गुरुवार, ६ जानेवारी, २०११

रहमान यांनी लोकअपेक्षेचा विचार करणे आवश्यक

ए. आर. रहमान यांनी भविष्यकाळात देशहितासाठी कोणतेही गीत तयार करताना लोकअपेक्षेचा विचार करणे आवश्यक आहे.
मध्यंतरी झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धांच्या स्वागतम् हे रहमान यांचे गीत लोकांच्या अपेक्षा पूर्ण करून न शकल्यामुळे त्यांनी माफी मागितली होती. या गाण्यासाठी शासनास चक्क पाच कोटी रुपये मोजावे लागले होते(कोट्यवधींचा घोटाळा वेगळाच). आय एम् सॉरी म्हणून रहमान मोकळे झाले. वास्तविक घेतलेल्या पाच कोटिंपैकी चार कोटी अथवा काही कोटींची रक्कम तरी त्यांनी शासनास परत करणे आवश्यक होते. परंतु तसे झाले नाही. शासनाने देखील भविष्यकाळात ही बाब ध्यानात ठेवणे आवश्यक आहे.

रस्ते सुरक्षा अभियानानिमित्त मंत्रालयात शुक्रवारी वैद्यकीय शिबीर

मुंबई, ता. ६ रस्ते सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने शुक्रवारी (ता. ७) सकाळी दहाला मंत्रालयात वाहनचालकांसाठी वैद्यकीय शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
जानेवारी महिन्याच्या पहिल्या सप्ताहात साजरा करण्यात येणार्‍या रस्ते सुरक्षा अभियानानिमित्त मंत्रालयात वाहनचालकांसाठी दरवर्षी वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येते. यंदाही मंत्रालय आवारात वाहनगृह क्र. १ ८ ते २५ येथे उद्या सात जानेवारीला सकाळी दहा ते सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत वाहनचालकांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त वाहनचालकांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दक्षिण उपविभागतर्फे करण्यात आले आहे.

थंडीने गारठला मध्य प्रदेश- शाळांना सुट्या जाहीर

मध्यप्रदेशात शीतलहर कायम असून मालवा प्रांताच्या अनेक भागात दव गोठून बर्फ तयार झाले आहे. पचमढी येथे अवघे १ अंश सेल्सिअस तापमान असून काही ठिकाणी शून्य अंश तापमान आहे. शासनाने मध्य प्रदेशातील शाळांना दहा दिवसांच्या सुट्या जाहीर केल्या आहेत.
शाजापूर येथे बुधवारी (ता. ५) पारा घसरून अवघ्या १.५ अंश सेल्सिअस तर नौगाव येथे १.७, शिवपुरी १.५, दमोह १.२, पचमढी १.०, टीकमगड ०.६, मंडला ०.६, दतिया आणि उमरिया अनुक्रमे शून्य अंश, उज्जेन, बैतुल येथे अनुक्रमे २.२ भोपाळ २.३, इंदूर ५.०, सागर ४.०, देवास ६.४, मंदसोर ३.६, नीमच ३.५, रतलाम ३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. धुक्यामुळे रेल्वे विलंबाने धावत असून हवाई वाहतुकीवर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे. प्रदेशात थंडीने कहर केला असून थंडीची लाट आल्यामुळे मध्य प्रदेश शासनाने प्रदेशातील शासकीय व खासगी शाळांच्या इ. आठवीपर्यंतच्या वर्गांना आजपासून (ता. ६) १५ जानेवारीपर्यंत सुट्या जाहीर केल्या आहेत.

