मुख्य सामग्रीवर वगळा

देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी भूमीपुत्रांना विकासातील भागीदार बनविणे आवश्यक - भुजबळ



मुंबई, दि. 14 एप्रिल : महाराष्ट्राची तसेच देशाची सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी भूमीपुत्रांना विकासातील भागीदार बनविणे अत्यावश्यक आहे, असे मत राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे व्यक्त केले.
महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळ (एमईडीसी) आणि अमेरिकास्थित लॅम्ब्डा-अल्फा इंटरनॅशनल (एलएआय) या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने 'युज ऑफ लँड रिसोर्सेस इन द डेव्हलपमेंट ऑफ महाराष्ट्रा' या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय परिषदेचे उद्धाटन केल्यानंतर ते बोलत होते. मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृहात हा उद्धाटन समारंभ झाला.
विकासकामांमध्ये राजकारण आणण्याऐवजी विकासासाठी राजकारण करण्यास आपले प्राधान्य असल्याचे सांगून श्री. भुजबळ म्हणाले की, कोणत्याही प्रकारच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी जमीन हा अत्यंत मूलभूत व आवश्यक घटक आहे. शासन अथवा खाजगी विकासक या दोन्ही घटकांनी जमीनमालकांना विश्वासात घेऊन आपल्या सद्हेतूंविषयी त्यांची खात्री पटविली तर कोणतीही अडचण येत नाही. त्यामुळे कोणताही प्रकल्प उभारत असताना तो ज्या जमिनीवर उभा करण्यात येत आहे, त्या शेतकरी, अल्पभूधारक तसेच सर्वसामान्य जनतेच्या हितरक्षणास सर्वच संबंधितांनी सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे.
यापुढील काळात राज्याची आर्थिक प्रगती खऱ्या अर्थाने साधावयाची झाल्यास सार्वजनिक-खाजगी भागीदारीला (पी-पी-पी) पर्याय नसल्याचे स्पष्ट करून श्री. भुजबळ म्हणाले की, केवळ शासनाच्या अर्थसंकल्पीय तरतुदींतून पायाभूत सुविधा विकासाचे मोठमोठे प्रकल्प हाती घेणे आणि विहित मुदतीत पूर्ण करणे अशक्य असते. त्यामुळे 'पीपीपी' तत्त्वावर प्रकल्प उभारणेच अधिक उपयुक्त ठरते. सार्वजनिक बांधकाम विभागासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात केवळ 2749 कोटींची तरतूद करण्यात आली असताना अजघडीला राज्यात सुमारे 50 हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाचे प्रकल्प खाजगीकरणाच्या माध्यमातून प्रगतीपथावर आहेत. केवळ अर्थसंकल्पावर अवलंबून राहिल्यास यातला एखादा प्रकल्पही निर्धारित वेळेत पूर्ण करणे शक्य होऊ शकणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी श्री. भुजबळ यांच्या उपस्थितीत 'एमईडीसी' व 'एलएआय' यांच्यात 'आर्थिक विकासासाठी जमिनीचा वापर' यासंदर्भात परस्पर सहकार्याचा सामंजस्य करार करण्यात आला. या कराराचा महाराष्ट्राच्या औद्योगिक, व्यावसायिक आणि आर्थिक विकासाला निश्चितपणे लाभ होईल, अशी आशा श्री. भुजबळ यांनी व्यक्त केली.
सुरवातीला 'एमईडीसी'चे अध्यक्ष विठ्ठल कामत यांनी प्रास्ताविक केले. अमेरिकन कॉन्सुलेटचे राजकीय व आर्थिकविषयक प्रमुख रॉबर्ट कार्लसन यांचेही यावेळी भाषण झाले. या कार्यक्रमास 'एलएआय'च्या अध्यक्ष डॉ. कॅरन सिएरॅकी, राज्यातील वरिष्ठ आयएएस अधिकारी, एमईडीसीचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. डॉ.सी.एस. देशपांडे यांनी आभार मानले.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012