शीण सुस्ती महानिद्रा, क्षणात पळवी चहा
प्रभाते तोंड धुवोनी, घेता वाटे प्रसन्नता...
अर्धांगिनी हस्ते घेता, निद्रा तात्काळ विरघळे
पुन्हा स्नानांतरे घेता, अंगी चैतन्य सळसळे...
लिंबुयुक्त विना दुग्ध, अरुची पित्त घालवी
शर्करेविना घेता, मधुमेह न गांजवी...
शितज्वर शिरःशूळा, खोकला नाक फुरुफुरा
गवतीपत्र अद्रकयुक्त, प्राशित जाई सत्वरा...
भोजनपूर्व प्राशिता, मंदाग्नी, पित्तकारका
घोटता घोटता वाढे, टॅनिन जहरकारक...
चहाविना आप्त स्नेह्यांचे, स्वागतासी अपूर्णता
यास्तव भूतल जन म्हणती ह्याची अमृता...
इति सुहासविरतिम् चहास्तोत्रम्
चहाबाजप्रित्यर्थम् संपूर्णम्...।।।
(संग्रहित...)
मार्चमध्ये पनवेल येथे चौथे राज्यव्यापी साहित्य संमेलन: कवी, गजलकारांना सहभागी होण्याचे संस्थांचे आवाहन
पनवेल (ता. ११): यंदाचे चौथे एकदिवसीय राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलन पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत. याकरिता सहभागी होऊ इच्छिणाऱ्या राज्यातील नामवंत कवी, गजलकारांनी आपल्या स्वरचित कविता, गजल २० फेब्रुवारीपर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन कांतीलाल प्रतिष्ठान रायगड आणि विश्वव्यापी मराठी साहित्य, सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी केले आहे. अभिजात मराठी भाषेच्या जतनाकरिता गेली अनेक वर्षे दोन्ही संस्था कांतीलाल कडू यांच्या नेतृत्वाखाली कवी संमेलने, गजल मुशायरा, चर्चासत्रांपासून मराठी भाषेचा गोडवा वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. सकाळी वारकरी दिंडीतून ‘ज्ञानोबा-तुकोबा’ यांच्या गजरासह ग्रंथ दिंडीत टाळ, चिपळ्या, तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन पारंपरिक पद्धतीने नयनरम्य पालखी काढण्यात येईल. या परंपरेच्या माध्यमातून पनवेल शहराचे साहित्य, संस्कृती आणि सांस्कृतिक वारसा जतन केला जात आहे. सकाळी दिंडी, उद्घाटन सोहळा, एक-एक तासाच्या अवधीची दोन चर्चासत्रे, कवी आख्यान, गजल मुशायरा याशिवाय अन्य ...