मंगळवार, २६ एप्रिल, २०११

सुट्टीची भटकंती...(४)

घरी परतल्यानंतर थोडा वेळ टीव्ही पाहू म्हटलं...। पण तेवढ्यात वीज गेली...झालं...। ग्रामीण भागात सध्या जवळपास दहा तास दररोज वीज (भार-नियमन) जाते. ग्रामीण भागासाठी असलेल्या शासनाच्या विविध योजना कुठे जातात कुणास ठाऊक? बहुदा फक्त कागदोपत्रीच असाव्यात असं मला वाटतंय. शेवटच्या माणसापर्यंत शासनाच्या योजना पोहोचल्या पाहिजे...हे शासनाचं धोरण कुठे गेलं? आणि इतकी वीज घालवून ग्रामीण भागावर कितीतरी अन्याय केला जातोय. बिच्चारे शेतकरी बांधव...खरंच त्यांची कीव करावी असंच वाटतं. वास्तविक गरीब असो, की श्रीमंत...सगळ्यांना भूक तर लागतेच. सगळ्यांना दररोज जेवण लागतंच. केवळ महाराष्ट्रच नाही, संपूर्ण देशच कृषि अर्थातच शेतीसाठी ग्रामीण भागावर अवलंबून आहे. परिणामी शासनाने ही बाब गांभीर्याने इतके दिवस विचारात का घेतली नाही? वीजेचा तुटवडा काही एकदम होत नाही. आपल्याला एखादा मोठा आजार व्हायचा असेल तर शरीर जसे आधी सूचना देतं, त्याकडे दुर्लक्ष केलं तर मात्र नक्की मोठा असा आजार, विकार जडतो. अगदी तस्सच इथेही आहे, पण तसं झालं तर शासन आणि राजकारण काय ते? अशा नाना प्रश्नांचं काहुर माजलं. शेवटी विचार केला, मिस्टर कूल..होण्यातच सगळंकाही आहे. उगाच रागावून, संतापून काय उपयोग? म्हणतात नां, भले भले भागले..देव पूजेला लागले...।
मामाकडे इनव्हर्टर होतं, पण सतत वीज जात असल्यामुळे ते सुद्धा पुरेसं चार्ज होत नव्हतं. बिच्चारा..करणार काय? मामीने कंदील आणि मेणबत्त्या लावल्या...नेमका गॅसही संपला. त्यामुळे स्टोव्ह वरच स्वयंपाक सुरू झाला. थोड्या वेळाने रटरट शिजणारा भात...मस्तपैकी आंबटगोडाचं वरण, बिबड्यांचा वास आला आणि सपाटून भूक लागली. सोबत काकडी, टोमॅटो होतेच. जेवणं झाली। ओसरीवर मामा-मामी बरोबर गप्पा मारत बसलो. पण तिथेही व्यत्यय आलाच. काही क्षणातच डासोपंत चावरे यांचं पथक तिथे आलं आणि त्यांनी कानात गुणगुण सुरू केली. त्या दोघांपेक्षा मलाच डास जास्त चावत होते. एकतर, माझा रक्तगट A+ असल्यामुळे (अशा रक्तगटाच्या माणसांना डास जास्त चावतात असं म्हणतात किंवा नवीन ते सुद्धा शहरी माल वाटल्यामुळे) डासांनी मनसोक्त चावून पोट भरलं असावं. कुठून काय माहिती, वार्‍याची मंद झुळुक मधुनमधुन येत होती, त्यामुळे तरी डास उडत होते. रात्रीचे दहा केव्हा वाजले कळलंही नाही. साडेदहा वाजताच मी झोपलो...
(पुढे सुरू..पण उद्याच्या भागात...)

कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप

(पनवेल):  राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...