शुक्रवार, २१ जानेवारी, २०११

१५ जानेवारी 'राष्ट्रीय मतदार दिन' साजरा होणार

दरवर्षी १५ जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करण्यास केंद्राने हिरवा कंदील दिला आहे. मतदान करण्यात असलेली मतदारांची उदासीनता लक्षात घेऊन ही संकल्पना अस्तित्वात येत आहे.
वयाची अठरा वर्षे पूर्ण केलेल्या मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येतो. दिवसेंदिवस मतदारांची मतदान करण्याविषयी उदासीनता वाढत आहे. वारंवार होणारी सत्ता परिवर्तने आणि जनतेस मिळणार्‍या सुखसोयी हे याचे प्रमुख कारण असल्याने युवकांपासून ज्येष्ठ नागरिक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यास मतदान केंद्रात जात नाहीत. कोणीही सत्तेवर आला तरी देखील काहीच करत नाही. यापेक्षा मतदान न केलेलेच बरे...! अशी मतदारांची भूमिका असते. यात बर्‍याच अंशी तथ्य देखील आहे,
वयाची अठरा वर्षे पूर्ण केलेल्या मतदारांची यादी निवडणूक आयोगातर्फे दरवर्षी बनविण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक मतदारसंघातील नवीन मतदारांचा मेळावा भरविण्यात येईल. त्यांना ओळखपत्र व बॅज देण्यात येणार असून मतदान करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. दरवर्षी सुमारे पंचवीस टक्के युवक मतदारयाद्यांसाठी नावनोंदणी करतात अथवा मतदान करतात असे सर्वेक्षणात आढळले असून यामुळेच राष्ट्रीय मतदार दिनाची संकल्पना मूर्त रूपात आणत असल्याचे माहिती व प्रसारणमंत्री अंबिका सोनी यांनी स्पष्ट केले आहे.
शासनाची ही संकल्पना कौतुकास्पद आहे. या संकल्पनेस प्रतिसाद मिळेल तो मिळेल. परंतू शासनापेक्षा तज्ज्ञांच्या मताप्रमाणे मतदारांच्या, मतदार नोंदणी करणार्‍यांच्या प्रमाणात, टक्केवारील अपेक्षेनुरुप वाढ झाल्यानंतर दरवर्षी साजरा करण्यात येणारा हा दिन थांबविण्यात यावा. दरवर्षी साजरा करण्यात येणारे विविध दिन यावर खर्च करण्यापेक्षा नागरिकांच्या समस्या खर्‍या अर्थान सोडविण्यासाठी राबविल्या जाणार्‍या योजनांमध्ये अथवा युवकांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांना आवश्यक तो अर्थपुरवठा करण्यात शासनाने हा पैसा वापरल्यास सार्थक होईल, हीच अपेक्षा.

पिंपरी-चिंचवड महापालिका व एमआयडीसीने एकत्रित प्रयत्नांतून अतिक्रमणे रोखावी

मुंबई, ता. २० - पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील एमआयडीसीच्या जागेवरील अतिक्रमणे रोखण्यासाठी महापालिका व एमआयडीसीने संयुक्त प्रयत्न करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. यासह विविध सूचना श्री. पवार यांनी केल्या.
एमआयडीसीने मागणी केल्यानुसार रिकामे भूखंड परत करण्याची कार्यवाही महापालिकेने सुरू केली असून महापालिकेने देखील एमआयडीसीकडे विकास योजनेतील रस्ते आणि पाणी पुरवठा प्रकल्पासाठी जागेची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.

