शुक्रवार, २ डिसेंबर, २०११

नगरपरिषदांच्या मतदानाच्या तारखेत बदल- ८ डिसेंबरऐवजी ११ डिसेंबर

मुंबई, ता. २ - राज्यातील १८८ नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या निवडणुका ८ डिसेंबर २०११ रोजी होणार होत्या. परंतु बर्‍याच नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या प्रभागातील उमेदवारी अर्जांसंदर्भात न्यायालयात अपील दाखल झाल्यामुळे मतदानाच्या तारखेत बदल करण्यात आला असून आता १७७ नगरपरिषदांच्या निवडणुका ११ डिसेंबर २०११ रोजी, तर आज (ता. २ डिसेंबर) न्यायालयाचा निकाल लागलेल्या नगरपरिषदांच्या निवडणुका १३ डिसेंबर रोजी होणार आहेत, असे निवडणुक आयोगातर्फे कळविण्यात आले आहे.
अपील दाखल न झालेल्या नगरपरिषदा, नगरपंचायतींबाबत तसेच अपीलांवरील न्यायालयाचा निर्णय १ डिसेंबर २०११ पर्यंत प्राप्त झाला आहे. त्यांचे मतदान ११ डिसेंबर रोजी घेण्यात येईल. या निवडणुकांचा जाहीर प्रचार ९ डिसेंबर २०११ रोजी रात्री बाराला संपेल. त्यांची मतमोजणी त्याच दिवशी सायंकाळी साडेसहाला किंवा दुसर्‍या दिवशी १२ डिसेंबरला होईल.
(उर्वरित वृत्त शनिवार (ता. ३) च्या पोस्टमध्ये वाचा...)

बुधवार, ३० नोव्हेंबर, २०११

अपीलाव्यतिरिक्त इतर जागांचा निवडणूक कार्यक्रम पूर्वनियोजनाप्रमाणेच [नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-२०११]



 मुंबई, ता. ३०- नगरपरिषदांच्या निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी दिलेल्या उमेदवारी अर्जासंदर्भातल्या निर्णयाविरुद्ध न्यायालयात अपील दाखल झालेल्या जागेकरिता अपीलाचा निकाल लागल्यानंतर तिसर्‍या दिवसापर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असेल. परंतु अपील दाखल न झालेल्या जागांचे चिन्हवाटप आणि इतर कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमानुसारच होईल.
 

राज्यातील १८८ नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी ८ डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्जाबाबत अपील दाखल झालेल्या जागांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा टप्पा पूर्ण झाला असल्याने या जागांचा निवडणूक कार्यक्रम पू्र्वीच निश्चित केल्यानुसार पार पडेल.
 

महाराष्ट्र नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक नियम १९६६ मधील नियम ४ च्या पोटकलम ३ अनुसार अपीलाचा निकाल लागण्यानंतर तिसर्‍या दिवसापर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असेल. तसेच यानंतर मतदान दिनांक राज्य निवडणूक आयोगाकडून स्वतंत्रपणे कळविण्यात येईल, असे राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे.

मंगळवार, २९ नोव्हेंबर, २०११

चिदंबरम यांचे आवाहन : स्वतःपासून सुरूवात करण्याची अपेक्षा!

केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी काँग्रेस पक्षातील ज्येष्ठांनी तरुणांसाठी जागा रिकामी करण्याचे आवाहन नुकतेच युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय मेळाव्यात केले आहे. या माध्यमातून युवकांचे मन जिंकण्याचा प्रयत्न त्यांनी निश्चितपणे केला आहे. चिदंबरम यांनी स्वतःपासून सुरूवात करणे अपेक्षित आहे. आगामी निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा व्होट बँक आपल्याकडे खेचुन आणण्यासाठी देखील ही तयारी असावी. काहीही असो. हे मात्र खरे आहे. राजकारण्यांनी सत्तेची अभिलाषा न बाळगता तरुणांसाठी राजकारणात संधी उपलब्ध करणे ही काळाची गरज ठरत आहे. तरुण म्हणजे मॅच्युअर, परिपक्व नसतो हा समज आताच्या तरुणांनी आपल्या बुद्धीच्या कौशल्यावर आणि चुणुक दाखवून खोटा ठरवला आहे. केवळ काँग्रेस पक्षच नव्ह, तर सर्वच राजकीय पक्षातील ज्येष्ठांनी आता नव्या दमाच्या तरुणांना राजकारणात संधी द्यावी. त्यांच्या राजकीय वाटचालीतील चांगल्या कार्याच्या अनुभवाचेच केवळ मार्गदर्शन तरुणांना करावे. राजकाराणातून देखील निवृत्त होण्यासाठी आचारसंहिता तयार करण्याची गरज आहे. राजकारणात राहून वडिल आणि मुलगा वेगवेगळ्या पक्षात असल्याची अनेक उदाहरणे आहेत. परंतु हे सारे उपलब्ध सुविधांचा लाभ घेण्यासाठीच असल्याचे सहज जाणवते. कायदे तितक्या पळवाटा या समजाच्या विपरित पळवाटा..तितके कायदे अशी परिस्थिती तरुणांनी निर्माण करावी. आपल्या शिक्षणाचा नव्हे उच्च-शिक्षणाचा फायदा तरुणांनी समाजासाठी (नागरिकांसाठी) करावा.
आधी स्वतः करावे मग दुसर्‍या सांगावे या उक्तीप्रमाणे चिदंबरम यांच्यासारख्या अनेक राजकारण्यांनी कृती करून एक आदर्श घालून द्यावा, हीच अपेक्षा.

