मुख्य सामग्रीवर वगळा

सुट्टीची भटकंती...(६)

...सकाळी उठून गावात फेरफटका मारावा या उद्देशाने तयार झालो आणि गावात गेलो. अगदी गावाच्या सीमेपर्यंत पोहोचलो. गावाच्या सीमेवर अगदी टिप्पीकल वास येत होता...तसाच उलट पावली परत फिरलो. शासनाची शौचालयासंदर्भात असलेली योजना स्वीकारण्यास अजूनही ग्रामस्थ मंडळी तयार नाहीत असं दिसलं. ठराविक घरांमध्येच किंवा घराबाहेर सिट्स बसविल्याचं लक्षात आलं. खरंतर शासनाच्या अनेक चांगल्या योजना असतात, पण त्या व्यवस्थित राबविल्या जात नसाव्या किंवा पोहोचत नसाव्या. खर्च तर होऊन जातो, हे मी तुम्हांला मागेही सांगितलंच (कदाचित हा उल्लेख अनेकदा होईल). हो, एक मात्र आहे. शासनाने ग्राम स्वच्छता चांगल्या प्रकारे राबविणार्‍या ग्रामपंचायतीला, पालिकेला बक्षिस, पुरस्कार, काही सवलती जाहीर केला असल्यामुळे अनेक गावं ही योजना चांगल्या प्रकारे कशी राबवता येईल, यशस्वी कशी होईल याचा विचार करतात आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीही करतात. या गावात सुद्धा तसंच चित्र होतं. गावात ठिकठिकाणी गल्लीच्या कोपर्‍यावर कचरा-कुंडी ठेवली होती. तसंच कचरा गोळा करण्यासाठी दररोज सकाळी ठराविक वेळेत कचरा उचलणारी गाडी, कर्मचारी किंवा घंटागाडी येत होती. ही घंटागाडी थोडी मोठी असल्यामुळे अरूंद गल्ल्यांमध्ये जाऊ शकत नव्हती. तिथे गल्लीच्या तोंडावर गाडी थांबून कर्मचारी थेट आतमध्ये येऊन कचरा नेताना दिसत होते. सगळा कचरा गोळा करून गावापासून सरासरी पाच ते सहा किलोमीटर दूर नेऊन तिथे स्वतंत्र व्यवस्था केली होती. कचर्‍यातलं प्लॅस्टिक इथे वेगळं केलं जायचं. प्लॅस्टिकच्या कॅरी बॅग्ज वापरण्याची बंदी इथेही घातलेली होती. म्हणून शासनमान्य प्रमाणातील कॅरी बॅग्ज किंवा कागदी पिशव्या वापरण्याचा आग्रह केला जात होता (कॅरी बॅग ला..मी गंमतीने वाहक पिशवी असं म्हटलं आणि आमच्या मामाला हसू आलं).
गावातल्या काही धनाढ्यांकडे खूप गाई होत्या. त्यांनी गावाबाहेर छानसं फार्म हाऊस तयार केलं होतं. इथून दूध शहरांमध्ये पाठवलं जायचं. तसंच गावच्या सरपंचाने तर दुधापासून तयार होणार्‍या पदार्थांचा छोटासा कारखानाच सुरू केला होता. त्यालाही प्रतिसाद चांगला होता. हा कारखाना बघण्याची मनात इच्छा होती. सरपंच चक्क बी. एस्सी. पीएच. डी. असल्यामुळे संशोधनातही त्याला अभिरूची होती. त्या दृष्टीने तो सुद्धा याव्यतिरिक्त काहीतरी प्रयत्न करतोय असं वाटलं.
घरी परत येताना बस स्थानकाशेजारच्या हॉटेलमधून मस्तपैकी वड्यांचा आणि मिसळीच्या रस्श्याचा वास आला. आज वडा-पाव आणि मिसळ खायची असा विचार केला आणि हॉटेलमध्ये शिरलो. पाहिलं तर थोडंस अस्वच्छ असं हॉटेल होतं. इतक्या सकाळी सुद्धा गावातल्या नागरिकांप्रमाणे माशाही उठलेल्या जाणवलं. पण विचार केला, इथले लोक तर इथे खातातच आपण ही खाऊन पाहू...वडा-पाव खायला सुरवात केली, मात्र...पाव वडा खायला सुरवात केली आणि काय विचारता। तिखट पण खावा असाच वाटणारा तो वडा होता. नाकातून पाणी यायला आणि कान खाजवायला सुरवात झाली. ऑर्डर प्रमाणे त्यांनी संगळं दिलं होतं आता खाणं आवश्यकच...। कमी गर्दी असल्यामुळे हॉटेलच्या मालकाला ते लक्षात आलं. जवळ येऊन त्याने, नवीन दिसताय? कुठून आलात? जास्त तिखट लागलं का? अरेरे...अरे, थोडा कलाकंद आण पाहू...असं एका वेटरला(कळकट कपड्यातल्या पोर्‍याला) सांगितलं. कलाकंद खाल्ल्यानंतर जरा बरं वाटलं. माझ्या समोर बसलेला एक माणूस तर चक्क मिरची कचाकचा खात होता..ते पाहून तर मलाच चर्र झालं. मिसळही खाल्ली, वरून मुद्दामच हॉटेलचा चहा प्यायलो. बिल द्यायला गेलो, मात्र खिशात पैसे थोडे कमी होते. असं कुठे जाऊ याची शक्यता नसल्याने मोजके पैसेच खिशात ठेवले होते. आता काय करावं? या विचारात असताना हॉटेलच्या मालकाने ते ओळखलं आणि तुम्हा पाहूणे आहात, राहू द्या पैसे. असं सांगितलं आणि घेतलेले पैसेही परत केले. मी खूप आग्रह केला तरी घेतले नाहीत...गावच्या माणसांच्या मायेचा ओलावा आणि शहरातील शुष्कता रूक्षपणा यावरून माझ्या लक्षात आला..!

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012