विमानतळ प्रकल्पग्रस्तांना १२.५ टक्के भूखंडांच्या वाटपाकरिता सिडकोची विशेष मोहिम

मुंबई, ता. ६- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या अंतर्गत येणार्‍या गावातील प्रकल्पग्रस्तांच्या संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदल्यात द्यावयाच्या साडेबारा टक्के योजनेचे भूखंड वाटपाकरिता भूमी व भूमापन विभागातर्फे विशेष मोहिम सुरू करण्यात आली आहे.
२२ डिसेंबरला प्रकल्प बाधीत कृती समितीच्या बैठकीत ही विशेष मोहिम प्राधान्याने राबवून वाटपाची प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्याबाबतचा निर्णय व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे यांनी जाहीर केला होता. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ क्षेत्रात येणार्‍या कोंबडभुजे, तरघर, उलवे, गणेशपुरी, वाघीवली वाडा, ओवळे (मुळगाव) कोली, कोपर, चिंचपाडा आणि वाघीवली या दहा गावांमधील पूर्वी संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदल्यात १२.५ टक्के भूखंड वाटप केलेले नाही अशा प्रकल्पग्रस्तांसाठी या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी तीन स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली असून त्यात तीन सहाय्यक भूमी व भूमापन अधिकारी आणि १० कर्मचार्‍यांचा समावेश करण्यात आला आहे. बैठकीनंतर सुरू केलेल्या कार्यवाहीत आतापर्यंत १०० प्रकरणांची प्रक्रिया सुरू केली असून ३० प्रकरणात वाटपपत्रेही देण्यात आली आहेत. तर करंजाडे, वडघर आणि चिंचपाडा येथील १४० भागधारकांना इरादापत्र देण्यात आले आहे.
या मोहिमे अंतर्गत द्यावयाची इरादापत्रे व पाटपपत्रे व भाडेपट्टा करारनाम्याच्या अनुषंगाने प्रकल्पग्रस्तांनी त्यांची आवश्यक कागदपत्रे व वारसदाखले मुख्य भूमी व भूमापन अधिकारी, सिडको भवन, भूमी व भूमापन विभाग, सातवा मजला सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथे त्वरित सादर करून विशेष मोहिम जलदगतीने राबविण्यास सहकार्य करावे, असे आवाहन सिडको प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

बुधवार, ५ जानेवारी, २०११

बारामती येथे प्रायोगिक तत्वावर बहुमजली औद्योगिक संकुल उभारावे -उपमुख्यमंत्री

मुंबई, ता. ५- बारामती येथे प्रायोगिक तत्वावर बहुमजली औद्योगिक संकुल (फ्लॅटेड इंडस्ट्रियल इस्टेट) उभारावे आणि ते गरजू लघुउद्योजकांना देण्यात यावे असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे दिले.
बारामती चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत मंत्रालयात झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. उद्योग राज्यमंत्री सचिन अहिर, उद्योग विभागाचे प्रधान सचिव ए. एम. खान, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव सुब्रत रथो, महावितरण कंपनीचे कार्यकारी संचालक अजय मेहता, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. शिवाजी, बारामती चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष धनंजय जामदार आदी उपस्थित होते.
बारामती औद्योगिक क्षेत्रातील विविध प्रश्नांचा आढावा घेताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, पुणे आणि नाशिकच्या धर्तीवर बहुमजली औद्योगिक संकुल असावे. त्यामुळे अनेक लघुउद्योजकांना तयार गाळे मिळतील. याबाबत त्वरित कार्यवाही सुरू करावी. तसेच एमआयडीसीने उद्योजकांना एकोणीस प्रकारच्या सेवा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिल्या असून या सेवांना मिळणार्‍या प्रतिसादाचा अभ्यास करावा.
बारामती औद्योगिक क्षेत्र शहर आणि ग्रामीण भागात विभागले आहे. या क्षेत्रासाठी स्वतंत्र पोलिस ठाणे स्थापन करण्याची मागणी आहे. त्याऐवजी संपूर्ण औद्योगिक क्षेत्र बारामती ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत समाविष्ट करावे.
पियाजिओ, डायनामिक्स, भारत फोर्ज, आयएसएमटी आदी कंपन्यांमधील कामे प्राधान्याने स्थानिक लघुउद्योजकांनाच मिळावी यासाठी आपण कंपन्यांच्या व्यवस्थापनास तसे पत्र लिहिणार आहोत. सौर उर्जेवर रस्त्यांवरील दिवाबत्तीची व्यवस्था करणे शक्य आहे का? याचाही अभ्यास करावा.
बारामती चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे पदाधिकारी सर्वश्री संदीप मेणसे, भारत जाधव, पोपटराव गवळे, महादेव गायकवाड, आशिष पल्लोड, शरद सूर्यवंशी, शिवाजी निंबाळकर, रमणिक थोरात, गिरिष कुलकर्णी आदी उपस्थित होते.

