवरील प्रलंबित प्रकरणे तसेच या संस्थांच्या कार्यक्षमतेच्या वृद्धीसंदर्भात उपाय योजना किंवा सूचना सादर करण्याच्या अनुषंगाने सिडकोच्या अनुभवी तज्ज्ञजनांमार्फत प्रस्ताव-निवेदन सादर करण्यात यावे, त्यानुसार उपाययोजना करणे शक्य होईल असे मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले. व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे यांनी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोला नवी मुंबई शेजारील क्षेत्रासाठी नियुक्त करण्यात येण्याची अपेक्षा व्यक्त केली. महत्त्वपूर्ण प्रकल्पांसाठी मायनर मिनरल ऍक्टमधून सूट मिळावी, विशेष अनुदान मिळावे किंवा कर सवलत मिळावी याबाबत माहितीही त्यांनी दिली.
बैठकीस विविध विभाग प्रमुख, जनसंपर्क अधिकारी उपस्थित होते.

सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील हंगामी पोलिस पाटलांची कायम नियुक्ती

मुंबई, दि. ४ : सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन वर्षांपेक्षा अधिक सेवा केलेल्या हंगामी पोलिस पाटलांची विशेष बाब म्हणून कायमस्वरुपी नियुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
      गृह राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या उपस्थितीत पोलिस पाटलांच्या मागण्यांसंदर्भात जानेवारीमध्ये बैठक झाली होती. त्यात सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यातील हंगामी पोलिस पाटलांना कायमस्वरूपी नियुक्ती देण्याची मागणी करण्यात आली होती. त्या संदर्भात शासनाने सर्वांगीण विचार करून हा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार दोन वर्षांपेक्षा अधिक सेवा केलेल्या हंगामी पोलिस पाटलांना आवश्यक वय आणि शिक्षणातून सूट देऊन प्रथम पाच वर्षे किंवा वयाची 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत यापैकी जे अगोदर पूर्ण होईल तेवढ्या कालावधीसाठी काही अटी व शर्तीच्या अधीन राहून नियुक्ती देण्यात येणार आहे.
    हंगामी पोलिस पाटलांना कायमस्वरुपी नियुक्तीसाठी शासनाविरुद्ध न्यायालयात दाखल केलेले दावे विनाशर्त मागे घेणे बंधनकारक राहील. दावे मागे घेतल्याची कागदपत्रे संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावी लागतील व जिल्हाधिकारी यासंदर्भात खातरजमा करतील. त्याचबरोबर हंगामी पोलिस पाटलांची कायम स्वरुपी नियुक्ती करताना कोणत्याही न्यायालयाचा अवमान होणार नाही, याचीसुद्धा जिल्हाधिकारी खातरजमा करतील. त्यानंतर संबंधित उपविभागीय दंडाधिकारी पात्र हंगामी पोलिस पाटलांची यादी तयार करतील. यादीतील हंगामी पोलिस पाटलांची चारित्र्य पडताळणी केली जाईल. त्यांची कायमस्वरुपी नियुक्ती करताना आरक्षणाची अडचण असल्यास त्यात सूट देण्यात येणार आहे. पण त्यानंतर उपविभागातील सर्व जागांचा विचार करून 16 ऑक्टोबर 2008 च्या शासन निर्णयान्वये फेर आरक्षण निश्चित कले जाईल. संबंधित पोलिस पाटलांना कायम नियुक्तीच्या दिनांकापासून लाभ देण्यात येतील.
    दरम्यान, उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी शासन निर्णय, गृह विभाग क्र. बीव्हीपी-0510/प्र.क्र.201/पोल-8, दि. 14.6.2010 अन्वये विहित केलेल्या प्रयोजनाव्यतिरिक्त हंगामी पोलिस पाटलांच्या नियुक्त्या करू नयेत. या निर्णयातील कारणाव्यतिरिक्त अन्य कारणांसाठी हंगामी पोलिस पाटल्याच्या नियुक्त्या केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उपविभागीय दंडाधिकाऱ्यांवर रहील; तसेच ते शिस्तभंगविषयक कारवाईस पात्र राहतील, असेही शासन निर्णयात नमूद केले आहे.

ठळक बातम्या

मार्क झुकेरबर्गही गुगल प्लसवर...
तेलंगाणा काँग्रेस सदस्य आज राजीनामा देण्याची शक्यता...
महाराष्ट्र सुवर्ण महोत्सवी वर्षाची सांगता...
मुंबईतल्या कार्यालयातील भोजनावर लागणार अंकुश- वारंवार घडणार्‍या घटनांची दखल...

