कोल्हापूर, दि. १४ फेब्रुवारी: शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर क्रीडा संकुलात आजपासून सुरू झालेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ व्हॉलीबॉल पुरूष गटाच्या स्पर्धेमध्ये आज बाद फेरीच्या सामन्यांत गुजरात विद्यापीठ (अहमदाबाद), राजस्थान केंद्रीय विद्यापीठ (अजमेर), वीर नर्मद दक्षिण गुजरात विद्यापीठ (सूरत), पॅसिफिक विद्यापीठ (उदयपूर) आणि मोहनलाल सुकादिया विद्यापीठ (उदयपूर) यांच्या संघांनी विजयी सलामी दिली. महाराष्ट्राच्या जळगाव आणि परभणीच्या संघांनी चुरशीची लढत देऊनही पहिल्याच दिवशी स्पर्धेबाहेर पडावे लागले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी), महारामा प्रताप विद्यापीठ (उदयपूर) आणि धर्मसिंह देसाई विद्यापीठ (नाडियाद) या संघांनी उपस्थिती न दर्शविल्यामुळे अनुक्रमे चारोतार विद्यापीठ (चुंग, जि. आणंद), जनार्दन रायनगर राजस्थान विद्यापीठ (उदयपूर) आणि सरदार पटेल विद्यापीठ (वल्लभ वैद्यनगर) यांना पुढे चाल देण्यात आली.
अत्यंत चुरशीच्या लढतीत अहमदाबादच्या गुजरात विद्यापीठाने जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा २५-१९, २५-१९, १२-२५, १६-२५, १५-१० असा ३-२ ने पराभव केला. जळगावच्या संघाने अत्यंत चिवट झुंज दिली.
राजस्थान केंद्रीय विद्यापीठाने परभणीच्या मराठवाडा कृषी विद्यापीठाचा २३-२५, १४-२५, २५-१४, २५-१७, १५-१२ असा ३-२ ने पराभव केला. पिछाडीवरून जोरदार मुसंडी घेत राजस्थान विद्यापीठाने सामन्यावर वर्चस्व मिळवले आणि अखेरचे तीन सेट सलग जिंकत सामना जिंकला
.
सूरतच्या वीर नर्मद दक्षिण गुजरात विद्यापीठाच्या संघाने बिकानेरच्या महाराजा गंगासिंह विद्यापीठाचा २५-१८, २५-१०, २५-१३ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. उदयपूरच्या पॅसिफिक विद्यापीठाने गांधीनगरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टीचर एज्युकेशन संघाचा २५-८, २५-१६, २५-१२ असा सहज पराभव केला तर उदयपूरच्याच मोहनलाल सुकादिया विद्यापीठानेही जयपूरच्या जयनारायण व्यास विद्यापीठाचा २५-१५, २५-२०, २५-१६ असा पराभव केला.
मार्चमध्ये पनवेल येथे चौथे राज्यव्यापी साहित्य संमेलन: कवी, गजलकारांना सहभागी होण्याचे संस्थांचे आवाहन
पनवेल (ता. ११): यंदाचे चौथे एकदिवसीय राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलन पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत. याकरिता सहभागी होऊ इच्छिणाऱ्या राज्यातील नामवंत कवी, गजलकारांनी आपल्या स्वरचित कविता, गजल २० फेब्रुवारीपर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन कांतीलाल प्रतिष्ठान रायगड आणि विश्वव्यापी मराठी साहित्य, सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी केले आहे. अभिजात मराठी भाषेच्या जतनाकरिता गेली अनेक वर्षे दोन्ही संस्था कांतीलाल कडू यांच्या नेतृत्वाखाली कवी संमेलने, गजल मुशायरा, चर्चासत्रांपासून मराठी भाषेचा गोडवा वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. सकाळी वारकरी दिंडीतून ‘ज्ञानोबा-तुकोबा’ यांच्या गजरासह ग्रंथ दिंडीत टाळ, चिपळ्या, तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन पारंपरिक पद्धतीने नयनरम्य पालखी काढण्यात येईल. या परंपरेच्या माध्यमातून पनवेल शहराचे साहित्य, संस्कृती आणि सांस्कृतिक वारसा जतन केला जात आहे. सकाळी दिंडी, उद्घाटन सोहळा, एक-एक तासाच्या अवधीची दोन चर्चासत्रे, कवी आख्यान, गजल मुशायरा याशिवाय अन्य ...