मुख्य सामग्रीवर वगळा

“शतकी लग्नगाठ” बांधायला लावणारी...अर्धशतकी लग्नगाठ!

श्री. किशोर कुळकर्णी आणि माझा परिचय तसा ‘दैनिक तरूण भारत ’ पासूनचा..। पण त्यांच्या प्रकाशित झालेल्या या पुस्तकाचे परिक्षण करण्याइतका काही मी पात्र नाही. जेव्हा विद्यार्थ्याचा शिक्षक होतो, तेव्हा परीक्षक होऊन परीक्षा घेतली जाते, परिक्षण केले जाते, मी मात्र अद्याप विद्यार्थीच आहे. दुसरं म्हणजे माझ्या लग्नगाठीला अद्याप एक तप सुद्धा पूर्ण झालेलं नाही, आणि विविध दिग्गजांनी त्यांची मतं इथे प्रस्तुत केली आहेत परिणामी, मी या पुस्तकाविषयी काय लिहिणार? पण दिलेली जबाबदारी पूर्ण करावीच लागेल, म्हणून या क्षणी पुस्तकाचे परिक्षण करण्याचा केलेला हा छोटासा प्रयत्न...!
तसं पाहिलं तर ‘किशोर’ नावाच्या व्यक्तींचा स्वभाव जरी भिडस्त वाटत असला तरीही त्यांना लोकांच्या गरजा, आवडी-निवडी यांची जाणीव असते. आपल्या कार्यानेच ते लोकप्रिय होऊन सर्वश्रृत होऊन यशस्वी होतात, त्यांच्या कार्याचा सुगंध त्रिभुवनी पसरतो. स्व. गायक किशोर कुमार यांच्या उदाहरणाने आपला या गोष्टीवर विश्वास नक्की बसावा. सुरवातीला किशोर कुळकर्णी यांचे लेख ‘दैनिक सकाळ’ मध्ये टप्प्याटप्प्याने मालिकेच्या माध्यमातून अनेक भागात प्रसिद्ध करण्यात आले. सोलापूर च्या नागेश सुरवसे यांनी किशोर यांचे लेख आपल्या सनराईज प्रकाशन च्या माध्यमातून पुस्तक रुपाने प्रसिद्ध केले म्हणजे ही किशोर कुळकर्णी यांच्या लेखांना मिळालेली लोकप्रियतेची पोचपावतीच म्हणावे लागेल. एकूण 29 दाम्पत्यांच्या आयुष्याची प्रदीर्घ वाटचाल आणि लग्नानंतर सुरू झालेला सहजीवनाचा प्रवास यात वर्णन करण्यात आला आहे.
विशेष उल्लेखनीय म्हणजे विको वज्रदंती चे मालक श्री. गजानन पेंढरकर यांची मुलाखत मनात घर करते. खानदेशच्या मातीशी त्यांचा संपर्क आल्यामुळे त्यांची खानदेशविषयी ओढ आहे. आणि ‘निसर्ग-पुत्र’ असा बहुमान मिळावा इतके श्री. पेंढरकर यांचे कार्य आहे. बेरोजगार तरुणांनी किंवा संसारात अनंत अडचणी आल्या तरीही त्यावर मात कशा पद्धतीने करावी हे नवदाम्पत्यांनी श्री. व सौ. पेंढरकर यांच्याकडून शिकावे...। स्वतः किशोर यांनी प्रवासात असताना 80 वर्षाच्या आजोबांची आस्थेवाईकपणे केलेली चौकशी, आणि पाटील बायोटेक्स चे प्रमोद पाटील यांच्या आई वडिलांची लगेच घेतलेली मुलाखत यावरुन त्यांच्यातली तगमग लक्षात येते. आईवडिलांविषयी जी बारिक माहिती मुलाला सुद्धा माहिती नव्हती, ती किशोर यांनी त्या आई वडिलांच्या हृदयात डोकावून जाणून घेतली आणि आपल्यातल्या हाडाच्या पत्रकाराची ओळख दिली आहे. खानदेशातील ज्येष्ठ राजकारणी, ज्यांचा विरोधक सुद्धा आदर करतात आणि ज्यांचे मार्गदर्शन सुद्धा घेतले जाते असे श्री. ओंकार आप्पा वाघ यांची लग्नानंतरची यशस्वी 50 वर्ष, अत्यंत हालाखीत असलेले गंभीरखाँ व सौ. तुळसाबाई तडवी दाम्पत्य अशा अनेकांच्या मुलाखती थोडक्यात म्हणजे समाजाच्या सर्व स्तरातल्या लोकांच्या मुलाखती घेतल्या आहेत.
सखोल विचार केल्यास बऱ्याच जणांनी आपल्या संसाराची सुरवात करताना अत्यंत गरीबीचे दिवस पाहिले आहेत हे जाणवते. काळ हा झपाट्याने पुढे जातो. आज जरी सगळ्यांचेच सु-दिन असले तरीही अनेकांनी हाडाची काडं करुन संसाराचा रथ यशस्वीपणे पुढे हाकला आहे. अर्थातच प्रत्येकाला पत्नीची साथ आहेच...हे सांगण्याची गरज नाहीच..!
खरं तर या पुस्तकाची संकल्पना सुरवातीला जळगावच्या एका 49 -99 रु. वस्तू विक्रीच्या दुकानासमोर उभे राहून किशोर यांनी त्यांच्या एका जीवलग मित्राशी चर्चा करून मांडली होती, संकल्पनेस मूर्त स्वरुप येईल, अशी पुसटशी कल्पना करण्यापूर्वीच पूर्ण झालेल्या या अर्धशतकी लग्नगाठ- पुस्तकात ज्या दाम्पत्यांची मुलाखत प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यांच्या आजवरच्या वाटचालीचे इतके सुंदर वर्णन पाहून ती सर्व दाम्पत्य त्यांची शतकी लग्नगाठ निश्चितच पूर्ण करतील, ते सुद्धा या पुस्तकातल्या आठवणींच्या सहाय्याने, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही...लेखक किशोर कुळकर्णी यांनी तोपर्यंत त्यांची “अर्धशतकी लग्नगाठ” पूर्ण केली असेल, आणि उपरोक्त सर्वांची “शतकी लग्नगाठ” ते वाचकांपर्यंत पोहोचवतील, हाच विश्वास...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.