सिडकोची ऍम्नेस्टी योजना ७ जुलैपासून कार्यान्वित

मुंबई, ता. ४ - सिडकोने नवी मुंबईमध्ये बांधलेल्या सदनिका/दुकाने/कार्यालयांचे केवळ करारनामा व कुलमुखत्यारपत्राच्या (पॉवर ऑफ अटर्नी) आधारे सिडकोच्या परवानगीशिवाय करण्यात आलेले हस्तांतरण नियमाधीन करण्यासाठी आखलेली ऍम्नेस्टी योजना ७ जुलैपासून कार्यान्वित करण्यात येणार आहे. सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत यापूर्वीच या योजनेच्या अंमलबजावणीचा निर्णय झाला आहे. योजनेसाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण कर्मचार्‍यांना देण्यात येत आहे.

शुक्रवार, १ जुलै, २०११

"गुगल प्लस" चा सामना करण्यास फेसबुक तयार...

अल्पावधीतच गुगलच्या 'ऑर्कुट'ला मागे टाकून संपूर्ण जगातल्या विशेषतः तरुणाईच्या पसंतीस उतरलेल्या 'फेसबुक'ने गुगलने नुकत्याच सुरू केलेल्या "गुगल प्लस" या सोशल वेबसाइटचा अर्थातच 'गुगल'चा सामना करण्याची तयारी केली आहे. यानुसार काही दिवसातच 'फेसबुक' "एक खास सेवा" देणार असल्याचे फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी जाहीर केले आहे. यासह आणखी काही सुविधा देण्याबाबत काम सुरू असून त्याबाबत मात्र पुढच्या आठवड्यातच माहिती देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

आज आत्ता...

*     रेव पार्टी- रेव पार्टी आयोजक अपराजित मित्तलला अटक- मित्तल अखेर पराजित.

*     शनिवारी (ता. १ जुलै) बुढ्ढा होगा तेरा बाप रिलिझ होणार. अमिताभच्या चाहत्यांना अभिषेककडून धन्यवाद.

*     बुढ्ढा होगा तेरा बाप...अमिताभच्या चाहत्यांनी अमिताभच्या चाहत्यांसाठी तयार केलेली फिल्म.

गुरुवार, ३० जून, २०११

नकुल पाटील यांच्या निधनाने आदरणीय व्यक्तिमत्व हरपले- अजित पवार

मुंबई, ता. ३० - सिडकोचे चेअरमन आणि राज्याचे माजी मंत्री नकुल पाटील यांच्या निधनाने सामाजिक, राजकीय आणि क्रीडा क्षेत्रातील एक आदरणीय व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना आदरांजली वाहिली.

उपमुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात की राज्याचे माजी मंत्री आणि सिडकोचे चेअरमन म्हणून त्यांनी केलेले कार्य अविस्मरणीय असून सामाजिक, राजकीय आणि क्रिडा क्षेत्रात त्यांनी वावरताना सर्वसामान्य जनतेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यांच्या निधनाने युवक कार्यकर्त्यांचा आधार आणि मार्गदर्शक हरपला आहे.

नकुल पाटील यांचे निधन

मुंबई, ता. ३० - सिडकोचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री नकुलपाटील यांचे बुधवारी (ता. २९) रात्री ११.४५ च्या सुमारास हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने डोंबिवली येथे निधन झाले. त्यांच्यावर गुरुवारी (ता. ३०) डोंबिवली पूर्व येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.


कार्यकर्तेही माणूसच...

महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सोलापूर, नांदेड आदी शहरांमध्ये इंधन दरवाढ आणि महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी गेल्या काही दिवसात आंदोलनं केली आहेत. काही ठिकाणी प्रत्यक्ष नाही परंतू अप्रत्यक्षपणे या प्रश्नी विरोधकांना सुद्धा सहमती दर्शवून साथ दिली. मुंबईत सुद्धा ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी महागाई आणि इंधन दरवाढीला विरोध करून शासनाला घरचाच आहेर दिला आहे. वास्तविक सामान्य नागरीकांना असे यापूर्वीच होणे अपेक्षित होते. महागाई आणि इंधन दरवाढीस विरोध करणारे जरी सत्ताधारी पक्षांचे कार्यकर्तेच असले तरीही आपणही माणसंच आहोत हे यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. विशेषतः नेहमीच महागाईची सर्वाधिक झळ मध्यम वर्गीयांनाच बसते. कार्यकर्त्यांनी केलेल्या विरोधावरून, दशकात राजकीय पक्षांमध्ये दाखल झालेले कार्यकर्ते देखील मध्यम वर्गीय असल्याचे आणि सुशिक्षित असून प्रत्येक गोष्टीची जाण त्यांना असल्याचे प्रथम दर्शनी जाणवते. हे खरं सुद्धा आहे. केवळ विरोधाला विरोध करून गलिच्छ राजकारण करण्याऐवजी चांगल्या गोष्टींसाठी, जनतेच्या हितार्थ निर्णय घेण्यासाठी राजकारण करणे केव्हाही चांगले...


सिडकोच्या गृहनिर्माण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; अंतिम यादी १० सप्टेंबरला

 सिडकोच्या ऑगस्ट २०२६ गृहनिर्माण योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, योजनेअंतर्गत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या ४,७...