एकलहरे प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा प्रश्न तातडीने मार्गी लावू- उपमुख्यमंत्री

मुंबई, ता. ४- एकलहरे विद्युत प्रकल्पग्रस्तांना प्रकल्पग्रस्त दाखले उपलब्ध करण्याबरोबरच त्यांना किंवा त्यांच्या वारसांना प्रशिक्षण देऊन विद्युत वितरण कंपनी अंतर्गत नोकरीत थेट सामावून घेण्याबाबत योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार समीर भुजबळ यांना दिले. विद्युत प्रकल्पाच्या विविध मागण्यांबाबत पवार यांच्या समिती कक्षात झालेल्या बैठकीत त्यांनी सांगितले.
औष्णिक वीज प्रकल्पाच्या फ्लायअ‍ॅशमधील काही हिस्सा स्थानिक तसेच प्रकल्पबाधित व्यावसायिकांना उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी बैठकीस उपस्थित असलेल्या अधिकार्‍यांना दिले. जमीन हस्तांतरणाची कार्यवाही तत्काळ पूर्ण करून एकलहरे परिसरातील झोपडपट्टीवासियांच्या पुनर्वसनाचा प्रश्नही मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच एकलहरे येथील दोन जुने संच आवसायनात काढून ६६० मेगावॉटचा एकच प्रकल्प उभारण्यात यावा, या मागणीचा पुढील टप्प्यात विचार करण्यात येईल असे ते म्हणाले.

नाशिकमधील विकासकामांबाबत स्वतंत्र बैठकीचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

मुंबई, ता. ४- नाशिकमधील विविध विकासकामे तसेच पायाभूत सुविधा विकासाच्या संदर्भात तत्काळ स्वतंत्र बैठक घेऊन सर्व संबंधित प्रश्न मार्गी लावण्यात येतील असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी खासदार समीर भुजबळ यांना दिले.
नाशिक शहराशी संबंधित विविध विकासकामांबाबत समीर भुजबळ यांनी आज मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांची मंत्रालयात भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना उपरोक्त आश्वासन दिले. खासदार भुजबळ यांनी यावेळी नाशिक महानगरपालिकेच्या अखत्यारितील काही प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले.
निवेदनातील काही प्रमुख मागण्या अशा- १) नाशिक महानगरपालिकेच्या सेवेत पेस्ट कंट्रोलचे काम ठेकेदारी पद्धतीने करणार्‍या कर्मचार्‍यांना सेवेत सामावून घेण्याची कार्यवाही तत्काळ करण्यात यावी. २) नाशिक महापालिका हद्दीत शासनामार्फत कार्यरत असलेल्या अंगणवाड्यांमधील मुख्य सेविका, अंगणवाडी मदतनीस, अंशकालिन शिक्षिका आदी कर्मचार्‍यांना महापालिका सेवेत सामावून त्यांची निश्चित वेतनश्रेणी लागू करावी. त्यासंदर्भातील कर्मचारी आकृतीबंधास शासन स्तरावर तातडीने मान्यता मिळावी. ३) सन २००३ पासून महापालिकेत रोजंदारीने कार्यरत असलेल्या सुमारे बाराशे कर्मचार्‍यांना सेवेत कायम करण्यात आले आहे. परंतु प्रशासनाकडून चुकीने नामोल्लेख राहून गेलेल्या चार कर्मचार्‍यांना देखील सेवेत कायम करण्याचा निर्णय शासनाने तातडीने घ्यावा. इ.

पंढरपूर शहराच्या विकासाचा आराखडा त्वरीत तयार करावा: उपमुख्यमंत्री

मुंबई येथे मंत्रालयात पंढरपूर शहराच्या विकास कामांच्या आढावा बैठकीत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार, सोलापूरचे पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे, आमदार भारत भालके आदी.
मुंबई, ता. ४- पंढरपूर शहराच्या दहा किलोमीटर परिसराचा विकास आराखडा त्वरीत तयार करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
पंढरपूर शहराच्या विकास आराखड्यासंदर्भात मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, आमदार भारत भालके, माजी आमदार सुधाकर परिचारक आदींसह पंढरपूरचे नगराध्यक्ष उपस्थित होते.
श्री. पवार यांनी पंढरपूर विकास प्राधिकरण, नगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाशी संबंधित बाबींचा आढावा यावेळी घेतला. पंढरपूरच्या विकासासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल. विकास कामे करताना शासनाच्या विविध विभाग आणि यंत्रणांमध्ये समन्वय राखावा. कामे दर्जेदार होण्याच्या दृष्टीने सर्व उपाययोजना कराव्यात. विभागीय आयुक्त सर्व कामांवर देखरेख करतील आदी सूचना दिल्या.
शहरातील रस्ते, नगरपालिकेच्या महागाई भत्ता, अनुदान, यात्रा अनुदान, स्टॉर्म वॉटर ड्रेन, राज्य सरोवर संवर्धन योजना, यात्राकर आदींबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हा स्तरावरही त्वरित बैठक घेण्याचे आदेश देखील पवार यांनी पुणे विभागीय आयुक्तांना दिले.

