शुक्रवार, १४ जानेवारी, २०११

पणशीकर यांच्या निधनामुळे मराठी रंगभूमीची अपिरिमित हानी

ज्येष्ठ अभिनेते प्रभाकर पणशीकर यांच्या निधनामुळे मराठी रंगभूमीची अपिरिमित हानी झाली आहे. या शब्दात राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
प्रभाकर पणशीकर यांनी "तो मी नव्हेच" मधील लखोबा लोखंडेच्या भूमिकेसह अनेक नाटकांमध्ये साकारलेल्या विविध भूमिका अविस्मरणीय ठरल्या.

ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकर यांचे निधन

"तो मी नव्हेच" सह विविध भूमिका साकार करून अभिनयास आकार देऊन ज्यांची छाप अखिल मराठी मनावर कायमची पडली असे ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकर (वय ७९) यांचे गुरुवारी (ता. १३) रात्री निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून श्वासोच्छ्वासास त्रास होत असल्यामुळे आणि किडनी बिघडल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

गुरुवार, १३ जानेवारी, २०११

पर्यटनवृद्धीसाठी भारत व त्रिनिदाद यांच्यात द्वि-पक्षीय सहकार्य वाढविण्याची गरज

मुंबई, ता. १३ - भारत आणि रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद व टोबॅगो यांच्यात पर्यटन क्षेत्रात द्वि-पक्षीय सहकार्य वाढीस लागावे यासाठी राज्याचे पर्यटनमंत्री म्हणून प्रयत्न करण्यास आपल्याला निश्चितपणे आनंद वाटेल, असे प्रतिपादन राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद व टोबॅगोचे पर्यटनमंत्री रुपर्ट ग्रिफीथ यांच्या नेतृत्वाखालील २१ सदस्यीय शिष्टमंडळाने आज सकाळी भुजबळ यांची भेट घेतली. यावेळी श्री. भुजबळ म्हणाले की, विश्वविख्यात क्रिकेटपटू ब्रायन लारा याच्यामुळे त्रिनिदादचे नाव जगभरात झाले आहे. या निसर्गसमृद्ध देशासोबत पर्यटन सहकार्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. दरवर्षी भारतातील सुमारे ११ दशलक्ष पर्यटक अन्य देशात पर्यटनासाठी जातात. वेगळ्या पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी उत्सुक असणार्‍या कित्येक भारतीय पर्यटकांसाठी त्रिनिदाद हा उत्तम पर्याय म्हणून पुढे येऊ शकतो. शिष्टमंडळाच्या होणार्‍या चर्चेतून सकारात्मक गोष्टी निश्चितपणे निष्पन्न होतील अशी आशा भुजबळ यांनी व्यक्त केली.
श्री. ग्रिफीथ यांनी त्रिनिदाद व टोबॅगोचे राष्ट्रीय वाद्य असलेल्या स्टील-पॅनची प्रतिकृती श्री. भुजबळ यांना भेट दिली. यावेळी त्रिनिदाद व टोबॅगो उच्चायुक्तालयाचे अधिकारी, एमटीडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक  अविनाश ढाकणे व पर्यटन विभागाचे उपसचिव राजीव निवतकर उपस्थित होते.

पुणे येथे शुक्रवारी पोलिसांची वार्षिक आढावा बैठक

पुणे, ता. १३ - पुणे शहराच्या पोलिस आयुक्त श्रीमती मीरा बोरवणकर आणि सहपोलिस आयुक्त अशोक धिवरे शुक्रवारी (ता. १४) दुपारी सव्वा बाराला पोलिस आयुक्त कार्यालयात गुन्हे प्रकटीकरण (दाखल व उघड) व इतर चांगली कामगिरीबाबत वार्षिक आढावा बैठक घेणार आहेत. यावेळी आढावा, गुन्हे प्रकटीकरण व इतर चांगल्या कामगिरीबाबत पत्रकार परिषदेत माहिती देण्यात येईल. बैठकीस अप्पर पोलिस आयुक्त गुन्हे, उत्तर, दक्षिण, तसेच पोलिस उपायुक्त गुन्हे आणि आर्थिक परिमंडळ १, २, ३, ४ उपस्थित राहतील.