नायगाव येथे पॉलिटेक्निक सुरू करणार - उपमुख्यमंत्री पवार

मुंबई, ता. २० - नायगाव (जि. सातारा) येथे मुलींसाठी पॉलिटेक्निक सुरू करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
नायगाव येथील विकास कामांबाबत मंत्रालयात झालेल्या बैठकीत श्री. पवार बोलत होते. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ, आमदार मकरंद पाटील, पर्यटन विभागाचे मुख्य सचिव आनंद कुळकर्णी उपस्थित होते.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जन्मभूमी नायगाव असल्यामुळे विशेष बाब म्हणून तेथे पॉलिटेक्निक सुरू केले जाईल. मुलींसाठी वसतीगृह उभारण्याची कार्यवाही देखील त्वरीत सुरू करावी. पर्यटक निवास आणि विविध बाबींसाठी दोन ठिकाणांची जागा निश्चित करून संबंधित विभागांना त्वरीत उपलब्ध करून द्यावी.
सावित्रीबाई फुले यांच्या जयंती सोहळ्याच्या कार्यक्रम स्थळाचे सपाटीकरण यांत्रिकी विभागकडून करून घ्यावे. आदी सूचना श्री. पवार यांनी दिल्या.

जिल्हा नियोजनाच्या आराखड्यात कुस्ती, कबड्डीच्या मॅटसाठी तरतूद करावी

मुंबई, ता. २० - देशी खेळांना चालना देण्याच्या उद्देशाने जिल्हा नियोजन आराखड्यात कुस्ती आणि कबड्डीच्या मॅटसाठी तरतूद करावी, तसेच महाराष्ट्र केसरी किताब विजेत्या कुस्तीगिरांच्या मानधनासंदर्भातील वय आणि उत्पन्न अट शिथील करण्यात यावी असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
हिंदकेसरी आणि महाराष्ट्र केसरी किताब विजेत्या कुस्तीगिरांच्या विविध मागण्या आणि कुस्ती स्पर्धांचे धोरण ठरविण्यासंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. युवक कल्याण आणि क्रीडामंत्री पद्माकर वळवी, वित्त विभाग मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, सार्वजनिक बांधकाम विभाग सचिव धनंजय धवड, क्रीडा व युवक संचालनालयाचे संचालक नरेंद्र सोपल, कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे आदी उपस्थित होते.
मानधनासाठी खेळाडूंचे वय ५० वर्षाहून अधिक असणे आवश्यक आहे, परंतू हिंदकेसरी, महान भारतकेसरी आणि रुस्तम-ए-हिंद किताब विजेत्यांना वय व उत्पन्नाची अट नाही. याच धर्तीवर महाराष्ट्र केसरी किताब विजेत्यांना असणारी उत्पन्नची अट शिथील करावी अशी कुस्तीगिरांची मागणी होती. याविषयी प्रस्ताव वित्तविभागाकडे सादर करावा तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील अशा किताब विजेत्यांना एसटी बस प्रवास सवलत लागू करावी. शिवाय शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंसाठीची एसटी प्रवास सवलत कूपनची मर्यादा ५०० रुपयांवरून एक हजार रुपयांपर्यंत वाढवावी असे निर्देश पवार यांनी दिले.
स्वर्गीय खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेस आंतरराष्ट्रीय दर्जा देण्याचा विचार केला जाईल. यासाठी क्रीडामंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि कुस्तीगिरांनी चर्चा करून आराखडा सादर करावा असेही पवार यांनी सांगितले.

