मुख्य सामग्रीवर वगळा

बारामती येथे प्रायोगिक तत्वावर बहुमजली औद्योगिक संकुल उभारावे -उपमुख्यमंत्री

मुंबई, ता. ५- बारामती येथे प्रायोगिक तत्वावर बहुमजली औद्योगिक संकुल (फ्लॅटेड इंडस्ट्रियल इस्टेट) उभारावे आणि ते गरजू लघुउद्योजकांना देण्यात यावे असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे दिले.
बारामती चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत मंत्रालयात झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. उद्योग राज्यमंत्री सचिन अहिर, उद्योग विभागाचे प्रधान सचिव ए. एम. खान, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव सुब्रत रथो, महावितरण कंपनीचे कार्यकारी संचालक अजय मेहता, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. शिवाजी, बारामती चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष धनंजय जामदार आदी उपस्थित होते.
बारामती औद्योगिक क्षेत्रातील विविध प्रश्नांचा आढावा घेताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, पुणे आणि नाशिकच्या धर्तीवर बहुमजली औद्योगिक संकुल असावे. त्यामुळे अनेक लघुउद्योजकांना तयार गाळे मिळतील. याबाबत त्वरित कार्यवाही सुरू करावी. तसेच एमआयडीसीने उद्योजकांना एकोणीस प्रकारच्या सेवा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिल्या असून या सेवांना मिळणार्‍या प्रतिसादाचा अभ्यास करावा.
बारामती औद्योगिक क्षेत्र शहर आणि ग्रामीण भागात विभागले आहे. या क्षेत्रासाठी स्वतंत्र पोलिस ठाणे स्थापन करण्याची मागणी आहे. त्याऐवजी संपूर्ण औद्योगिक क्षेत्र बारामती ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत समाविष्ट करावे.
पियाजिओ, डायनामिक्स, भारत फोर्ज, आयएसएमटी आदी कंपन्यांमधील कामे प्राधान्याने स्थानिक लघुउद्योजकांनाच मिळावी यासाठी आपण कंपन्यांच्या व्यवस्थापनास तसे पत्र लिहिणार आहोत. सौर उर्जेवर रस्त्यांवरील दिवाबत्तीची व्यवस्था करणे शक्य आहे का? याचाही अभ्यास करावा.
बारामती चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे पदाधिकारी सर्वश्री संदीप मेणसे, भारत जाधव, पोपटराव गवळे, महादेव गायकवाड, आशिष पल्लोड, शरद सूर्यवंशी, शिवाजी निंबाळकर, रमणिक थोरात, गिरिष कुलकर्णी आदी उपस्थित होते.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012