इंदूर- ता. ८ डिसेंबर- मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत अपेक्षानुरुप विजयाचा आनंद ओसंडून वाहणार्या मुख्यमंत्री शिवराज चव्हाण यांनी प्रदेशाच्या विकासात काँग्रेसने सहकार्य करण्याचे आवाहन आज आपल्या आभारप्रदर्शनात केले. श्री. चव्हाण यांनी देखील गुजराथचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणेच हॅटट्रिक केली आहे. मध्यप्रदेशात तिसर्यांदा कमळ फुलल्याचा आनंद श्री. चव्हाण यांच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होता.
आज संध्याकाळी श्री. शिवराज चव्हाण यांनी विधानसभा निवडणूक २०१३ मध्ये प्रदेशातील मतदारांनी भाजपास बहुमताने विजय मिळवून दिल्याबद्दल मतदारांचे, पक्षकार्यकर्ते, पदाधिकारी, पक्षाचे केंद्रीय नेतृत्व, ज्येष्ठ-श्रेष्ठांचे आभार मानले. निवडणुकीत आरोप-दोषारोप होतच असतात, माझा कोणावरही राग नाही. निवडणुका पार पडल्या. व्हायचे तेवढे राजकारण झाले. आता काँग्रेसने देखील प्रदेशाच्या विकासासाठी आपल्याला सहकार्य करण्याचे आवाहन श्री. चव्हाण यांनी केले.
यावेळी श्री. चव्हाण म्हणाले की, जनता जनार्दनाच्या स्नेह आणि प्रेमामुळेच पक्षास बहुमत प्राप्त झाले आहे. पक्ष कार्यकर्त्यांनी विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याचा त्यांनी आवर्जुन उल्लेख केला. आपण अद्याप सामान्य कार्यकर्ता आणि जनतेचे सेवक आहोत. पक्षाने आपल्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी दिली याबद्दल त्यांनी पक्षाचे आभार मानले. मध्यप्रदेश हे आपल्यासाठी मंदीर असून प्रदेशातील सर्व नागरीक आपले देव असल्याचे त्यांनी सांगितले. विजयासोबत विनम्रतेस कधीही विसरू नये, घमेंड करू नये असा मोलाचा सल्ला देखील श्री. चव्हाण द्यावयास विसरले नाहीत.
क्षणचित्रे-
* शिवराज चव्हाण यांना पेढा भरविण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी.
* आपल्या सर्व भाच्यांचे आभार..असा उल्लेख श्री. चव्हाण यांनी केल्यानंतर...शिवराज मामा की जय...घोषणांनी परीसर दुमदुमला.
मार्चमध्ये पनवेल येथे चौथे राज्यव्यापी साहित्य संमेलन: कवी, गजलकारांना सहभागी होण्याचे संस्थांचे आवाहन
पनवेल (ता. ११): यंदाचे चौथे एकदिवसीय राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलन पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत. याकरिता सहभागी होऊ इच्छिणाऱ्या राज्यातील नामवंत कवी, गजलकारांनी आपल्या स्वरचित कविता, गजल २० फेब्रुवारीपर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन कांतीलाल प्रतिष्ठान रायगड आणि विश्वव्यापी मराठी साहित्य, सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी केले आहे. अभिजात मराठी भाषेच्या जतनाकरिता गेली अनेक वर्षे दोन्ही संस्था कांतीलाल कडू यांच्या नेतृत्वाखाली कवी संमेलने, गजल मुशायरा, चर्चासत्रांपासून मराठी भाषेचा गोडवा वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. सकाळी वारकरी दिंडीतून ‘ज्ञानोबा-तुकोबा’ यांच्या गजरासह ग्रंथ दिंडीत टाळ, चिपळ्या, तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन पारंपरिक पद्धतीने नयनरम्य पालखी काढण्यात येईल. या परंपरेच्या माध्यमातून पनवेल शहराचे साहित्य, संस्कृती आणि सांस्कृतिक वारसा जतन केला जात आहे. सकाळी दिंडी, उद्घाटन सोहळा, एक-एक तासाच्या अवधीची दोन चर्चासत्रे, कवी आख्यान, गजल मुशायरा याशिवाय अन्य ...