मंगळवार, २२ नोव्हेंबर, २०११

मतदाराच्या ओळखीसाठी आता आधार ओळखपत्रासही मान्यता

मुंबई, ता. २२ - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या मतदानासाठी ओळखीचा पुरावा म्हणून मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त अन्य १६ पुराव्यांमध्ये आता आधार ओळखपत्राचाही समावेश करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या नव्या निर्णयानुसार मतदाराकडे ओळख पटविण्यासाठी छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र नसल्यास किंवा त्यावरून मतदाराची ओळख पटत नसल्यास आधार ओळखपत्रासह १७ पुराव्यांपैकी एक पुरावा सादर करावा लागेल. यानंतरच मतदारास मतदान करता येईल.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या मतदानाप्रसंगी मतदाराच्या ओळखीसाठी पुढीलपैकी कोणताही एक पुरावा आवश्यक आहे: १. पासपोर्ट, २. वाहन चालविण्याचा परवाना ३. आयकर विभागाकडील पॅनकार्ड, केंद्रशासन, राज्यशासन, सार्वजनिक उपक्रम किंवा स्थानिक स्वराज्या संस्थेने आपल्या कर्मचार्‍यांना छायाचित्रासह दिलेली ओळखपत्रे, राष्ट्रीयकृत बँका किंवा टपाल कार्यालयातील खातेदाराचे छायाचित्र असणारे पासबुक, स्वातंत्र्य सैनिकाचे छायाचित्र असलेले ओळखपत्र, राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यापूर्वी सक्षम प्राधिकार्‍याने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जाती, विशेष मागासवर्ग प्रवर्ग आदींना छायाचित्रासह दिलेले प्रमाणपत्र, निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी सक्षम प्राधिकार्‍याने दिलेला छायाचित्रासह अपंगत्वाचा दाखला, छायाचित्रासह मालमत्तेबाबतची कागदपत्रे, तसेच नोंदणीखत इ., निवडणूनक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी छायाचित्रासहित मिळालेला शस्त्रास्त्राचा परवाना, निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी मिळालेले राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेखालील छायाचित्र असलेले ओळखपत्र, निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी निवृत्त कर्मचार्‍यांना मिळालेले छायाचित्र असलेले ओळखपत्र, निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी निवृत्त कर्मचार्‍यांचा विधवा, अवलंबित्वाच्या व्यक्ती यांना छायाचित्रासह मिळालेले ओळखपत्र, निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी वयस्कर निवृत्ती वेतनधारक अथवा त्यांच्या विधवांना मिळालेले छायाचित्र असलेले प्रमाणपत्र, केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा योजनेचे छायाचित्रासहित कार्ड, निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी मिळालेली शिधापत्रिका, आणि आधार ओळखपत्र इ.

मंगळवार, १८ ऑक्टोबर, २०११

विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखाना: ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ

शिर्डी ता. १८ - राहाता तालुक्यातील प्रवरानगर येथे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ नुकताच राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे कृषी आणि पणनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील होते.
कारखान्याने ६१ गळीत हंगाम यशस्वीरित्या पार पाडले आहेत. कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून अहमदनगर जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, मुळा प्रवरा इले. को. ऑप. सोसायटी लि. श्रीरामपूरचे चेअरमन अण्णासाहेब म्हस्के पाटील उपस्थित होते.
या कारखान्याचा आदर्श राज्यातील अन्य कारखाने घेत असल्याची प्रशंसा श्री. भुजबळ यांनी करून नगर-मनमाड रस्त्यासह राज्यातील इतर रस्त्यांची कामे लवकरच पूर्ण केली जातील असे सांगितले. यावेळी अध्यक्ष श्री विखे पाटील यांनी कारखान्याच्या कार्याचा आढावा घेतला. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात साखर उत्पादनास सुरवात होणार असल्याचे स्पष्ट केले. याचबरोबर, यंदाच्या दिवाळीसाठी कामगारांना १८ टक्के बोनस जाहीर केला.