मंगळवार, ४ जानेवारी, २०११

अपघातग्रस्तांना मदत करणार्‍यांना अजिबात त्रास न होण्याची तरतूद आवश्यक

अपघातग्रस्तांना मदत करणार्‍या सभ्य नागरिकांना त्रास कमीत कमी होईल याबाबत कायदे करण्याचे विचाराधीन असल्याचे नुकतेच राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सांगितले. परंतु त्रास कमी होण्याऐवजी त्रास अजिबात न होणे यासाठी तरतूद होणे आवश्यक आहे.
कोणत्याही सभ्य नागरिकाने रस्त्यावर एखादा अपघात पाहिल्यास, एखादा गुन्हा घडताना पाहिल्यास संबंधितास सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून मदत केली जाते, गुन्हेगारास पोलिसांच्या सुपूर्द केले जाते. परंतु याचा चांगला परिणाम होण्याऐवजी अशा नागरिकांना त्रासच जास्त होतो. अत्यंत जाचक असे प्रश्न विचारणे, जखमी अथवा अपघातग्रस्तास रुग्णालयात दाखल करताना प्रथम पोलिस तक्रारीबाबत रुग्णालय प्रशासनाने विचारणा करणे अन्यथा संबंधितास दाखल न करणे, एखाद्या घटनेतील साक्षीदारास पोलिसांनी ती व्यक्तीच घटनेस जबाबदार असल्याप्रमाणे त्या व्यक्तीवर प्रश्नांची सरबत्ती, भडिमार करणे या बाबी सामोर्‍या आल्या आहेत. फलस्वरूप मदत करणार्‍यांचे प्रमाण हळूहळू कमी होत आहे. रस्त्यावर विशेषतः महामार्गावर अपघात झाल्याचे आणि जखमी विव्हळत असल्याचे दिसत असताना देखील उगाच कायद्याचा ससेमिरा नको...म्हणून अनेकदा वाहनचालक पुढे निघून जातात. राज्याच्या गृहमंत्र्यांचा निर्णय स्वागतार्ह असला तरीही कौतुकास्पद निश्चितच नाही. अपघातग्रस्तांना मदत करणार्‍यांना कायदेशीर कारवाईचा त्रास अजिबात न होण्याची तरतूद कायद्यात केल्यास शासनाचा देखील संभाव्य त्रास कमी होईल, हाच विश्वास.

अवघी अवनी गारठली थंडीने

गेल्या आठवड्यात देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये थंडीने अक्षरशः कहर केला असून जणू काही पृथ्वीच गारठली असल्यासारखे वाटत आहे. मध्य प्रदेशात नुकतेच उज्जेन येथे ५ अंश सेल्सिअस तर इंदूर येथे ६ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. काही ठिकाणी थंडीमुळे गारठून मृत्यूमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत.
अनेक जण अंगावर थंडीपासून बचाव करणारे स्वेटर आदी कपडे चोवीस तास परिधान करीत आहेत. मध्यप्रदेशातील इंदूर येथे एक जानेवारीपासून हेलमेटची सक्ती करण्यात आली असून अद्याप हेलमेट वापरणार्‍या दुचाकीधारकांची संख्या अल्प असली, तरीही ती वाढत आहे. हेलमेटमुळे चेहेर्‍याचा थंडीपासून चांगला बचाव होऊन डोळे, कानांना गार हवा लागत नसल्याने हेलमेट विक्रीच्या दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी दिसत आहे. सकाळी चहा, पोहे, जिलबी, वडे अर्थातच स्नॅक्स घेण्यात नागरिक स्वारस्य देत आहेत. काही भागात संक्रांतीपर्यंत सकाळच्या शाळांची वेळ देखील सकाळी नऊनंतर करण्यात आली आहे.

कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप

(पनवेल):  राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...