मंत्रालयात मोफत आरोग्य तपासणीस उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई, ता. १३- रस्ते सुरक्षा पंधरवाड्यानिमित्त सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे ३५० कर्मचार्‍यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. श्री. भुजबळ यांनी स्वतःची रक्त-साखर तपासून शिबिराचे उद्घाटन केले. शासकीय वाहनचालक व कर्मचार्‍यांनी आपल्या आरोग्याची सातत्याने काळजी घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन यावेळी भुजबळ यांनी केले.
दिवसभरात सुमारे ३५० वाहनचालक, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, पोलिस कर्मचारी यांनी शिबिराचा लाभ घेतला. नेत्रचिकित्सा, रक्तदाब तपासणी आणि ई. सी. जी. तपासणी करण्यात आली. डॉ. विपुल गट्टाणी, डॉ. मुख्तार देशमुख, डॉ. संदेश श्रीप्रभू, डॉ. अजित कोठावाला, डॉ. महेश रावखंडे, डॉ. मयूर जावळे, डॉ. समीर अन्सारी, डॉ. रविकिरण पवार, आदी डॉक्टरांनी तपासणी केली.

बुधवार, १२ जानेवारी, २०११

दहशतवाद प्रतिकार पोलिस प्रशिक्षण संस्थेसाठी बारामती येथे जमीन उपलब्ध करणार

मुंबई, ता. १२- बारामती येथे नागरी दहशतवाद प्रतिकार पोलिस प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी राज्य शासनाकडून २० कोटी रूपये व जमीन उपलब्ध करून दिली जाईल. असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
पोलिस प्रशिक्षण केंद्रासंदर्भात मंत्रालयात समिती कक्षात ते बोलत होते. गृहमंत्री आर. आर. पाटील, अप्पर मुख्यसचिव उमेशचंद्र सरंगी, पोलिस महासंचालक डी. शिवानंदन उपस्थित होते. श्री. पवार म्हणाले की बारामतीजवळ बर्‍हाणपूर येथील जागा प्रशिक्षण केंद्रासाठी योग्य ठरेल. तेथील पालखी तळ सुरक्षित ठेवून उर्वरित जागेवर प्रशिक्षण केंद्र उभारता येईल. यासाठी केंद्राकडून २० कोटी रुपये मिळणार असून राज्यशासनही २० कोटी रुपये उपलब्ध करून देईल.
श्री. शिवानंदन म्हणाले की, राज्यात पोलिस प्रशिक्षण केंद्र आहे परंतु नागरी दहशतवाद प्रतिकार प्रशिक्षण केंद्र नाही. केंद्र शासनाने अशा प्रकारची प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी राज्यांना प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतली आहे. या ठिकाणी पोलिसांना दहशतवाद्यांचा प्रतिकार करण्याबाबत अत्याधुनिक प्रशिक्षण दिले जाईल. अशा प्रशिक्षणाची आपल्या पोलिसांना आवश्यकता आहे.

अनुभवी मार्गदर्शकास मुकलो- उपमुख्यमंत्री

मुंबई, ता. १२- महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस ऍड. गुरूनाथ कुलकर्णी यांच्या निधनाने एका ज्येष्ठ आणि अनुभवी मार्गदर्शकाला आम्ही मुकलो आहोत. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोकभावना व्यक्त केल्या.
त्यांनी पक्षाच्या स्थापनेपासून पक्ष कार्यालयात समन्वयक म्हणून महत्वाची जबाबदारी पार पाडली आहे. विविध निवडणुकांच्या वेळी ते निवडणूक आयोग आणि निवडणुकीसंदर्भातील कायदेविषयक मार्गदर्शकाची भूमिका बजावत असत. म्हणून त्यांना गुरूजी म्हणून संबोधले जात होते. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी पक्ष संघटनेची पडद्यामागची मात्र महत्वाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली. कर्तृत्वाची पावती म्हणून पक्षाने त्यांना विधान परिषदेवर पाठवून अधिक महत्वाची जबाबदारी सोपविली होती. कोकणच्या प्रश्नावर देखील ते नेहमीच आक्रमक भूमिका घेत असत. त्यांच्या निधनाने कोकण आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुरूनाथ कुलकर्णी यांचे निधन

मुंबई, ता.१२- राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरूनाथ कुलकर्णी (वय ७०) यांचे प्रदीर्घ आजारानंतर आज दुपारी कोकिलाबेन रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची अपरिमित हानी झाल्याची शोकभावना राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.
श्री. भुजबळ यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासूनच गुरूनाथ कुलकर्णी यांनी पक्षाच्या विस्तारासाठी समर्पणशील भावनेने कार्य केले. पक्षाच्या घटनेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यावर त्यांचा भर असे. केंद्रिय मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांबरोबर त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे एकहाती सांभाळली. आपल्या संयमी आणि अभ्यासपूर्ण भाषणांनी त्यांनी विधान परिषदेच्या कामकाजावर देखील छाप पाडली. त्यांच्या निधनामुळे गोरगरीबांविषयी अत्यंत आस्था असणारा एक कृतीशील सामाजिक नेता राज्याने गमावला आहे.
गुरुवारी (ता. १३) दुपारी बाराला त्यांच्या देहावर दादर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