सोन्याची संधी..संधीचं सोनं करण्याची योग्य वेळ!

जग जवळ येऊन आता बरेच दिवस झालेत. गेल्या काही वर्षात तर व्यस्तता सुद्धा वाढली आहे. आलेली संधी ही सोन्याची असून, संधीचं सोनं करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

अनेक वर्षांपूर्वी पाचव्या इयत्तेपर्यंत विद्यार्थ्यांना फारसा अभ्यास नसल्याने सुट्टीत गावी जाणे, भरपूर खेळणे, दिवाळीत फराळ तयार करण्यात आईला मदत करणे अशा गोष्टी सहज शक्य होत्या. मात्र आता ही परिस्थिती बदलली असून आजकालच्या अगदी बालवाडीत जाणार्‍या (सध्याच्या भाषेत के.जी.) जाणार्‍या विद्यार्थ्यांना सुध्दा अभ्यासाचं ओझं प्रचंड असतं, काहींना हे पेलता पेलवत नाही. के.जी. पासून कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्यालाच (अर्थात अभ्यास करणार्‍या) अभ्यास, ट्यूशन, प्रॅक्टिकल असा अक्षरशः ताण असल्याचं जाणवतं. नोकरदार मंडळींचे, सकाळी टिफिन घेऊन जाणे आणि संध्याकाळी घरी येणे, हे सुद्ध आता जवळपास दुर्मिळ झाले आहे (शासकीय नोकरी मात्र काही प्रमाणात अपवाद). नोकरीची चाकोरी, चाकोरीबद्ध जीवन आणि जॉब सॅटिसफॅक्शन आता संपुष्टात आले आहे. प्रायव्हेट कंपनीत पॅकेज जरी चांगलं मिळत असलं तरीही कंपनी त्याचा मो-बदला घेणारंच. खाजगी नोकरीत असं चालायचंच...असं म्हणणार्‍या मंडळींची संख्याही कमी नाहीच. सुटीच्या दिवशी अतिरिक्त काम करून आपलं दिलेलं टार्गेट पूर्ण करण्याचा प्रयत्न करणारे कमर्चारी सुद्धा भरपूर आहेत. परंतु त्यांनी कंपनीच्या कामासाठी दिलेला अतिरिक्त वेळ लक्षात न घेता, नंतर पाहिजे तेव्हा सुट्टी देण्यासाठी कुरबुर करणारे 'बॉस' सुद्धा आहेतच. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले..याऐवजी आता बोले तैसा चाले त्याची मोजावी पाऊले...अशी परिस्थिती, वातावरण तयार झाले आहे. यामुळे बॉस इज अल्वेज राइट या उक्तीप्रमाणे काहीही झाले तरी बोलू नका, मुकाट्याने सहन करण्याशिवाय गत्यंतर नसते.

वारंवार नोकरीमध्ये बदल करणार्‍याला धरसोड न करण्याचे उपदेश द्यायला जग विसरत नाही. पण सध्याच्या काळात याशिवाय दुसरा तरणोपाय नसतो. वाढत्या महागाईच्या काळात कोणतीही कंपनी अगदी सुमार पॅकेज वाढवून मोकळी होते. परिणामी आधुनिक परिभाषेत "स्विच ओव्हर" करून पॅकेजमध्ये किमान दुप्पट वाढ करून घेण्याचा प्रयत्न होताना दिसतो. गेल्या दशकात बेरोजगारी आहे तशीच असून हिचे प्रमाण कमी होण्याची सुतराम शक्यता नाही. उच्च शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध नसल्यामुळे यात भरच पडते आहे. यामुळे कंपन्यांना सुद्धा एखादा उच्चपदस्थ कर्मचारी नोकरी सोडून गेला तरीसुद्धा दुसरा कर्मचारी कमी पगारावर सहज उपलब्ध होत असल्याने कंपन्या बिनधास्त असतात. तर, सध्या आयटी, कॉर्पोरेट कंपन्यांची व्याप्ती वाढत आहे. विशिष्ट अनुभवानंतरच नोकरीत घेण्याचा ट्रेन्ड आता बदलत असून युवकांना नोकरी देण्यावर काही कंपन्या भर देत आहेत. अशा कंपन्याना देखील हुशार कर्मचार्‍यांची नितांत गरज असल्याने, कॅम्पस इंटरव्ह्यू सारख्या ठिकाणीच भक्कम पॅकेज जाहीर करून भावी कर्मचार्‍याला महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्वरीत नोकरी देऊन अशा कंपन्या 'उद्याच्या चिंतेतून' मोकळे होतात. विद्यार्थ्यांनी, गेलेली वेळ, काळ परत येत नाही...हे ध्यानात ठेऊन, एकप्रकारे ही सोन्यासारखी संधीच उपलब्ध होत असून, या संधीचं सोनं करून विद्यार्थ्यांनी देखील भविष्याच्या चिंतेतून मुक्त व्हावे हीच अपेक्षा!