स्वारगेट बसस्थानकासह परिसराच्या पुनर्विकासास तत्वतः मान्यता

मुंबई, ता. २० - पुण्यातील स्वारगेट एसटी आणि शहर वाहतूक बस स्थानक परिसरातील सद्यस्थिती आणि नियोजित मोनो व मेट्रो रेल्वे स्थानकामुळे वाढणारी वर्दळ लक्षात घेऊन या परिसराच्या पुनर्विकासास तत्वतः मान्यता देण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे सांगितले.
पुणे आणि बारामती शहरातील एसटी महामंडळाच्या विविध प्रश्नांबाबत मंत्रालयात झालेल्या बैठकीत श्री. पवार यांनी ही माहिती दिली. जलसंपदामंत्री सुनील तटकरे, राज्य एसटी महामंडळाचे अध्यक्ष सुधाकर परिचारक, उपाध्यक्ष दीपक कपूर, पुणे विभागीय आयुक्त दिलीप बंड, पुणे महापालिका आयुक्त महेश झगडे आदी उपस्थित होते.
बैठकीत स्वारगेट परिसराच्या पुनर्विकासाबाबत सादरीकरण करण्यात आले. यावेळी श्री. पवार म्हणाले की, स्वारगेट परिसरात सर्व बाजूंनी वाहतूक एकवटली असून सध्याच्या आणि भविष्यातील वाहतुकीचा विचार करून एसटी आणि शहर वाहतूक बसस्थानकांचा विचार करणे आवश्यक आहे. पुनर्विकास करताना सध्याची बसस्थानके आणि नियोजित मेट्रो व रेल्वे स्थानकांसह खासगी वाहनांच्या संख्येचाही विचार करावा लागेल.
बारामती येथे एसटीचा डेपो क्रमांक दोन उभारण्यासाठीच्या जागेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की बारामती एमआयडीसीतील जागा केंद्र शासनाच्या एका संस्थेकडे हस्तांतरित करण्यात आली असून संबंधित जागा उपलब्ध होत नसल्यास सेंट्रल बिल्डिंगजवळील जागा देण्याबाबत चौकशी केली जाईल.
बसस्थानकांचा पुनर्विकास करताना तेथेच गाळे देऊन परवानाधारक कॅन्टीन आणि स्टॉलधारकांचे पुनर्वसन करावे अशी मागणी परवानाधारक असोसिएशनतर्फे करण्यात आली.

गुरुवार, २० जानेवारी, २०११

लाजरी... (एक चारोळी)

"लाजरी" च्या या लाजण्याने लाजाळू ही लाजले..लाजरीशी खेळताना समजलंच नाही, बारा केव्हा वाजले...!
फूल तिच्या लाजण्याने खुदकन हसले..इतक्यात येऊन छोटेसे फुलपाखरू बसले..
लाजता लाजता लाजरी होऊ लागली मोठी...सुचले हो शब्द बघा आणि आले इथे ओठी...
फिरताना बागेत तिला बघून बहरला चाफा..नकळत चिउताईने घेतला तिचा पापा...!!!

माझा मित्र  संदीप पारोळेकर (दै. लोकमत वेबसाइट पुणे- उपसंपादक) त्याच्याकडे एक छानशी चिमुकली पाहूणी आली आहे..तिचे नाव "लाजरी" ठेवले आहे..त्याने ही आनंदवार्ता सांगताना सुचलेल्या-उपरोक्त चार ओळी..!!

आनंदाचा बहर...

राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड आणि खासदार समीर भुजबळ नवी दिल्ली येथे प्रफुल्ल पटेल यांना कॅबिनेटमंत्री पद मिळाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देताना.

बुधवार, १९ जानेवारी, २०११

घनकचरा प्रकल्पाबाबत नव्याने प्रस्ताव सादर करावा

मुंबई, ता. १८ - मीरा-भाईंदर येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठीच्या जागेबाबत नव्याने प्रस्ताव सादर करण्यात यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. मीरा-भाईंदर महानगरपालिका विविध समस्यांबाबत आयोजित बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रांतर्गत उत्तन पाली येथील सध्या कार्यरत असलेल्या प्रकल्पाऐवजी वरसावे येथे स्थलांतर करण्याचा प्रस्ताव होता. परंतु वरसावे येथे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी आरक्षित केलेली जमीन केंद्र शासनाच्या निकषानुरुप नसल्यामुळे प्रस्ताव रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. येथील शाळांच्या थकित भाड्याबाबत शासनाच्या धोरणानुसारच निर्णय घेण्यात यावा असेही पवार यांनी सांगितले.
बैठकीस पाणीपुरवठा स्वच्छतामंत्री लक्ष्मणराव ढोबळे, खासदार संजीव नाईक, राज्यमंत्री सचिन अहिर, राजेंद्र गावित, आमदार गिल्बर्ट मेंडोसा, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या मुख्य सचिव मालिनी शंकर, नगरविकास विभाग सचिव मनुकुमार श्रीवास्तव, जलसंपदा विभाग सचिव एकनाथ पाटील आदी उपस्थित होते.