चिनी "मांज्या" प्रमाणेच अन्य वस्तूंवर बंदी आणण्याची गरज

दरवर्षाप्रमाणे यंदाही गुजरातमध्ये पतंग महोत्सवानिमित्त सुमारे दोनशे देशांमधील प्रतिनिधींचा सहभाग आहे. चीनच्या मांज्यावर यंदाही शासनाने बंदी कायम ठेवली आहे. याप्रमाणेच आपल्या देशात चिनी बनावटीच्या विक्री होत असलेल्या अन्य वस्तूंवर देखील बंदी आणण्याची गरज आहे.
पतंग उडविण्यासाठी आवश्यक असलेला दोरा म्हणजेच मांज्या..! भारतीय बनावटीच्या या मांज्या वर चिनी बनावटीच्या मांज्याने मध्यंतरी कुरघोडी करून भारतीय मांज्याची पतंग कापली होती. परिणामी चिनी मांज्याला प्रचंड उठाव आल्यामुळे आणि हा मांज्या तुलनेत अधिक धारदार असल्यामुळे विशेषतः हातांना नुकसान होण्याची शक्यता होती. यामुळे शासनाने या मांज्यावर बंदी घातली आहे. भारतीय मांज्यासाठी एका दृष्टीने हे पथ्यावरच पडले म्हणायचे. या बंदीमुळे तरी बिचार्‍या भारतीयांनी बनविलेल्या मांज्याला उठाव आला असेल. देशात मोबाईलपासून सणासुदिला वापरण्यात येणारी विद्युत रोषणाई, फटाके, मुलांची खेळणी, विविध वस्तू अशा अनेक बाबतीत चिनी वस्तूंनी भारतीय बाजारपेठ व्यापली आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. यासाठी शासनाचे व्यापारविषयी असलेले धोरण, नीति, धारणा जबाबदार असल्याचे व्यापार्‍यांचे मत आहे. कुटुंबप्रमुखाने स्वतःच्या मुलाकडे दुर्लक्ष करून दुसर्‍याच्या मुलाचे संगोपन करण्यासारखीच ही तर्‍हा म्हणावी लागेल. एकीकडे देशात बेरोजगारीची समस्या भेडसावत असून यातून बाहेर पडण्याचा मार्ग बेरोजगारच काय शासनाला सुद्धा पाहिजे तसा सुचत नसल्याचे चित्र आहे, तर दुसरीकडे अशा प्रकारे चिनी वस्तू भारतीय बाजारपेठ व्यापत आहेत. देशी वस्तूंपेक्षा चिनी वस्तू स्वस्त असल्यामुळे दोन पैसे बचत होत असल्याने अनेक ग्राहक चिनी वस्तूंचे अक्षरशः अधीन झाले आहेत. चिनी मांज्याप्रमाणेच अन्य वस्तूंवर देखील बंदी आणल्यास बेरोजगारी कमी होईल, हीच अपेक्षा!

थंडीचा जोर कमी

सुमारे महिनाभर देशात अनेक राज्यांमध्ये आलेली थंडीची लाट या आठवड्यात कमी होत असल्याचे जाणवत आहे. अनेक शहरांमध्ये दिवसा थोडी ऊबदार हवा आणि रात्री मात्र गारवा जाणवत आहे. रात्रीच्या किमान तापमानात देखील वाढ झाली असून गेल्या आठवड्यात शून्याकडे सरकणारा पारा आता दहा कडे सरकत असून अनेक राज्यांमध्ये रात्रीचे किमान तापमान आता पाच अंशांपेक्षा जास्त होत आहे. थंडीचा जोर कमी झाल्याचे जाणवताच मध्यप्रदेशमध्ये काही शाळांनी इयत्ता आठवीचे वर्ग पुन्हा सुरू करण्याची शासनाकडे मागणी केली. परंतु तज्ज्ञ आणि विविध अधिकार्‍यांच्या झालेल्या बैठकीत शाळा सोमवार (ता. १६) पासूनच सुरू करण्याचा निर्णय कायम करण्यात आला आहे. थंडीमुळे अचानाक शाळांना सुट्या जाहीर करण्यात आल्यामुळे मात्र अनेक पालक मुलांसह गावांना गेले.

कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप

(पनवेल):  राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...