मंगळवार, ११ ऑक्टोबर, २०११

सिडकोतर्फे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांच्या घरांच्या सर्वेक्षणास सुरुवात

मुंबई, ता. १० - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी संपादित करावयाच्या क्षेत्रातील प्रकल्पग्रस्त कुटुंबियांच्या आर्थिक व सामाजिक सर्वेक्षणाच्या कामास सोमवार (ता. १०) पासून सुरुवात करण्यात आली. चिंचपाडा येथील काळभैरव मंदिराच्या प्रांगणात बैठक होऊन सुरुवात झाली.
नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आणि पुनर्स्थापना धोरण निश्चित करायची प्रक्रिया सुरू असून, सर्वेक्षणासाठी 'स्पार्क' या अशासकीय स्वयंसेवी संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वेक्षण प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी सर्वेक्षणाची प्रत संबंधित प्रकल्पग्रस्तास देण्यात येणार असल्याची माहिती संस्था प्रमुख श्री. जोकिन यांनी सांगितले.

शनिवार, १० सप्टेंबर, २०११

कसबा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात रविवारी रक्तदान

पुणे, ता. १० - येथील मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपती सार्वजनिक  गणेशोत्सव मंडळात रविवारी (ता. ११ सप्टेंबर) रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. श्री कसबा गणपती गणेशोत्सव उत्सव मंडपात सायंकाळी सहापासून ते रात्री नऊपर्यंत रक्तदात्यांना रक्तदान करता येईल. मंडळ यंदा ११९ व्या वर्षात पदार्पण करीत असून यानिमित्त विविध उपक्रम राबविले जात आहेत, असे मंडळ अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी कळविले आहे.

गुरुवार, १ सप्टेंबर, २०११

श्री. कसबा गणपती प्राणप्रतिस्थापना आणि पुरस्कार सोहळा


पुणे, ता. ३१- पुण्यनगरीचे ग्रामदैवत आणि मानाचा पहिला श्री कसबा गणपती- श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा ११९ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. यावर्षी मंडळाची प्राणप्रतिष्ठापना डॉ. संप्रसाद विनोद यांच्या हस्ते संपन्न होत आहे. तसेच पुण्यनगरीच्या नावलौकिकात भर घालणार्‍या ५ मान्यवरांना “श्री कसबा गणपती पुरस्कार” डॉ. संप्रसाद विनोद यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.

यंदा सर्वश्री सुधीर गाडगीळ (सुप्रसिद्ध निवेदक आणि मुलाखतकार), रुता देशमुख (छत्रपती पुरस्कार विजेती – रोप मल्लखांब )
,डॉ. संचेती (संचेती हॉस्पिटल), कैलाश आणि संजय काटकर (संस्थापक - क्विक हिल  कंपनी), वेदमूर्ती गणेश कृष्ण जोशी कोतवडेकर यांना हा पुरस्कार देण्यात येईल. यावर्षी मंडळातर्फे देखावा म्हणून कलादिग्दर्शक श्री. गिरीश कोळपकर यांच्या सादरीकरणातून गणाधिशाय राजमंडप सादर केला आहे. श्री. कसबा गणपती प्राणप्रतिस्थापना आणि पुरस्कार सोहळा- श्री. कसबा
गणपती उत्सव मंडप येथे गुरुवारी (ता. १ सप्टेंबर) सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे, कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळ पदाधिकारी, कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरीक परीश्रम घेत आहेत, असे अध्यक्ष श्रीकांत थेटे यांनी कळविले आहे. अधिक माहितीसाठी ९४२३०१४३४६ येथे संपर्क साधावा.

रविवार, २८ ऑगस्ट, २०११

दत्ता पाटील यांच्या निधनामुळे सर्वसामान्यांचा आवाज हरपला- भुजबळ

मुंबई, दि. 27 : महाराष्ट्र विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते दत्तात्रय नारायण उर्फ दत्ता पाटील यांच्या निधनामुळे सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा आवाज हरपला, अशा शब्दात राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
श्री. भुजबळ यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, स्वातंत्र्यलढ्यासह संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत दत्ता पाटील यांनी अमूल्य योगदान दिले. 25 वर्षांहून अधिक काळ अलिबागचे नेतृत्व करीत असताना त्यांनी या विभागातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे हित कधीही नजरेआड होऊ दिले नाही. कोकण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रालाही त्यांनी मोलाचे योगदान दिले. या लोकांचा विधिमंडळातील एक कणखर आवाज म्हणून ते ओळखले जात. त्यांच्या निधनामुळे एक सच्चा, तळमळीचा लोकप्रतिनिधी काळाच्या पडद्याआड गेला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप

(पनवेल):  राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...