मुख्य सामग्रीवर वगळा

'नवीन पोपट' तयार होऊ न देणे 'यशवंतांसाठी' महत्वाचे...

मालेगावचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना जाळणार्‍या संशयित पोपट शिंदे याचा मृत्यू झाला. निर्ढावलेल्या भ्रष्टाचाराने आणि भ्रष्टाचारास पोसणार्‍यांच्या स्वैराचारामुळे पोपट शिंदेंप्रमाणेच नवीन भेसळ माफिये तयार होऊ न देणे, यशवंत सोनवणे यांच्यासारख्या चांगल्या शासकीय अधिकार्‍यांसाठी आणि भ्रष्टाचारमुक्त जीवन जगण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे.
नाशिक परिक्षेत्रातील मालेगाव जिल्ह्यातील पानेवाडी प्रकल्पाजवळ इंधनात भेसळ होत असल्याची माहिती मिळाल्यावरून यशवंत सोनवणे संबंधित ठिकाणी छापा मारण्यासाठी गेले होते. घडत असलेला भेसळीचा प्रकार गंभीर आणि त्याचे स्वरूप मोठे असलेले पाहून सोनवणे यांनी आणखी काही अधिकार्‍यांना पाचारण करण्यासाठी प्रतीक्षा करीत होते. पोपट शिंदे याला समज देतानाच परिस्थिती आणखी चिघळली, यामुळे आणखी अधिकारी, कर्मचारी आवश्यक होते. दरम्यान, सोनवणे यांच्याशी झालेल्या बाचाबाची पोपट शिंदे आणि सहकार्‍यांनी सोनवणे यांच्या अंगावर इंधन टाकून त्यांना जीवंत जाळले. यात सोनवणे यांचा घटनास्थळीवरच मृत्यू झाला होता. शिंदे याला सोनवणे यांनी पकडून ठेवल्यामुळे तो देखील सुमारे सत्तर टक्के जळाल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. घटनेनंतर सहा दिवसांनी सोमवारी (ता. ३१ जानेवारी) संशयित शिंदे याचा मृत्यू झाला.
घडलेल्या घटनेमुळे शासन खडबडून जागे झाले (?) आणि ठिकठिकाणी भेसळ माफियांवर कारवाई करण्यात येऊन सुमारे दोनशे जणांना ताब्यात घेण्यात आले. मध्यंतरी पोपट शिंदे याच्या निकटवर्तीयांनी सोनवणे हे शिंदे याला पैशाची मागणी करत होते अशा आशयाची तक्रार दिली. काही क्षण ही तक्रार जरी ग्राह्य धरली, तरीसुद्धा पैसे, लाच मागणार्‍या अधिकार्‍याला, एखाद्या व्यक्तीस जीवंत जाळणे हे कोणत्या कायद्यात बसते? जाळणे अथवा जीवे मारणे हा काही अंतिम उपाय, समाधान नाही...। लाच, भ्रष्टाचार याबाबत न्याय मिळण्यासाठी स्वतंत्र विभाग आहे (मिळणारा न्याय विलंबाने मिळतो, हे वेगळे), मात्र अशा विभागांकडे धाव घेणे आवश्यक आहे.
या घटनेचा आणि अशा प्रकरणांचा थोडा अभ्यास करता, विविध बाबींची बीजे प्रथम शासन रोवते. डोईजड झाल्यानंतर राजकारण्याप्रमाणे कारवाई करायची, हे अनेकदा दिसून येते. म्हणतात नां, "ज्याच्या हातात सत्ता त्याच्या हातात भत्ता"। विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांपासून थेट जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये, मंत्रालयात भ्रष्टाचार बोकाळला असल्याचे नागरिकांच्या तक्रारींवरून जाणवते. एखाद्या मोठ्या प्रकरणाची तक्रार दाखल झाल्यानंतर कारवाई करायची, कालांतराने नागरिक विसरतात याची चांगली जाण असल्यामुळे नंतर सगळे थंडावते.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येस यशवंत सोनवणे यांनी जणू भ्रष्टाचार, भेसळ करणार्‍या माफियांविरुद्ध बलिदान दिले आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. नाण्याच्या दोन बाजूंप्रमाणे शासनात देखील चांगल्या, स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी कार्यरत आहेत. सोनवणे यांना त्यातलेच मानले जाते. आपल्यापेक्षा जग मोठे असते आपण जगाच्या तुलनेत जमिनीवरून जाणार्‍या, भिंतीवरच्या मुंगीइतके छोटे असतो. बोटावर मोजण्याइतक्या चांगल्या प्रतिमेच्या लोकांमुळेच सारे काही ऑल ईज वेल.. सुरू आहे याची जाणीव शासनाला, लोकप्रतिनिधींना देखील असतेच. शिंदेंसारख्या व्यक्तीची पोच अगदी मंत्रालयापर्यंत असल्यामुळे शिंदेने Mr. Clean अशी प्रतिमा देखील कागदोपत्री तयार करवून घेतली होती. शिंदे याने मुलीचे लग्न सुद्धा जवळ असलेल्या काळ्या पैशाने अगदी थाटामाटात लावून देऊन मोठमोठ्या हस्तींना आमंत्रित केले होते, या हस्तींनी लग्नात हजेरी सुद्धा लावली होती. आपली पोच किती आहे हे कदाचित शिंदे याने या माध्यमातून दाखवून दिले असावे. अन्यथा केवळ वडा विकणारा, नंतर किराणा दुकान चालवणारा, ढाबा चालविणारा एखादा माणूस इतक्या थाटामाटात समारंभ आयोजित करणे सध्याच्या काळात तरी अशक्यप्राय आहे.
                                       वाट चुकलेला पोपट आयुष्याचीच वाट चुकला...
पोपट शिंदे आणि त्याची बहिण मनमाड नजीक वाट चुकले होते आणि यानंतर तो तिथेच स्थायिक झाला, असे त्याचे निकटवर्तीय सांगतात. वाट चुकलेल्या या पोपट शिंदे आयुष्यात चालण्याच्या सन्मार्गाचीच वाट चुकला. आपण करीत असलेल्या कृत्याचा पश्चात्ताप देखील पोपट याला झाला नसावा. अन्यथा आपल्या कुटुंबियांवर याचा काय परिणाम होईल? याचा विचार त्याने नक्कीच केला असता आणि सत्कृत्य करू शकला असता.
आता तरी शासनाने खरोखर जागे होऊन भ्रष्टाचार आणि भेसळ करणार्‍यांवर कडक कारवाई करून त्यांना जास्तीत जास्त शिक्षा करावी. परिणामी भविष्यकाळात नव्याने तयार होणारे असले पोपट शिंदे सारखे माफिया, भ्रष्टाचार्‍यांना वेळीच पायबंद बसेल, हीच अपेक्षा!

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012