अल्पसंख्यांक समस्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार - अजित पवार

मुंबई, ता. १८ - अल्पसंख्यांक समाजाच्या विविध समस्यांवर तत्काळ तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी सविस्तर चर्चा करू, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
पंतप्रधानांच्या १५ कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी, अल्पसंख्यांक समाजातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या मागण्या, अल्पसंख्यांक समाजाच्या विविध प्रश्नांबाबत आज श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. राज्यमंत्री खान यांनी राज्यात या १५ कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी समित्यांची नियुक्ती करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. तसेच जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत अल्पसंख्यांकांच्या विकासाबाबतच्या योजनांची चर्चा व्हायला हवी अशी मागणी केली. यानुसार श्री. पवार यांनी चर्चेबाबत दुजोरा देऊन आणि त्यासंदर्भात परिपत्रक निर्गमित करावे अशा सूचना दिल्या.
बैठकीस शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, शालेय शिक्षण व अल्पसंख्यांक विकास विभागाच्या राज्यमंत्री फौजिया खान, अल्पसंख्यांक आयोग अध्यक्ष नसीम सिद्दिकी, आमदार नवाब मलिक, शालेय शिक्षण विभाग प्रधान सचिव संजयकुमार, वित्तविभाग प्रधान सचिव सुधीर श्रीवास्तव, महिला व बालकल्याण विभाग प्रधान सचिव वंदना कृष्णा उपस्थित होते.

पावनखिंड पर्यटन विकासासाठी पहिल्या टप्प्यात सव्वादोन कोटी

मुंबई, ता. १८ - कोल्हापूर जिल्ह्यातील पावनखिंड (ता. शाहूवाडी) या ऐतिहासिक स्थळाचा विकास करण्यासाठी पावनखिंड परीसरात पहिल्या टप्प्यात सुमारे सव्वादोन कोटी रुपयांची विकास कामे करण्यात येतील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
शाहूवाडी-पन्हाळा परीसरातील विविध विकास कामांच्या संदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत बांधकाम विभाग सचिव धनंजय धवड यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी श्री. भुजबळ म्हणाले की, ऐतिहासिक पावनखिंड परीसराचा विकास करण्याच्या अनुषंगाने पहिल्या टप्प्या, सुशोभीकरणासह स्मृतीस्तंभ उभारणी, प्रवेशद्वार ते वाहनतळ रस्ता, वाहनतळ उभारणी, निरीक्षण मनोरा, स्वच्छतागृह व विश्रांतीस्थळ, ओढ्यावर लहान पूल आदी कामे करण्यात येतील. यासाठी २ कोटी २० लाख रुपयांची तरतूद करण्यात येईल. शिराळा व पन्हाळा तालुक्यांना जोडणारा महत्वाचा रस्ता असलेल्या सावर्डे (जि. कोल्हापूर) ते कांदे (जि. सांगली) या मार्गावर वारणा नदीवर उंच पातळीचा मोठा पूल बांधण्याचे सुमारे साडेसात कोटी रुपयांचे काम नाबार्ड अंतर्गत करावयाच्या कामात प्रस्तावित करण्यात येईल. तसेच पिशवी ते खोतवाडी, करूंगळे ते उदगिरी तसेच शित्तूर ते उदगिरी या रस्त्यांच्या कामासाठीही निधी उपलब्धतेनुसार प्राधान्याने तरतूद केली जाईल.

कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप

(पनवेल):  राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...