मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जुलै, २०१४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नवी मुंबईकरांना टोलचा भार लावणार नाही – उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

मुंबई - (प्रतिनिधी) - सायन ते कळंबोली हा दहा पदरी रस्ता मोकळा करण्यात आला आहे. या रस्त्याचा ९५ टक्के भाग सिडकोच्या कार्यक्षेत्रात येतो. सिडकोच्या उभारणीत येथील स्थानिक शेतकऱ्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे या रस्त्यावरील टोलचा भार नवी मुंबईकरांवर पडू नये, यासाठी आपण आजच्या कॅबिनेट बैठकीत सिडकोतर्फे १२०० कोटी देण्याची मागणी करणार असल्याचे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. विष्णूदास भावे नाट्यगृह,वाशी येथे पार पडलेल्या नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या निर्धार मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली. ठाणे जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात टोलनाके आहेत. हे टोलनाके कसे कमी करता येतील, यावरही विचारविमर्श चालू असल्याचे अजित पवार म्हणाले. MMRDA, सिडको आणि राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्यांचा समन्वय साधून हे टोलनाके बंद करण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच Light Motor Vehicle ला दुचाकी, तीन चाकी आणि एसटीप्रमाणे टोलमधून वगळता येऊ शकते का? याचीही चाचपणी चालू केल्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले.

राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांना भावपूर्ण निरोप

मुंबई दि. 5 (प्रतिनिधी) - राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांना कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांतर्फे आज भावपूर्ण निरोप देण्यात आला. राज्य निवडणूक आयुक्त पदाची पाच वर्षांची यशस्वी कारकीर्द पूर्ण करुन श्रीमती सत्यनारायण आज निवृत्त होत आहेत. यानिमित्त आज आयोगाच्या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यातर्फे त्यांना एका अनौपचारिक समारंभात भावपूर्ण निरोप देण्यात आला. याप्रसंगी राज्य निवडणूक आयोगाचे सचिव, मधुकर गायकवाड यांच्या हस्ते त्यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देण्यात आला. कोणत्याही प्रकारे आपला औपचारिक निरोप समारंभ करु नये अशा प्रकारच्या सूचना श्रीमती सत्यनारायण यांनी आधीच कार्यालयातील अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारत त्यांनी निरोप घेतला आणि सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. हा आगळावेगळा निरोप समारंभ भाषणाविनाच पार पडला.